राखी
राखी
वरद उत्साहात निघाला रिमझिम सुरू होती आज बरीच आमंत्रण पण जायला हवे. कोणी दूर राहणाऱ्या भेटून गेल्या ओझरत्या. परदेशातल्या भगिनी वेळेवर व्हिडिओ चॅट करून. पण काही वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील खरेच एक दिवस सोहळा रंगीबेरंगी धागा पण सप्तरंगी होतात आठवणी विचार चक्र फिरले तसा तोही रमाकडून सुंदर मायेची राखी हातावर बांधून निघाला.
आनंदात सण साजरा झाला आठवणी फेर धरत राहिल्या
पावसाने जोर पकडला समोरचे धूसर होऊ लागले
माघारी घराकडे जाताना देवळात जाऊन मग जावे विचाराने बाईक वळवली रस्त्यावर गर्दी प्रचंड आज राख्या पौर्णिमेच्या प्रकाशात उजळून निघत होत्या अचानक समोरून एक दुचाकी घसरली गर्दी झाली. तोही गाडी बाजूला लावून धावतच गेला. अरेरे, बापरे......
कोलाहल माजला क्षणात ती आणि तिचा लहानगा गाडीवरून पडले बराच मार बसला वरदने एक दोघांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले थोडक्यात निभावले चौकशी करता कळले तिचा भाऊ परदेशी जाणार होता. कायमचा पण आता वेळ निघून गेली पोहचता येणार नव्हते मोबाइल घरीच विसरला भावाला फोन करू नका म्हणाली त्याला सुखरूप जाऊ द्या. सासरचा घरचा फोन दिला. रक्षाबंधन सण सर्वांकडे उगाच मलाच दोष देतील सारे. हिरमोड झाला बिचारीचा. गाडी हॉस्पिटलमध्ये ठेवून घरी निघाली वरदने रिक्षातून सोडतो कळवले होते. तिचा बांध फुटला अश्रू लपवत हो म्हणाली ती
कधी कधी परिस्थिती विचित्र वळणावर परीक्षा घेते, न राहवून ती म्हणाली "दादा आज तुम्ही होतात म्हणून वाचलो. आजकाल कोणी मदत करत नाही" तिच्या हाताला, कपाळावर जखमा, छोट्यालाही खरकचटलं होते. त्याच्याच घराजवळ राहणारी म्हणून तो तिला सोडणार होता. "असे नका म्हणू ताई मी सोडतो तुम्हाला घरी"खरेतर वरद कोणी नव्हता पण त्याचा आतला आवाज मात्र जागृत होता.
तासाभरात ते तिच्या घरी गेले जे झाले ते ऐकल्यावर
घरच्यांना धक्कादायक वाटले सासू, नणंद घरी होते. तेवढ्यात मागून तिचा नवरा आला तोही भांबावलेला. तिच्या सासूबाईंनी त्याला काहीतरी सांगितले. अग तू मोबाइल कसा विसरलीस गं... फोन करायचा. तिची, मुलाची विचारपूस चालू होती. "मी निघतो" वरद न राहवून म्हणाला तेवढ्यात तिच्या सासूबाई पुढे आल्या त्याला थांबवत चौकशी केली. परवानगी असेल तर मेघा तुला राखी बांधेल चालेल का रे. वरदने समजून संमती दिली. त्याला बसायला सांगून सासूबाई आत गेल्या. सगळे शांत होते काहीतरी कृत्रिम जाणवत होते वरदला. बऱ्याच वेळाने हातात औक्षणाचे तबक व राखी "मेघा मी तबक धरते तू याला राखी बांध" जो रक्षणासाठी धावला आज तोही भाऊच, आज राखी पौर्णिमा. तिनेही नणंदेच्या मदतीने वरदला राखी बांधली. काही तासांत कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते असे काही घडेल. एक अनामिक अनोळखी असणारे भावा बहिणीच्या नात्यात गुंफले गेले. तो काही देऊ लागला तसे तिच्या सासूबाई म्हणाल्या आता तू कधीच काही द्यायचे नाही, द्यायचे ते आयुष्यभराचे दिले. आज ती तुला देणार म्हणत एक बॉक्स त्याच्या हातात ठेवला. परत ये येत रहा.. त्याचा आवाज थोडा कातर झाला सर्वांच्या लक्षात आले.
त्यानेही निरोप घेतला सर्वांचा. विचारात तो घरी कधी पोचला त्याला कळलेच नाही. आई मात्र येरझऱ्या घालत होती. तो घरात गेला तशी रडू लागली. त्याला वाटले काळजी म्हणून रडते त्याने घडला प्रकार आईला सांगताच ती अजून रडू लागली. काय रे हा दैवयोग. त्याला कळेना काय झाले. अरे आत्ताच रमाचा फोन झाला ती सुद्धा पडली. कोणीतरी घरी पोचवले, सुखरूप आहे. त्याने रमा ताईला फोन केला "काय झाले, कशी आहेस". रमा "अरे, मी सुखरूप आहे काळजी नको, एक बरे कुठेही लागले नाही मला" काळजी घे सांगत फोन बंद झाला.
शांतता पसरली काहीवेळ, कोणाला मदत केली तर आपल्याला मदत होते म्हणतात ह्याचाच अनुभव तो घेत होता. गप्पा मारताना आईची नजर त्या बॉक्सवर गेली " अरे हे आता काय आणले आणि कोणासाठी " न राहवून तिने तो उघडला. एक सोन्याचे ब्रेसलेट होते आणि एक चिठ्ठी....
"प्रिय वरद आज अचानक आपले नाते जुळले. माझी सून मेघा, खरेतर तिच्या भावाकडे गेली होती पण तिला अपघात झाला. आम्ही तुला सांगितले नाही पण तुम्ही येण्याआधी दहाच मिनिटे आम्हाला कळले की तिचा भाऊ अपघातात गेला. तिला सांगितले तर धक्का बसेल म्हणून बोललो नाही. पण आज देवानेच तिला पुन्हा एक भाऊ दिला तुझ्या रूपाने. नंतर सांगूच तिला कारण तो धक्का सहन होणार नाही तिला. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग खूप चांगले संस्कार केले आईने म्हणून आज तू जाणीवेने मदत केलीस. सुखी रहा बाळा, तुला उदंड आयुष्य लाभो हा या आईचाही आशीर्वाद."
वरदची आई चिठ्ठी वाचून थांबली पाणावल्या डोळ्यांनी ती फक्त वरदकडे बघत राहिली. हवेत विचित्र गारवा जाणवला दोघांना. काय हे अघटित सारे. थोडा वेळ असाच गेला, आई मी फोन करतो. मेघाचा घरचा नंबर आहे माझ्याकडे. फोन झाला तसा तो निघाला दोन्ही बहिणींना सावरायला...