STORYMIRROR

samarth ramdas

Classics

2  

samarth ramdas

Classics

मनाचे श्लोक - ५

मनाचे श्लोक - ५

1 min
14.5K


बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।

शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥

विचारें बरें अंतरा बोधवीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥


बहुतांपरी हेंचि आतां धरावें।

रघूनायका आपुलेसे करावें॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥


मना सज्जना एक जीवीं धरावें।

जनी आपुलें हीत तूवां करावें॥

रघूनायकावीण बोलो नको हो।

सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥


मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।

कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।

सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥


जयाचेनि संगे समाधान भंगे।

अहंता अकस्मात येऊनि लागे॥

तये संगतीची जनीं कोण गोडी।

जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥


मना जे घडी राघवेवीण गेली।

जनीं आपुली ते तुवां हानि केली॥

रघूनायकावीण तो शीण आहे।

जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥


मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।

जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥


सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

सदा रामनामें वदे नित्य साचा॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥


सदा बोलण्यासारिखे चालताहे।

अनेकीं सदा एक देवासि पाहे॥

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥


नसे अंतरी काम नानाविकारी।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥

निवाला मनीं लेश नाही तमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics