बळीचा बकरा
बळीचा बकरा
प्रत्येक विश्वामध्ये काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी वाघ बनून पुढे जातात, किंवा त्यांच्या कनिष्ठ मंडळींना धोक्याच्या ठिकाणी समोर पाठवतात.
प्रत्येक मिळकतीमध्ये, वरिष्ठांचा वाटा किती असतो हे न सांगितलेलं बरं. आणि प्रत्येक कामामध्ये, काम करुन घेण्यामध्ये त्यांचा किती वाटा असतो तो पण सर्वश्रुत आहे. साधीशी गोष्ट, कुठल्याही शाळेच्या बाबतीत सगळं काही श्रेय वरिष्ठ व्यक्तीला किंवा मॅनेजमेंट मधल्या सगळ्यांना जात, एखादा जर काही चुकत असेल तर त्याच्यासाठी एखादी व्यक्ती पुढे केली जाते.
दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात जमिनीला तर सोन्या पेक्षा जास्त किंमत होती, एका मॅनेजमेंट कडे शाळेची इमारत तयार होती, तिथे गेले पंचवीस वर्षापासून शाळा व्यवस्थित चालू होती. बॉर्ड ऑफ डायरेक्टर च्या मीटिंग मध्ये शाळेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं. बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये सात मजली भव्य इमारत बांधून, बरेचसे हॉल, शारीरिक कवायत, इंडोर स्टेडीयम इ साठी जागा, परीक्षा घेण्यासाठी मोठे हॉल, भरपूर हवा खेळत असणारी इमारत बांधण्याचे ठरले.
मॅनेजमेंटकडून एक स्त्री गव्हर्नर म्हणून बांधकामाची देखभाल करण्यासाठी दर गुरुवारी येत असे. कंपनीतर्फे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, शाळेचे प्रिन्सिपल आणि यांचे कनिष्ठ हेदेखील शाळेच्या बांधकामामध्ये सूचना देत होते. दोन वर्षात भव्य अशी जागतिक दर्जाची इमारत बांधून तयार झाली. तिसऱ्या वर्षी इमारतीचे भूमिपूजन करून तिथे अजून काही तुकड्या सुरू करून भरपूर मुलांना ऍडमिशन देण्यात आली. मोठ्या मोठ्या हॉलमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कवायतीचे प्रशिक्षण पण होत असे. टीचर च्या तालावर मुलं एक-दोन-तीन-चार कवायत करत. एक दिवशी तिसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांची कवायत चालू होती. लहान लहान मुले होती, तालावरती उड्या मारायला त्यांना फारच आवडत होते. शेजारी सातवीच सातवीचा वर्ग विज्ञानाचे धडे घेत होता, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वर्गामध्ये चारीही पंखे चालू होते.
अचानकपणे सातवीच्या वर्गातील पंख्याचा हुक छतापासून सुटले आणि पंखा गरगरत खाली आला. मागच्या मुलांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते सर्व जोरात ओरडले, त्याबरोबर पुढे बसलेल्या मुली एकदम खाली पडल्या आणि थोडक्यात वाचला वाचल्या. नाहीतर त्या दिवशी कुठल्यातरी मुलीचा नक्कीच जीव गेला असता. तीन वर्ष नवीन इमारत, कच्ची? कच्ची? बऱ्याच शिक्षकांनी तक्रार केली, दरवाजाच्या बाजूचे प्लास्टर खाली पडत आहे. जुनी इमारत पंचवीस वर्ष जुनी असूनही तिथे कधी प्लास्टर पडले नव्हते किंवा पंखे खाली आले नव्हते. म्हणजे नवीन इमारतीमध्ये भरपूर भेसळ झाली तर.
सगळा कारभार चिडीचूप. शाळेचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंट चे लोक येऊन त्या मजल्याचे निरीक्षण करून गेले. कॉन्ट्रॅक्टरला बोलावणे धाडले. एवढ्या लवकर वरचा प्लास्टर कसे खाली येत आहे? काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन, आणि टेबला खालील पाकिटे सरकवून मामला रफादफा केला गेला. शाळेचे सगळे पंखे त्यानिमित्ताने बदलण्यात आले आणि त्याच्यामध्ये पण भरपूर मलिदा इकडे तिकडे झाला.
फेब्रुवारीचा महिना होता इयत्ता चौथी चा क्लास हॉल मध्ये कवायत करत होता, एक दोन तीन चार, पाच सहा सात आठ, प्रत्येक चौथ्या आकड्याला त्यांना उडी मारायची होती. एक प्रकारचं रिदमिक कवायत चालू होती. बाजूच्या वर्गा मधल्या शिक्षकांनी येऊन सांगितले पण, भिंती हादरत आहेत, पण तिकडे दुर्लक्ष करून, शारीरिक शिक्षणाचा क्लास चालूच राहिला. शेवटी व्हायचं तेच झालं, वर्ग संपायच्या शेवटी शेवटी, अचानक पणे मागच्या बाजूचा प्लास्टर सुटलं, आणि एक मोठा तूकडा चौथीच्या शार्दुल डोक्यावर येऊन पडला. वर्ग संपल्यामुळे मुलांनी भराभर गोंगाट करत हॉल रिकामा केला, टीचरने मागे वळून बघितलं, शार्दुल खाली पडलेला, आणि डोक्यातून रक्ताची धार लागलेली. बाजूला एवढा मोठा आकाराचा प्लास्टरचा तुकडा. शार्दुल उचलून पटकन शाळेच्या हेल्थ केअर सेंटर मध्ये नेले, प्राथमिक चाचणीनंतर, त्याच्या डोक्याला मागच्या बाजूनी मोठी जखम पडली आहे हे जाणवले. त्याच्या आईला बोलवण्यात आली, आणि शाळेच्या गाडीने मोठ्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आली. शार्दुल चे बाबा एक प्रसिद्ध वकील असल्यामुळे शार्दुल ची आई डॉक्टरांना हात लावू द्यायला तयार नव्हती. तिचं म्हणणं पडलं क्रिमिनल केस आहे. शार्दुल बरोबर हॉस्पिटलमध्ये टीचर बरोबर, शाळेचे सुपरवायझर पण पाठवले होते. सुपरवायझर ला सांगून पाठवले होते की काहीही झालं तरी पोलीस केस होऊ देऊ नका.
शार्दुल चे बाबा अर्ध्या तासातच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, आणि शाळेवरती एफ आय आर दाखल केला. तीन वर्षाची नवीन बिल्डिंग, भ्रष्टाचारामुळे अतिशय धोकादायक होती आणि त्यामुळे शार्दुलच्या डोक्यावरती प्लास्टर पडून जखम झाली. आठ वर्षाचा शार्दुल, आणि दोन किलो प्लास्टरचा तुकडा. कदाचित मेंदूला पण इजा असण्याची शक्यता डॉक्टरने दर्शवली. झालं, सगळे मॅनेजमेंटचे लोक, ताबडतोब दिल्ली सोडून निघून गेले. मॅनेजमेंट च्या लोकांनी सगळी जबाबदारी प्रिन्सिपल सरांच्या डोक्यावरती टाकली. प्रिन्सिपल सरांनी कॉन्ट्रॅक्टर ला फोन करून, रातोरात पडलेल्या प्लास्टर च्या ठिकाणी डागडुजी करून घेतली. दुसऱ्या दिवशी पोलीस. आणि शार्दुल चे बाबा शाळेमध्ये आले तेव्हा त्यांना एकही साक्षीदार मिळाला नाही ज्याने सांगितले ही शार्दुल च्या डोक्यावरती प्लास्टर पडले.
मॅनेजमेंट प्रिन्सिपल सर आणि कॉन्ट्रॅक्टर यांची गुप्त बैठक दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये झाली. त्यामध्ये असं ठरलं की लागतील तेवढे पैसे देऊ पण शार्दुलच्या वडिलांना एफ आय आर मागे घेण्यासाठी दबाव आणू. बळीचा बकरा म्हणून सुपरवायझरला पुढे करण्यात आले. त्यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली , शार्दुल च्या वडिलांना काहीही करून पोलिस कंप्लेंट मागे घ्यायला लावायची. नशिबाने शार्दुल चा मेंदूला कुठलीही इजा झाली नव्हती. जखम फक्त वरवरची होती. शार्दुल से वडील अतिशय संतापलेले होते. त्यांची समजूत घडणे हे अतिशय कठीण झाले होते. पालक शिक्षक वर्गाचा देखील या अपघातामुळे, शाळेवर चा विश्वास उडाला होता. कठीण वेळ आली होती. सगळीकडून नाचक्की होत होती. सुपरवायझर विराज सर, बारा गावचं पाणी प्यायलेले होते. त्यांना त्यांच्या पण नोकरीची परवा होती, जाणत्या लोकांचा सल्ला घेऊन त्यांनी मनाशी काहीतरी ठरवले. शार्दुलच्या बाबांच्या हाता पाया पडून झाले, काही उपयोग झाला नाही. आता सगळा रोख टीचर कडे वळवण्यात आला. कोणीतरी शहाण्यांनी भौतिकशास्त्राचे नियम सांगितले की जेव्हा काही रिदमिक चालू असतं तेव्हा ती बिल्डिंग देखील हळूहळू हलायला लागते आणि तिथले सुटलेले पार्ट किंवा कच्चे भाग खाली पडू शकतात. नाही का! एखाद्या पुलावरून जाताना सैनिक शिस्तशीर पावले टाकत नाहीत, कारण त्यांच्या पावलाच्या तालामध्ये पूल हादरू शकतो आणि कोसळू शकतो.
पालक शिक्षक सभेने प्रिन्सिपलवरती भरपूर दबाव टाकला, प्रत्येकाला आपला हुद्दा आणि आपली जान प्यारी. सगळी जबाबदारी आता टीचर च्या डोक्यावर येऊन पडली. झालेल्या एक्सीडेंटला पी टी शिक्षक जबाबदार धरला गेला. मैदानावरती कवायती करण्यापेक्षा हॉल मध्ये कवायत करून मुलांना धोकादायक वातावरणामध्ये जबरदस्तीने नेण्याची जबाबदारी चक्क टीचर[ जाधव सर] वर टाकून त्याला राजीनामा द्यायला भाग पाडले. जाधव सरांनी राजीनामा दिला तेव्हा हा सगळा मामला शांत झाला, हॉस्पिटल सर्व खर्च आणि शार्दुल ची या वर्षाची शाळेची फी सगळा खर्च शाळेने केला.
जाधव सरांना माफी मागावी लागली नाहीतर शार्दुल चे बाबा प्रिन्सिपल सर आणि बाकीच्या लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी तयारीत होते. शाळेच्या मॅनेजमेंटने जाधव सरांचे आभार मानून त्यांना चंडीगड च्या आपल्या दुसऱ्या शाळेमध्ये नोकरी देऊ केली. शेवटी हेच चुकी कोणाची सजा कोणाला.