गोष्टी गावाकडच्या - भाग 1
गोष्टी गावाकडच्या - भाग 1
कडक उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याच्या दुसरा आठवडा चालू आसावा शेतातील सर्व कामे उरकली होती आता चाहूल फक्त पेरणीची होती. सकाळी माझी जमिरची आणि सुभानची भेट झाली एक तासभर आमच्या गप्पा झाल्यानंतर हळूच सुभान म्हणाला आज आपल्या तिघांनाही काहीच कामे नाहीत म्हणून आपण आज पोहायला जाऊया... आम्ही खूप दिवस झाले मनसोक्त पोहलो नव्हतो म्हणून आम्ही दोघेही तयार झालो आणि जेवण झालं की लगेच आपण निघूया हे ठरलं.
तिघेही जेवण झाल्यानंतर ओट्यावर भेटलो आणि तिघांकडे ही गाडी असून गाडी कोणीही आणली नाही मी त्या दोघांनाही गाडी बद्दल विचारलं तर सुभानची गाडी बिघडली होती आणि जमीर ची गाडी त्याचा भाऊ नेणार होता व माझी गाडी माझे मामा नेणार होते मग काय करायचं मग तिघांचाही बेत हा पायी जाण्याचा ठरला...
भरकटत भरकटत निघालो गप्पा मारत.वाटेने आमच्या सोबत काही आमच्या पेक्षा लहान मुले निघाले पोहण्यासाठी..धिंगाणा मस्ती करत शेवटी विहिरीजवळ पोहचलो... दोन दिवस लाईट नसल्याने विहिरीचे पाणी खूप वर आले होते.. एवढ निर्मळ आणि कटोकाठ पाण्याने भरलेली विहीर पाहून मला राहवलं नाही मी सगळ्यात आधी कपडे काढून धपककन उडी मारली...काय आनंद होत होता मला शब्दात व्यक्त करता येणार नाही...
एक दोन तास पोहून व पाण्यात शिवणापणी खेळून आम्हाला खूप भूक लागली होती.. सगळ्यांनी पोहणे बंद करून सुभान च्या आखड्यावर जायचे ठरवले.तिथे गेल्यावर जमीर म्हणाला खूप भूक लागली आहे चला गावाकड जाऊ.तेवढ्यात सुभान म्हणाला आखड्यावर तांदूळ आहेत कच्चे खाय इथ माणूस गार सावलीला बसलय अन तू लगेच चला गावाकड...जरा बस आराम कर.. अरे तांदूळ आहेत म्हणल्यावर तेल आहे का बघ आपण कांदे लसूण आणुत कुठून तरी आणि मस्त पैकी खिचडी तयार करू जमीर म्हणाला... ईथ काय मव घर आहे काय तेल मिरची मीठ आसायाला सुभान म्हणाला...
ह्यांचं बोलणं ऐकून बाळ्या म्हणाला अरे काल माझ्या बापानं मया आखड्यावा पार्टीसाठी समान आणलं होतं तेवढ्यातुन तेल आणि हळद उरली आहे चागलं पाव किलो तेल आसल...हे सगळं मी एकल आणि लगेच बळ्याला त्याच्या आखड्यावर पाठवलं..लगेच विचारलं कांदे कोणाच्या शेतात आहेत रे लगेच सुभान म्हणाला अरे येड्या तुह्या पाठीमागं कांदे आहेत दिसेनात का तुला..अरे काखेत कळसा अने गावाला वळसा मला दिसले नाहीत रे... तेवढ्यात सुद्या म्हणतो की दामू मामाच्या शेतात टमाटे आणि मिरच्या आहेत मी लगेच जाऊन आणतो आणि काही न म्हणतच तो निघून गेला कारण त्याला भूक खूप लागलेली होती...शेजारच्या शेतात भुईमुगा काढुन रानाला पाळी (वखरने) घालून ठेवली होती आणि वर थोडाफार शेंगा पडलेल्या असतातच म्हणा त्या शेंगा जमिरने जाऊन आणल्या आणि इतर सगळ्यांनी त्या फोडल्या..
हळूहळू सगळं साहित्य एकत्र झालं गोष्ट राहिली तिच्या शिवाय काहीच काम होणार नव्हतं ती म्हणजे काडीपेटी... आता काय करायचं सगळेजण इकडे तिकडे पाहू लागली कोणी बीढी ओढणारे दिसते का म्हणून पण आसपास कोणीच दिसत नव्हतं.सगळ्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पण काडेपेटीचा विचार कोणीच केला नाही आता करायचं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला... मी रानातील चुलीजवळ कुठे एखादी पडलेली काडी सापडते का ते पाहू लागलो आणि आमचं नशीब चांगलं एक काडी मला सापडली आणि लगेच एक रिकामी काडी पेटी बैलांच्या शेणाच्या उखंड्यावर सापडली.एकच गाडी असल्याने आम्ही अगोदर कडब्याचा (ज्वारीच्या झाडाचा पाला) पालापाचोळा गोळा केला आणि सगळेजण वारा लागू नये म्हणून गोल बसून आडोसा दिला आणि काडु ओढून आग पेटवली... आणि पेटली सुद्धा...
चुलीवर एक भलं मोठं पातेलं ठेवलं आणि खिचडीला फोडणी दिली साधारण दीड दोन किलो तांदूळ असावेत आणि खाणारे दहा ते बारा जण... झाली एकदाची आमची खिचडी मग काय बसलो सगळे जण जेवायला शेजारच्या रानातील केळीचे पानंसुद्धा आणली आणि तेवढी खिचडी आम्ही सगळ्यांनी फस्त करून टाकली... त्या खिचडीची चव मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि शब्दातही सांगू शकत नाही....