सावर रे मना ...!!
सावर रे मना ...!!
आज तू मला सावरलं नसतंस तर हे दिवस मला बघायलाच मिळाले नसते, खरं तर या जगात मी आहे ते तुझ्यामुळेच.....
अगं अंजली काय बोलयेयस हे तू, वेडी आहेस का तू ?
जेव आधी नंतर बोलू निवांत आपण...
आता तुझी आठवण कोणी काढली? ठसका पण असा आहे ना जेवतानाच लागतो....
तसं नाही रे विजय, आज मी जे हे माझं आयुष्य जगतेय, ते तुझ्यामुळेच ना.....
बरं बाबा हो, आता तरी जेव माझ्या आई शांतपणे, नाहीतर पुन्हा ठसका लागायचा....
अरे.....
आता अरे नाही आणि तुरे नाही...गप्प म्हणजे गप्प....शांत ...अजिबात आवाज नको...
विषय बंद......
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अरे विजय कुठे चालला आहेस तू, मला जरा कॉलेजला सोडशील का रे.....
हो सोडतो ....
त्यात काय एवढं.....आणि हो शांत बसून राहशील तरच सोडतो, नाहीतर जा चालत.....
बरं बाबा, नाही बोलत, मग तर झालं.....
अंजली आणि विजय कॉलेजच्या गेटजवळ पोहचले...
अगं अंजली, आज एक चमत्कार झाला, माहितेय का तुला....
काय रे काय झालं....
अगं एक माणूस आपलं तोंड अर्धा तास बंद करू शकतो, हे मला आज कळले.....
नालायका, तुझ्या ना आता....
अंजली एखादा दगड मिळतो का बघायला, इकडे तिकडे बघत होती, पण विजय कसला थांबतोय तिथे....तो गेला बाईकला किक मारून .....भुर्रर्रर्र
अंजली कॉलेजच्या गेटच्या आत गेली आणि तिथेच चक्कर येऊन पडली.....
तिच्या मैत्रिणी - मित्र तिच्याभोवती गोळा झाले, आणि तिथे कल्लोळ माजला....
सगळे बाजूला व्हा, तिला एकटं सोडा, व्हा बाजूला सगळे....
नारायण काका.....
कॉलेजचे शिपाई, पण खूप वर्षांपासून तिथे काम करत असल्यामुळे त्यांचा कॉलेजमध्ये सगळेच आदर करायचे....
अगदी सर्व प्रोफेसर सुद्धा....
काय आहे इथे, तमाशा चालला आहे का ? तिला मदत करायची सोडून लागले सगळे बोंबलायला.....
ये, काशी इकडे ये, हिला समोरच्या दवाखान्यात घेऊन जावे लागेल, चल ये लवकर....
दोघांनी तिला दवाखान्यात नेलं....
डॉक्टर म्हणाले, काही झालेलं नाहीय, पण हिने जास्त टेन्शन घेतल्यामुळे तिला थकवा आलाय एवढंच.....
इतक्यात अंजली शुद्धीवर आली....
डॉक्टर - तुमच्या बरोबर कोणी आता इथे येऊ शकत का ?
मला त्यांच्याशी बोलायचं आहे...
नारायण काका - काय झालं डॉक्टर, .....
डॉक्टर - काका मी तुम्हाला नाही सांगू शकणार घरातील,
कोणीतरी मोठी व्यक्ती हिच्या बरोबर असायला हवी.
काशी भाऊ - अंजली अगं बाबांना बोलावून घे ना, डॉक्टर
म्हणतायत तर....
अंजली - डॉक्टर, पण आपण मला का सांगत नाही
आहात ? मला काय झालंय, आपण मलाच
नाही सांगत आहात ! अस कसं....
डॉक्टर - होय अंजली, मला तूम्हाला एकटीला
ते नाही सांगता येणार....
अंजली - बरं मी बोलावते कोणालातरी थांबा....
काका तुम्ही गेलात तरी चालेल,
मी विजयला बोलावून घेते....
नारायण काका - अंजली बाबांना बोलावून घे,
त्या पोराला कशाला गं उगाच ......
अंजली - काका आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही
झालंय ते सर्व मी त्यालाच सांगत आलेय,
मग आज का नाही...
नारायण काका - ठीक आहे पोरी आम्ही जातो...
नारायण काका आणि काशी भाऊ दवाखाण्यातून निघून जातात, आणि अंजली विजय ला फोन करते....
अरे विजय कॉलेजच्या बाजूला दवाखाना आहे, तिथे येतोस का जरा, तू मला सोडून गेलास आणि मला चक्कर आली होती....
काय ? कशी चक्कर आली तुला, काय झाले तुला, बरी आहेस ना तू आता ??
अरे, हो हो, कॉलेजमधल्या नारायण काकांनी आणले डॉक्टरकडे,
पण डॉक्टर म्हणतायत की, काहीतरी सांगायचं आहे, घरच्या व्यक्तीला कोणालातरी बोलव, म्हणून तुला फोन केला....
वेडी आहेस का तू ? मला फोन केला म्हणजे, मग कोणाला सांगणार होतीस तू ? आलोच मी.....
विजय नुकताच साईटवर पोहचला होता, तोच अंजलीचा फोन आला, तिच्यासाठी कधीही काहीही करायला तयार असलेल्या विजय ने, गाडीला किक मारली आणि आला दवाखान्यात....
विजय, विजय....इकडे ये...
बघ ना रे, डॉक्टर काय म्हणतायत ते, मला पण नाही सांगत आहेत.....
अगं पण काय झालंय काय ??
जा तूच बघ विचार, डॉक्टरांना.....
बरं, थांब जरा....
डॉक्टर - आपण कोण ?
विजय - मी विजय ह्या अंजलीचा मित्र,
पण यांच्या जवळच राहतो....
डॉक्टर - अंजली तुमच्या घरातून कोणी नाही येऊ शकणार
का इथे कोणी ?
अंजली - सर, आपण यांना सांगितलं तरी चालेल,
हे आमच्या घरच्या सदस्यांसारखेच आहेत.
डाक्टर - हे पहा विजय, अंजलीच्या विश्वासाने मी तुम्हाला
काही गोष्टी सांगतोय, परंतु या सर्व गोष्टी
त्यांच्या आई-वडिलांनाही सांगा.....
विजय - बरं, डॉक्टर काय झालंय तिला, सांगा.....
डॉक्टर - विजय अंजलीच्या हृदयाला रक्त पुरवठा
व्यवस्थित होत नसल्याने, तिचा मनस्ताप
वाढला किंवा तिने जास्त विचार केला तर, असे
चक्कर येणे आणि खूप जोरात धाप लागणे, असे
अधून मधून होत राहील.
तिला खूप आरामाची गरज आहे....
अंजली - डॉक्टर, हे काय सांगताय आपण,
आपण म्हणतताय त्याप्रमाणे होतं मला कधी-कधी....
विजय - डॉक्टर, यावर उपाय काय आहे, कायमस्वरूपी.....
डॉक्टर - कायमचा उपाय एकच आहे, हृदयाच्या ज्या भागाला
रक्तपुरवठा होत नाही, तो भाग काढून, त्या जागी
तिच्या ब्लड ग्रुप ला मॅच होणाऱ्या व्यक्तीचा
हृदयाचा भाग लावायचा....
हा एकच आणि अंतिम उपाय आहे, नाहीतर या अशा
समस्या सारख्या उद्भवतच राहणार....
अंजली - अरे बापरे, म्हणजे माझं काही खरं नाही वाटते, विजय
मी आता लवकरच जाणार वाटतं !
अंजली एकदम रडायलाच लागली....
तिला शांत करत विजय पुन्हा डॉक्टरांशी बोलू लागला...
विजय - ये, अंजली तू जरा शांत राहते का ? काका-काकींना
सांगू आपण, आणि नंतर बघू काय करायचं ते !
डॉक्टर - हे पहा, ही गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे,
तिच्या घरच्यांना सांगा, आणि निर्णय घ्या, ऑपरेशन
करायचं असेल तर मला येऊन भेटा, आपल्याच
हॉस्पिटलला ऑपरेशन होऊन जाईल....
विजय - बरं, ठीक आहे डॉक्टर, आम्ही निघतो आता आणि
आपल्याला कळवतो आम्ही.....
विजय आणि अंजली दवाखान्याच्या बाहेर आले, अंजली रडवेला चेहऱ्याने विजय कडे बघतच बसली होती....
अगं ये शेंबडे, तुला काही नाही होत, चल आधी घरी जाऊ....
विजय आणि अंजली घरी आले....
अगं अंजली कॉलेजवरून आज लवकर घरी कशी आलीस तू ?
आणि तुझा चेहरा का असा दिसतोय, काय झालं...
शकुंतलाताई म्हणजेच अंजलीची आई, अंजलीकडे बघतच म्हणत होती...
काय गं काय झालं, हो गं अंजली काय झालं तुला.....
वडिलांना बघून अंजली अजूनच घाबरली आणि त्यांना बिलगून रडू लागली....
अहो काका, काही नाही ओ, बसा, सांगतो....
कॉलेजला घडलेलं सगळं, विजय अंजलीच्या वडिलांना म्हणजेच, सूर्यकांत काकांना सांगतो....
अरे पण, अंजली हे असं तुला होतंय हे आम्हाला तू का नाही सांगितलंस बाळा...
बाबा तुम्ही किती काय काय करताय आमच्यासाठी म्हणून नाही सांगितलं....
अगं पण उद्या काही कमी जास्त झालं असतं मग, आम्ही काय केलं असतं सांग....?
हो बाबा, माझं चुकलंच पण मला माफ करा....!
शकुंतला त्या सरपंचांना सांगावं लागेल ना, हे सगळं त्यांच्या मुलाला पटले तर पुढे बोलू, नाहीतर आमची लेक आम्हाला जड नाही.....
अंजलीने कॉलेजचे शेवटचे वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे बाबांना सांगून टाकले होते, म्हणून आई आणि बाबांनी गावातीलच सरपंचाच्या मुलाशी तिच्या लग्नासाठी बोलणं चालू केलं होतं....
विजयला या गोष्टी ठाऊक होत्या, परंतु त्याने अंजलीला आपल्या मनातलं कधीच बोलून दाखवलं नव्हतं आणि आता लग्न ठरलंय तर कशाला उगाच आपण बोलू, म्हणून विजयही शांतच बसला होता.....
सूर्यकांत काकांचं बोलणं ऐकलं नि विजय जागेवरून उठून,
मी जातो आता, असं म्हणून जायला पुढे होणार तोच अंजलीने त्याला आवाज दिला....
विजय अचानक कुठे चाललायस....??
न..नाही..नाही...काय नाही, साईटवर जायचंय ना म्हणून निघत होतो....
थांब जरा विजय चहा टाकलाय तो थोडा पिऊन जा....
शकुंतला काकींनी विजय ला थांबविले....
चहा पिऊ आणि निघू असा विचार करून विजय पुन्हा बसला....
हॅलो, सरपंच साहेब, नमस्कार,
हो बोला सूर्यकांतराव, कशी काय आठवण काढलीत मधेच, लग्नाला अवधी खूप आहे ना अजून, तुमच्या मुलीचं शिक्षण आहेच की,... सरपंच अगदी मीश्किलीने हसत हसत बोलत हेते....
आपल्याशी थोडं बोलायचं होतं, माझ्या मुलीबद्दल काही सांगायचं होतं, नंतर म्हणायला नको हो, सांगितलं नाही, म्हणून कानावर घातलेलं बरं...
आणि सूर्यकांत काकांनी सगळी हकीकत सरपंचांना सांगितली...
शेवटी विचार मुलांचा आहे, माझा मुलगा इथेच आहे, त्याच्याशीच बोला, तोच आपल्याला काय तो निर्णय सांगेल...
सरपंचांनी फोन मुलाकडे दिला....
हो बोला काका, मी संतोष बोलतोय...
सगळी हकीकत ऐकून घेऊन संतोष म्हणाला.....
काका, राग मनात नका ठेऊ, पण मी स्पष्टच सांगतो, मी स्रियांचा आदर करतोच, परंतु लग्न झालेही नाही आणि अगोदरच असं काही असेल तर मला हे लग्न मान्य नाही, बरं झालं आपण फोन केला.....
एवढं बोलून संतोषने फोन ठेवला....
काय बोलावे या माणसांना, काहीच का समजून घेत नाहीत हे लोक, जाऊदे पोरी तू जड नाही आम्हास .....!!
माझं जे काही आहे ते कुणाचं आहे, तुझंच आहे ना !
मग, आज याने नकार दिलाय, उद्या अजून कोणीतरी देईल, त्यापेक्षा तू आमच्या जवळ राहिलीस तर, आम्हालाही तितकंच समाधान होईल.....
विजय चहा घे रे....
थांब आई, चहा द्यायच्या आधी मला विजय ला काहीतरी विचारायचं आहे.....
अंजली काय झालं, अशी काय बोलतेयस, जे काही डॉक्टरांनी सांगितले ते तुला आणि काकांना मी सगळंच सांगितलं आहे....
नाही तू सगळं सांगितलं नाहीस, मला माहितेय तू नाही संगीतलंयस सगळं, ते मी सांगायच्या आधी सांग....
अंजली, काय सांगितलंय डॉक्टरांनी अजून....
आई, ते तर विजयला माहीत असणार ना, तोच सांगेल...
विजय, मी मुलीचा बाप म्हणून विचारतोय, काय सांगितलंय सांग.....
बाबा तो असा नाही सांगणार, .....विजय उठ, उठून उभा राहा...
विजयवर झालेला हा शब्दांचा हल्ला विजयलाही अनपेक्षित होता......
मघाशी उठून निघत असताना अंजलीने विजयच्या डोळ्यांत पाहिले होते, त्या एका क्षणाच्या नजरभेटीने, अंजली खूप काही समजून गेली होती,.......
अंजली विजयच्या अगदी समोर डोळ्यात-डोळे घालून उभी राहिली, विजय बोल, जे काही मनात साठवून ठेवलंयस ते बोल...
अंजली, काही नाही, काका-काकी तुम्ही तरी समजवा हिला, काहीच नाहीय माझ्या मनात...
विजय मी अशीच मेली....तर चालेल का रे तुला..?
अंजली भरल्या डोळ्यांनी म्हणाली...
विजयने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला....
आणि तो खाली बसला....
विजय माझ्याशी लग्न करशील का रे ?
या प्रश्नाने विजय भांभावला...
काका-काकींनाही काहीच कळत नव्हते काय चाललंय या दोघांचे...
अंजलीची आई काहीतरी बोलायला पुढे जाणार तोच, विजयने अंजलीला मिठीत घेतले आणि रडू लागला, हो अंजली हो, मी करेन तुझ्याशी लग्न, अगं माझा ब्लड ग्रुप पण सेम आहे गं...मी करेन तुझ्याशी लग्न....
विजय आणि अंजलीच्या चेहऱ्यावरचे भाव बघून सूर्यकांत काका आणि शकुंतला काकींनाही गहिवरून आले....
विजय तू आम्हाला सगळ्यांना सावरलेस रे पोरा....!!
अंजली अगदी योग्य निर्णय घेतलास बघ पोरी तू....!
आईच हे वाक्य ऐकून अंजली पुन्हा आईच्या कुशीत जाऊन रडू लागली....
अगं आई विजयचे माझ्यावर प्रेम आहे पण तुम्ही काय म्हणाल म्हणून तो मला सांगत नव्हता...
काय रे विजय ?
आम्ही काय परके आहोत का ?
आम्हालाही तू जावई म्हणून आवडलास बरं का !!
झालं, अंजलीला विजयने एक खूपच मोठा सुखद धक्का दिला होता...
डॉक्टरांना भेटून विजयने आपलं अर्ध हृदय अंजलीला द्यायचं ठरवलं....
अंजलीचं ऑपरेशन होऊन आता दोन वर्षे झाली होती, अगदी व्यवस्थित सगळं चाललं आहे....
विजयचं आणि अंजलीचं लग्नही झालं....
अंजली घरात कधी एकटी असली की, ती आपल्याच हृदयाने विजयच्या हृदयाशी गप्पा मारत असते....
कधी कधी विजय म्हणतो....वेडी झालीयस तू वेडी...
हो मी वेडीच झालेय पण तुझ्यासाठी नाही....
माझ्याकडे असलेल्या या तुझ्या हृदयासाठी.....
दोघे अगदी हसत खेळत आपले आयुष्य जगण्यात आणि त्याचा आनंद घेण्यात रमून गेले होते.....
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अंजली ये अंजली, मला भूक लागली गं चल जेवायला घेऊया....
हो टेबलवर जेवण ठेवलंय आणून, मी आले थांब....
भाकरीच्या तुकड्याकडे बघत अंजली मनाशीच बोलत होती....
आज वयाच्या सत्तर वर्षापर्यंत मी जगले, पण ज्याच्यामुळे मी आज एवढी वर्ष जगले आणि त्यानेही मला अगदी कधीही कसलीही उणीव भासू दिली नाही.....
तोच माझा विजय मला या म्हातारपणात माझ्याजवळ स्वतःचं हृदय देऊन, कायमचा निघून गेला....
काळ ही किती निष्ठुर असतो ना, ज्यांच्यामुळे आपण जगतोय त्यांना आपल्यापासून हिरावून नेतो......
विजय तू मला खऱ्या अर्थाने सावरलंयस रे, तेव्हाही आणि आत्ताही......
अंजली, पुन्हा आपल्याच हृदयाने विजयच्या हृदयाशी बोलत बोलत तिथेच त्याच बसल्या जागी हे जग सोडून जाताना, विजयच्या हृदयाने आपल्याच हृदयाकडे पाहत होती....
आणि....
आणि .....
टेबल वरचं जेवण मात्र सुकून गेलं होतं.....