दूर दूर चालली...
दूर दूर चालली...


माहितीये मला,
तू थांबला आहेस तिथेच, तसाच...
माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा असशील ना?
मोजत असशील पुढे सरकणारं माझं एक एक पाऊल.
चुकत असेल ना तुझ्या हृदयाचा ठोका,
त्या सरकणाऱ्या माझ्या पावलावर?
जपत असशील माळ मनातल्या मनात,
"पलट पलट" अशी.
कदाचित ओघळतही असेल एखादा आसू,
नकळत तुझ्या डोळ्यातून.
म्हणूनच तर चांदण्याशिवायच आकाश आज निरभ्र दिसतंय.
मी नाहीच पाहिलं वळून,
तरीही तू स्वतःला सावरशील ना रे?
तुझ्या बावऱ्या मनाला आवरशील ना रे?
इथेच.... इथेच स्वार्थी झाले रे मी.
तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला बघण्याची शिक्षा मला नको होती.
त्या यातना मला नको होत्या.
तू माझ्यापासून दूर जाताना,
उचलणाऱ्या तुझ्या पावलांचे वार मला नको होते.
तू पाठमोरा झाला असतास तर कदाचित,
मी पळत आले असते तुला वळवून घेण्यासाठी.
पण म्हणून नात्यांची गाठ लगेच बांधली गेली असती असं नाही ना रे?
म्हणूनच... म्हणूनच तर मी तुझ्यासमोर पाठमोरी झाले.
म्हणजे माझ्या भविष्याचं वादळ मला एकटीने झेलता येईल.
अन् माझ्या पावलांची परतीची वाट हरवून जाईल, क
ायमची.
म्हणूनच तर मीच माझ्या पावलांचा मार्ग बदलला.
पण मनात मात्र तुझेच विचार,
तुझ्या आठवणी, तुझी काळजी,
अन् तुझंच प्रेम घेऊन जात आहे.
तू ही हे सगळं जपशील ना रे?
नकोच अडवूस आज मला,
पण तू ही सुखाचा मार्ग निवडशील ना रे?
लिहिशीलच एखादी कविता तू.
तुझ्या कविताही असतील माझ्यासाठी,
माझ्यावरच, आणि माझ्याच आठवणीत.
किनारा, वाळू अन् पाऊलखुणा नकोच ठेवूस तू.
पण नको रे...
या विरहातही मी तुझ्या हृदयात असताना,
स्वतःला असा एकटा म्हणू.
सांग ना,
माझ्या आठवांची सोबत तरी करशील ना रे?
माझा नाहीच झालास तरीही माझाच राहशील ना रे?
या जन्मी नाहीच भेटलो, तरीही जन्मोजन्मी असाच का होईना,
भेटशील ना रे?
आदित्यपासून दूर जाणाऱ्या अपूर्वाच्या मनाची स्थिती तिने अशाच शब्दात मनातल्या पुस्तकात व्यक्त करून जड मनाने निरोप घेतला. पण आजही आहेत ते दोघंही एकमेकांच्या मनातच! दुसऱ्या कुणाचेही न होता. थांबले आहेत त्याच वळणावर जिथे ते वेगळे झाले होते. पुन्हा कुठेतरी तेच वळण एकत्र येईल आणि यांची पुन्हा गाठ बांधली जाईल, याच आशेवर!