विरभद्राचे आगमन (भाग 3)
विरभद्राचे आगमन (भाग 3)
रोहनची नजर गूढ गूढ होत होती. वीरभद्र मंत्र म्हणत भावनाजवळ गेला. तिच्या कपाळावर आपला अंगठा ठेवला तसे भावनाने डोळे बंद केले. वीरभद्र तोंडाने मंत्र म्हणत आपल्या अंगठ्याचा दाब वाढवीत होता तसतसा भावनाच्या चेहऱ्यावर फरक पडत होता. तिचा चेहरा तणावमुक्त दिसत होता. ती पूर्वपदावर आल्यासारखी भासत होती. तिच्या शरीरातून काळपट धूर बाहेर निघाला व ती बेशुद्ध होऊन खाली पडली. वीरभद्रचे सर्व लक्ष भावनावर केंद्रित असताना वीरभद्रवर मागून वार झाला. त्या वाराने तो हवेत उचलल्या जाऊन समोरच्या भिंतीवर जोराने फेकल्या गेला.
अनिकेतने वार करणाऱ्याच्या दिशेने पाहिले आणि त्याचे डोळे खोबणीतून बाहेर यायचेच बाकी राहिले. आपले हृदय बंद पडते की काय असे त्याला वाटले. कारण वीरभद्रवर वार करणारे दुसरे कुणीच नसून त्याचे वडील शामराव होते. आकस्मिक झालेल्या हल्ल्याने वीरभद्र थोडासा गोंधळला. स्वतःला त्याने लवकर सावरले पण त्याला हालचाल करता येत नव्हती. अनिकेतच्या वडिलांना शामराव यांना कुणी गृहीतच धरले नव्हते की ते असं काही करतील.
शामराव हिंस्त्र चेहऱ्याने वीरभद्रकडे पाहत म्हणाले की, इतक्या जीवघेण्या वारानंतरही तू अजून जिवंत आहेस याचे आश्चर्य आहे पण फार वेळ नाही राहशील. तुझ्यामुळे माझ्या योजनेत अडचणी निर्माण झाल्या. अनिकेतची आई त्याला लहानपणी माझ्याकडे सोडून निघून गेली. त्याला कारणीभूत मीच होतो. खूप त्रास देत होतो मी तिला. तेव्हापासून प्रेम या शब्दाचा मला तिटकारा आहे. ज्या दिवशी अनिकेत भावनाला घेऊन माझ्याकडे आला व ते प्रेमविवाह करणार असल्याचे सांगितले तेव्हाच मी ठरवले की कुठल्याही परिस्थितीत हे लग्न होऊ द्यायचे नाही. अनिकेतची आई सोडून गेल्यावर मी एका बाईच्या सानिध्यात आलो होतो जी तंत्रविद्या जाणत होती. मी तिच्याकडे गेलो व तिची मदत मागितली. तिने मला भावनाची कुठलीही एक वस्तू मागितली. घरी येऊन मी अनिकेतच्या खोलीत काही सापडते का हे शोधू लागलो. शोधताना मला तिचा रुमाल सापडला. मी तो रुमाल तिला नेऊन दिल्यावर तिने कुणाचे तरी आवाहन करून त्याला भावनाच्या मार्गावर पाठविले व पुढे काय घडले ते सर्व तुला माहीत आहेच. आता तू माझ्या पाशात बंदिस्त असल्यामुळे हालचाल करू शकत नाहीस, तुझ्या देखत मी या पोरीचा जीव घेऊन तिच्या आत्म्याला माझी दासी बनवितो.
एवढे बोलून शामराव भावनाकडे निघाले. वीरभद्र जोरात ओरडून शामराव यांना म्हणाला, थांब. मला बांधू शकेल एवढी हिंमत शामराव यांच्यासारख्या साधारण व्यक्तीत नक्कीच नाही. भावनाच्या शरीरातील अमानवी शक्तीही माझं काही वाईट करू शकली नाही, तिचे शरीर सोडून गेली. तिथे शामरावांचा काय निभाव लागेल. तू कोण आहेस.
तसे शामराव गरजले, मी.. मीच आहे अंधाराचा स्वामी. मी फक्त वेगवेगळी शरीरे धारण करतो. शामरावांच्या शरीरासारखी. मला अंत नाही. रावण, हिरण्यकश्यपू, दैत्यासुरपासून तुमचे अलीकडचे हिटलर, मुसोलोनी, गद्दाफी, सद्दाम आमचाच अंश असलेले. युगायुगांपासून माझ्या भीतीची दहशत प्रत्येकाच्या मनावर आहे. ती दहशत व भीतीच माझे सामर्थ्य आहे. एखादया वडाच्या, पिंपळाच्या झाडाखालून जाताना तुमच्या मनात ईश्वराचे विचार असले तर ते झाड तुम्हाला साध्या झाडासारखेच दिसेल पण जर त्याच झाडाखालून जाताना तुमच्या मनात भीती असेल तर त्याच झाडावर तुम्हाला कुणीतरी लटकताना दिसेल. कुणीतरी तुमच्याकडे रोखून पाहताना, तुमच्या अंगावर धावून येताना दिसेल.
शामरावांचे रूप हळूहळू पालटू लागले. एक डोळा खोबणीतून बाहेर निघून कमरेपर्यंत लटकत होता. हाताची नखे धारधार चाकूसारखी बाहेर निघाली. चेहऱ्यावर भलीमोठी जखम होती व त्यातून दुर्गंधीयुक्त पु बाहेर पडत होता. डोक्याला खूप मोठे छिद्र पडले होते त्यातून मोठमोठ्या अळ्या बाहेर पडून त्यांच्या तोंडात शिरत होत्या. ते दृश्य पाहून अनिकेत व रोहन बेशुद्ध पडले. भावनाच्या वडिलांनी ओकारी केली. या बीभत्स रूपातील शामराव यांनी त्यांचा मोर्चा भावनाकडे वळविताच वीरभद्रने सुरुवातीलाच रूममध्ये ठेवलेल्या त्रिशूलवर नजर टाकुन हात जोडले त्याबरोबर त्रिशूल त्याच्या जागेवरून हलत वीरभद्रच्या भोवतीचे पाश तोडत त्याच्या हातात विसावले. वीरभद्र आता मोकळा होता. एव्हाना अनिकेत व रोहन, भावना शुद्धीवर आले होते.
वीरभद्र भावना व शामरावांच्या रूपातील अंधाराच्या स्वामीच्या मध्ये उभा होता. त्याला मोकळे झालेले पाहून शामराव गोंधळात पडले व नंतर चवताळून हात लांब करून वीरभद्रचा गळा पकडायचा प्रयत्न करू लागले. पण वीरभद्रच्या जवळ हात पोहचताच त्यांचा हात जळत होता.
वीरभद्र गरजला, तू कितीही प्रयत्न केला तरी माझे काहीच वाकडे करू शकणार नाहीस अन माझ्या उपस्थितीत येथील कुणाचेही नाही. तुझ्या एक गोष्ट लक्षात यायला हवी होती की जसा तुझ्यात सैतानाचा अंश आहे तसा माझ्यात पण कुणाचा तरी अंश असणारच. अरे माझे नाव वीरभद्र आहे. वीरभद्र हा त्या महान शिवशंकराचा गण आहे आणि त्याचाच अंश माझ्यात आहे.
चराचराचा तोच वासी
तोच एकटा स्मशान निवासी
आदि तो अन अंतही तोच
अनादी तर अनंतही तोच
तोच जन्म अन मरणही तोच
तांडव तोच अन तारणहारही तोच
अशा महाकाळ शिवशंकराच्या गणाचा अंश आहे मी. एवढे बोलून त्याने हातातील त्रिशूल शामरावांच्या दिशेने फेकला. त्रिशूल हृदयाच्या मधोमध लागून शामराव खाली पडले. खाली पडता पडता त्यांच्या मुखातुन शब्द निघाले, मला अंत नाही, मी परत येईल, परत येईल मी. शामरावांच्या देहाने पेट घेतला. शेवटी तिथे त्यांच्या देहाची राख उरली.
आपल्या वडिलांचा अंत पाहून अनिकेतने टाहो फोडला. वीरभद्र अनिकेतच्या जवळ आला त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तुझे वडील खूप पूर्वीच गेलेत. त्यांच्या देहाचा फक्त वापर सुरू होता. सावर स्वतःला.
भावना धावत येऊन अनिकेतला बिलगली. कित्येक वेळ दोघ फक्त रडत होते. भावनावेग ओसरल्यावर सर्व खाली आले. शामराव असे करू शकतात यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नव्हता.
रोहन अनिकेतला म्हणाला की, मला माफ कर मी तुझ्यासोबत फार तुसडेपणाने वागलो पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. भावना तुझे नाव जरी काढले तरी चिडायची. अनिकेतने हसून त्याला आलिंगन दिले. नंतर अनिकेत वीरभद्र कडे वळला.
त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्न पाहून वीरभद्र उद्गारला, प्रेम अन द्वेष दोन विरोधी भावना. प्रेम हे मांगल्याचे तर द्वेष अघटिताचे प्रतीक. तुझ्या स्वप्नात भावना येत होती, तुम्ही भेटत होता हे केवळ भावनाच्या तुझ्यावरील निरातीशय प्रेमाने शक्य झाले. तुझ्यावरील प्रेमानेच तिलापण वाचविले कारण तिच्या मेंदूचा पूर्ण ताबा त्या अमानवीय शक्तीने घेतला होता पण तिचं हृदय त्या शक्तीच्या नियंत्रणात येत नव्हते. त्या हृदयात तुझ्याबद्दल प्रेम होते. त्या स्वप्नात तुला रोहनपण दिसला कारण भावनाचे मित्र म्हणून रोहनवर पण प्रेम होते आणि तिने तुझ्यासारखेच त्याला पण तिथे बोलाविले होते. तुझ्या वडिलांच्या मनात पराकोटीचा द्वेष भरलेला होता म्हणून अंधाराच्या स्वामीला त्यांचा ताबा घ्यायला फारसे कष्ट पडले नाहीत. तुझ्या वडिलांनी द्वेषापोटी एका हिडीस व विकृत शक्तीला आपल्या जगात प्रवेश दिला होता. तुला आठवते माहिती काढण्यासाठी मी तुझे रक्त प्राशन केले होते तसेच काल रात्री मी इकडे येण्याअगोदर शरीराला पांढरी भुकटी लावली? ती भुकटी नव्हतीच ती स्मशानातील चितेची राख होती. मी अघोरी पंथाचा मांत्रिक. भुत, प्रेतात्मा यांच्यात राहलेला पण आयुष्यात एक व्यक्ती अशी आली होती जिने प्रेम करायला शिकवलं व मी अघोरी मार्ग सोडला. आता सर्व ठीक झाले आहे. तुम्ही दोघे आता सुखाचा संसार करायला मोकळे आहात एवढे बोलून वीरभद्र तेथून निघाला. पुढील कामगिरी, नवे आव्हान त्याची वाट पाहत होते....
समाप्त