मनाचीये गुंती
मनाचीये गुंती
मुग्ध होताना ,मन स्वतः शी
तादात्म्य पावते, आत्म्याशी
कळ अंतरात खोल खोल
समरसून अंतरात्म्याशी
मानवी मन म्हणजे बेलगाम अश्व जणू वार्याच्या वेगाने सुसाट पळणारे..मानवी मन हे काबूत नसतंच आपल्या, मनगाभार् यात असंख्य भावनांच काहूर अंतर्मनात सतत हिंदोळे घेणारं... असंख्य सागरलाटांप्रमाणे भूतभविष्यात डोकावून पाहात, हेलकावे खात कधी सुखाच्या तर कधी निराशेच्या गर्तेत ढकलत, काळ्याकभिन्न मेघांचे घन दाटून यावेत तसे...,गडद अंधाराच्या खाईत स्वतः ला झोकून देत चाचपडणारं...!!!
मनसागरात भावनांच्या लाटा विचारांच्या भोवऱ्यात सापडून सतत किनार्यावर येवून आदळत असतात...मनाचे धरबंद सुटलेत का? कुणाला ,त्यात षडरिपूंचे गारुड मनांगनावर घिरट्या घालीत सतत भिरभिरतं..काम क्रोध,लोभ,मद,मोह मत्सर यांच्या जाळ्यात सापडून कधी मंतरलेल्या क्षणात हरवत आपल्याच धूंदीत विहरणारं तर कधी मोरपिसागत हलके होतं अलवार तरंगत विहरणारं...अगदी मनमुक्त भावनांचा संचार
कधी अग्नी च्या ज्वालात होरपळतं तर कधी सुखचांदण्यात न्हाऊन अत्तरशिंपण करीत सुगंधित होत जाणारं....!!! असंख्य भावनांची तरल स्पंदने जेव्हा ह्रदयाच्या गाभाऱ्यात धडकतात तेव्हा मंदिरात घंटानाद व्हावा तसेच अनेक भाव उचंबळून येतात..मन कावरंबावर होतं ,कधी वेड्या मनाला अलवार साद घालावी कधी प्रेमाने कधी वेदनांनी विव्हळत... !!!
भावनांची गर्भरेशमी फुले मनाच्या गाभाऱ्यात आशेचे कवडसे निर्माण करतात कधी स्वप्नात तर कधी वास्तवात जगायला भाग पाडतात.. हेच आशेच्या किरणांचे कवडसे उमेद बनून जीवनात भरारी घेत सुखाची पाऊलवाट बनून राहाते..जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो...मनाची दशा ही उजेडाच्या वाटा शोधत अलवार स्वप्नांची पेरणी करीत मनमयुराचं थिरकनं नृत्य करीत थुई थुई नाचू लागतं.. अनामिक बंधन झुगारून मंत्रमुग्ध होऊन मधुबनी विहरतं.. इंद्रधनुच्या रंगात सहज मिसळून जात....!!!
शिशिराच्या गारव्यात, मनाच्या फांदीवर मोदे विहरत विहंग होऊन बागेश्री स्वर छेडू लागतं,अनेक भावनांच्या अंतरंगाचे एकेक पदर उलगडत,मनाचे सांत्वन करीत एक आश्वासक कोंदण निर्माण करतं.. जगण्याच्या आसक्तीने भवसागर पार करण्यासाठी... पुन्हा अलवार मोरपिसागत तरंगतं.. नव्याने मनाला उभारी देण्यासाठी... स्थितप्रज्ञाप्रमाणे आश्वासक होऊन मनाला शांती प्रदान करीत तप्त मनावर फूंकर घालण्यासाठी..जीवनातला आनंद शोधीत अणूरेणूत सामावण्यासाठी...!!