क्रांतीज्योती सावित्रीबाई
क्रांतीज्योती सावित्रीबाई
क्रांतीज्योती सावित्रीबाई
हीच खरी ज्ञानाची होती,
पेटवून अज्ञान स्त्री जातीचे
उजळविल्या सर्व ज्ञानज्योती.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्यावेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणार्या देशात स्त्रीला समाजात 'चूलआणि मुल' एवढे स्थान होते. स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता. अशावेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ज्योतीबांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पुणे येथील भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून ज्योतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.
अध्यापनाचे काम करत असताना सावित्रीबाईंचा मानसिक व काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाईकांनी समाजाने, सनातन्यांनी केला .रस्त्यातून जाताना त्यांना लोकांकडून शिवीगाळ अंगावर टाकण्यात आले .घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला .पण त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखेच वाटत. ही सर्व कृती त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे वाटत असे.
उभी राहिली खंबीरपणे
क्रांतीसुर्य ज्योतीबांच्या पाठीशी,
ढाल होऊन लढली ती
न डगमगता समाजाशी.
शाळेत असताना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून मुलींना शिकवणे तू बंद कर असे सांगितले. सावित्रीबाईंनी त्यांना चपराक लावली. सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या. थोड्याच कालावधीत त्यांनी चांगली प्रगती केली. त्याच काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे, कारण विधवा स्त्रीने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी-परंपरा होती. स्त्रीला अपशकुनी मानले जायचे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत त्यांना घरात कोंडून ठेवले जात. या सर्व स्त्रियांची दुःखे त्यांनी जवळून पाहिली. ती दूर झाली पाहिजे यासाठी ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न सुरू केले .
सावित्रीबाई अपत्य नव्हते पण दीनदलितांच्या अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले. सर्व टीका सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाचे पवित्र काम चालू असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु त्या आपल्या कार्यापासून डगमगल्या नाहीत .मुलींची संख्या वाढू लागली त्यांच्या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला.
सावित्रीबाईजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते प्रत्यक्ष कृतीत आणले.केशवपन बंद करणे ,नाभिक लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे ,महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्याची धुरा अखंडपणे सांभाळली, हे कार्य करत असताना साहित्याच्या माध्यमातून 'काव्यफुले 'व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे काव्यसंग्रह लिहिले.
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्री मुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे पहिले भारतीय . स्त्री शिक्षणात त्यांनी अज्ञान, जातीभेद ,स्त्री-पुरुष भेद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. 19 व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली. अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले .शैक्षणिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दाम्पत्याचा सत्कार केला. जोतिरावांच्या समता, सत्यपरायण, मानवतावाद या तत्त्वांचा अंगीकार करून त्यासाठी सावित्रीबाईंनी आपले सारे जीवन व्यतीत केले. १८९७ मध्ये प्लेगची महाभयानक साथ आली ही क्रांतीज्योती सावित्रीमाई प्लेगच्या साथीमध्ये सर्व लोकांना मदत करता करता या प्लेगच्या साथीला बळी पडल्या. व अखेर १०मार्च१८९७ रोजी सावित्रीबाईंनी जगाचा निरोप घेतला. ही सावित्रीमाई अनंतात विलिन झाली. सारा महाराष्ट्र हळहळला.
माझे नतमस्तक त्याच्या पायी ,कारण आज सर्व महिला सावित्रीबाईंच्या खूप ऋणी आहोत. त्यांच्यामुळेच आज आम्ही समाजात ताठ मानेनं जगतोय.
हिच खरी ज्ञानाची ज्योती
सावित्रीबाई आमुची आई,
तिच्यामुळेच मुक्त आम्ही
कसे होऊ तिचे उतराई...