काळ आला पण वेळ आली नव्हती
काळ आला पण वेळ आली नव्हती
मनू लगबगीने पावल उचलत होता . इतक्या घाईने जात होता की त्याला रस्त्यावरचे खड्डे , आजूबाजूची वर्दळ याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याच्या जाण्याचा वेग पाहता त्याला बघून कोणीही म्हटल असत की या माणसाला कामाबद्दल किती श्रद्धा आहे. बहुतेक कुठल्यातरी महत्वाच्या कामगिरीवर चाललाय . देवा कृपा करून याच काम यशस्वी होऊ दे रे बाबा !
परंतू ५ - १० मिनिट चालून मनू एका दुकानासमोर थांबला . दुकानावरची पाटी वाचली , अंबिका देशी दारूचे दुकान ! आणि गड जिंकल्यागत दुकानात शिरण्यासाठी पुढे सरसावला . तेवढयात ज्या काही लोकांनी त्याला एवढ्या घाईत येताना पाहिल होत आणि काहीतरी कामाच्या गडबडीत हा माणूस चाललाय अस गृहीत धरल होत , त्या लोकांनी मनूला देशी दारूच्या दुकानात शिरताना बघून नाक मुरडली . एवढ्या सकाळी - सकाळी सगळा कामधंदा सोडून दारूच्या दुकानासमोर उभा असलेल्या मनूला पाहून काही लोकांच्या कपाळावर आठया उमटल्या , तर काहींनी त्याच्या नावानी बोट मोडली .
का अशी वेळ आली असेल मनूवर ? फक्त एकदाच ! एकदाच काय त्यानी त्याच्या मित्रांनी आग्रह केला म्हणून हातात दारूचा ग्लास पकडला आणि आता अशी वेळ आली होती की त्या दारूच्या ग्लासने त्याला पूर्णपणे आपल्या नशेत जकडल होत . त्या नशेन तो इतका भारून गेला होता की आता वेळी - अवेळी सुद्धा त्या रंगीत पाण्याची धुंदी त्याला आपल्याकडे आकर्षित करत होती . या रंगीत पाण्याने गावातल्या कितीतरी लोकांना स्वतःच्या जाळयात अडकवल होत. आता पाळी मनूची होती . घरातल्या लोकांच्या नजरा चुकवून , कामाकडे दुर्लक्ष करून हळूहळू त्याच पूर्ण लक्ष दारू सेवनाकडे वळत होत.
मनू आत्ता कुठे कामाला लागला होता. अजून त्याला खूप पुढे जायच होत. जीवनाला आत्ता तर खरया अर्थाने सुरूवात झाली होती. घरात त्याच्या लग्नाविषयी विचार चालला होता .अस असताना मनू या मद्यपानाच्या आहारी गेला होता. कुठून त्या दिवशी मित्रांसोबत गेला आणि ही अवदसा गाठी बांधून आला !
मनूच मन आतून त्याला खात होत . पण तो स्वतःला त्या गोष्टीपासून जितका दूर ठेवायचा प्रयत्न करत होता , तेवढाच तो त्याकडे आकर्षित होत होता . त्याला स्वतःची लाज वाटत होती . पण तरी सुद्धा तो स्वतःला दारूच्या दुकानात जाण्यापासून थांबवू शकत नव्हता . त्याचं मन कमकुवत झालं होतं .
लोक - लाज सोडून मनू दुकानात शिरला . त्याने दारूचे ३-४ ग्लास एकामागून एक ढोसले आणि घाईने दुकानाच्या बाहेर पडला . लोकांच्या नजरा चुकवत गल्ली बोळातून भराभरा पाऊल टाकत मुख्य रस्त्याजवळ पोहोचला . रस्ता ओलांडण्यासाठी चार पावलं पुढे टाकतो न टाकतो , तोच एक ट्रक भरधाव वेगाने त्याच्या दिशेने यमाच्या रुपात प्रत्यक्ष झाला . क्षणार्धात काय झालं हे त्याला कळलच नाही . अगदी थोड्या अंतरात मृत्यूच्या दाराशी जाऊन तो परत आला होता . आजूबाजूचे लोक धावून आले . त्यांनी मनूला उचलल . बाजूला घेतल . मनूच्या डोक्याला मार लागला होता आणि त्यातून घळाघळा रक्त वाहू लागल होत . लोकांनी त्याला एका ऑटोरिक्षात घालून हॉस्पिटलमधे पोहोचवल . हॉस्पिटलमधे डॉक्टरांनी त्याच्या जखमांवर पट्टी बांधली . शरीरावर काही ठिकाणी खरचटलं होत , त्यावर मलम लावल . मनूला लोकांनी वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यामुळे आणि तिथे त्याला त्वरित उपचार मिळाल्यामुळे खूप मोठा धोका टळला होता .
मनूला त्या क्षणी स्वतःच्या आई - वडिलांचा आणि लहान बहीनीचा चेहरा डोळ्यांसमोर तरळून गेला . जर त्या क्षणी काही बरं - वाईट झालं असतं तर ! त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी स्वीकारली असती ? त्या भयानक प्रश्नाने तो हादरून गेला . त्याला स्वतःच्या जबादारीची त्या क्षणी खूप प्रकर्षाने जाणीव झाली . त्याने त्या दिवशी स्वतःला वचन दिलं की आता काही झालं तरी तो दारूला हात लावणार नाही . ज्या वस्तूंमुळे त्याचे प्राण पणाला लागले , तो त्या वस्तूकडे ढुंकूनही बघणार नाही . आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या न चुकता पूर्ण करण्याच वचनही त्याने स्वतःला दिलं .
मनूला या क्षणी एक गोष्ट सारखी डोक्यात थैमान घालत होती , ती म्हणजे बहुतेक त्याच्या मृत्यूचा काळ जवळ आला होता , पण त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली नव्हती . म्हणूनच आज तो मृत्यूच्या पंजातून सुखरूप निसटला होता . त्याला हे कळून चुकलं होतं की व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यूला ओढवून घेण्यापेक्षा मेहनत करून स्वतःचं अस्तित्व अर्थपूर्ण बनवण , जीवन आनंदाने फुलवन जास्त सोयीस्कर आहे . हा विचार करताना मनूला एक म्हण सारखी डोक्यात येत होती -
" काळ आला पण वेळ आली नव्हती ! "