नियती
नियती
निसर्ग सौंदर्याने नटलेलं देवबांध गाव. पावसाळ्यात पावसाची चुळबुळ पाहणारं तर उन्हाळ्यात उन्हाची उष्णता स्थितप्रज्ञासारखी झेलणारं. अशा या गावाच भूषण म्हणजे रामराव पाटील. रामराव पाटील शिक्षक होते. शिक्षकीपेक्षातील कार्यामुळे जिल्हाभर त्यांची ख्याती पसरलेली. ४थी आणि ७वी शिष्यवृत्ती परीक्षेत रामरावांच्या वर्गातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले नाही असे कधी झाले नाही. रामरावांनी ३६ वर्ष सेवा केली आणि समाधानानं निवृत्त झाले. आयुष्याची सोनेरी संध्याकाळ गावी जाऊन शांततेत जगावी, असा विचार करून ते आपल्या देवबांध गावी आले. त्यांना वाटले आपल जीवन आता सुखात जाणार पण नाही कारण नियतीने त्यांच्यापुढे एक वेगळाच डाव मांडला होता. डाव मांडून ही नियती शांतपणे बसली होती, त्याची ही कथा.
रामरावांना दोन मुल होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी घरात मोठी आणि जिद्दी. घरात आजोबा, आजी अशी मध्ययुगात जगणारी माणसं. मुलीला शिकवू नये असा विचार त्यांच्या डोक्यात भिनलेला. पण रामरावांनी त्याला सुरंग लावला. मुलीला पदवीधर केलं आणि एका खाजगी बॅकेत नोकरीस लावले. नंतर अनुरूप स्थळ पाहून रामरावांनी तिचा विवाह केला. आता रामरावांच्या घरी त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांचे आई-वडील असे लोक होते. रामरावांचे आई-वडील होते मध्ययुगात जगणारी. यांमुळे मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा संस्कार त्यांच्या डोक्यात भिनलेला. ते रामरावांच्या मुलाचे म्हणजे आपल्या नातवाचे अतोनात लाड करत. यांमुळे रामरावांचा मुलगा हट्टी बनला होता. रामराव या गोष्टीमुळे खुप चिडत. पण आई-वडीलांसमोर त्यांचे काही चालत नव्हते.
रामरावांचा मुलगा जेमतेम १२वी झाला. रामरावांनी त्यांला नोकरीस लावले. पण तेथे दुसर्या दिवशी त्याचा मॅनेजरशी खटका उडला. यामुळे आपण तेथे नोकरी करणार नाही. इतरांचे पाय चाटणार नाही असा हेका त्याने धरला. घरातल्या लोकानी नातवाची बाजु घेतली. बाप नोकरीत असतांना त्याला नोकरीची गरज काय? असे त्यांनी नातवाला चिथवले. नियतीचा खेळ आता रंगात आला होता. आजी-आजोबांच्या सांगण्यावरून नातू नोकरी करत नव्हता. कंटाळून रामरावांनी आपल्या मुलाला एक दुकान टाकून दिले. पण तेथेही रामरावांच्या नशिबाचे फासे उलटे पडले. रामरावांच्या मुलाला दुकानांमुळे व्यसनी मित्रांची संगत लागली. दुकानात बसून तो मित्रांबरोबर नशापाणी करू लागला. रामरावांना ही गोष्ट कळली. त्यांनी मुलाला समजावले. पण तो काही समजून घेत नव्हता.
रामरावांच्या मुलाच्या वागण्याने सारे चिंतीत होते. रामरावांनी विचार केला आता त्याचे लग्न करून द्यावे. रामरावांच्या किर्तिमुळे चांगली स्थळ आली पण देव देतं आणि कर्म नेत अस झाल. रामरावांच्या मुलाने चांगल्या स्थळांना नाकारले. शेवटी हो-ना करता तो एका स्थळासाठी तयार झाला. यथावकाश लग्न झाले. लग्नानंतर रामरावांनी मुलाला आणि सुनेला शेती करण्यासाठी गावी पाठवले. रामरावांचा मुलगा शेतीत रमला. व्यसनांचाही त्याला विसर पडला. पण एक दिवस रामरावांच्या मुलाला मामलेदार कचेरीत त्याचा मित्र भेटला. त्यामुळे रामरावांच्या मुलाला पुन्हा व्यसनाची आठवण झाली आणि आता तो पुन्हा व्यसन करू लागला. बायकोने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. सगळ हाताबाहेर गेल होत. बायको माहेरी निघून गेली. रामराव सूनेला समजवण्यासाठी गेले. पण सूनेला संसार करायचा नव्हता. रामरावांच्या मुलाला आपल्या चुका कळल्या. तो सुद्धा आपल्या बायकोला समजवायला गेला. ती काही त्याच्याबरोबर घरी परतली नाही. रामरावांच्या मुलाने याचा धसका घेतला.
अगोदरच व्यसनाने शरीर पोखरलेल आणि त्यात घरात असा प्रकार. यामुळे रामरावांच्या मुलाची जगण्याची जिद्द संपली. त्यातच त्याने आजारपण अंगावर काढले. आजार विकोपाला गेला. तरी रामरावांचा मुलगा दवाखान्यात जात नव्हता. रामरावांच्या मुलीने जबरदस्तीने त्याला दवाखान्यात आणले. पण उपयोग झाला नाही. दवाखान्यात आल्यावर अगोदरच्या आजाराने शरीराने योग्य साथ दिली नाही आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. रामरावांच्या मुलाच्या मृत्युनंतर त्याची बायको आपल्या सासरच्या लोकावर उलटली. तिने रामरावांवर फसवणुकीचा आरोप केला. मुलाच्या व्यसनाची माहिती दिली नाही असे ती म्हणत होती. तिला तिच्या माहेरच्या माणसांची साथ होती. रामरावांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने जुमाणले नाही. तिला सर्व संपत्ती आपल्या नावावर हवी होती. शेवटी कंटाळून रामरावांनी सर्व संपत्ती आपल्या सुनेच्या नावावर केली. यानंतर सून कोनालाच जुमानत नव्हती. आपल्याच घरात रामराव आश्रित म्हणून जगू लागले. सूनेला त्यांची उपस्थिती सलत होती. यामुळे त्यांच्यात भांडणे होत. शेवटी भांडण विकोपाला गेले.
सुनेने आपला मानसिक छळ होत असल्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. रामरावांनी त्यामुळे घर सोडले. ते आता गावातल्या गणेश मंदिरात रहाण्यास आले. तेथेच ते स्वयंपाक करतात आणि आपल्या बायकोबरोबर जीवन जगत आहेत. रामरांवाच्या वाट्याला ही वेळ का यावी?
खरच यात रामरावांच काय चुकलं? मुलीला शिक्षण दिले पण आई-वडीलांच्या हट्टांमुळे आणि अति लाडामुळे त्यांचे काही चालल नाही. मुलगा व्यसनाधीन झाला आणि सारा खेळ संपला. याला नियती न म्हणावे तर काय? कारण हजारो मुलाचे भविष्य घडवणार्या रामरावांना आपल्या मुलाच्या बाबतीत हतबलता यावी? सारा नियतीचा अजब खेळ आहे. अजून काय म्हणावे..?.............