वेताळ आणि मनुष्याचे प्रेम
वेताळ आणि मनुष्याचे प्रेम
" अंजली... किती वेळ झाला अजून झोपली आहेस. कॉलेज नाही आहे का ?" असे बोलतच तिची आई तिच्या खोलीत आली. " आई, उठले ना ! फक्त २ मिनिटे दे ना !" अंजली बोलली.
तिच्या आईने फक्त २ मिनिटे दिली आणि त्या निघून गेल्या. अंजली उठली आणि तिने तिचे आवरून घेतले आणि खायला ती जेवणाच्या टेबल वर आली होती.
" आवरून झाल का ?" आई बोलली. " हो, खायला दे मी निघते." अंजली बोलली. अंजली कॉलेजला निघून गेली. अंजलीचे कॉलेज मध्ये बरेच मित्र आणि मैत्रीण होते. त्यात काही खास मित्र मैत्रीण होते. तिचा दिवस खूप छान गेला. पण ती ज्या वाटेने जायची त्या वाटेत मध्ये एक जंगल लागायचे.
ती त्याच जंगलातून जायची पण तिला कधी ही भीती वाटली नव्हती. पण आज तिला भीती वाटत होती. त्याच कारण ही तसेच होते. अमावस्या होती. तीच काळरात्र ज्याला सर्व जण घाबरतात.
अंजली जंगलातून जात होती. आज तिच्यासोबत तिची मिताली नावाची मैत्रीण नव्हती. कारण तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती कॉलेजला आली नव्हती.
अंजली एकटीच ते जंगल पार करत होती. अचानक तिला मागून आवाज आला. " अंजली अंजली...." ती विचार करत होती की, आपले नाव कोणाला माहीत आहे ? आणि त्याला आपले नाव कसे माहीत ? कुठून समजले ?
ती पुढे जातच होती की, " अंजली थांब ना ! तुला जे प्रश्न पडले त्याची उत्तर माझ्याकडे आहेत." असा आवाज झाला. आता तिने त्याला उत्तर देण्याचे ठरवले. " तुम्ही कोण आणि मला कसे ओळखता ? मला तुम्ही दिसत का नाही ?" अंजली बोलली.
इतक्यात तिच्या समोर एक विशाल काय शरीराचा दैत्य येऊन उभा ठाकला. त्याला बघून ती घाबरली. ती पळू लागली होती. पण तिचे पाय एकाच जागेवर जखडून ठेवल्यासारखे झाले होते.
" सोड, मला सोड कृपया सोड." असे अंजली बोलत होती. " मी प्रतीक पाटील. ह्या गावात नवीन आलो होतो. तुझ्याच सारखा नवीन होतो. पण ह्या गावकऱ्यांनी मला मारून माझे प्रेत ह्या जंगलात पुरले होते. तेव्हा पासून मी वेताळ बनून फिरतो आहे." असे तो दैत्य बोलला.
अंजली म्हणाली, " पण तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे ?" वेताळ म्हणाला, " मैत्री हवं आहे. तू माझ्याशी मैत्री करशील का ?" अंजली म्हणाली, " मैत्री आणि ते ही भूताशी. ठीक आहे. पण मला तू काहीच करणार नाही हे कशावरून ?"
वेताळ बोलला, " मी तुला काहीच होऊ देणार नाही. तुला सर्व संकटांपासून वाचवेल." अंजली म्हणाली, " ठीक आहे. मला वचन दे." वेताळने तिला वचन दिले. त्याने तिला सोडून दिले. अंजली घरी आली. तिला विश्वास बसत नव्हता.
" बाळ, आली का ? हात पाय धुवून घे. मग मी जेवायला वाढते." असे तिची आई बोलली. अंजली फ्रेश होऊन खाली आली. तिला त्यानंतर खूप ताप चढला. तीन दिवस ती कॉलेजला गेलीच नाही. जंगलात वेताळ देखील विचार करत होता की, " अजून अंजली का नाही आली ? खुप दिवस झाले ती आली का नाही ?"
शेवटी ५ व्या दिवशी अंजली कॉलेजला गेली आणि येताना त्याच जंगलातून येत होती. वेताळ चांगलाच भडकला होता. ती दिसताच त्याने तिला हवेत अधांतरी घेतले. " काय ? इतके दिवस का आली नाहीस ? मी किती वाट पाहत होतो."
" वेताळ मला माफ कर. माझी तब्येत ठीक नव्हती. मी आजारी होते. त्यामुळे मी घराबाहेर पडलेच नाही." असे अंजली बोलली.
वेताळ काहीच बोलला नाही. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याने तिला खाली सोडले. तिने आज वेताळ करिता काहीतरी आणले होते. तिने बॅगेतून एक खायची गोष्ट काढली आणि वेताळ समोर ठेवत ती म्हणाली, " वेताळ ही मी तुला खायला घेऊन आली आहे. बघ काय आहे आणि कसे लागते."
वेताळने ते अन्न लगेच ग्रहण केले. त्याला ते खूप आवडले. वेताळ म्हणाला, " हे काय होत ? खुप चविष्ट होत. उद्या ही आणशील का ?" अंजली थोडी हसली आणि बोलली, " हे गुलाबजाम आहेत. मला आवडतात म्हणून मी घेतले."
वेताळ बोलला, " अच्छा ! पण उद्या ही आण." अंजली बोलली, " अरे, हे खूप महाग मिळतात. आज पैसे होते म्हणून विकत घेतले. रोज रोज कशी आणू." खरे तर अंजलीला त्या वेताळ पासून सुटका करून घ्यायची होती.
पण ते सहज शक्य नव्हते. ती घरी गेली. दुसरीकडे वेताळ देवाकडे एक मागणे मागत होता की, " देवा मला ही मुलगी आवडली आहे. मला हिच्याशी लग्न करायचे आहे. पण मी एक वेताळ आहे. तसे ही मला लग्नाच्या आधीच मारून टाकण्यात आले आहे. त्यामुळे माझी लग्न करण्याची इच्छा तशीच आहे."
इतक्यात वीज कडकडावी तसा आवाज झाला आणि त्याच्यासमोर एक पांढरी आकृती येऊन उभी राहिली. " वत्स, तुझी इच्छा मला ठाऊक आहे. मी प्रत्यक्ष देव नाही पण त्याने तुझी मदत करायला पाठवले आहे. तुला आज शोधून काढायचे आहे असा व्यक्ती जो नुकताच मेला आहे. ज्याचे वय तुझ्या वया ईतकेच आहे. पण तुला त्याच्या शरीरात प्रवेश करायचा असेल तर स्मशानात करावा लागेल. त्याला जाळायच्या आत करावा लागेल."
त्या प्रमाणे वेताळ तसा मुलगा शोधायला बाहेर पडला. त्याच्या अंगावर कुत्रे भुंकत होते. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याला फक्त अंजली आठवत होती. शेवटी त्याला एक घर मिळाले जिथे त्याच्याच वयाचा मुलगा मरण पावला होता.
त्याला वाट पाहवली जात नव्हती. पण अटीनुसार स्मशानातच तो त्याच्या शरीरात प्रवेश करू शकत होता. त्यामुळं जेव्हा त्या मुलाच्या शरीराला स्मशानात आणले गेले तेव्हा वेताळने त्याच्या शरीरात प्रवेश केला. तसा तो मुलगा त्याचे हात पाय हलवायला लागला.
हे दृश्य पाहून तिथली माणसे घाबरली. पण काहीना हा चमत्कार वाटला. त्या मुलाचे बाबा बोलले, " आपल बाळ, बघ ते जिवंत झालं."
त्याची आई :- हो, मी ही पाहते आहे.
त्याची बहीण :- दादा, आम्हाला सोडून गेलाच का होतास ?
त्यांना त्यांचा मुलगा परत आल्याचा आनंद झाला होता. त्या मुलाच्या आईचे नाव रुक्मिणी आणि बहिणीचे कांता तर वडिलांचे नमन होते. ते सर्व घरी आले आणि त्यांचे जीवन जगू लागले.
पण इकडे प्रवेश मिळवल्यानंतर त्याला तो वेताळ असताना काय झालं होत हे माहीत नव्हतं तो त्या मुलाचे आयुष्य जगत होता. त्या मुलाचे नाव अमन होते. अंजली पण त्या गावात नवीन होती. कारण ती फक्त एकाच वर्षासाठी गावी आली होती.
तीच एक वर्ष संपले की, ती परत शहरात जाणार होती. आता अमन देखील आनंदी होता. तो कॉलेज मध्ये जात होता. तो शेवटच्या वर्षाला शिकत होता. पण अंजली ही डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात होती.
पण सुदैवाने अंजली आणि अमन एकाच कॉलेज मध्ये होते. अंजली कॉलेज मध्ये होती आणि अमन पण कॉलेज मध्येच होता.
मीना :- अग, अंजली तो बघ अखडू अमन आलाय.
अंजली :- अग, हा तर मेला होता ना !
मीना :- हो, पण हा तर चमत्कार म्हणावा लागेल.
अंजली :- हो, खरचं.
इतक्यात अमनच लक्ष त्या दोघींकडे गेले........
आता पुढे काय होईल ? वेताळ आणि अंजलीचे प्रेम सफल होईल का ? अमनला त्याचा वेताळ जन्म आठवेल का ? त्याला अंजलीला आपण ओळखतो हे कळेल का ? पाहू पुढील भागात.........


