चारित्र्यहीन
चारित्र्यहीन
शहरातल्या कॉलेजच्या मुलींची सहल ही गावातील धरणावर आली होती. मुली धमाल करत होत्या. धरणात पाण्याशी खेळत होत्या. धरणातील पाण्याचा कोणालाही थांगपत्ता नव्हता. त्यांचे वागणे हे अविचाराचे बालिशपणाचे होते. त्यातील एक मुलगी सायली पाण्यात विहार करायला थोडी दूर गेली. तोच तिचा पाय पाण्याखालील खडकावरून घसरला व ती धरणातील खोल पाण्याकडे वाहत चालल्याने ती खूप आरडाओरडा करत होती. तिच्या मैत्रिणींनी सुद्धा खूप आरडाओरडा केला. मदतीसाठी हाका मारू लागल्या. तेवढ्यात धरणाच्या काठावर उभ्या असलेल्या रुपेश चे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्याने तो सायलीचा आकांडतांडव पाहिला. ती धरणातील पाण्यात बुडू लागली होती. त्याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व तिच्याकडे तो पोहत जावू लागला. ती खूप खोल पाण्यात वाहत आली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. मदतीसाठी जिवाचा आकांत करत होती. रुपेशने तिचा हात धरला तेव्हा तिला जीवात जीव आल्यासारखे वाटले. त्याने तिला पोहत जाऊन मोठ्या प्रयत्नाने धरणाच्या काठावर आणून ठेवले. ती जवळजवळ बेशुद्धावस्थेत होती. तिची परिस्थितीही गंभीर होती. तिच्या मित्रिणींनी लगेच तिला कार मध्ये टाकले व तात्काळ शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटल मदतीला हलवले. तिथे तिच्यावर औषध उपचार सुरू झाला. रुपेशलाही तिच्या जीवाची काळजी होतीच. तो सुद्धा तिच्या काळजीत व्यस्त होता. तिचा जीव वाचला पाहिजे असे त्याला त्याला मनोमन वाटत होते. शेवटी दोन दिवसानंतर त्याच्या कानावर गोड बातमी आली की तिचा प्राण हा वाचला होता.
तो तिला भेटायला शहराकडे निघाला तिला काय द्यावे म्हणून त्याने एक फुलांचा बुके घेतला व तो धावतच हॉस्पिटल मध्ये गेला. तिच्या वार्डमध्ये प्रवेश करताच त्याला तिथे तिची आई तिच्या बेडवर बसलेली दिसली. ती सुद्धा कॉटवर बसून होती. रुपेश तिच्यासमोर बुके करून तिला म्हणाला, “गेट वेल सून.” त्याला पाहताच तिने किंकाळी फोडली. तिच्या आईला सांगू लागली, “हाच तो नराधम, चारित्र्याहीन माणूस! ज्याने त्यादिवशी पाण्यात माझा विनयभंग केला. तो मला वाचवण्याच्या निमित्ताने माझ्या शरीरातील विविध अंगांना स्पर्श करत होता. माझ्या अंगाशी झोंबा झोंबी करत होता. माझ्या गुप्तांगांशी खेळत होता त्याने माझे केस ओढले. माझे कपडे फाडले. आपल्या शरीराची भूक मला वाचवण्याचे निमित्ताने भागवत होता.” तिने एवढे बोलतात तिच्या आईने सुद्धा डोळे वटारले त्याच्याकडे पाहून ती सुद्धा त्याला बोलू लागली, “राक्षसा तुला दुसरी मुलगी मिळाली नाही का खेड्यात की तू माझ्या मुलीचा विनयभंग केलास. तुला लाज शरम काही वाटत नाही का? लवकर निघ इथून नाही तर आत्ताच्या आत्ता तुला मी पोलिसात देईन, तुझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करू.
तू खूप नालायक आहेस. खेड्यातले मुलंही नालायकच असतात शहरातल्या मुली त्यांनी कधी पाहिलेल्या नसतात व पाहिल्या की तिच्या मागे धावत जातात झोंबायला.” एवढे ऐकून रुपेश काहीही न बोलता दवाखान्यातून बाहेर जायला निघाला. बाहेर त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एका लहान मुलाला त्याने तो बुके दिला. तो मुलगा खूप खुश झाला. हॉस्पिटल मधून बाहेर निघत तो बस स्टॅन्ड वर आला. एका चहाच्या टपरीवर तो गेला तिथे त्याने थंड पाण्याची एक बॉटल विकत घेतली. बॉटल मधील पाणी गटागटा तो पिऊ लागला. अंतर्मनातील दाह पाण्याने शांत झाला असे त्याला वाटले. त्याने चहाची ऑर्डर केली व समोरील पेपर तो चाळू लागला. त्याच्या मनात एक शब्द खूप घुमू लागला तो म्हणजे ‘चारित्र्याहीन’. त्याच्या मनात विचार आला खरच चारित्र्याहीन कोण? माझ्या जीवाची पर्वा न करता तिचे प्राण वाचवणारा मी? की केवळ स्त्रियांचे शरीर मिळाले म्हणून त्याला पुढे करत त्याचा गैरफायदा घेत आपल्या प्राणदात्यावरच विनयभंगाचा आरोप करणाऱ्या त्या दोन स्त्रिया? एवढ्यात त्याचे लक्ष पेपरमध्ये छापून आलेल्या एका बातमीकडे वळले. त्या बातमीचा मथळा होता, “मंत्र्याच्या मुलाची बलात्काराच्या आरोपींना निर्दोष सुटका.” तो स्वत:शीच बोलला, “कुठल्या समाजात राहतो आपण.”