त्या दोघी अन् ते दोघे...
त्या दोघी अन् ते दोघे...
सकाळची आठ साडे आठ वाजताची वेळ. शामराव आपल्या विहिरीवरील मोटर लावून विहिरीवर बसले होते. ते शेतातच राहत होते म्हणून सखाराम बोलण्यासाठी आला होता. गावात शामरावानां सगळे अण्णा म्हणत
सखाराम: रामराम अण्णा काय चालली कामदारी
आण्णा: अरे ये सखाराम बस. काही नाही तिकडं वरच्या वावरात दोन्ही मुली ऊस लावतात मला काही काम होत नाही म्हणून लाईट आली की मोटर लावायचं काम करतो.
सखाराम:काय आण्णा तुमच्याकडे तर पैशाला कमी नाही रोजगारी लावून काम करून घ्यायचं कुटवर त्या दोन मुलीची बेजारी करता
आण्णा: अरे सखाराम आईविना दोन मुली संभाळल्यात मी मला असं त्यांना बेजार करावं वाटलं का. पण पोरी ऐकतच नाहीत कालच माझ्या बहिणीचे दोन्ही पोरं आलते मदत करू लागयला त्यांना पण दोघींनी वापस केलं.
सखाराम: खरंच अण्णा तुमच्या पोरी कोणत्या पोरांना पण ऐकणार नाहीत कामाला.पण अण्णा तुमच्या पोरींच्या नशिबात लई सुखाचे दिवस येणार आहेत जर तुम्ही तयार झालात तर.(सखाराम आपल्या खिशातून तंबाखू काढत काढत म्हणाला)
आण्णा: म्हणजे सखाराम मी नाही समजलो बाबा.
सखाराम: अहो अण्णा गावातून खास कामासाठी तुमच्याकडे आलतो.
आण्णा: कोणत्या रं..
सखाराम: तुमच्या दोन्ही मुलीसाठी स्थळ आलेत. दोन्ही सख्खे भाऊच आहेत. एक इंजीनियर हाय आणि एक पोलीस अधिकारी हाय. (तंबाखू चोळत चोळत बोलू लागला)
आण्णा: आरं सखाराम तुला कवापासून माझ्या पोरीची काळजी पडली.
(सखाराम ने आपल्या तोंडात तंबाखू टाकून थोडा वेळ थांबून नंतर बोलू लागला)
सखाराम: अण्णा आईविना पोरी आहेत वाटलं चांगल्या घरात जातील. तुम्ही सगळ्यासाठी करता आमच्यासाठी पण तुम्ही बरेच केलं. तुमच्या भल्यासाठी आलो अण्णा गावात दुसऱ्या पण पोरी आहेत.
(सखारामने तंबाखूची पुडी आण्णाला खाण्यासाठी अण्णा कडे दिली आपल्या हातावर तंबाखू चोळत चोळत)
आण्णा: माझ्या पोरीसाठी त्यांच्या हे बाप अजून जिवंत आहे. तुला काळजी करायची काही गरज नाही.
सखाराम: अहो अण्णा पण इतक्या पगारीचे पोर पुन्हा नाही भेटणार तुमास्नी.
आण्णा: हे पंधरा एकरचा मळा बघतो सखाराम. हा मळा माझ्या दोन्ही पोरींनी कष्टाने हिरवागार केलाय. जर रानात दहा-बारा जण आले तर माझ्या दोन्ही मुली त्यांना पाणी पाजतील अशा माझ्या मुली आहेत.
सखाराम: हो अण्णा बरोबर आहे तुमचं पण पोरीचं लग्न आज ना उद्या करावंच लागल.
आण्णा: हे मात्र बरोबर बोललास. पोरीचं लग्न तर करावाच लागल. पण मी त्यांचा बाप आहे तुला एवढी काळजी म्हणल्यावर मला बी असेलच की रं
सखाराम: हो अण्णा तुम्हाला भी असेलच की
आण्णा: (अण्णाने विहिरीच्या असलेली झाडाला टेका दिला आणि निवांतपणे बोलू लागले) हे बघ सखाराम पोरींची आई गेली तेव्हा पासून त्यांची काळजी माझ्या बहिणीने घेतली आपल्या पोटच्या पोरी वाणी.
सखाराम:हो ना बरं झालं तुमची बहीण तुम्ही गावात देली होती. काय करणार अण्णा अक्का साहेबांचा नवरा मेल्यावर त्यांना बी तुमचा आधार आहे.
आण्णा: तिला दोन सोन्यावाणी पोर आहेत. जमीन कमी आहे पण काम करतात कुठलं व्यसन नाही आणि माझ्या शब्दाबाहेर कधीच जात नाहीत.
सखाराम: हो अण्णा फार गुणी पोरं आहेत तुमच्या हाताखाली मोठे झालेत म्हणून.
अण्णा: माझ्या दोन्ही पोरीचे लग्न त्यांच्या संग करायचे ठरवलंय. आयुष्यभर दोन्ही पोरी माझ्या नजरेखालीच राहतील मग काय करायचं नोकरदारांना देऊन.आणि मलाही म्हातारपणी त्यांचाच आधार होईल
सखाराम: वा आण्णा बरोबर आहे तुमचं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही.
(दोघांचे बोलणे चालू असताना अन्नाच्या दोन्ही मुली सीता आणि गीता तिथे येतात)
सीता: अण्णा लाईट गेली का आम्ही फार वेळ वाट पाहत होतो पाणीच येत नाही सऱ्या कोरड्या पडल्या. ऊस खूप राहिलाय दाबायचा.
आण्णा: पोरी खूप वेळ झाला लाईटच आली नाही तू काय कर जनरेटर चालू कर लाईटचा काही भरवसा नाही
गीता:ताई माझ्याकडे दे हँडल मी चालू करते जनरेटर.
सखाराम: सीता गीता तुम्ही राहू द्या जनरेटर मी चालू करतो तुम्हास्नी जमणार नाही.
अण्णा: अरे सखाराम माझ्या पोरी आहेत त्या. पोराला बी माग टाकतील. सीता जनरेटरचा हँडल घेते. कोण्या पोराच्याही हाताने एवढी गती निर्माण होत नसेल तितक्या गतीने ती हँडल फिरवते आणि धक धक धक जनरेटर चालू होते. सखाराम बघतच राहतो.
सखाराम: अण्णा खरंच खासच निर्णय घेतला तुम्ही तुमच्या पोरी राम श्यामला देण्याचा.
हे ऐकून सीता आणि गीता लाजत लाजत तिथून पळ काढतात कारण त्यांच्या मनाला लहानपणापासूनच ते दोघेही आवडत असतात...
सखाराम: बरं येतो अण्णा काळजी घ्या..
आण्णा: होय सखाराम येत जा अधून मधून कधी कधी...
सखाराम: हो अण्णा येतो
सखाराम तिथून चालायला लागतो त्याच्या डोक्यात अजून तो जनरेटरचा आवाज घुमत असतो आणि नजरेत सीताने गतीने फिरवलेला हँडल त्याला दिसत असतो...