भेंडोळी उत्सव
भेंडोळी उत्सव
काशीला भैरवनाथाचे मंदिर आहे. तिथे काशी चे रक्षक रखवालदार म्हणून भैरवनाथाची महती आहे . तिथे काशीला आधी भैरवनाथाचे दर्शन घेतले जाते मगच काशी विश्वेश्वराचे. भेंडोळी हा उत्सव भारतात दोनच ठिकाणी आहे.एक काशीला तर दुसरा तुळजापूरला. तुळजापूर हेक्षेत्र दक्षिणेतील प्रति काशी आहे.
दिवाळी च्या अमावस्येला ही भेंडोळी निघते . देवीच्या मंदिराच्या दक्षिणेला एका उंच डोंगर कड्यावर काळभैरवाचे मंदिर आहे त्याला काळूबाचा कडा असे म्हणतात . अमावस्येच्या दिवशी देवाला तेलाचा अभिषेक करतात. प्रत्येक घरातून भक्त तेल आणून अभिषेक करतात. मांसाहाराच्या नैवेद्यासोबत इथे गांजा पण देवासमोर ठेवण्याची जुनी प्रथा आहे.
मंदिर उंच,पायऱ्या खड्या,त्यामुळे जरा जपूनच चढावं उतरावं लागतं . मंदिरासमोरच ओटा आहे, त्यावर एक जाडजूड लाकडी खांब आठ-दहा फुटांचा आडवा ठेवलेला असतो त्याला केळीची पाने खुंट बांधलेली त्यावर स्वच्छ पवित्र व गोडेतेलात भिजवलेला नवा कोरा कपडा ,याचे थरावर थर अनेक थर बांधलेले खूप मोठे भेंडोळे असते म्हणून तिला भेंडोळी म्हणतात .ही रात्री आठच्या सुमारास प्रज्ज्वलित करतात. पुढे साताठ तर मागे साताठ तरूण बलदंड मुलं ही वरून खालून आगीने भडकलेली भेंडोळी खांद्यावर घेऊन निघतात. काळूबाच्यानावानं चांगभलं असा जयजयकार होऊन कड्यावरच्या आवघड पायऱ्या उतरून भेंडोळी नगर प्रदक्षिणा करण्यास निघते. देवीच्या मंदिराकडे निघते. कड्याच्या पायऱ्या उतरून मंदिराच्या पायऱ्या चढायला लागते . वाटेत एक दगडी किल्ल्याचं तीस चाळीस फूट लांब अतिशय कमी रूंदीचं बोळ लागतं.ते बोळ मध्यभागी वाकड्या वळणाचं असून बोगदाच आहे तिथून सिंगल सडपातळ माणूसच जातो.लठ्ठ माणसाला वळणावर तिरकस होऊनच जावं लागतं एवढं रुंदीला कमी. तिथून त्या बोळातून भेंडोळी पन्नास माणसांना घेऊन आत शिरते व सहीसलामत बाहेर पडते कसलाही अडथळा न येता.हा चमत्कार कसा होतो ते भगवंतालाच ठाऊक. मग पश्चिमेकडील शिवाजी दरवाज्यातून भेंडोळी देवीच्या मूर्ती पर्यंत आणली जाते. दर्शन भेटवली जाते. नंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून पायऱ्या चढत चढत वर नगरीतून पूर्वेकडे असलेल्या डुल्या मारूती मंदिराच्या ओट्यावर विसावते.जवळच असलेल्या अहिल्याबाई विहिरीतून पाणी आणून भेंडोळीचा अग्नी शमविला जातो. अर्धवट जळालेला कपडा (पलिता) घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. थोडातरी बोटभर पलित्याचा तुकडा मिळावा यासाठी ढकलाढकली तर प्रसंगी हाणामारी पर्यंत मजल जाते. घरात जर हा पलित्याचा तुकडा नीट जपून ठेवलातर सुख शांती समाधान धन प्राप्त होते अशी भावना श्रध्दा भाविकांची असते.