ऋतुराज वसंत .....
ऋतुराज वसंत .....
वसंत ऋतू हा स्वास्थ्य, सुंदरता आणि स्पूर्ती मिळून देणारा असा ऋतू आहे. वसंत ऋतूत पक्षांचा किलबिलाट सर्वत्र पसरलेला असतो. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, उत्साह बघायला मिळतो. प्रकृतीच्या या अनोख्या अश्या परिवर्तनामुळे वसंत ऋतू्ला "ऋतुराज वसंत" असे म्हणतात.
वसंत ऋतू म्हटला की सर्वत्र शांतता, हिरवळता, उत्साहित वातावरण, डोळ्यांना मोहवून टाकणारी अशी दृश्य बघायला मिळतात. अस म्हटल जात की वसंत ऋतू हा सरस्वती मातेचा प्रकट दिवस म्हणून फेब्रुवारीत "वसंत पंचमी" या नावाने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या वसंत ऋतूत घडलेली माझ्या जीवनातील एक गोष्ट सांगायला मला आवडेल....
फेब्रुवारीच्या महिन्यात मी आणि माझे बाबा घराबाहेर बसलेलो. माझे बाबा त्या समोरील आंब्याच्या झाडाकडे बघत होते. मी त्यांच्या बाजूला बसलेली. मी तशी लहानच होते. मी बाबांच्या चेहऱ्यावर पाहिले बाबा एकटक त्या झाडाकडे पाहत होते. थोड्यावेळाने मी पण त्या झाडाला निरखून पाहू लागली. माझ्या मनात एकच विचार चालू होता, बाबा त्या झाडाला का म्हणून बघत असावे? काय आहे त्या झाडात जे मला दिसत नाही? मी पंधरा मिनिटे त्या झाडाचे निरीक्षण केले मला काही कळत नव्हते. मग मी खूप वेळाने बाबांना विचारले ... बाबा काय हो काय झालं? तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला का एकटक बघत आहात बाबांनी माझ्या प्रश्नच छानस उत्तर दिलं. ते म्हणाले ते झाड बघून मला माझ्या बाबांची आणि बाबा असताना आमच्या कुटुंबात असलेल्या आनंदाची आठवण येते.
या वसंत ऋतूमध्ये हे आंब्याच झाड बघ कसं हिरवगार, मोहर लागलेला , पालवी फुटलेली ते पाहून मनाला गारवा भेटतो. वसंत ऋतू आला की या झाडाला नवी पालवी फुटते आणि ते झाड अजून हिरवगार छान वाटतं. माझे बाबा असताना तसाच आमचं कुटुंब मस्त आनंदात, उत्साहात आणि मजेने राहायचो. जीवनात कितीही दुःख असाल तरीही की बाबांचा चेहरा पाहिल्यावर सारा थकवापणा दूर होऊन जायचा. जसा हा वसंत ऋतू झाडांना हिरवगारपणा देवून जातो. एक नवीन जीवन जगायला प्रोत्साहित करतो. माझे बाबा पण असेच होते.
हा वसंत ऋतू मला माझ्या बाबांची आठवण करून देतो. मनाला शांतता देतो, नवीन काम करण्याचा उत्साह देतो.