नियती भाग १
नियती भाग १
त्या दिवशी रविवार होता. चांगला मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि आता रिमझिम चालू होती. बायको माहेरी गेली होती त्यामुळे आता काय करांव याच विचारात होतो. अश्या वेळी बायको असती तर तिला भजी आणि कॉफी करायला सांगितली असती आणि गॅलरीत बसून छान आस्वाद घेतला असता. शेवटी ठरवल की आपणच करावी. मग तयारीला लागलो. प्रथम कांदा आणि बटाटा चिरणे आले. चला भजी हवी असेल तर पर्याय नाही. किचन कडे मोर्चा. दारावरची घंटी वाजली. दार उघडल तर माझा जिवलग मित्र प्रकाश उभा, चेहरा गंभीर.
“कायरे काय झाल ? ये ये. आतच चल मी मस्त भजी करतोय भजी खाऊ, कॉफी पियू. मजा करू. पण तू एवढा गंभीर का ?” मी म्हणालो.
“अरे आईचा फोन आला होता. आमच घर रस्ता रुंदीत जातंय म्हणून.”- प्रकाश.
“पण तू तर म्हणाला होता की केस कोर्टात गेली आहे आणि स्टे मिळाला आहे मग आताच एकदम काय झाल ?” तोवर मी कांदा कापायला घेतला.
“कोर्टाचा निकाल लागला. पालिकेच्या बाजूने. आता पालिका थांबायला तयार नाही. पुन्हा स्टे यायच्या आत त्यांना बुलडोजर चालवायचा आहे. एकदम emergency आली आहे.” प्रकाश आता रडवेला झाला. होता.
“मग आता ? मी काय करू शकतो ?”
“तू काय करणार ? जे काही करायच ते पालिकांच करणार आहे. मी फक्त मन मोकळ करायला आलो. बस. आता गावी जाऊन घर तुटायच्या आधी सर्व आवरा सावर करून आईला घेऊन इथे यायच. बाकी नंतरच नंतर बघू.” – प्रकाश.
“मी येतो ना तुझ्या बरोबर. केंव्हा जाणार ते सांग म्हणजे तशी रजा टाकतो.”
“खरंच तू येशील ? बरीच मदत होईल मला.” – प्रकाश.
“नक्कीच येईन.”
दोन दिवसांनी आम्ही त्याच्या गावी गेलो. घरी जाऊन सगळ नको असलेलं सामान भांगारवाल्याला दिल. जे कामाच होत तेवढ उचलून टेम्पो मध्ये घातल आणि पुण्याला पाठवून दिल. उरलेलं मागची खोली पडणार नव्हती त्यात रचून ठेवलं. मग प्रकाश तिथेच राहिला आणि मी त्यांच्या आईला घेऊन पुण्याला आलो. दुसऱ्या दिवशी टेंपोवाल्याचा फोन आला. मी सामान प्रकाशच्या घरी उतरवून घेतलं. आणि परत गावी गेलो. प्रकाश हॉटेल मधे शिफ्ट झाला होता. मी जॉइन झालो.
डोळ्यासमोर वाडवडिलांच घर जमीनदोस्त होतांना पाहून प्रकाश व्यथित झाला होता. मला पण फार वाईट वाटत होतं. पण काहीच हातात नव्हतं. आम्ही वापस पुण्याला आलो.
परत रुटीन सुरू झालं. प्रकाश ची आई पण आता सेटल झाली होती. दोन महिन्यांनंतर प्रकाश चा फोन आला.
“आज संध्याकाळी येतोस का घरी ?” – प्रकाश.
“का ? आता काय झालं ?”
“तस काही विशेष नाही पण मला काही समजत नाहीये. तू ये न.” – प्रकाश.
संध्याकाळी मी आणि बायको दोघंही त्यांच्याकडे गेलो. विचार आला की
हिच्याशी बोलल्यावर त्याच्या आईला पण जरा बर वाटेल. नवीन गाव, अजून ओळख पाळख झाली नसेल.
“हं काय आता नवीन ?” मी विचारलं.
“पालिकेने पत्र पाठवल आहे. हे घे तूच वाच.” – प्रकाशने पत्र माझ्या कडे दिलं.
पत्रात लिहिलं होतं की रस्ता रुंदी करिता खोदकाम करतांना एक शिला लेख आणि एक ताम्रपट सापडला आहे त्यामुळे तुमचा प्लॉट अधिग्रहीत करून Archaeological Survey of India कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
“Archaeological Survey of India कडून पण याच अर्थाच पत्र आलं आहे. काही कळत नाही आहे. मग आता आपल्या जमिनीच काय ? आपल्या हातातून गेली की काय ? आता पालिका पण भरपाई देणार नाही कदाचित.” – प्रकाश निराश झाला होता. प्रकाश च्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आता वडलोपार्जित जमिनीची अशी वाताहत होते आहे म्हंटल्यांवर वाईट वाटणारच. आर्थिक नुकसान झालं ते वेगळंच.
“मला वाटतं की एकदा गावी जाऊन काय परिस्थिति आहे ते प्रत्यक्ष बघाव नुसतच इथे बसून अंदाज करण्यात काहीच अर्थ नाही.” मी म्हंटलं.
त्या शनिवारी संध्याकाळी आम्ही गावी पोचलो. दुसऱ्या दिवशी घराच्या जागेवर गेलो. तिथे एक वाचमन राखण करत बसला होता. त्यांच्याशी बोलल्यावर कळल की सहा साात सरकारी साहेब येऊन बघून गेलेत. आणि दोन तीन महिन्यात त्यांच्या पद्धतीने खोदकाम सुरू करणार आहेत. प्रकाशच घर चारी बाजूंनी जाड दोऱ्या लावून बंदिस्त केल होत आणि कोणीही त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा बोर्ड लावला होता. बोर्ड आम्ही पण पाहिला.
झालं आता आमच्या हातात काहीच नव्हत. आम्हाला तो शिलालेख पाहिला मिळेल का अस आम्ही विचारल. पण त्यांनी नकारार्थी मान हलवली. शिला समोर दिसत होती पण त्यानी सॉरी म्हंटलं.
आम्ही दुपारच्या बसने वापस पुण्याला आलो. बोलण्या सारखं काही नव्हतच.
दोन महिन्यांनी प्रकाश चा फोन आला.
“अरे ASI कडून पत्र आलंय. २४ तारखेला सकाळी ११ वाजता department चे चार पाच अधिकारी भेटायला येणार आहेत.” – प्रकाश.
“म्हणजे परवा ?” मी म्हणालो.
“हो. रजा काढावी लागणार. तू येतोस का ? सरकारी लोकांशी बोलायचं म्हणजे तुला तर माहीत आहे, मला जमत नाही.” प्रकाशनी त्याचा प्रॉब्लेम सांगितला।
“अरे सारखी सारखी रजा टाकणं अवघड आहे रे. पण मी प्रयत्न करून बघतो. आणि त्यात न जमण्यासारखं काय आहे ? तू काही गुन्हा केलेला नाहीयेस उलट तुझीच जमीन सरकार नी बळकावली आहे. तू तर जोरात बोलायला पाहिजे.” मी म्हणालो.
”प्लीज यार तू येच.” प्रकाश गळ्यातच पडला.
“बर.” शेवटी मी हार पत्करली.
“तू येच मी वाट पहातो.” – प्रकाश.
२४ तारखेला आम्ही सगळे १० वाजे पर्यन्त तयार होऊन वाट पाहत बसलो. मनात कितीतरी विचार घोळत होते. कोण येणार, काय चौकशी करणार, आम्ही माहिती दडवून ठेवली असा तर सरकारचा समज झाला नसेल वगैरे, प्रकाश तर हवालदिल झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तसा तो नेभळटच आहे पण मी ही जरा साशंकच होतो.
साडे अकरा वाजता तीन चार जण आले. सगळे पन्नाशीच्या पुढचेच. चेहऱ्यांवरून प्राध्यापक वाटत होते. त्यांनी बोलायला सुरवात केल्यावर तर खात्रीच पटली.
“हे बघा आम्ही, तुमच्या जमिनीत जे शिलालेख आणि ताम्रपट सापडले आहेत त्या विषयी तुमच्या जवळ काय माहिती आहे ते विचारायला आलो आहोत. आम्ही सगळे इतिहास विभागाचे लोक आहोत. आणि राष्ट्रीय पुरातन संपत्ति बद्दल संपूर्ण माहिती मिळवणं हेच आमचं काम आहे. आमचं तुमच्या कडे येणं हा आमच्या संशोधनाचाच भाग आहे. तेंव्हा तुम्ही अगदी नी:संकोच बोला.” - एक अधिकारी.
हे ऐकल्यावर आता प्रकाशच्या चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा relax झालो. प्रकाशनीच बोलायला सुरवात केली
“माहिती as such काहीच नाही. पालिकेच पत्र आल्यावरच कळल. हे पहा.” प्रकाश ने पत्र दिल.
त्यांच्या पैकीच एक जण बोलला
“ते सर्व आम्हाला माहीत आहे. पण मला सांगा की तुमचं घर जवळ जवळ 100 वर्ष जुनं आहे, तुमचे वडील, आजोबा कोणीतरी तर काहीतरी बोललं असेल जरा प्रयत्न करा, आठवून बघा.”
क्रमश:.......