Komal Mankar

Tragedy

2  

Komal Mankar

Tragedy

अगतिका

अगतिका

6 mins
1.4K


कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं …..प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत होता . केवढ्या घाईत निघाली मी घरून . झालं आता दोन तास जप करत बसा इथे !ह्या मुंबई लोकल ट्रेनचा हाच तगादा असतो. लोकल कधी वेळेत आली तर सूर्याने दिशा बदलवल्याचे डोहाळे लागतात . खाली बर्थचा मी शोध घेत निघाली . पण कुठेच खाली बर्थ नजरेस पडत नव्हता . मी समोर चालू लागली शेवटी एक खाली बर्थ दृष्टीस पडला तिथे जाऊन बसली.  नजरेसमोरून धाडधाड करत जाणाऱ्या गाड्या ह्यात माझी गाडी कधी येणार आणि इंटरव्ह्यू कसा जाणार ह्याच विचारात मी गढून गेली होती .एवढ्यात माझ्या बाजूला ती येऊन बसली . समोरून जाणाऱ्या वडे वाल्याला ती आवाज देऊ लागली . तेव्हा माझ्या बाजूला येऊन बसलेल्या तिच्यावर माझी नजर पडली . विशीतली तरुणी वाटतं होती ती मला .ओठाला लावलेली लाल भडक लिपीस्टिक तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर शोभून दिसत होती . काजळी डोळ्यात तेवढीच चमक होती . पाठीवर मोकळे सोडलेले तिचे काळेभोर केस काहीसे कपाळावर येत होते . त्या समोर येणाऱ्या लटांना मागे करत ती एका हाताने वडे खात होती .खूप दिवसाचं तिने काही खाल्लं नसावं अशी ती वड्यावर ताव मारत होती. दूरवर फिरणारी माझी नजर न राहून तिच्यावर खिळत होती . एकदम तिने माझ्याकडे बघितलं आणि आमची नजरेवर नजर पडली .तोंडासमोर खायला घेतलेला वडा हातातल्या कागदी प्लेटवर ठेवत . प्लेट माझ्याकडे सरकवत ती म्हणाली ,खातेस ? मी नाही म्हटलंत्यावर ती म्हणाली , ” मग अशी का बघत आहेस  ? “मी काही नाही म्हणत समोर बघायला लागली . परत तिच्याकडे वळून बघण्याची हिंमत मला झाली नाही. अर्धा तास असाच शांततेत निघून गेला . कुठे जायचं आहे तुला ? तिने माझ्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं मुंबईला … आणि तुला कुठे जायचं ? ती म्हणाली ,” मला कुठेच नाही … “मला विचार आला कुठे जायचं नाही तर बॅग वैगरे घेऊन इथे का बसलीे असावी ?माझ्या प्रश्न चिन्ह चेहऱ्याकडे बघत ती उद्गारली” मावशी येणार आहे मुंबईला जाणाऱ्या गाडीन . गाडी दोन तास उशिरा आहे म्हणून मी तिची वाट बघत बसली इथं . “मला पुढे काही बोलायच्या आतच ती ,” तुझ्याकडे फोन आहे का ? मला एक फोन करायचा होता .कुठ जवळपास STD बूथ पण नाही … “मी हो म्हणत तिच्या हातात फोन दिला . तिने कॉल लावताच शिव्या द्यायला सुरुवात केली .आजूबाजूला जाणारे येणारे प्रवासी तिच्या बोलण्याकडे एकटक बघत जात होते . त्या दोन मिनिटांत तिच्या शिव्यांचा अंदाज बांधता नाही यायचा . ती कुण्यातरी माणसाला शिव्या देत असावी असं तिच्या बोलण्यावरून वाटतं होतं . एवढं भडकायला काय झालं ?  तिच्या हातून फोन घेत मी  विचारलं . त्यावर ती म्हणाली , ‘ साले ने पैसे नही दिए, दस दिन से बोल रहा आज देता कल देता … रोजचा गिराइक आहे म्हणून थांबले होते . ‘ मी तिला विचारलं , काय करते तू ? माझ्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली ,धंदा करते …मी म्हटलं , ‘ कशाचा ?’माझ्या प्रश्नावर ती लगेच उत्तरली .’ शरीराचा . ‘ ( मी तिच्याकडे बघून काही क्षणासाठी निःशब्द झाली . काय बोलावंकळतं नव्हतं मला . ) काय झालं माझ्या सारख्या धंदेवाली सोबत एका बेंचवर बसल्याच तुला ….तिला मध्येच बोलत असताना थांबवत मी म्हटलं , ‘ असं काही नाही  … तू ही माणूसच आहे ना ?’ ह्यावर ती म्हणाली , ‘ सर्व मला माणूस म्हणून नाही तर एक वेश्या म्हणून बघतात .घरणदाज बाया मी त्यांना कोण आहे हे कळताच माझ्या जवळून उठून जातात . ” तुझं वय काय ग ? ‘माझ्या अचानक विचारलेला प्रश्नाने ती भांबावून जात म्हणाली ,’ 25 लागेल आता ह्या महिन्यात ‘माझा अंदाज खोटा ठरला होता तर . मी म्हटलं तिला कशाला आली ह्या धंद्यात .ती जरा मिश्किल हसत म्हणाली ,’ कोण्या स्वतःला ह्या धंद्यात झोकून घ्यायची हौस नसते तै .’तिच्या डोळ्यातुन तिचा भूतकाळ अधोरेखित होत होता . मी विषय बदलवत तिला म्हटलं किती वर्ग शिकली तू ?ती म्हणली बारवी पर्यंत … मला आश्चर्य वाटलं ऐकूनमग समोर शिकायचं नव्हतं का ? परिस्थिती न्हवती तशी , बाप कर्ज बाजरी बुडाला होता . माय लहानपाणीच देवाघरी गेली . कसा बसा भावाच्या भरवश्यावर संसाराचा गाडा रेटत होता . पण परमेश्वराने त्यालाही गिळला अपघातात तो ही जागीच गेला . बापावर कर्जाचा बोजा होता . काय करणार तो बी ? मला इथे सोडून गेला. तिचं बोलणं ऐकून वाटलं सख्खा बाप मुलीला ह्या धंद्यात ढकलून देतो. तुझ्या बाबाला माहिती आहे तू हे काम करते म्हणून ? तो तुला काहीच म्हणत नाही ??ती पुढे सांगायला लागली , ‘ पहिल्या पाच महिन्यातच पन्नास हजार कमवून सर्व त्याच्या कर्जाचा बोजा हलका केला तो काय म्हणेल नको करू हा धंदा म्हणून . लहान दोन बहिणी बी आहे हे काम नाही केलं तर उपासमारीची वेळ येईल.. माझ्या सारखं त्यांचं शिक्षण नाही बुडवायचं . ’तिच हे बोलणं ऐकून तर थक्क झाली होती मी . वेळ आणि परिस्थिती माणसाला कोणत्या वळणावर घेऊन जाईल ह्याचा काही नेम नसतो .मग परत तुझी गावाकडं जायची इच्छा नाही का ? इथे तुला पोटभर खायला मिळतं? तिला ज्या पद्धतीने मी वडे खाताना बघितलं होतं त्यावरून जाणवलं की तिला पोटभर अन्नही नसेल मिळत .’ नाही , पोट भरायला तिथं काही बी साधन नाही एवढी मिळकत पण होत नाही . माझ्या आयुष्याचा गुजराना ह्याचं भरवश्यावर चालतो. सरत्या शहराच्या मध्यवर्ती , डामरी रस्त्याभोवती वटवाघळासारखं घिरट्या घालत ऐ चालतो का अड्यावर म्हणत आपल्या कलेन त्यासनी हिसडून घ्यायचं , तो म्हणणं त्या हॉटेल मध्ये रात्र काढायची आणि दिवस होताच आपल्या वस्तीला निघायचं .असे कैक येतात न जातात त्यातून निघणाऱ्या एखाद्याकडे मी आस्थेने बघू लागते .एखाद्याचं काळीज समजे पर्यंत कुतूहलाने मी त्याच्यात दुमडून रहाते . चालत्या हलत्या वस्तीतून येरझाऱ्या घालणारा मग तो नेहमीचा गिराईक होऊन जातो. नेहमीचे होऊन जाणारेही फार फार काळ टिकत नाही . लुबाडायला त्यांना शरीर पाहिजे असतं . घरात बायको असून रखेल बनवायला तयार असतात पण खिशातून पैसे काढायला हात मागे सरतो . ‘हे सारं काही ती एका दमात बोलून गेली . एखाद्या स्त्री जीवनाची अशीकैफियत तिच्या तोंडून मी पहिल्यांदाच ऐकत होती .बोलताना ती म्हणूनही गेली …’ तै , तुमच्या सारखं माझ्या आईवडिलांनी मला शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं नाही केलं . ‘दोष कुणाला द्यायचा तिने ,परिस्थितीला की खुद्द पोटच्या पोरीला ह्या व्यवसायात ढकलून जाणाऱ्या बापाला जो कर्जाच्या बाजारात पोरीच्या देहाची किंमत लावून त्यावर 

घराचा गाढा ओढत होता .उन्हात वाऱ्याची हिरवी झुळूक अंगाला स्पर्श करून जावी तसं ती म्हणाली ,’ आज एवढ्या दिवसाने कोणी तरी आपलं भेटल्यासारखं वाटलं , ह्या जन्मात मनासारखं जगायचं राहून गेलं बघ . आईच्या गेल्यानंतर मायने जवळ बसून बोलणारही कोणी अजून पर्यंत भेटल नाही . ‘तिचेही काही स्वप्न असतील प्रत्येकाला मनासारखं जगता आलं तर त्याचं आयुष्य त्याला सार्थकी लागल्यासारखं वाटतं .मी तिला म्हटलं ,’ मी तुला काही मदत करू शकते का ? तू हवी ती मदत माग तुला इथून बाहेर पडायलाही साह्य करेल . तुझं बारावी पर्यंत शिक्षणही झालं आहे म्हणते ना ! मग समोर शिक्षण घे … ‘माझ्या बोलण्यावर ती म्हणाली ,’ मदत नको मला माझं आयुष्य खूप पुढे निघून गेल आता कात्रीत सापडल्या गत झालं , जगाच्या कोपऱ्यात मी कुठेही पळून गेली तरी मावशी माझ्या मागावर येऊन मला धंद्यावर लावेलच .पळून जाण्याचा पर्यंत केला पण कैकदा मावशीने मला गाठलं .शरीरावर ओरफडे फुटे पर्यंत मारलं . पायाला विस्तवाचे चटके दिले . ‘हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि नकळतमाझ्याही . ‘ हे बघ इथून पुढे माझा विचारही ध्यानात आणू नको . मला धड जगता ही येत नाही आणि मरताही येत नाही . शिकायची खुप इच्छा होती पण आता तेही शक्य नाही ’शिक्षणाबद्दल असलेली तळमळ मला तिच्यात दिसून येत होती .तिलाही माझ्या सारखं शिकता आलं असतं तर आज समाजात ताठ मानेन जगता आलं असतं .एवढ्यात मुंबईला जाणारी गाडी अनाउन्स झाली . एवढा वेळ आम्हीबोलतं होतो पण शेवटी मी तीच नाव विचारायचं राहून गेली .मावशी ह्याच गाडीत आली आहे अस म्हणत ती जागेवरून उठताच .मी तिला थांबवत विचारलं तुझं नाव विचारायचं राहून गेलं .तुझं नाव काय ?त्यावर ती म्हणाली ,माझी रोज नाव बदलतात कधी शबनम , कधी राधा , चमेली कोणी त्याच्या मनात येईल ते म्हणतो …. मुंबईला जाणारी गाडी धाडधाड करत माझ्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली .ती चालत जात मला म्हणाली तुला कोणतं नाव द्यावं वाटतं मला ते दे !माझ्या समोर उभी असलेली मुंबईला जाणारी गाडी आणि तिची पाठमोरीआकृती ह्याच्यात मी स्तब्ध उभी होते माझ्या जागेवर .लोकांचा जमाव उतरत होता चढत होता .मानो , जिंदगी तेज रफ्तार से आगे बढ़ रही हो और कोई पीछे छूट गया है  ….मी भानावर येत आपली बॅग सांभाळत चढायला गेली. तेव्हापर्यत त्या लोकल ट्रेनच्या गर्दीत ती ही दिसेनाशी झाली . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy