आयुष्यातील एक चांगला धडा देणारा क्षण
आयुष्यातील एक चांगला धडा देणारा क्षण


मी इयत्ता आठवीत शिकत होते. आठवीत होते म्हटलं की एन.एम.एम.एस., स्कॉलरशीप अश्या स्पर्धा परीक्षा आल्याचं. मी ही तेव्हा एन.एम.एम.एस ला बसले. आधीपासूनच मला स्पर्धा परीक्षांची आवड होती. मग काय अभ्यास चालू झाला. शाळेत तर काही नीट अभ्यास घ्यायचे नाहीत. त्यामुळे जो अभ्यास करायचा तो स्वतःच्या हिमतीवर. आमच्या गावात एक मोठ वाचनालय आहे. तिथे मी जवळ जवळ दुसरीला असल्यापासून जाते. आताही मी अभ्यासाला तिथेच जाते. जर काही येत नसेल तर मोठ्या दादादिदींना विचारायचे.
अभ्यास वाढत होता तसाच आत्मविश्वास ही वाढत होता. हा आत्मविश्वास अति आत्मविश्वासात कधी बदलला हे समजलेच नाही. पेपर झाला आता फक्त निकालाची वाट पाहात होते. एके दिवशी असेच दुपारी बसले होते मोबाईल मम्मीकडे होता. मम्मी अचानक म्हणाली,"NMMS चांगले अंतिम निकाल जाहीर. असं पेटकर सरांनी ग्रुपवर टाकलं आहे. "मी दोन मिनीटं स्तब्ध झाले. हृदयाचे ठोके वाढले. मी पटकन उठले मम्मीजवळ गेले. मोबाईल घेतला. एकटी बाजुला येऊन बसले. लिंक ओपन होत होती. तसे माझ्या पोटात गोळे येत होते. झालं एकदाची लिंक ओपन झाली. निकाल पाहिला. आणि एकदम माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले कारण वर्षभर इतकं जीव पणाला लावून अभ्यास केला. आणि फक्त एक मार्काने माझी NMMS ची शिष्यवृत्ती गेली. मला खुप दुःख झाल.
पण त्या दिवशी देवाने १ मार्काने शिष्यवृत्ती गेल्याचा अनुभव काय असतो हे दाखवून दिलं. मला जरी शिष्यवृत्ती मिळाली नसली तरी मला याचा आनंद आहे की मी आज इतक करू शकले म्हणजे पुढे जाऊन ही काहीतरी करू शकते. या परीक्षेमुळे मला खरचं एक चांगला अनुभव आला.