किल्ला : कालचा आणि आजचा
किल्ला : कालचा आणि आजचा
कोणाही थोरा-मोठयांना विचारा, तुमचा आवडता सण कोणता ? नाही म्हटलं तरी १०० पैकी ९० जणांचं उत्तर 'दिवाळी' हेच असेल. दिवाळसण म्हटला की डोळ्यांपुढे येते चकली, शेव, करंज्या, लाडू ही जिन्नस , बर्फी - मिठायांची चैन, रंगांनी बहरलेली रांगोळी, घरांवर झगमगत ऐटीत लटकणारे कंदील, स्वतः जळून बाकी सारं प्रकाशमय करणा-या छोट्या-छोट्या पणत्या आणि या सा-यासोबत दिवाळसणाचा एक अविभाज्य भाग असणारा असा 'किल्ला'. काल संध्याकाळी दारावरची बेल वाजली, उघडून पाहिलं तर सोसायटीतल्या लहानग्या मुलांचा गृप , "दादा, किल्ल्याची वर्गणी" म्हणून उभा होता. 'किल्ल्याची वर्गणी....' ऐकायला मलाही थोड विचित्र वाटलं खरं पण गेल्या आठवडाभरापासूनची त्यांची किल्ल्यासाठीची धडपड मी पाहून होतो, त्यामुळे तुर्तास ती द्यायला डोळे वटारावे लागले नाहीत. वर्गणी घेतल्यानंतर "दादा, परवा किल्ला बघायला ये", हे सांगायला मुलं विसरली नाहीत. आता मलाच त्यांच्या किल्ल्याबद्दल फार उत्सुकता वाटत होती. माझे बालपणीचे हेच दिवस डोळ्यांसमोर उभे ठाकत होते. किल्ले आम्हीही केले ; पण सुदैवाने त्यासाठी कधी वर्गणी मागावी लागली नाही. आजही मुळात त्या वर्गणीवर माझा आक्षेप नव्हताच, सध्याच्या सणांच्या बदलत्या स्वरूपाचं मी निरीक्षण करत होतो. किल्ल्यांच्याही आता स्पर्धा भरू लागल्यात, ज्यात सगळ्यात मोठ्ठया आणि आकर्षक किल्ल्यांना अमुक-अमुक रकमेचं पारितोषिक दिलं जातं. खरतर त्या दृष्टीने मुलांची ही धडपड सुरु होती, हे समजायला मला वेळ लागला इतकचं.
सार्वजनिक गणेशोत्सवासारख रूप आता किल्ल्यालाही मिळतय हे साम्य ह्या वेळी मी अनुभवलं. आम्ही किल्ले बनवताना ४-६ विटा, ५-७ खडक म्हणण्याइतपत मोठे दगड त्यावर एखादी गोणी एवढं जोडून त्यावर माती लिंपली की आमचा किल्ला तयार! विलक्षण अप्रूप आणि हा 'आपला' किल्ला याचं ते समाधान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यात bomb लावून नष्ट करण्यापुरतच मर्यादित रहायचं. किल्ला कोण फोडणार यावरून कधीच न होणारं एकमत 'सगळ्यात लवकर उठेल तो' वर येऊन संपायच. ४ दिवसांच्या त्या अप्रुपाचा शेवट इतका सहज साधा एका bomb ने व्हायचा. एवढच काय ते दिवाळीतल्या किल्ल्याचं आमच्यालेखी महत्व; पण आज जे हे commercial स्वरूप त्याला प्राप्त झालय त्यामुळे एक फायदा असा की येणा-या परीक्षकांसमोर किल्ल्याची प्रतिकृती जी त्यांनी बनवलीय त्याची माहिती गोळा करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागेल. Internet आणि पुस्तकं त्यांना साथ देतील, ज्यामुळे ते इतिहासाशी जोडले जातील. त्यातून एक स्फूरण त्यांना मिळेल ; जे ब-याच गोष्टींसाठी भावी आयुष्यात त्यांना उपयोगी पडेल. हेच स्फूरण वापरून सध्यातरी ते जवळ-जवळ गड उभारणीच्या शेवटावर पोहोचलेत. आताच्या घडीला तयार प्रतिकृतीवरून पारितोषिकाचं माहित नाही ; पण तमाम रहिवाश्यांच मन मात्र हे लहानगे नक्कीच जिंकतील, असं वाटतय.
बघूया तर मग काय होतय ते ? अहो, तुमच्या किल्ल्याचं कुठवर आलंय पण ? झाला की नाही ?
सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.....!!!!!