Hanamant Padwal

Tragedy

5.0  

Hanamant Padwal

Tragedy

दोन रंग.. देशातील

दोन रंग.. देशातील

3 mins
642


शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आमच्याच गावाहून जाते.मागच्या दोन महिन्यापुर्वी वाळूचा ट्रक रुतला तो नेमका त्या पाईपावरच आणि तेव्हापासून त्या पाईपाचे लिकेच अर्ध्या गावाची तहान भागवत होतं.पण आता कोरडाठाक पडलाय तो खड्डा. ओरबडून ओरबडून घेत होत्या बाया पोरी त्याला,घोट घोट पाण्यासाठी रातरात नजरा लावून बसत असायची बापेमाणसं.खड्ड्यात पाणी आलं रं आलं की चैतन्य खुलायचं चेहर्यावर.आंघोळीसाठी,धुन्याभांड्यासाठी आणि

पिण्यासाठीसुध्दा हेच पाणी होतं गावाला.

खरं तर आंघोळीचा चार चार दिवस पत्ताच नसायचा...धोतराचा अगर तत्सम पांढरट कपड्यातून गाळुन पाणी पित असायचा गाव.कधी दुसर्या फिल्टरची गरज नाही वाटली कोणाला.एवढ्या हालाकीनं दिस कुठं संपणार व्हती,खड्डा कोरडा पडला आणि पोटात गोळा उठला,आता करायचं काय...? टँकर येत असायचा पण त्यालाबी आता वेळ काळ नाही.टँकरवाला बोलला व्हता की टँकरात भरयलाच पाणी नाही.आता करायचं तरी काय? पाणी पाणी आणि पाणी तीन तीन कोस जावूनही डोक्यावरलं हांड

रिकामं राहू लागलं...घरातील बाया पोरं बापे म्हातारी सारी सारी जनु मोहिमेला निघालीत असं सारं चित्र.सुखलेला घसा रखरख ऊन.डोळयातला

टिपुसही तिथंच सुकून बसला,अनवानी पायानं माळरानी वनवन करत दिवस डुबेपतोर हिंडत रहायचं..फक्त पाण्यासाठी. दुष्काळामुळं दोनीक सालापासुन शेतात कायबी पिकलं नव्हतं म्हणून बापानं जीतराबाचा काटा काडला व्हता.ज्याच्याकडं हुती त्याच्या जीतराबाच्या अंगाला फक्त बरगाड्या शिल्लक राहिल्याती.पाणी वैरणी शिवाय कधी जीव सोडतील सांगता येत नाय.पाण्याबरोबर उकाड्यानं जीव नकोसा झालाय घरात दिवसातून कितीदा तरी ये जा करणारी लाईट.कधी लाईट हाय तर पंखा नाय तर कुणाकडं पंखा हाय तर लाईट रहात नाय .सारं उरफाटं जगणं खेड्यातलं.निसर्गाचा कानाडोळा अन सरकार कडून अवहेलना.जगण्याची रोज रोजच लढाई सार्याच्या वाट्याला आलेली.रोजगाराचा म्हंजी पोटापाण्याचाबी प्रश्न निर्माण होऊन बसला.आता गाव सोडण्याशिवाय कांही पर्याय उरला नसल्यानं गावंच्या गावं ओस पडू लागली,खेड्यातली लोकं शहराकडं धावू लागली.

शहरातील झगमगाट पाहून गांगारुन गेल्यागत वाटतं आहे.कोणाचं कोणाकडे कसलेही लक्ष दिसत नाही.गटारीमधून वाहणारं पाणी बघून मनाची घालमेल होतेय.किती किती पाणी सांडतात हे लोक.यांना आमच्या गावाकडं येऊन बघा म्हणावं ,कळेल यांना पाण्याची किमंत.थोडाही खुमास नाही.प्रत्येकजन आपापल्या तो-यातच दिसतो आहे.दिवस दिवस लाईटची वाट पाहणारे आम्ही आणि दिवसाही लखलखाटत चमकणारे मॉल आणि हॉटेल्स बघून

भारतातून इंडियात आल्यासारखं वाटते.माझ्याच देशात मी वावरतोय की भास आहे कांही कांही समजत नाही.खेडे आणि शहरे जशी दरी आहे,तशीच माणसाच्याही मना मनात दरी आहे की काय अशी शंका निर्माण व्हावी असे वातावरण सर्वत्र दिसते आहे.आम्हाला जगण्याच्या रोजच्या लढाईत पोटाचा प्रश्न सोडवता सोडवता आता पाण्याचाही प्रश्न किती सतावतो आहे..! इथं कोणाच्या ध्यानी मनी कांही समस्या आहेत की नाही असेच वाटते.चेहरे वाचता वाचता वाटते की यांना कांही प्रश्न पडतात का ?आम्हाला सतावणारे प्रश्न यांना असतील का.?सिमेंटच्या जंगलात जन्मलेली वाढलेली आणि तशीच घट्ट मनाची माणसं आहेत ही.आमच्या नशीबानं आमच्या वाट्याला आलेले भोग आम्ही भोगतो आहोत....त्यांच्या सुदैवानं त्यांना मिळाल्यालं सुख उपभोगतात ते,आपणास याचे वाईट का वाटावे?पण तरीही मनात प्रश्न उरतोच की एकाच देशात दोन टोकाचं जगणं का असावं?एकानं सुखाची लईलूट करत रहावी तर दुस-यानं ससेहोलपट सोसावी.शहरात राहण्याचा झगमगाट,खाण्याच्या झगमगाट,वावरण्याचा झगमगाट ,घराघरात लखलखाट.खेड्याची स्थिती या उलट.शहरात वाहणांची गर्दी माणसांची गर्दी स्वार्थ दडलेल्या विचारांची गर्दी.जीव गुदमरायला लागतो इथं आमच्यासारख्याचा.का माहित नाही पण जीव लावणारी आणि जीव जपणारी माणसं गावातच राहिली वाटतं, पुन्हा पुन्हा आठवण येते त्यांची या कोंदट वातावरणापेक्षा ते गावचं मोकळं आकाश कवेत घेतं सा-यांना.असतील आता वाईट दिवस पण जातील की तेही दिवस.नाही तरी निसर्गाला आणि दैवाला दोष देण्यापेक्षा आपण कांही चुकतो आहोत ,चुकलो आहोत हे आत्मपरिक्षण करायला हवं.खरंच निसर्ग ऐवढा निर्दयी नक्कीच नाही.दिवसामागून रात्र येते,उन्हानंतर सावली असते तसं दुष्काळा नंतर सुखाचा दिलासा आणि मनाला व मातीला ओलावा देणारा पाऊस येणार आहेच.शहरीपणात आणि त्या झगमगाटात विरघळलेली माणूसकी शोधत बसण्यापेक्षा गावाच्या खडकावर पाय रोवून बसलेली माणसं आणि आपलंपण जपणारी जीवलग लोकंच जवळची वाटतात म्हणून "गड्या आपला गावच बरा....!!"

                   


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy