Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Niranjan Niranjan

Tragedy Others

3  

Niranjan Niranjan

Tragedy Others

मोठ्या मनाचा माणूस - भाग चार

मोठ्या मनाचा माणूस - भाग चार

16 mins
819


भाग ९

राजू आणि बबनच्या मैत्रीला आता तब्बल दोन वर्ष होऊन गेली होती. त्यांची मैत्री अजूनच घट्ट झाली होती. आता प्रमोद आणि बबन फारसे बोलत नसत. ते तिघेही आता नववीत होते.

एक दिवस राजू शाळेतून घराकडे यायला निघाला. घराकडे आल्यावर पाहतो तर सगळीकडे आग आणि धूर. राजूची झोपडी आणि आजूबाजूच्या इतर काही झोपड्या वीज पडून खाक झाल्या होत्या. त्या दिवशी दुपारी जोराचा पाउस झाला होता. जोरजोरात वीजाही कडकडत होत्या. एक वीज झोपडपट्टीवर कोसळली. रखमा नुकतीच जेवण्यासाठी झोपडीत आली होती. तिने जेवणाचं ताट हातात घेतलं आणि एका क्षणात त्या ताटासह तिची राख झाली होती. राजू तिथे आला. तिथे सगळचं सामसूम होतं. राजूला सगळं समजलं. त्याने आपल्या आयुष्यातला अत्यंत कठीण आणि शेवटचा निर्णय तत्क्षणी घेतला आणि त्याने सायकल वळवली. तो पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याचा त्याच्या मनावर ताबाच राहिला नव्हता. तो बेफिकीरीने नुसता सायकलचे पॅडल मारत होता. एक दोनदा तर तो कारला धडकता धडकता वाचला. थोड्याच वेळात तो नदीच्या पुलापाशी येऊन पोहोचला. अजूनही जोरात पाऊस पडत होता. नदीचे पात्रही ओसंडून वाहत होते. राजूने सायकल तशीच सोडली आणि तो थेट पुलाच्या कड्यावर बसला. त्याचं मन सैरावैरा धावत होतं. आईच्या आठवणीने मध्येच त्याला भरून येत होतं. तो जेव्हा पहिल्यांदा वर्गात पहिला आला होता त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला आठवत होता. दोन दिवसांपूर्वी जेव्हा त्याने आईसाठी साडी घेतली होती, ती साडी पाहून आनंदित झालेली रखमा त्याला आठवली आणि त्याचं मन भरून आलं. आईच त्याच्यासाठी सर्वकाही होती. उन्हापावसाचं रस्त्यावर भिक मागून रखमाने त्याला वाढवलं होतं. तिच्या शिवाय जगणंच अशक्य होतं. त्याने दीर्घ श्वास घेतला व तो कड्यावर उभा राहिला. तो खाली नदीत उडी मारणार तेवढ्यात त्याला कोणीतरी मागे खेचलं. त्या माणसाने राजूला ओढतच मागे जीपपाशी आणलं आणि जीपच्या मागच्या सीटवर बसवलं. जीपमध्ये त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता. त्याने राजूचा हात घट्ट पकडला. तो मगाचा माणूस चालकाच्या सीटवर जाऊन बसला व त्याने गाडी चालू केली. थोड्या वेळाने गाडी एका गावात आली आणि एका मोठ्या वाड्यासमोर येऊन थांबली. अजूनही त्या माणसाने राजूचा हात घट्ट धरला होता. इतक्या वेळ राजूने काहीच हालचाल केली नव्हती. त्याचा चेहराही आता निर्विकार झाला होता. राजूला वाचवणारा माणूस त्या गावचा सरपंच होता. तो चांगलाच उंच आणि धिप्पाड होता. सखाराम पाटील त्याचं नाव होतं. तो वयाने तरूण व चांगला शिकलेला होता. सखारामने अॅग्रीकल्चर मध्ये डिग्री मिळवली होती. त्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती चांगलीच फुलवली होती. कुणाच्याही मदतीला धावून जाणारा असा गावात त्याचा लौकिक होता. सखारामने राजूला हाक मारली तसा राजू लगबगीने आला व तो राजूला घेऊन आत गेला. त्याने रुमालाने पुसून राजूला कोरडे केले. त्याचे ओले कपडे काढून त्याला कमरे भोवती गुंडाळायला पंचा दिला. राजूच्या चेहऱ्यावरची कळाच गेली होती. तो कुणाशीच अजून एक शब्द देखील बोलला नव्हता. थोड्या वेळाने रामूने चहाचा कप राजू समोर ठेवला. पण राजूने कपाकडे पाहिलं सुद्धा नाही. सखाराम तिथे आला व म्हणाला, “बाळ चहा घे, का असे स्वतःचे हाल करतोयस?” राजू काहीच बोलला नाही आणि त्याने चहाही घेतला नाही. जणू सखारामने बोललेला एकही शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. सखाराम तिथून गेला. थोड्या वेळाने रामू जेवणाचं ताट घेऊन आला. पण राजूने अन्नाला स्पर्शही केला नाही. राजूला खूप मोठा धक्का बसला असणार हे सखारामला कळालं होतं. नाहीतर एवढ्या लहान वयात कोण आत्महत्येचा निर्णय घेईल. त्याने थोड्यावेळ राजूला एकटं सोडण्याचं ठरवलं. सकाळी उठल्यावर राजू सगळं सांगेल अस त्याला वाटत होतं.

सकाळी स्वतः सखाराम चहा घेऊन राजूच्या खोलीत आला. जागरणामुळे राजूचे डोळे तारवटल्यासारखे दिसत होते. सखाराम त्याला म्हणाला, “बाळा, पहिलं चहा घे. मग आपण बोलू.” राजूने चहाचा एक घोट घेतला. त्याला थोड बरं वाटलं. त्याच डोकं खूप दुखत होतं. चहा संपल्यावर कुठे त्याच्या जीवात जीव आला. “आता तू थोडी विश्रांती घे. मग आपण बोलूयात.” एवढे बोलून सखाराम तिथून निघाला. राजूला पण गाढ झोप लागली. काल झालेल्या सगळ्या प्रकारामुळे तो फार दमला होता. झोपून उठल्यावर तो तसाच भिंतीला टेकून बसून राहिला. त्याच्या मनात राहून राहून आईचे विचार येत होते व त्याचे डोळे अश्रूंनी भरत होते. एका क्षणात होत्याच नव्हत झालं होतं. रामू परत जेवणाचं ताट घेऊन आला व म्हणाला, “बाळा, चार घास खाऊन घे. म्हणजे तुला बरं वाटेल. काल पासून काही बी खाल्ल नाहीस तू.” राजूने दोन तीन घास खाल्ले पण जेवण जाईना. त्याने ताट तसच ठेवलं. सखाराम तिथे आला व म्हणाला, “बाळा, काय झाल आहे ते मला सगळं सांग. मन मोकळं कर. असं गप्प बसून कसं चालेल?” राजू हळूहळू बोलू लागला. त्याने घडलेलं सगळं सखारामला सांगितलं. मधेच तो रडत होता.

सगळं काही ऐकल्यावर सखारामला फार वाईट वाटलं. राजूला या क्षणी किती त्रास होत असेल याचा विचारही सखारामला करवत नव्हता. तो राजूला म्हणाला, “फार वाईट झाले तुझ्या बाबतीत. तुला हवे तेवढे दिवस तू इथे राहू शकतोस. नंतर काय करायचं ते पुढचं पुढं बघू. आणि काहीपण लागलं तर मला सांग. विश्रांती घे. आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा पोटभर जेव.” राजूने नुसती मान डोलावली. सखारामशी बोलून त्याचं मन थोडं मोकळं झालं होतं.

सखारामच्या वाड्यावर येऊन राजूला चार दिवस झाले होते. आता त्याचं डोकं थोडफार ताळ्यावर आलं होतं. पण आईची आठवण त्याला सारखी येत होती. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे झालेली जखम भरून येण्यासाठी वेळ हेच एकमेव औषध होतं. अधूनमधून सखाराम त्याच्याशी बोलायचा. राजूही त्याला शाळेतल्या काही गमती जमती सांगायचा. बबन बद्दलही सखारामला राजूने बरच काही सांगितल होतं. राजूला बबनची आठवण येत होती. आपल्याला शोधण्यासाठी आख्खं शहर शोधलं असेल हेही त्याला माहित होतं. आणि झालही तसच. बबनने त्याच्या काही मित्रांबरोबर राजूचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच न मिळाल्याने बबन खूप निराश झाला होता. राजू त्याचा सर्वात जवळचा मित्र होता.

काही केल्या राजूला परत जायची इच्छा होत नव्हती. त्याचं घर, त्याची झोपडी तर निसर्गाच्या कोपामुळे साफ नाहीशी झाली होती. बबनला भेटायची, इतर मित्रांना भेटायची त्याची इच्छा तर होती पण तो विचार केला की त्याला ती काळरात्र आठवायची व त्याच्या डोक्यात कळ यायची. या चार दिवसात सखाराम व रामूने त्याची अतिशय उत्तम सेवा केली होती. सखाराम खरंतर त्या गावचा सरपंच होता. तो त्या गावातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त शिकलेला माणूस होता. पण आपल्या पदाचा आणि आपल्या श्रीमंतीचा त्याला बिलकुल गर्व नव्हता. तो राजूला सुद्धा अगदी मित्राप्रमाणे वागवत होता. राजूच्या दृष्टीने तर सखारामने त्याचा जीव वाचवून त्याच्यावर उपकारच केले होते. या उपकारांची परतफेड कशी करायची याचा तो विचार करत होता. त्याने ठरवलं, आता आपण सखारामला त्याच्या कामात मदत करायची. त्याच्या शेतात कामं करायची. सखारामचे उपकार फेडायचा हाच एकमेव मार्ग त्याच्याकडे होता. खरतर काहीही केलं तरी ते उपकार कधीच फेडता येणार नव्हते पण राजूच्या मनाला थोडं तरी समाधान मिळणार होतं. दुपारी सखाराम राजूच्या खोलीत आला व त्याला म्हणाला, “काय हिरो, बरा आहेस ना आता?” राजूने त्याच्याकडे हसून पाहिले व मान डोलावली. सखाराम राजूला म्हणाला, “तुला इथे राहून आता चार दिवस झाले. तुझ्यावर जी वेळ आली ती कोणाच्या शत्रूवरही यायला नको. आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते म्हणजे काय असतं याचा अनुभव मीही एकदा घेतलाय.” सखारामचा चेहरा गांभीर झाला व तो पुढे सांगू लागला, “माझा एक लहान भाऊ होता. तेव्हा साधारण तो तुझ्याच वयाचा असेल. काही वर्षांपूर्वी ती घडना घडली. ती आठवली की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. आम्ही सगळी मुलं रोज नदीवर पोहायला जायचो. मला पहिल्यापासूनच पोहायची आवड होती. माझ्या भावाला विकासला मात्र पाण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे तो कधी पोहायला शिकला नाही. मी ठरवलं होतं काहीही झालं तरी विकासला पोहायला शिकवायचं. त्याची पाण्याची भीती घालवायची. मी एका कापडात थर्माकॉल बांधून तो त्याच्या पाठीवर बांधला. त्याला हात पाय कसे मारायचे हे दाखवलं. थर्माकॉलमुळे आपण बुडणार नाही हे त्याला माहित होतं त्यामुळे तो पण निर्धास्त झाला. तो पोहत पोहत थोडा पुढे गेला. त्याला फार मजा येत होती. थर्माकॉलमुळे तो न पोहताही पाण्यात एकाच जागी तरंगत होता व हसत माझ्याकडे पाहत होता. मीही त्याच्याकडे कौतुकाने पाहून हसत होतो. थोड्यावेळाने तो अजून पुढे पोहत गेला. मी अजूनही काठावरच होतो. इतरही काही मुले तिथे पोहत होती. आता विकास बराच पुढे गेला होता. तो तिथून परत यायला निघाला आणि त्याच्या पाठीवर बांधलेल्या थर्माकॉलची दोरी सुटली, त्याच्या पाठीवरचा थर्माकॉल सुटला व पाण्याबरोबर वाहून गेला. विकास हात पाय मारायचा प्रयत्न करत होता पण भीतीमुळे त्याचे पायच हलेनात. तो जोर जोरात दादा दादा वाचव असं ओरडू लागला तसं माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. मी लगेच कपडे काढले व पाण्यात उडी मारली. तो माझ्या पासून फारच लांब होता. मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतच तो बुडून नदीच्या तळापाशी पोहोचला होता. मी काहीच नाही करू शकलो रे. माझा सख्खा भाऊ पाण्याला घाबरणारा विकास माझ्यावरच्या त्याच्या दादावरच्या विश्वासामुळेच पोहायला तयार झाला होता. आणि केवळ माझ्यामुळेच तो मला सोडून गेला. मी काहीच करू शकलो नाही.” हे सांगतांना त्याचा आवाज कापत होता. त्याचे डोळे देखील अश्रुंनी भरले होते. थोडा थांबून सखाराम पुन्हा बोलू लागला, “मी जेव्हा तुला पुलाच्या कठड्यावर उभे पाहिले तेव्हा मला क्षणभर वाटलं, देवानेच मला माझ्या भावाला परत एकदा वाचवायची सांधी दिलीये व मी तुला मागे ओढलं. तुला पाहून आता मला जणू विकासच परत आल्यासारखं वाटतय.” सखाराम थोडा थांबून पुन्हा म्हणाला, “राजू, तुला पाहिजे तेवढे दिवस तू इथे रहा. अगदी कायमचा राहिलास तरी चालेल. खरतर आता मी जे बोललो ते मी तुला सांगणार नव्हतो, पण मला राहवलं नाही. मन शांत झालं तुझ्याशी बोलून.”

आता राजू बोलू लागला, “दादा, हो मी तुम्हाला दादाच म्हणतो. दादा खरतर त्या दिवशी मला मरणाच्या दाढेतून बाहेर काढून तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केलेत. या जन्मात तरी मला ते फेडता येणं केवळ अशक्यच आहे. माझं घरही आता राहीलं नाही आणि परत त्या शाळेत जाऊन माझं तिथे लक्ष लागेल असही मला आता वाटत नाही. तुम्ही मला इथं रहायला देऊन खरतर तुम्ही माझ्यावर परत एकदा उपकारच करताय. मी इथे राहून तुम्ही जे काम सांगाल ते मी करेन. शेतात राबेन, घरची कामे करेन. केवळ तुमच्याचमुळे मला माझा पु्र्नजन्म झाल्यासारखां वाटत आहे.” एवढे बोलून तो थांबला. आणि त्याने आदराने सखारामच्या पायाला हात लावला आणि सखारामच्या डोळ्यातून एक अश्रुचा थेंब राजूच्या केसांत पडला. सखाराम वेगळ्याच विचारात रमला होता. राजू जे काही बोलला त्याच्याकडे त्याचं लक्षचं नव्हतं. जेव्हा “दादा” हा शब्द त्याच्या कानावर पडला तेव्हाच तो भूतकाळात गेला होता. दादा, दादा म्हणत त्याच्या मागे पळणारा विकास त्याच्या डोळ्यांसमोर आला होता. विकासच्या आठवणी एकापाठोपाठ एक त्याच्या मनामध्ये येत होत्या व त्याचे डोळे पाणावत होते. थोड्यावेळाने सखाराम काहीच न बोलता तिथून निघून गेला.

आता राजू चांगलाच रमला होता. त्याने एक चिठ्ठी देखील लिहिली होती व रामूला ती हळूच बबनच्या घरी पोहचती करायला सांगितलं होतं. राजूनं त्यात आतापर्यंत घडलेलं सगळं लिहिलं होतं. सखाराम दादा कसा चांगला आहे, तो माझी किती काळजी घेतो तसेच मी सुखरूप आहे व आता तू माझा शोध घेऊ नकोस आणि माझी काळजी करू नकोस असं सगळं लिहिलं होतं. त्याने चिठ्ठीत शेवटी लिहिलं होतं, “नशिबात असेल तर परत केव्हातरी आपली भेट होईलच.” खरंतर बबनला भेटायची राजूची फार इच्छा होती. पण मग तो आपल्याला परत तिथे येण्याचा आग्रह करेल असं राजूला वाटत होतं.

राजू आता रोज सकाळी शेतात जाऊन काम करायचा. सखाराम शहरात जाताना काहीवेळा राजूलाही बरोबर घेऊन जायचा. कोणत्या सिजनला कुठलं पीक घ्यायचं, चांगलं बियाणं कसं निवडायचं, पीकाची काळजी कशी घ्यायची हे सगळं सखारामनं राजूला शिकवलं होतं. तसेच आधुनिक शेतीची काही पुस्तकही त्याने राजूला वाचायला दिली होती. फावल्या वेळात राजूचं वाचन चालू असायचं. गावातल्या इतर मुलांबरोबर राजूची आता मैत्री झाली होती. रोज सांध्यकाळी तो त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचा. कधी क्रिकेट तर कधी फुटबॉल तर कधी कबड्डी सुद्धा. त्या मुलांना शाळेला जातांना पाहून राजूला पण त्याच्या शाळेची आठवण यायची व शाळेत जायची त्याचीही इच्छा व्हायची. तो जर बोलला असता तर सखारामने लगेच त्याची शाळेत ऍडमिशन केली असती. पण मग शेतातली कामं पण त्याला करायची होती. राजू आल्यापासून सखारामचं शेतातलं बरचसं काम कमी झालं होतं. तसे शेतात काम करणारे बरेच कामगार होते, पण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची गरज होती. राजू तेच काम करायचा. तो वयाने लहान असला तरी हुशार होता व त्याला जबाबदारीची जाणीव होती. सखारामचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.

एकदा सखारामच राजूला म्हणाला, “राजू, तू परत शाळेत जावस असं मला वाटतं.” तेव्हा राजू त्याला म्हणाला, “पण मी जर शाळेत गेलो तर मग शेतावर कोण लक्ष ठेवणार?. तुम्हालाही इतर कामं खूप असतात, आणि खरंतर मला हे काम आवडायला लागलं आहे.” “हे बघ राजू, तुला जर हे काम आवडत असेल तर तू नक्की कर. पण जर तुला शाळेत जायची इच्छा असेल तर मी शेताच्या कामासाठी दुसरा कोणीतरी पाहीन. त्यामुळे पुढे कधी जर तुला शाळेत जायची इच्छा झाली तर मला नक्की सांग. तू म्हणशील त्या शाळेत आपण प्रवेश घेऊ.” सखाराम राजूला म्हणाला. राजूला खरंतर आता परत शाळेत जाऊन पुढे शिकायची इच्छा होत होती. पण सखारामच्या उपकारांची जाणीवही त्याला होती. खरचं वयाच्या मानाने फारच समजूतदार होता राजू.

राजू रोज शेतात जाऊन स्वतः कामही करत असे व इतर कामगारांवर लक्षही ठेवत असे. एखाद्या कामगाराने जर नीट काम नाही केलं तर राजू त्याबद्दल सखारामला सांगत असे. मग सखाराम त्या कामगाराला जाब विचारायचा. तसेच सरपंच म्हणून काम करत असतांना गावातील बरेच लोक सखारामकडे तक्रार घेऊन येत असत. सखाराम राजूबरोबर लोकांच्या समस्यांबद्दल चर्चा करत असे. मग ते दोघे मिळून त्या समस्या सोडवत असत. काहीवेळा तर लोक आपापसातली भांडणं घेऊन सखारामकाडे यायचे. गावातल्या लोकांना सखारामबद्दल प्रचंड आदर वाटायचा. कोणत्याही समस्येकडे तो स्वतःचीच समस्या असल्याप्रमाणे पाहायचा. या दोन वर्षात राजू सखारामकडून खूप काही शिकला होता.

सखाराम मुळातच हुशार व समजूतदार होता. अगदी लहान असल्यापासून तो स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकला होता. आईची हुशारी आणि वडिलांचा चांगुलपणा, दिलदारपणा त्याच्यात आला होता. सखारामची आई जात्याच हुशार होती पण लहान वयातच तिला धनंजयराव पाटीलांसारखं मोठं आणि दमदार स्थळ आल्यामुळे वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. धनंजयराव पाटील हे अतिशय प्रामाणिक आणि दिलदार होते. गावात कोणालाही पैश्याची किंवा इतर कोणतीही मदत लागली तर ते पुढचा मागचा विचार न करता सढळ हातांनी मदत करायचे. त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा होता. आपल्यामुळे गाव नाही तर गावामुळे आज आपण जे काय आहोत ते आहोत अशी त्यांची धारणा होती. सलग २० वर्ष सरपंच पद सांभाळल्यावर एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर गावानं एकमतानं केवळ २५ वर्शीय असलेल्या सखारामला सरपंच म्हणून निवडलं होतं. केवळ सहानुभूती म्हणून नाही तर धनांजयरावांवर असलेल्या विश्वासामुळेच गावकऱ्यांनी सखारामला निवडलं होतं. केवळ चारच वर्षाच्या कारकिर्दीत सखारामने स्वतःला सिद्ध केलं होतं. खरंतर पैशाच्या व लौकिकाच्या जोरावर आमदार होणं सखारामला सहज शक्य होतं, पण हे गाव सोडायची त्याची बिलकुल इच्छा नव्हती. या गावानं त्याच्या घराण्याला आणि त्याला खूप काही दिलं होतं. त्याचीच परतफेड करायची संधी त्याला मिळाली होती.

सखारामच्या आयुष्यात आता सगळंकाही होतं. पण आता वेगळ्याच विचारांनी त्याच्या मनात घर केल होतं. सखारामला आता लग्नाचे वेध लागले होते. तशी त्याच्या पहाण्यात एक मुलगी होती. रसिका शिंदे. सखाराम कॉलेज मध्ये असतांना रसिका त्याच्या गावात शिकायची. त्याला फार आवडायची ती. रसिकालाही सखाराम आवडायचा. पण कॉलेजात असतांना हाय हॅलो च्या पुढं कधी त्यांचं बोलणं झालं नाही. काही दिवसांपूर्वी सखाराम एका कामासाठी शहरात गेला असतांना त्याला रसिका भेटली. दोघांनीही एकमेकांना ओळखलं. थोडावेळ कुणीच एकमेकांशी बोलल नाही. शेवटी सखारामच रसिकाला म्हणाला, “इतकी वर्ष झाली, पण तू काही बदलली नाहीस. कॉलेजच्या दिवसात जशी होतीस अगदी तशीच आहेस अजून.” हे ऐकल्यावर रसिका चक्क लाजली. थोड्या वेळाने रसिका म्हणाली, “तू तरी कुठे बदलला आहेस फारसा.” आणि दोघेही हसले. आता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या दिवशी ते इतके बोलले की ते इतक्या वर्षानी भेटले आहेत असं कुणालाही वाटलं नसतं. शेवटी त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला व “परत भेटू” असं म्हणून निघाले.

आता सखाराम आणि रसिकाचं जवळजवळ रोजच फोनवरुन बोलणं व्हायचं आणि शहरात आल्यावर भेटणंही व्हायचं. शहरात जर काही काम नसलेच तर मुद्दाम एखादं काम काढून शहरात जाऊन सखाराम रसिकाला भेटायचा. आधी केवळ कामासाठी फोन करणाऱ्या सखारामला तासनतास फोनवर बोलतांना पाहून दादाचं काहीतरी चालू आहे हे राजूला कळलं होतं. वेळ आल्यावर दादा स्वतःहून आपल्याला सगळं सांगेल अशी राजूला खात्री असल्यामुळे त्याने कधी सखारामला विचारलं नाही. एक दिवस रसिका सखाराम सोबत त्याच्या घरी आली. त्याने सगळा वाडा तिला दाखवला तसेच रामूची व राजूची ओळख करून दिली. सखारामने आधीच राजूबद्दल सांगितलं होतं. त्याच दिवशी रसिका परत गेल्यावर सखारामने राजूला सगळं सांगितलं व पुढच्याच महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत असही सांगितलं. हे ऐकून राजूला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षानी त्या वाड्यात एखाद्या स्त्रीचा वावर होणार होता. सखारामची आई जाऊन कित्येक वर्ष झाली होती. त्यानंतर घरातली सर्व कामं रामूच करायचा. अगदी सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा रामूच करायचा. त्याला स्वयंपाक फारसा जमायचा नाही पण त्याच्या परीने जमेल तसं तो करायचा. अन्नाला नावं ठेवायची नाही म्हणून सखारामने व राजूने सुद्धा कधी त्याच्या अन्नाला नावं ठेवली नाहीत. काहीच दिवसांत वहिनीच्या हातचं खायला मिळणार म्हणून राजू सुद्धा आता सुखावला होता.

आता लग्नाची तयारी जोरदार सुरु होती. सखाराम, रामू व राजू तिघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. लग्न आता काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं‌. कार्यालय, जेवण व भटजी हे सगळं सखारामने आधीच ठरवलं होतं. गावोगावी जाऊन पत्रिका पोहोचवायचं काम राजू आणि त्याच्या गावातील मित्रांनी केलं. पूर्ण वाडा साफ करणं व आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करायचं काम रामुवर सोपवलं होतं. रसिकाच्या बाबांनी सखारामला हुंड्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला, “हुंडा हा प्रकारच खरंतर मला पटत नाही. तुमच्या मुलीचा हात तुम्ही माझ्या हातात दिला हेच माझ्यासाठी खूप आहे.” रसिकाचे आई वडील सुद्धा खुश झाले. आपल्या मुलीला सखाराम सारखा कर्तबगार नवरा मिळाला हेच ते स्वतःचं भाग्य समजत होते.

शेवटी एकदाचा लग्नाचा दिवस उजाडला. सखारामचे गावोगावीचे नातेवाईक, त्याचे मित्र मैत्रिणी, काही राजकीय लोक तसेच जवळ जवळ सगळेच गावकरी लग्नाला आले होते. रसिकाच्या बाजूचेही बरेच लोक होते. लग्न छान झालं. राजूनेही खूप मेहनत घेतली होती. एकावेळी इतके लोक तो पहिल्यांदाच पाहत होता. बऱ्याच दिवसांनी तो सखारामच्या घोड्यापुढे बेभान होऊन नाचला. वरात वाडा्यापाशी आली. दारातला तांदळाने भरलेला पेला कलंडला व रसिकाने सखारामची धर्मपत्नी म्हणून पहिल्यांदाच वाड्यात प्रवेश केला. सखाराम आता संसारी माणूस झाला होता.

थोड्याच दिवसात सखाराम व रसिका हनिमूनसाठी गोव्याला निघाले. रसिकाला वाड्यात येऊन थोडेच दिवस झाले होते. पण राजूला तिचं वागणं थोडं तुटकचं वाटत होतं. भाऊजी आणि वहिनीमध्ये ज्याप्रमाणे भावा बहिणीसारखं नातं असायला हवं तसं नातं अजूनतरी राजू आणि रसिका मध्ये तयार झालं नव्हतं. इतक्या दिवसात रसिकाने केवळ एकदाच स्वयंपाक केला होता. तेव्हा सुद्धा ती राजूला म्हणाली होती, “राजू, मी जेवण बनवलय, आत कट्ट्यावर सगळं ठेवलं आहे वाढून घे.” तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर नव्हताच उलट एक प्रकारचा तिरस्कार, उद्धटपणा राजूला तेव्हा जाणवला.

सखाराम व रसिका आता हनिमूनवरून परत आले होते. सखारामचे काही मित्र ज्यांना काही कारणाने लग्नाला यायला जमलं नव्हतं ते सखाराम व रसिकाला भेटून गेले. आता सखाराम परत कामाला लागला होता. बऱ्यावचवेळा तो कामासाठी बाहेर गावी जायचा. त्याने अजून काही व्यवसाय सुरु केले होते. तसेच काही जागाही घेतल्या होत्या. त्यामुळे सखाराम आता फारच व्यस्त असायचा. शेती आता पूर्णपणे राजूच सांभाळत होता. दिवसभर शेतात काम करून आल्यावर वहिनीने आपल्याला मस्तपैकी गरम गरम चहा किंवा शिरा करून द्यावा असं त्याला वाटायचं. पण वहिनीच्या अशा वागण्यामुळे त्याला दहा वेळा विचार करायला लागायचा. सखाराम घरी असतांना मात्र रसिका राजूशी फार छान वागायची. तिच्या वागण्यातला बदल राजूला लगेच जाणवायचा.

रसिकाला सखारामने राजूबद्द्ल पूर्वीच सगळं सांगितलं होतं. पण रसिकाचे विचार सखाराम इतके उदात्त नव्हते. एका भिकारणीच्या मुलाला सखाराम भाऊ कसा मानतो हेच रसिकाला पटत नव्हतं. त्यामुळे सखारामसाठी जरी राजू त्याचा भाऊ असला तरी रसिकासाठी तो केवळ एक भिकारणीचा मुलगा होता. त्याला भेटण्या आधीपासूनच रसिकाच्या मनात राजूबद्द्ल एक प्रकारचा तिरस्कार निर्माण झाला होता. वाड्यात येऊन आता तिला जवळ जवळ चार महिने झाले होते. राजूबद्दलचा तिचा तिरस्कार अजूनही कमी झाला नव्हता. उलट तो दिवसेंदिवस वाढतच होता. राजूचा अपमान करायची, त्याला कमीपणा दाखवायची एकही संधी रसिका सोडत नव्हती. राजूला तर याचा खूप त्रास होत होता. पण वहिनी म्हणून तो तिच्याशी चांगलचं वागायचा. ती त्याला काहीही बोलली तरी तो तिला उलटून काहीच बोलायचा नाही. मुकाट्याने ऐकून घ्यायचा.

एक दिवशी सकाळी एक भिकारी वाड्याच्या दारात आला व खायला मागू लागला. रसिका बाजूच्या झोपळ्यावर काहीतरी विणत बसली होती. सखाराम घरात नव्हता व राजू जवळच्या एका झाडाला आळं करत होता. भिकाऱ्याकडे पाहून रामू म्हणाला, “थांब इथच. भाकरी आणतो तुझ्यासाठी.” हे ऐकून राजूला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात रसिका रामूला म्हणाली, “काय नको रे रामू. या भिकाऱ्यांना सगळं आयतं हवं असतं. अजिबात काही देऊ नकोस त्याला.” तिचं बोलणं रामूला आवडलं नव्हतं. पण मालकिणीचं ऐकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. राजू तर रागाने लाल झाला होता. तिचं बोलणं आपल्याला उद्देशून आहे हे त्याला माहित होतं. त्याने हातातलं खुरपं खाली मातीत मारून मन शांत करण्याचा प्रयत्न केला. असा त्याचा अपमान कित्येकदा झाला होता. आपल्यामुळे सखाराम आणि वहिनीतलं नातं बिघडायला नको म्हणून तो हे सगळं सखारामला सांगत नव्हता. तो कसेबसे दिवस काढत होता.

आज तर रसिकाने दुष्टपणाचा कळस केला. सकाळीच चहा पिता पिता सखाराम तिला म्हणाला, “कोल्हापुरात एक आलिशान हॉटेल काढायचा मी विचार करतोय. त्या हॉटेलचं सगळं व्यवस्थापन मी आपल्या राजूला द्यायचं ठरवलंर आहे. राजू आता मोठा झालाय. तो हुशार व मेहनती आहे. तो नक्कीच हॉटेल चांगलं सांभाळेल असं मला वाटतं.” रसिका काहीच बोलली नाही. सखाराम जाईपर्यंत ती गप्प होती. पण सखाराम घराबाहेर पडल्यावर तिने जो तोंडाचा पट्टा सुरु केला तो बंद व्हायचं नावचं घेत नव्हता. दिवसभर तिने राजूला भिकारी म्हणून हिणवलं. खूप बोलली ती राजूला. त्याच्या मृत आईचाही तिने उद्धार केला. राजूची सहन शक्ती आता सांपली होती. पाणावलेल्या डोळ्यांसह तो त्याच्या खोलीत गेला व एक पेन कागद घेऊन त्याने चिठ्ठी लिहायला सुरुवात केली.


प्रिय सखाराम दादा,


आता मी एक क्षणही या घरात राहू शकणार नाही. म्हणून मी घर सोडून जात आहे. कारण मी सांगू शकणार नाही. खरंतर तुझ्या सारख्या महान माणसाचा भाऊ म्हणून या घरात रहायला मिळालं हे मी माझं भाग्यच समजतो. हे घर सोडतांना मला फार वेदना होतायेत. पण माझा नाईलाज आहे. माझी काळजी करू नकोस असं सांगणही खरंतर चुकीचं आहे. पण तरीपण माझी काळजी करू नकोस. आजपर्यंत तू मला खूप काही दिलंस. आता केवळ तुझा आशिर्वाद मला हवाय.


तुझा लाडका,

राजू


अश्रुंनी भरलेली ती चिठ्ठी राजूने टेबलवर ठेवली. बॅगेत थोडे कपडे घेऊन व कपाटातले स्वतःच्या कष्टाने कमावलेले थोडे फार पैसे घेऊन तो घराबाहेर पडला. रामूने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण, रसिकाने नजरेने खुणावताच रामू मागे सरकला व त्याने राजूला जाऊ दिले. जे काय घडलं ते सखारामच्या कानावर जाता कामा नये अशी सक्त ताकीद रसिकाने रामूला दिली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणेच सगळं घडलं होतं.

राजू घर सोडून जायला आता चार दिवस झाले होते. सखाराम गावात परत आला. त्याला सांगाण्यसाठी रसिकाने एक खोटी स्टोरी तयार केली होती. काही कामासाठी सांगून गेलेला राजू परत आलाच नाही. आम्ही त्याला खूप शोधलं पण तो कुठेच मिळाला नाही असं तिने सखारामला सांगितलं. चेहऱ्यावर खोटया काळजीचे भाव आणून ती सखारामशी बोलत होती. सखारामसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्याने गावातील काही लोकांना बोलावून पूर्ण गावभर राजूला शोधायला सांगितलं व तो स्वतः रामूला बरोबर घेऊन शहराकडे निघाला. त्याने अख्खं कोल्हापूर शहर पालथं घातलं पण राजू कुठेच मिळाला नाही. गावातील मुलांनादेखील मागचे काही दिवस राजू भेटला नव्हता. राजूची झोपडी जिथे होती त्या शिंगणापूरच्या झोपडपट्टीत देखील सखाराम जाऊन आला. पण तिथेही कोणाला राजूचा पत्ता नव्हता. निराश मनाने व रिकाम्या हातांनी सखाराम परत वाड्यावर आला. राजूला भेटल्यापासून आपला भाऊच परत आला आहे असं सखारामला वाटत होतं. इतक्या वर्षात सखारामला राजूचा खूप लळा लागला होता. सखाराम वाड्यात आला व थेट राजूच्या खोलीत शिरला. तिथे त्याला टेबलावर ठेवलेली चिठ्ठी दिसली. सखारामने ती चिठ्ठी वाचली. सखारामच्या डोळ्यातून अश्रुंचे थेंब त्या चिठ्ठीवर पडले व पुन्हा एकदा ती चिठ्ठी ओली झाली.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy