कर्माचे फळ
कर्माचे फळ
"अगं तुला काही कळलं का...त्या काटकरबाईच्या मुलाचं म्हणे कुठेतरी लपड आहे...आपल्या सोसायटीमधल्या बऱ्याच जणांनी पाहिलं आहे त्याला त्या मुलीबरोबर...काय बाई आजकालची मुलं..आई बापाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवत नाही..जाऊ दे आपल्याला काय करायचंय", अस म्हणत कांबळे काकू तासभर तोच विषय चघळत बसल्या होत्या..
कांबळे काकूंचा हा रोजचा दिनक्रम..त्यांचा मुलगा राजेश दुसऱ्या शहरात शिकायला होता आणि मुलगी अंकिता नोकरी करत होती..कांबळे काका रिटायर होते पण वेळ जावा यासाठी ते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसत असत..सकाळी दोघांना डबा दिला की काकू मोकळ्या..दुपारच्या वेळेत त्या आणि त्यांच्या मैत्रिणी सोसायटीच्या गार्डन मध्ये जमत...मग गप्पांचा फड रंगे..
सोसायटीतल्या प्रत्येक घरात घडणारी प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत असे..कोणाच्या घरात काय शिजतय, कोण कुठे गेलंय, कोणासोबत गेलंय या सगळ्याची इतंभूत माहिती त्यांना असायची..ती कशी हे सगळ्यांसाठीच एक कोड होतं..इकडून तिकडून माहिती गोळा करायची मग ती खरी की खोटी याची शहानिशा न करता तिखट मीठ लावून इतरांना सांगायची, हा जणू त्यांचा आवडता छंद होता..त्यांच्या कुटुंबीय त्यांच्या ह्या स्वभावाला वैतागले होते...पण स्वभावाला औषध नसत म्हणतात तेच खर..
काटकरबाईच्या मुलाच्या प्रकरणाला कांबळे काकूंनीच हवा दिली..काटकर बाईंना हे कळलं..त्या दिवशी असच सगळ्या महिला गार्डन मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या..काटकरबाई तावातावाने आल्या आणि कांबळे काकूंना खूप बोलल्या...
"स्वतःच्या मुलाला शिस्त लावता येत नाही आणि दुसऱ्यांना बोलतेय..मुलगा काय थेर करतो ते बघा आधी", कांबळे काकू म्हणाल्या
"शिस्तीच्या गोष्टी तुम्ही करू नका...दिवसभर लावलावीची काम करता, दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघण्यापेक्षा स्वतःचा स्वभाव सुधारा...लोकांच्या इज्जतीचा तमाशा बघायला कस आवडत ना हे देवाला माहीत. स्वतःवर येईल तेव्हा कळेल..", काटकर बाई रागारागात बडबडत निघून गेल्या..
कांबळे काकू काही झालंच नाही या आविर्भावात पुन्हा गप्पा मारू लागल्या..
दोन तीन दिवसांनी नेहमीप्रमाणे अंकिता आणि कांबळे काका ऑफिसला गेल्यावर काकू त्यांच्या मैत्रिणींसोबत गप्पा रंगल्या होत्या..काही वेळाने काकांचा फोन आला..फोनवर बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंताजनक भाव दिसत होते..बोलून झाल्यावर त्या काहीच न सांगता लगबगीने घरी निघून गेल्या..15-20 मिनिटांनी काका आले..गडबडीत दिसत होते..पुढच्या 10 व्या मिनिटाला दोघेही खाली आले..त्यांच्या हातात एक बॅग होती..भरभर पाय उचलत ते गेटच्या दिशेने गेले..सोसायटीच्या वॉचमनने त्यांना घाई गडबडीत जाण्याचं कारण विचारलं तेव्हा ते काहीच बोलले नाहीत..फक्त त्यांच्या कामवाल्या मावशींना निरोप सांगायला सांगितला की दोन दिवस येऊ नकोस..एवढे सांगून ते रिक्षा पकडायला थांबले..रिक्षा आली आणि ते निघून गेले..काकूंच्या मैत्रिणी ही आश्चर्याने हा प्रकार बघत होत्या..कोणालाही काही थांगपत्ता लागू न देता काका काकू कुठे गेले काहीच कळलं नाही...
दोन दिवसांनी सोसायटीत बातमी पसरली की राजेशने एका त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलीची छेड काढली होती..तो तिला खूप त्रास द्यायचा म्हणून तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली होती..त्यासाठी राजेशच्या आई बाबांना बोलावून घेतलं होतं..कांबळे काका आणि काकूंना बाहेर पडणे अवघड झाले होते ..जो तो फक्त राजेशबद्दल विचारत असे..कांबळे काकू तर घरातच बसून असायच्या...मुलाने आपली इज्जत चव्हाट्यावर आणली या जाणिवेने त्यांनी घराबाहेर जाणेच बंद केले
त्यांना आता कळून चुकलं की दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं की त्याच फळ कर्मफलन्यायानुसार आपल्याला ही भोगाव लागत..