मानवी अवस्था
मानवी अवस्था
बाल्यावस्था संपून तारुण्यावस्था किंवा प्रौढत्व सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला `किशोरावस्था’ असे म्हणतात. याच अर्थाने `कौमार’, `कुमारवय’, `पौगंडावस्था’ असे शब्दही वापरतात.`किशोरावस्था’ हा शब्द प्राचीन असून किशोरावस्था ही मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची अवस्था असून या अवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जन्मभर टिकून राहतो. या काळात `एकादशवर्षावधिपंचदशवर्षपर्यंतम्’ मातापितादींचे नियंत्रण हळूहळू कमी होते. शाळेत, खेळाच्या वेळी व इतर प्रसंगी समवयस्कांशी जास्त निकटचा संबंध येतो. मन संस्कारक्षम असल्यामुळे या वयात मनावर होणारे संस्कार जन्मभर टिकतात. शहरांतून तसेच दळणवळण सुलभ झाल्यामुळे खेड्यांतूनही वृत्तपत्रे, सिनेमा, नाटके, रेडिओ. इ. साधनांद्वारे हे संस्कार होत असतात.
घरातील व बाहेरील शिस्तीच्या बंधनांविरूद्धची प्रतिक्रियाही याच वयात मुलांत दिसते. या अवस्थेतील मुलांची वागणूक कित्येक वेळा उच्छृंखल, तर कित्येक वेळा अगदी समजुतदारपणाची दिसते म्हणून तारुण्यावस्थेच्या उंबरठ्यावरील ही अवस्था अत्यंत महत्त्व किशोरावस्थेचा एकूण कालविस्तार सामाजिक-सांस्कृतिक भिन्नतेवर आणि मुलांच्या आईवडिलांशी असलेल्या मनोभावात्मक संबंधांवर अवलंबून असतो. आधुनिक समाजात शिक्षणाची कालमर्यादा बरीच वाढलेली असून ह्या कालखंडात बहुतेक मुले परावलंबी असतात. त्या प्रमाणात त्यांचा किशोरावस्थाकालही वाढतो. लहान मुलाप्रमाणे आई-वडिलांवर अवलंबून असणे आणि परस्परावलंबी पण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करणे ह्यांच्या मधला काळ म्हणजे किशोरावस्था होय.
आठव्या वर्षापर्यंत मुलामुलींच्या शारीरिक वाढीत फारसा फरक पडत नाही. त्यानंतर मात्र तो प्रकर्षाने पडतो. मुलांची वाढ अकरा ते सोळाव्या वर्षापर्यंत झपाट्याने होते. काही महिन्यांतच त्यांची उंची एकदम वाढते. दाढी-मिशांची लव फुटू लागते. गुह्य भागावर, काखेत, छातीवर वगैरे ठिकाणीही केस येऊ लागतात. आवाज फुटतो, शुक्रजनन होऊ रेतस्खलनक्षमता येते. मुलींच्या शरीराची वाढ यापेक्षा लवकर म्हणजे आठव्या वर्षांपासूनच होते.