बायकांचं न्हाण
बायकांचं न्हाण
धनत्रयोदशीचा दिवस, गिरजाक्काने पाट मांडला. उटणं, तेल एकत्र करून सुनांना बोलावलं आणि फर्मान सोडलं.
"चला आता समद्याजणी एकेक करून या पाटावर बसा. छान तेल लावून तुमास्नी न्हाऊमाकू घालती."
"अहो आत्याबाई, हे काय नवीन खूळ. आम्हाला कशाला तेल, उटणं अन न्हाऊमाकू..! तिघी सुनांपैकी एकजण बोलली.
"अगं पोरींनो, तुम्ही माझ्या घरच्या लक्षुम्या..! दिनरात ह्या घरासाठी राबता. तुमी सगळ्याजणी निरोगी, आनंदी तर माझं घर निरोगी राहील ना गं बायांनो. आजचा दिस तुमचा..! घरच्या लक्षुमीला खुश ठेवलं तर देवी लक्षुमी खुश होईल ना, तवा लई पाघुळ लावू नगा. गप्पगुमान या पाटावर येऊन बसा".
सुनांना सासुचं कौतुक वाटलं.
इतक्यात गिरजाक्काची दहा वर्षांची नात म्हणाली,"आज्जे, मग तुला तेल मी लावणार."
गिरजाक्काने जुन्या परंपरांच्या प्रकाशाने नव्या पिढीचा मनोदीप उजळवून संस्कृतीचं महत्व पटवून दिलं.