वेळ निघून गेली
वेळ निघून गेली
सुख हे कसं पाण्यासारखं असतं, हातातून कधी ओघळून जातं ते समजत देखील नाही. आणि रिकामी ओंजळ झाल्यावर आपण भानावरती येतो.
मनीष आपल्या रिकाम्या फ्लॅट कडे बघत विचार करत होता. किती सुंदर होतं ते आयुष्य, विदुला त्याची सहचारिणी आणि वैदेही नावाची गोड मुलगी.
खूप सुखात चालला होता संसार, पण म्हणतात ना काळाला या गोष्टी बघवल्या नाही .
छे! काळाला कशाला दोष द्यायचा? दोष तर त्याचा स्वतःचा होता.
ऑफिस मध्ये टेबल खालून खूप पैसा मिळू लागला, आणि मग त्या पैशाची किंमत राहिली नाही.
आणि आज मित्रांनी नेला म्हणून, उद्या मित्राचा वाढदिवस होता म्हणून, परवा एखाद्या ऑफिस कलीची एंगेजमेंट झाली म्हणून, अशा पार्ट्या होत राहिल्या .आणि तो कधी दारूच्या आहारी गेला ते त्याचे त्यालाच कळले नाही.
सुरुवातीला विदुला त्याची वाट बघत उपाशी असायची.स्वयंपाक केला असेल तरी जेवायची नाही.त्याची वाट बघत बसायची, आणि हा मात्र आला की झिंगत जाऊन बिछान्यात पडायचा.
मग रागात्रासाने ने ती पण जेवायची नाही.सकाळी उठल्यावर मात्र अगदी तिच्या हाता पाया पडायचा, तिची समजूत काढायचा.
पुन्हा असं करणार नाही म्हणून मुलीच्या शपथा घ्यायचा, पुन्हा संध्याकाळी ये रे माझ्या मागल्या.
मग हळूहळू ऑफिसला जाणं कमी झालं, आणि एक दिवशी त्याच्या भ्रष्टाचाराच्या पायी त्याला लाच घेताना पकडले.मग काय सस्पेंड करून घरात बसवलं .
मग हळूहळू घरातल्या वस्तू विकून व्यसन मात्र चालूच राहील.
शेवटी कंटाळून आज वैदेही ला घेऊन ती कायमची निघून गेली, आणि तो मात्र हताश पणे चार भिंतीकडे बघत राहिला.
आता त्या घरांमध्ये वस्तू देखील नव्हत्या, आणि माणसं देखील नव्हती.
रहा तुझा तू एकटाच! विदुलाचे जातानाचे शब्द त्याच्या कानात फिरत होते.
"मनीष मी तुला वारंवार सावध केलं! वेळेत सावरला असतास, तर ही वेळ आली नसती.आता मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही.
तू दारू पिऊन गटारात पड, काय वाटेल ते कर. माझा-तुझा संबंध संपला.
तेव्हा आता त्याला खाडकन जाग आली.आणि सुखाचे दिवस आठवू लागले पण वेळ निघून गेली होती.