लव्ह बर्ड
लव्ह बर्ड
रिना आईशी फोनवर बोलत होती . " आई . मी काय सांगू ग आजकाल शिळ्या कडीला पण उत आलाय ".
माझे सासरे निवृत्त झाल्यापासून दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्या सारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात .आपल्या डोक्यावरचे पिकलेले केस बघून तर वागायचे ना ! एखाद्या तरुण जोडप्यासारखे वागतात ."
तेवढ्यात रिनाने पाठीमागे बघितले तर तिथे सासूबाई ऊभ्या होत्या . त्यांनी आपल्या सुनेचे बोलणे ऐकले पण त्याकडे दुर्लक्ष करत एकही शब्द न बोलता त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या. थोड्या वेळाने शांतपणे सुनेला रूममध्ये चहा घेऊन गेली .
" अग सुनबाई चहा घे ".
रिनाने तोंड मुरकडत त्यांच्या हातून चहा घेतला .
आपली सुन आपल्याला बघुन तोंड वेडेवाकडे करते व टोमनेही मारते हे त्यांना कळत होते . पण घरात वाद न घालता होईल तितके काम त्या करत . व दुपारी दोघेही गार्डन मध्ये बसून गप्पा करत आपला वेळ घालवत असे .
"शीतल निवास " असा मोठा बंगला होता अशोकराव व प्रभाताई यांच्या मेहनतीने बांधलेला . घराच्या समोर प्रभाताई ने एक छोटीशी बाग तयार केली . मोगरा .चाफा . गुलाब . जास्वंद अशी कितीतरी फुलझाडे लावली ऐका छोटया टाकीत कमळही फुलले होते .
तसेच स्वयंपाक घरात लागणारी ताजी भाजी कोथिंबीर पुदिना . मेथी स्वतःच्या बागेतली असायची . तिथेच त्यांनी एक झोपाळा बसून घेतला होता .
ईतके वर्ष कामाच्या गडबडीत अशोक रावांना या बागेचा आनंद घेता नाही आला .
पण आता मिळालेला सर्व मोकळा वेळ या बागेत झोपाळ्यावर बसून घालवायचे . त्या दोघांना मिळालेले आरामाचे क्षण सोबत घालवायचे होते . घरात सर्व सुविधा होत्या तरीही सुनेला त्यांच वागणं खटकायचं . त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे .
आयुष्यभर त्यांनी मुलगा नितीन साठी खुप खस्ता खाल्ल्या होत्या त्यामुळे आयुष्याची संध्याकाळ रोज बागेत सोबत घालवायची असे ठरविले.बाग व झोपाळा हटविण्यासाठी एक दिवस रिनाने युक्ती केली . आपण मोठी कार खरेदी करायची असे नितीनला सुचविले .
कल्पना छान आहे ग . पण गाडी ठेवायला जागा नाही .
जागा का नाही ! ती बाग आहे ना जिथे आजकाल दोन लव्ह बर्ड बसतात .
तू जरा जास्तच बोलते म्हणून नितीन रिणावर चिडला . पण याबद्दल आपण बाबांशी बोलू असे ठरविले .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नितीन वडिलांकडे गेला .
" बाबा मला एक कार घ्यायची आहे ."
पण बेटा आधी घरी एक गाडी आहे दुसरी गाडी घेतली तर ठेवणार कुठे ?
बाबा . आई किती दिवस या झाडांची काळजी घेणार त्यापेक्षा ही झाडं तोडून इथे एक गँरेज काढू .
हे ऐकून प्रभाताईचे डोळे भरून आले . अशोकराव ने रागावर नियंत्रण ठेवत बोलले . मला थोडा वेळ दे मला तुझ्या आईशी बोलावं लागेल .
" काय बाबा . आईला काय विचारायचे त्यात या बागेचा काय उपयोग . तुम्हाला काही काम नाही दिवसभर इथं झोपाळ्यावर डुलता . आपण म्हातारे झालो चार लोकं काय म्हणतील याचा विचारही करत नाही .
असं वागायला पटत का तुम्हाला !
नितीन चे हे बोलणे त्यांच्या मनाला लागले त्यामुळे त्यांच्या घशाखाली दोन घास ही उतरले नाही व दोघांना रात्रभर झोप ही लागली नाही .
सकाळी उठल्यावर अशोक रावांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले होते . त्यांनी स्वतः स्वयंपाक घरात जाऊन चहा बनविला व उदास असलेल्या प्रभाताईला चहा नेऊन दिला .
दिवसभर सर्व शांत होते व संध्याकाळी " घर भाड्याने देणे आहे " असा बोर्ड लावलेला पाहून नितीन चिडला .
बाबा . हे काय चाललं घर मोठे आहे मान्य आहे पण हे काय ?
पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफ मधले कुलकर्णी रिटायर्ड होत आहे . तेव्हा ते या घरात राहतील. त्यांनी शांतपणे उत्तर दिले .
पण कुठे ?
तुमच्या भागात अशोकरावने उत्तर दिले
आणि आम्ही !
तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम बनविले मी ! दोन तीन महिन्यात तुम्ही दुसरा फ्लॅट बघा किंवा कंपनीच्या फ्लॅट मध्ये जा जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल .
आणि आम्ही दोघं आमच्या वयाच्या लोकांसोबत राहू
आमचं संपूर्ण आयुष्य तुमची काळजी करण्यात गेलं आणि तुम्ही शहाणपणाचे धडे शिकवू लागले हेच बाकी राहिलं होतं.
बाबा मला असे म्हणायचे नव्हते .
नाही बेटा तुमच्या पिढीने आम्हाला व्यवहारिक होण्याचा धडा दिला . आम्ही आम्ही आनंदी असल्याचा तुम्हाला त्रास होतो . पण आमच्या आनंदाच्या हक्काचा कोपरा हिसकवण्याचा अधिकार कोणालाही नाही .
