लग्नानंतरचे दिवस
लग्नानंतरचे दिवस
माझं एका मुलावर खूप प्रेम होतं, आणि त्याचं पण माझ्यावर खूप प्रेम होतं. पण भरपूर प्रयत्न करून सुद्धा मला त्याच्या सोबत लग्न करता आले नाही, कारण आमच्या दोघांची जात सारखी नव्हती त्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. लग्न ठरण्यापूर्वी मी आई-वडिलांना भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला की, मी आत्ताच लग्न नाही करणार मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, माझ्यामध्ये एवढं धाडस नव्हतं की, मी माझा आई-वडिलांना हे सांगू शकत नव्हते की, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे आणि मी त्याचाच बरोबर लग्नदेखील करणार आहे.
आज खरंच मला माझाच एवढा राग येतोय ना मी जर थोडं धाडस केलं असतं तर खरंच माझा नवरा म्हणून माझा प्रियकर माझ्यासोबत राहिला असता. केवळ आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या मान-सन्मानासाठी स्वतःचा गळा स्वतःच दाबून टाकला. माझं लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी माझ्या शरीरात जणू काही प्राणच नव्हता असं मला वाटत होतं, लग्न मंडपात मी फक्त माझ्या शरीराने उभी होते पण माझा संपूर्ण जीव माझ्या प्रियकरात अडकला होता. कारण मला माहित होतं तो माझ्यावर खूप प्रेम करतो त्याला किती त्रास होत असेल याची पूर्ण खात्री होती.
लग्न समारंभ संपला मी सासरी आले, तिथे सर्व माझ्यावर खूप प्रेम करू लागले पण माझा जीव माझ्या प्रियकरात अडकला होता. नवरा सासू-सासरे खूप जीव लावणारे मिळाले, हे सर्व असूनदेखील मला सगळं सुनं-सुनं वाटायला लागले. मला माझ्या प्रियकराला पाहण्याची भरपूर इच्छा होत होती पण माझ्याकडे त्याला पाहण्याची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. मी ज्या वेळेस आरश्यासमोर उभी राहायचे तेव्हा मला माझ्या चेहऱ्याऐवजी माझ्या प्रियकराचा चेहरा दिसायचा. माझ्या लग्नाला एक-दीड वर्ष पूर्ण झाली होती, मी माझ्या प्रियकराला पाहिलं नव्हतं. मला वाटत होतं त्याला फोन करावा त्याला खूप बोलावं त्याची माफी मागावी त्याला सगळं काही सांगावं की मी इथं एका कैद्यावाणी जीवन जगत आहे.
पण माझ्याकडे त्याला बोलण्यासाठी त्याचा फोन नंबरदेखील नव्हता. नेहमी त्याचा नंबर मला तोंड पाठ असायचा. लग्नानंतर जणू काही माझं सगळं बदललं असं मला वाटू लागलं. त्याचा फोन नंबर माझ्याकडून विसरला गेला होता. मी स्वतःला जणू काही गोठ्यातील जनावर समजत होते कारण मला तर माझ्या घरच्यांनी विकले होते. माझा सौदा करून मला माझ्या नवऱ्यानं आणलं होत आम्हाला हुंडा 50,000 नको 10,0000 पाहिजे असे बरेच करार माझ्या घरच्यांनी केले होते. मी सासरच्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नव्हते, त्यांनी मला त्यांच्या गोठ्यात कैद केलं होतं. एवढं असूनसुद्धा माझं मन संसारात रमत नव्हतं मला वाटू लागले त्याला कसेही करून पाहावे.
नंतर मला सोशयल मीडियाचा आधार घ्यावा लागला मी त्याचे फेसबुक अकाउंट पाहिल्यावर मला तो दिसला मला समजत नव्हतं की आता त्याला कसे बोलावे मी त्याचे फोटो रोज न विसरता पाहत असायचे. काही दिवसांनंतर मला त्याचा फोन नंबर मिळाला मी कसलाही विचार न करता लगेच त्याला फोन केला आणि आम्ही दोघे जण खूप बोललो. मी त्याची माफीदेखील मागितली मला फार खूप आनंद झाला. नंतर मी माझ्या शैक्षणिक कामासाठी गावी आले. गावात जाण्यापूर्वीच आमच्या प्रेमाचा दरवळणारा सुगंध आला, मी घरी पण गेले नाही लगेच त्याला फोन केला मी गावी आले असे सांगून गप्प बसले. त्याला एवढा आनंद झाला की, तो मला पाहण्यासाठी एवढा वेड्यावानी करत होता की मी ते शब्दात सांगूच शकत नाही.
शेवटी आमची भेट झाली. बरेच दिवस फोनवर बोलून झाल्यावर त्याला पाहण्यासाठी माझे डोळे आतुरतेने वाट पाहत होते. मी त्याला पाहताच मला एवढा आनंद झाला की, मी फक्त एवढंच म्हणेल की जसे एखाद्या आंधळ्या व्यक्तीला दृष्टी आल्यानंतर त्याला जेवढा होतो तसे मला वाटत होते आणि तो पण मला पाहून भरपूर खुश झाला. मला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याचे माझ्याबद्दलचे प्रेम मला त्याच्या डोळ्यातील पाण्यामध्ये स्पष्ट दिसत होते.
तो फक्त माझ्याकडे पाहत होता, काहीही न बोलता मला त्याचे बोलणे समजत होते. त्याला झालेले दुःख मला समजत होते. मी पण त्याचेकडे पाहत उभी होते, आम्ही दोघे जण एकमेकांकडे पाहात उभे होतो, नंतर आम्ही दोघांनी बसून खूप गप्पा मारल्या. एकमेकांना समजावत एकमेकांना सावरत निरोप घेऊन घरी निघून आलो.
लेखक:- रोहन बुद्धम ढगे(RB)