Vasudev Patil

Drama

3  

Vasudev Patil

Drama

ठाव - भाग दुसरा

ठाव - भाग दुसरा

6 mins
600


टप्पारावरून धोदाना फुटावा तसा आभायातून जलप्रपात ओतला जात होता. तप्ती माय आता उफान घेत गावाला वेढा मारण्याच्या बेतात असावी. तशा आठवणीही गयभू आबाला गिळू पाहत होत्या.


आबानं लहानपणापासून कष्ट, हिकमत, जिद्दीनं पाच सात एकरातून उत्पन्न काढत दरवर्षी सौदा घेत घेत पन्नासेक एकर जमीन केली. हवेलीही त्यांनी स्वत:च निर्माण केली. त्यासाठी लागणारं लाकुड सालदार गड्यांसोबत बैलगाडीतून स्वत: सातपुड्यातल्या फाॅरेस्टमध्ये जाऊन सरकारी लिलावातून लाकडं आणली व गावात टोलेजंग हवेली बांधली.


नवी नवेल्या हवेलीत काशीबाई नांदायला आली. काशीबाईचं माहेर तर आबांपेक्षा श्रीमंत. पण आबांनीही तोड देत काशीबाईस सुखी ठेवलं. एक काळ असा होता की आबांच्या कापसाला पहिला भाव फुटुन तोल लागल्याशिवाय गावात कुणी कापूस विकायचा नाही. शेतातला कोणताही माल आबांशिवाय आधी जायचा नाही. पाच सहा माणसं सालदारगडी म्हणून सतत राबायची. घोड्यावरून रपेट मारत गयभू आबा सारा राबता सांभाळत.


सहादू, महादू ही दोन्ही पोरं बाहेर शहरात शिकली. मोठ्या सहादूनं चेन्नईला पवन ऊर्जा प्रकल्पात मोठ्या हुद्द्याची जागा मिळवली. दोघांचं लग्न लागलं नि गयभू आबांच्या गोकुळास उतरती कळा लागली.


सहादुनं दोन वर्षातच तीन एकराची खरेदी करवून दाखवत झलक दाखवली. आबा खुश झाले. पोरानं आपल्या पावलावर पाऊल ठेवलं. आबांनी पुढं वाद नको म्हणून व सरकारचं नेहमी बदलत राहणारं धोरण म्हणून साऱ्या जमिनीची विभागणी करत सर्वांच्या नावे खातेफोड करून टाकली.


सहादूनं मोठी उडी घेण्यासाठी नोकरी सोडत स्वत:च पवन ऊर्जानिर्मितीत उतरला. त्यासाठी त्याला मोठ्या भांडवलाची गरज पडली. सासऱ्यानं बरीच मदत केल्याचा कांगावा केला. सहादूनं तातडीनं आबा व आईस चेन्नईला बोलवलं. आबा एक महिना थांबले मुला-सुनेची सेवा पाहून सुखावले व परत आले. पण नंतर सहादू कर्जबाजारी होत गावात परतला.


वर्ष दोन वर्ष गेली. आबांनी पोरास धीर देत शेतीही काही कमी नाही आपली, सुखानं घरीच राहण्यास सांगितलं. मात्र सहादू व सासऱ्यानं संगनमतानं आबास पटवत शेती विकायला लावत पवन ऊर्जा निर्मीतीतच उतरवण्यास राजी केलं.


शेतीला दिवसेंदिवस वाढत जाणारं भांडवल, मजुराचा तुटवडा, आबांचं वाढतं वय, नवनवीन समस्या या बाबी ठसवत त्यांनी आबास राजी केलं. तरी आबांनी आपल्या नावावर असलेली दूरची जमीन विकली. सहादू परतला. पुन्हा जम बसवला. त्यानंतर महादूसही त्यानं नेलं व त्यासाठी त्यानं दुसरी साईड उभी करण्याचं ठरवलं. त्यासाठी सहादूनं आपण भरपूर भांडवल टाकतोय पण तरी आणखी शेत विकावं लागेल असं सांगताच आता मात्र आबा धास्तावले. सोन्यासारखी काळजाचा ठाव असलेली जमीन पुन्हा विकायला त्यांचं मन कचरू लागलं.


"पोरांनो जितकं उभारलं त्याच्या बळावर तुम्हास जे करता येईल ते करा. मला एक छदाम नका देऊ हवं तर. पण गावाचं वतन राहू देत." मात्र सहादूनं महादूस 'तुझ्यासाठीच करायचंय आता मला' असं चढवल्यानं या वेळेस महादूनं राडा केला. माघार घेत महादूच्या नावावर असलेलं बरंच शेत विकलं गेलं.


आबा तर जमीन असूनही स्वत: मात्र भुमीहीन झाले. यामुळं दोन दिवस त्यांनी खोलीत कोंडून घेतलं. अन्नाचा कणही उचलला नाही. काशीबाईनं दाराच्या तोंडाशी बसत विनवत समजूत काढली. आता महादूच्या नावावर थोडीफार उरली व सहादूच्या नावावरची. काशीबाईच्या नावावर गावआखरी खळवाडीचं दिडेक एकर होतं फक्त. गयभू आबा आव तुटल्यागत विरक्त झाले. दोन तीन वर्ष गेले. सहादू चेन्नईत स्थिरस्थावर झाला. मग त्यानं असली रंग दाखवायला सुरुवात केली.


महादूच्या साईडवर शालकाला आणलं व त्याच्या हाती कारभार सोपवला. महादूस शालकाची ही लुडबुड सहन होईना. वाद वाढू लागले. खटके उडू लागले. महादूनं ही साईड आपली आहे म्हणत शालकास हाकलून लावलं. पण त्याचा परिणाम सहादूनं साईड आपल्याच नावावर असल्याचं सांगत महादूस सुनावलं, "शालकच प्रमुख राहिल, राहायचं असेल तर त्याच्या हाताखालीच काम करावं लागेल. पटत असेल राहा अन्यथा तुझं तू पहा.”


महादू संतापला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यानं घरी धाव घेत आबास सारा प्रकार सांगत दादास जाब विचारायला लावला. आबांना सारंच उजाड झाल्यागत, भकास झाल्यागत वाटू लागलं. काशीबाईनं सहादूस बोलावणं पाठवलं. पण सहादू येईच ना. मग सरतेशेवटी आबा काशीबाई महादू सारेच चेन्नईला गेले. आबांनी सहादूस जाब विचारला. पण सहादूनं ताकास तूर लागू दिली नाही. सपशेल उडवून लावत त्यानं आबासच सुनावलं.


”तुमची जमीन विकून जी साईड सुरू केली होती ती तर लाॅसमध्ये‌ जाऊन तेव्हाच बुडाली होती. त्याला मी काय करू? शेवटी धंदा आहे हा!उठणं, बुडणं चालूच राहतं"


"महाद्या तुला वितीचा सहा फुटाचा मी केलाय, उठणं बुडणं मला नको शिकवूस! ती साईड बुडाली तरी ज्या साईड सुरू आहेत त्याही आपल्याच ना? मग महादूची सोय लाव कुठं तरी..." आबा संतापून सहादूस फैलावर घेऊ लागले.


"आबा आपल्या नाहीत त्या साईड. आपली साईड बुडून मी कर्जबाजारी झाल्यावर सुनीच्या वडिलांनीच मदत करून दुसऱ्या साईड सुरू करुन मला सावरलंय! त्यांच्याच साईडवर हा महादू त्यांच्याच मुलावर तोरा दाखवतोय मग त्याला ते तरी कसं ऐकतील व मी तरी काय करू?" सहादू एक एक सोंगटी गिळत पट उलगडू लागला.


आबा व काशीबाईच्या पायाखालची जमीन खसकू लागली.


"म्हणजे ज्या साईड सुरू आहेत त्या आपल्या नाहीत?"


"नाहीत...”


"मग कुणाच्या?" आबा लाल झाले.


"सांगितलं ना! सुनीच्या वडिलांच्या!परत परत वेड्यागत काय विचारताय!"


"सहाद्या लेका का विचारू नकोस?काळजाचा ठाव विकून तुला पैसे दिलेत ना!" आबा धाय मोकलून रडत थरथराट करत विचारू लागले.


"आबा हा साफ खोटं बोलतोय!आपल्याच साईड आहेत साऱ्या. हा सासऱ्याच्या नावाखाली गडप करू पाहतोय..” महादूनं सहादूच्या काॅलरलाच हात घालत हुडदंग मचवला. तोच सासरा शालकानं असं काही होईलच म्हणून आधीच आखल्याप्रमाणं स्थानिक गुंडाना खूण केली. त्यांनी मध्ये घुसत महादूस पकडत हाणामारीस सुरूवात केली. काशीबाईनं मध्ये पडत महादूस सोडवलं. महादू, आबास घेत काशीबाई निघाल्या. महादूनं गावाला परतत केस दाखल करण्यास आबाकडं तगादा लावला. पण काशीबाई व आबानं काहीच हासील होणार नाही म्हणून नकार देत महादूस समजावू लागले. पण महादू ऐकेना व तो आबांवरच संशय घेऊ लागला.


सहादू सारं शालकावर सोपवत सासु-सासऱ्यासहित सुनीला घेऊन गावात परतला. हवेलीची दोन हिश्श्यात वाटणी होत मध्ये जी भिंत उभी राहिली ती नात्यात पण उभी राहिली. आपल्या नावावर असलेलं शेत त्यानं ताब्यात घेतलं. महादू खूपच भडकला. असंही तो आबास हवेली सहादूस देऊच नका म्हणत होता. पण आबाचं चालायचा प्रश्नच कुठं होता आता. सहादूनं हवेली हिसकवतच दोन हिस्से केले होते. म्हणून याचा पडसाद म्हणून महादूनं आबास व काशीबाईस आपल्या हिश्श्यातून काढलं.


सहादूच्या सासु-सासऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घेत सहादूस त्यांना घ्यायला लावलं. अशाप्रकारे जमीन व घरावर ताबा बसवत आपल्या हिश्श्यात तात्पुरतं तेही उपकार करतोय या थाटात आबा आईस ठेवत सहादू चेन्नईस परतला. इकडे महादू बिथरला. त्यानं एकेक कुणबाव्याच्या वस्तू विक्रीस काढल्या. बैलं, गाई, म्हशी, घोडा विकला. सारं औताचं सामान विकलं. कळकाची इट्टीपण शिल्लक ठेवली नाही. सारं विकून शिल्लक राहिलेलं आपल्या हिश्श्याचं चार पाच एकर शेतही विकलं व मुंबईस निघून गेला.


उभा कुणबावा ओरबाळला जातांना गयभू आबा रक्तबंबाळ झाले पण डोळ्यात नासूर व्हावा त्याप्रमाणं त्यांच्या डोळ्यात टिपूसही आला नाही. आबांनी दु:ख व्यक्त करावं म्हणून काशीबाई प्रयत्न करू लागल्या. पण व्यर्थ. आबा आपल्या विकल्या शेतात जाऊन दुरूनच सुना भोरा फेरफटका मारून येत तर कधी सुन्न, मख्ख होत राजखांब्याच्या ओट्यावर बसून राहत. वर्ष जात राहिली. गयभू आबाची राहणी बदलत खालावत गेली. चेहऱ्यावरचं तेज, रया जाऊन कुडी जरठली. तशा धोतरास गाठी वाढू लागल्या.


काशीबाईच्या नावावर गाव आखरी खळवाडीचा तुकडा, त्यावरच त्यांची गुजराण होती. त्यातही गावालगत असल्यानं गुरंढोरं, पोरंसोरं नुकसानच जास्त करत. वर्षभराचा खर्च भागवणं जड जाऊ लागलं. तसं रात्री, पहाटेच्या अंधारात काशीबाई घरातली तांब्या पितळीची एकेक भांडी गावतील तांबटकराकडं कुणाला कळणार नाही अशा रितीनं खरकवत भागवू लागल्या. मात्र हे करतानाही गावातलं कुणीतरी पाहीच पण त्यांच्या काळजाला पडणारा पिळ मात्र कुणालाच दिसेना. भांडं गेलं की चार-आठ दिवस जात. 


सहादूनं हवेली विकायला काढली. म्हणून त्याच्या सासऱ्यानं एक दिवस येत आबास रक्त निघणार नाही असा चिमटा घेत समजावलं.


"आबा, आताच्या पोरांच्या आकांक्षा वाढल्यात हो! त्यांना जुनी अडगळ नकोशी वाटते. आपण म्हाताऱ्यांनी मोठ्या जिवाचं रान करून काही उभारलेलं असतं पण ते त्यांना अडगळ वाटतेय! आता ही हवेलीच पहा ना, किती हौसेनं उभारली असेन तुम्ही! पण त्यांना ही अडगळ आता नको वाटतेय. विकायचं म्हणताय ते. त्यांना मी भरपूर मना केलं. गावावर येण्या-जाण्यासाठी हक्काचं घर असू द्या म्हणून! पण जिथं तुमचं ऐकत नाही तिथं आमचं काय ऐकतील ते!स्वत:चं पोर राहिलं असतं तर कान पकडून खडसावलं असतं पण जावई पडलेत. कसं समजावणार. संस्कार हो शेवटी ज्याचे त्याचे!"


आबा सारं गेलं त्यावेळी देखील दु:खी झाले नाहीत पण ‘संस्कार’ काढले जाताच आपलं काळीजच कुणीतरी तळतंय या तीव्र जाणिवेनं चर्रर्र... झालं. ते उठू लागले.


"आबा रागावू नका पण आता गिऱ्हाईक येतील, पाहतील ते आपणास सहन होणार नाही... म्हणून....म्ह..."


"जगतराव त्याची काळजी नसावी आम्ही त्या आधीच हवेलीतून निघतो!" काशीबाई रांधणीतून बाहेर येत ताडताड बोलल्या. जगतराव घाव वर्मी अचुक बसला म्हणून मनात खूश झाले.


"माई मला माहित आहे मुलांनीच बेघर करण्याचं दु:ख काय असतं ते! पण काय करणार रति बदललीय फार आता." जितकं मीठ चोळता येईल तितकं चोळत जगतराव बोलतच होते.


"जगत! बेघर कुणाला बोलतोय! ज्यानं अाख्खं गाव कधी काळी काळ पडला तेव्हा पोसलंय! तो त्याच गावात बेघर कसा होऊ शकतो!" काशीबाईचा तोल सुटू पाहत होता. आबानं काशीबाईस हात धरत बाहेर आणलं. पण जायचं कुठं? हा प्रश्न आ वासून उभा होताच.


"काय हो असे हातपाय का गाळताय! समोरचं मशीनघर आपलंच आहे आणा त्याची किल्ली हवेलीतनं नी उघडा..." काशीबाई विजेगत कडाडल्या. आबा मशीनघर ऐकताच भानावर आले. हवेलीच्या माजघरातील खांब्याच्या खिळ्यास अडकवलेली किल्ली त्यांनी काढली.


क्रमश:


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama