तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
"काही बोलायचं नाहीय मला.. आजकाल मला गृहीतच धरायला लागलात.. लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचात.. तेव्हा मीही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं.. पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय.."
"छोट्या छोटया गोष्टीवरून नको ग भांडत जाऊ.. वेळ काळ काही बघत नाही.. सकाळ सकाळी चालू होते..सगळा दिवस खराब करुन टाकते.. "
"हो छोट्या छोट्या गोष्टीवरून... तुमच्यासाठी असतील छोटया गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा मग कळेल.. लग्नानंतर तर मी अशी चिडले कि मागे मागे फिरत मनवायला यायचात.. आता चिडले तरी काही फरक पडत नाही.. येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता.. दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं.. राग नाही येणार तर काय होणार.. "
"दिवसभर सगळं करते म्हणते ना.. नको करत जाऊ मग हे उपकार.. काही गरज नाहीय त्याची.. "
आज सकाळ सकाळी पतिदेवासोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नास्ता न खाताच ऑफिस साठी बाहेर पडला.. टिफिन ही नाही नेलं.. नको म्हणताना ही दररोज मला ऑफिस साठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलं ही नाही..
"जाऊ दे...ह्याचं हे नेहमीचच आहे.. टिफिन तरी घेऊन जायचं.. " असं मनातल्या मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिस साठी आवरायला लागली..
त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही कि मेसेज...
"मीच का करू..चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते.. मी पण नाही करणार ह्या वेळी" असा विचार करतच ऑफीसला पोहचली..
"पोहचले असतील ना नीट ऑफिसला..करू का मेसेज? जाऊ दे नको.. दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही.."
"नास्ता केला असेल का.. भूक तर सहन होतं नाही आधीच.."
"कॅन्टीन मध्ये जेवण ही नीट मिळत नाही..दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का..."
"काल ते कपाटातली फाईल ऑफिस ला घेऊन जायचं आहे म्हणत होते..घातलं कि नाही बॅगेत कि विसरले.."
"मीच अती केलं का नेहमीप्रमाणे..खरच छोटीच होती गोष्ट..उगीचच फाटे फोडले मी..किती वेळा तो तरी समझून घेणार"
"आज परत त्या ट्रेन मधल्या बायका जागेसाठी वचावचा भांडत होत्या...डोकं फिरवून ठेवतात नुसतं.. वरून काही बोलता ही येतं नाही..अशावेळी त्याला कॉल करून ट्रेन मधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं किती बरं वाटतं..मानायला हवं कि तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्या हुन चांगला मार्ग नाही"
अशा विविध विचारांनी तिचं ऑफिस मधल्या कामात काही लक्ष लागेना.
"ऍसिडिटी झालंय म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून नास्ता बनवलेला तिने..खाऊन आला पाहिजे होता..आता पोटात कावळे ओरडायला लागलेत.."
"बापरे दुपारच्या जेवणाचं काय करायचं..माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिन मध्ये..चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं..पण माझा राग अडला ना.. खा आता गुमान कॅन्टीन मधलं..मग कळेल बायकोचं प्रेम.."
"पोहचलात का नास्ता केला का कॉल करून तरी विचारायचं पण नाही..नाकावर राग आहे तिच्या..दररोज आपलं सारखं भुणभुण कॉल आणि मेसेज करून पोहचलात का, जेवलात का, कधी निघणार पण आज एक कॉल नाही कि मेसेज..मी तिच्या कॉल आणि मेसेज ला मिस करतोय का.. माझंपण काहीतरीच.. मी कशाला मिस करू..मला काही फरक नाही पडत.."
"अरे यार, फाईल घरीच विसरली..तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती..खरंच मानलं पाहिजे ती आहे म्हणून मी आहे.."
त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती..त्यालाही काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं होतं..
संध्याकाळ पर्यंत असच मौनव्रत चालू होतं दोघांचं..संध्याकाळी अचानक तिची ऑफिस मध्ये urgent मीटिंग ठेवली..त्यामुळे तिला घरी जायला उशिर होणार होता...जशी मिटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली.. पतीदेव तर सात पर्यंत घरीही पोहचला असेल..ऑफीस जवळ आहे ना त्याचं.. बापरे आठ वाजले.. दररोज मी आठ वाजेपर्यंत घरी पोहचते..पण आजतर नऊ वाजतील घरी पोहचायला..तो पर्यंत त्याला भूक लागणार..चिवडा आणि चकली चं डब्बा त्याला सापडेल का..भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत..कॉल चं करते.. (अरे पण आम्ही दोघे तर बोलत नाहीय ना..) काय करू..काय करू..जाऊ दे..कॉल करतेच मी..मोबाईल हातात घेते..बघते तर मोबाईल स्विच ऑफ..अरे देवा..सकाळच्या भांडणात चार्जेर घरीच राहिला वाटतं..आता काय करायचं..धावत पळतच ट्रेन पकडली..आणि घरी पोहचले..
"अहो..चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला का..काही खालं का तुम्ही.."
"इतका वेळ कुठे होतीस..किती कॉल्स केले तुला..किती वेळा सांगितलं चार्जेर किंवा पॉवर बँक बॅगेत ठेव बॅगेत ठेव..पण नाही..दररोज आठ ला येणारी नऊ वाजले तरीही पत्ता नाही म्हणजे काय समजायचं मी..कुठून तरी कॉल करून सांगायचं ना कि मी ठीक आहे उशिर होईल म्हणून..वाटलं सुमनच्या(माझी मैत्रीण) कडे गेली असेल..तिलाही कॉल केला पण तिथेही नाही.."
दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं..आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले..पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले हं..मोबाईल लगेच चार्जिंग ला लावला..चालू केला तर मागच्या एक तासात पन्नास मिस्ड कॉल्स होते.. हे पन्नास कॉल्स च माझ्यासाठी पुरेसे होते त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी..
"थांबा तुम्हाला भूक लागली असेल.. खायला देते" म्हणत आत गेली मी..."
थोडया वेळाने टीव्ही बघत जेवायला बसलो..पहिला घास मी भरवला त्याला..टीव्ही वर "तेरे बिन नही लगदा दिल मेरा ढोलना, सब छोड जाये तू ना मैनू छोडना" गाणं लागलं होतं..गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकांकडे बघत राहिलो..
खरंच असच असतं ना पती पत्नीचं हे नातं..सोबत असले कि नेहमी भांडणारे आणि सोबत नसले कि एक क्षणही न करमणारे असे हे नाते..ह्या नात्यासाठीच पुढच्या ओळी..
"तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे..
तू नसलास तर माझं जगणं ही निरर्थक आहे..
तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे..
तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापावही पुरेसा आहे..
तू आहेस म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यात मजा आहे..
तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे..
तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे..
तू नसलास तर हे जीवनच एक वादळ आहे..
तुझ्याशी कितीही भांडले तरीही मला माहीत आहे..
तू आहे म्हणून मी आहे..तू आहे म्हणून मी आहे.."
कसा वाटला लेख नक्की कळवा..