दिशा हरवलेला मी
दिशा हरवलेला मी
हल्ली नेहमीचं झालंय माझं.... सर्वं मित्रमंडळीना घेऊन फिरायला जाणं. कधी ट्रेकिंग,कधी नदीकिनारी,कधी समुद्र किनारी तर कधी धबधबा....पावसाळ्यात तर वरचेवर धबधब्यावर जाण होतच. त्या दिवशी मी असाच मित्रा समवेत फिरायला गेलो होतो. मौजमजा चालली होती. एकमेकांची टिंगळटवाळी चालु होती आणि मग काय बरोबर नेलेलं पेय काढलं आणि सर्वांनी चिअर्स चिअर्स म्हणत सरसर प्यायलं. नंतर काय झालं कुणास ठाऊक? मला साधारण अंधुक दिसायला लागलं. आजूबाजूला पाहिलं तर माझे मित्र तिथे नव्हते. मी सर्वांना हाका मारल्या पण मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मी सैरभैर होऊन सगळीकडे धावत सुटलो. पण मला कोणीही दिसलं नाही. धावता धावता माझा पाय अडकला आणि मी जोरात पडलो आणि माझी शुद्धच हरपली. शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला काळाकुट्ट अंधार दाटला होता. पक्ष्यांचा किरकिर्र असा आवाज कानात घोंगावत होता. भीतीने मी पार घामेघुम होऊन गेलो होतो. अचानक तुफान वारं सुटलं. ढग भरून आले. विजांचा कडकडात चालु झाला व मुसळधार पावसाने जोर धरला.
मी आसऱ्यासाठी वाट मिळेल त्या दिशेने धावू लागतो. मी कुठे आडोसा मिळतो का म्हणुन शोधाशोध सुरु केली...
शोध घेता घेता मला एक काटेरी झुडूप गवसलं. काटेरी झूडुपाच्या आत गवसलं जुनं पुराण घर. ते घर असंख्य वेलीनीं वेढलं होतं. वेल बाजुला सारली आणि दिसला एक बुलंद दरवाजा. मी तो दरवाजा उघडून आत गेलो. असंख्य जळमटे आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी ते घर भरून गेलं होतं. आत जायची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही. पण कोणती तरी अदभुत,अकल्पित शक्ती मला आत बोलावत होती. त्या घराच्या मध्यभागी जाताच ते घर पूर्णं हलायला लागलं. आणि माझ्या कडे बघुन हसायला लागलं.
मी भीत भीतच विचारलं...कोणी, कोणी आहे का इथे?
कुठूनसा आवाज आला....काय झाले?
का एवढा जिवाच्या आकांताने ओरडतोस??
मी म्हणालो, मी वाट चुकलोय.... मी माझ्या मित्रा सोबत आलोय आणि अचानक माझे मित्र कुठेतरी गायब झाले..... मी त्यांना शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण ते मला नाही सापडले....
पुन्हा आवाज आला. तु वाट आज नाही चुकलास. तु तुझी वाट कधीच चुकलास. पण तुझ्या डोळ्यावर जी झापड आहे, ती तुला चांगलं काही बघुन देत नाही. चांगला विचार करुन देत नाही. मी त्या आवाजाच्या दिशेने चालत होतो. चालता चालता विचारलं? तुम्हांला कसं कळलं?
मला सर्वं कळत. मी एक चांगली पिढी घडवली. माझ्या पुढच्या पिढ्या चांगल्या घडल्या. पण आतां मी फक्त नावात आहे. माझं नाव सगळे घेतात पण कर्म माझ्या सारखे करत नाहीत.
मी त्या आवाजाचा वेध घेत घेत पुढे चालत होतो. आता हळूहळू मला त्या आवाजाची ओळख पटू लागली होती. माझा जयघोष सगळे करतात, पण माझी नितीमुल्ये जोपासत नाहीत. माझ्या असण्याने माझं राष्ट्र खुप बलशाली व प्रतिभावान होतं. नंतरच्या अनेक पिढ्या सुद्धा तेच होतं पण हळूहळू इंग्रजांनी आपल वर्चस्व वाढवलं आणि आपल्या देशाची परिस्थिती बिकट केली आणि आता स्वातंत्र्य भेटुन कित्येक वर्षे झाली... पण नाही तुमच्या मनात देश प्रेम, नाही राष्ट्र प्रेम.... प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यात मग्न....
मी आवाजाचा वेध घेत घेत पुढे सरसावत होतो. आणि अचानक लख्ख प्रकाश पडला.... ते घर पुर्ण प्रकाशमय झालं...समोर दिसणार दृश्य बघुन मी अवाक झालो..... भल्या मोठ्या सिंहासनावर तेजस्वी, रुबाबदार व्यक्ती बसली होती.... सोन्याच सिंहासन, सोन्याचा मुकुट आणि चमकणारी सोन्याची तरवार पाहुन मी एकदम भारावून गेलो ती तेजस्वि व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन आपले महाराज होते. माझ्या मुखातून शब्द उमटले..... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माझ्या मुजराचा स्वीकार करा महाराज.... महाराज रागाने लालबुंद होऊन बोलले....या मुजराचा स्वीकार मी तेव्हाच करेल.... जेव्हा माझ्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही..... माझ्या राज्यात जातीभेद राहणार नाही.... जातीभेदाचे स्तोम माजलय. जातीयवाद वाढलाय....तो कमी करण्या ऐवजी त्याला खतपाणी घातलं जातंय... माझ्या राज्यात स्त्रीवर अत्याचार होतोय....अन्याय होतोय... भष्ट्राचार तर ओसोंडून वाहतोय....नीतिमत्तेने लोक वागत नाहीत.... माझा नुसता जयघोष करता पण आचरण चांगले करत नाहीत...."रयतेचा राजा" म्हणता ना तुम्ही मला....
मग सांगा? मला सहन होईल का?
माझ्या रयतेची पिळवणूक?
जातीभेदाचे राजकारण?
स्त्रीयांवरील अत्याचार??
मी लाजेने मान खाली घातली... आणि नकारात्मक मान डोलावली... क्षमा असावी महाराज.... आज माझे डोळे उघडले... नीतिमत्ता बोलण्यात नाही तर वागण्यात पाहिजे...फक्त जयघोष करून कार्य होत नाही.... कार्य कृतीतून झाले पाहिजे...मी नतमस्तक होतो आणि महाराजांना म्हणतो.... महाराज मला आशीर्वाद दया. अन्याया विरुद्ध लढण्याचे बळ दया. योग्य अयोग्य समजण्याची दृष्टी दया.....आपण निर्माण केलेलं सुराज्य आता नव्याने स्थापन आणि सक्षम करण्याची गरज आहे....
आपण गुलामगिरीनी खचलेल्या,गरिबीनी पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा व स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला होता....आता तो स्वाभिमान, ती स्वराज्य निष्ठा व ते राष्ट्रप्रेम सर्वामध्ये जागृत करायचे बळ व आत्मविश्वास दया....हा लढा जातीयवादाचा नसुन जनहिताचा व्हायला पाहिजे.....असे मी महाराजांना सांगतो.....जय भवानी जय शिवराय असा गजर करत हर हर महादेव अशी जोरात साद घालतो. आणि डोळे उघडून पाहतो तर तिथे कोणीच नसतो.... महाराज महाराज असा आवाज देऊन सगळीकडे फिरतो पण तिथे कोणीच दिसत नाही.... एव्हाना माझे मित्र फिरत फिरत माझा शोध घेत तिथे येऊन पोहचतात.... मला विचारतात अरे तु इकडे कशी वाट चुकलास? मी स्मितहास्य करत म्हंटलं.... वाट चुकलो नाही. माझी दिशा हरवली होती. पण आता मला योग्य दिशा सापडले....एक चांगली आठवण घेऊन मी त्या घरातुन बाहेर पडलो... सोबतीला दिल होत महाराजांनी बळ,शक्ती व आत्मविश्वास.... आता मी मनाशी पक्क ठरवलं...
जातीपातीच्या शृंखला नको....
पाहिजे विकासाचे राजकारण....
राज्य उभारणी हवी विश्वासाची आणि एकजुटीची...
हीच तर इच्छा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची....
जय भवानी....जय शिवाजी....