अरे संसार संसार
अरे संसार संसार


जगता येईना ना मरता येईना. रोज रोज सांगून जीव वैतागून जातो. घरातल्या उंबरठ्यावर बसून शीला जशी पुटपुटत होती. संध्याकाळचे सहा वाजले होते. सकाळचे आठ वाजल्यापासून लीलाधर घरातून बाहेर पडतो आणि त्याची घरी परतण्याची वेळ ठरलेली नसते. आल्यावर एक तर अनादर आणि नको ते बोलत सुटणं, ही रोजचीच दिनचर्या. कधीकधी नशेत धुंद असायचा. परतल्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा समाचार घेतला जायचा.
आजही तेच पण थोडं वेगळं घडले...
लीलाधर : काय गं! आज कुठे नाही हुंदडायला गेलीस?
शीला : कुठे जाऊ? मला वाटले तुमीच न्याल हुंदडायला.
लीलाधर : असं का! चल मग माझ्यासोबत दारुच्या दुकानात. माझ्यासाठी दारू हुडकून येऊ, तू म्हणशील तीच दारू पितो आज.
शीला : तुम्हाला काही लाजलज्जा आहे की नाही, की, विकून खाल्ली.
दोघांनाही एकमेकांवर संशय घेणं, या मानसिक विकाराने ग्रसित केले होते. दोघेही एकमेकांपासून खूश नव्हते. एकमेकांना तोंडघशी पाडणे ही दैनंदिनता झाली होती.
चेहऱ्यावर मरगळ आणून लीलाधर : राजेश मला चौरस्त्यावर दिसला. कुणीतरी बाईसोबत. तुला विसरला वाटतं. बिच्चा..रा!
शीला जोरात ओरडली.
का....य ?
परत शीला : तुम्हाला काय माहीत यातलं.
लीलाधर : म्हणजे तुला माहीत आहे तर.
शीला रागाने मोठ्ठा श्र्वास सोडत : मी चहा टाकते. आता मला चहाची इच्छा आहे, तुम्हाला हवं असेल तर सांगा.
दोघांचेही एकमेकांवरचा संशय घेणे चुकीचे नव्हतेच.
लीलाधरने मोठ्ठा श्र्वास घेतला.
लीलाधर : मला आता कशाचीच इच्छा राहिली नाही.
शीला : मलाही कुठे राहिली? हा संसार आणि तुमच्यातही.
शीला तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती
लीलाधर : अगं, जोरात बोलं नं!
नको वाटत असेल तर सोडून देऊ एकमेकांना.
शीला : का...य.! काय म्हणालात, दोन पोरांचं कसं व्हायचं, याचा विचार नाही!
परत शीला : एकाचं दहावीचं वर्ष, त्याचं कसं होईल याचा विचार कोण करणार.?
लीलाधरचेही अनैतिक संबंध होते. यामुळे शीला तिला नकोशी झाली होती. बराच वेळ तो तिच्या (लीलाधरची मैत्रीण) सोबत घालवत होता हे शीलालाही ठाऊक होते. शीलाची एक जीवाभावाची मैत्रीण होती. तिला दोघांचेही कारनामे माहीत होते. अनघा समजूतदार आणि मनमिळावू होती. तिला दोघांनाही वठणीवर आणायचे होते कारण निरागस अपत्यांचा प्रश्र्न होता. अनेक दिवस निघाले. रोजचाच अपमान आणि भांडणे. आई-वडिलांच्या अशा वागणुकीमुळे त्यांच्यावर विपरित परिणाम दिसू लागले. लहान मुलांच्या वागणुकीवर परिणाम होऊ लागला. हट्टीपणा आणि उद्धटपणा वाढू लागला.
संजूचा प्रवेश...
संजू शिट्ट्या वाजवत बॉल सोफ्यावर फेकत, दिवाणावरच्या चादरीला ओढवून ताणवत...
लहान मुलगा संजू : अगं मम्मी! मला दादासारखीच सायकल घेऊन दे. दादा मला आपल्या सायकलला हात लावू देत नाही. मला आज नवीन सायकल पाहिजे नाहीतर मी शाळेला जाणार नाही. आणि माझी पिकनिक जात आहे., मी माझ्या मित्रांसोबत जाणार पूर्ण एक दिवसाची आहे आम्ही खूप धमाल करणार आहोत. मला त्यासाठी एक हजार रूपये पाहिजेत.
शीला मुलाला रागावून आणि मोठे डोळे करून : हे सर्व तू कोणाला विचारून ठरवलेस. अभ्यास मात्र कवडीचा नाही. आणि म्हणे सायकल पाहिजे पिकनिकला जायचं, पैसे पाहिजे जसा तू आपल्या मनाचा राजाच... हे सर्व तुझ्या पप्पांना सांग.
संजू : तुमचे दोघांचे नेहमीचे. मला पाहिजेच.
संजू नाराज होऊन पुटपुटत होता... मला तू नको आहेस, तुम्ही दोघेही दुष्ट आहात, तुम्ही दोघे नुसते भांडत बसा.
अनघाचा प्रवेश...
अनघा आणि शीला दोघीही शांतपणे एकमेकांशी न बोलता बराच वेळ एकमेकींकडे बघत राहिल्या.
अनघा : बराच वेळानंतर : काय चालवलंय गं तुम्हा दोघांनी ! इतकी स्वार्थी कसे काय गं होवू शकता?
फालतू आकर्षणासाठी मुलांचं जीवन खराब करायला निघालेत. अशी कशी गं आई तू?
शीला : तुला नाही माहीत बऱ्याच गोष्टी, यांच्या वागणुकीचा वीट आलाय मला.
अनंघा : म्हणून तू मुलांच नुकसान करशील, पुढे पश्र्चाताप होईल. यावरही काही उपाय असेलच नं! उद्या सकाळी माझ्या मैत्रिणीकडे चलशील का? मला थोड काम आहे तू पण चल, मला बरे वाटेल.
शीलाची मैत्रीण अनघा हिने दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने सायकॉलॉजिस्ट डॉ. रमा दातेंकडे कौन्सिलिंगसाठी नेेले.
डॉक्टरांनी उलटतपासणी केली शीलाची.
डॉ. दाते : आत्ता सध्या काय चाललंय तुमचे.? अनेक संवाद झालेत.
आत्ताच्या क्षणापासून तर लग्नाआधीच्या क्षणापासून. सगळी हकीकत ऐकून विचारली, आणि डॉक्टरांनी शांतपणे समजून घेतली. दुसऱ्या दिवशी अनघाने निमित्त करून लीलाधरशीही भेट घडवून आणली. डॉक्टरांनी त्याचीही उलट तपासणी करून लीलाधरचे मन जिंकून घेतले.
नंतर दोघांचीही भेट करवून घेतली.
सल्ला देत समजावून सांगितले की,
डॉ. दाते : जीवन हे खूप अनमोल आहे. सोन्यासारखी दोन मुले. लग्नाआधी प्रेमात पडलेली जोडपी, नंतर नकोशी वाटतात. हे आज सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे. हे निव्वळ आकर्षण, प्रेम नाही. पुढेही आणि दुसरे-तिसरे. या सवयीला नक्कीच मर्यादा हवीच. पुढे तुमची मुलेही तुमचेच अनुकरण करतील, तुम्हाला आवडेल का?
सामंजस्याने घ्या. संसार आणि खरे प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. त्यासाठी आपल्यालाच कसोटीवर उतरावे लागते, संसार सुखाचा होण्यासाठी... नाहीतर आपण स्वतःला दुःखाच्या दरीत ढकलतो.
काही दिवसांनंतर....
संपूर्ण कुटुंबासोबत प्रवेश
कुठलीही आडकाठी न घेता....
संसार सुखाचा होणारच होता...