चौकट
चौकट


चौकटीतलं आयुष्य ....
किती घुसमट वाढवणारे असते हे फक्त स्त्रीच जाणू शकते.. एखाद्या चौकानाच्या केंद्रस्थानी उभे करून रुढी-परंपरेचे दोर हाताला बांधून सतत का नाचावं ..
त्याच त्या चौकटीत..
समोर विशाल आभाळ भरारण्यासाठी असतानाही का फक्त चौकटीतला मध्यबिंदू बनून रहावे..
खरंतर चौकट कशालाच नसावी...
ना तनाला..ना मनाला..
आणि विचारांना तर ती असूच नये...
चौकटीत वावरणारं तन म्हणजे फक्त परलोकी गेलं की भिंतीवर हाराने सजलेल्या चौकटी फ्रेममधे निर्जीव, अचेतन अशी तस्वीर बनून राहीलेला एक निर्जीव कागदाचा तुकडाच .. सचेतन तनाला जिवंतपणी अचेतन करणं म्हणजे जिवंतपणी मरण यातना भोगण्यासारखेच..
चौकटीतले मन ..म्हणजे जणू मनाला घातलेले लगाम... भरधाव उधळू पाहणाऱ्या अश्वाला जोरात लगाम खेचून त्याच्या गतीला घातलेली वेसण श्वास गुदमरून टाकणारी असते... चौफेर उधळू द्यावे मनाला... येऊ देत भरकटून बेभान वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर, फेसाळणाऱ्या सागरांच्या लाटांबरोबर, सहस्त्र नयनांनी सुर्याग्नीतून, काळ्याकुट्ट गूढरात्री अंधाऱ्या नगरीतून.. बेधुंद होऊन नाचू देत .. अगदी डोळ्यातून अश्रू झरेपर्यंत .
पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासारखंच ...
बुध्दीला चौकटीत बांधणे म्हणजे .. विचारांचे मरण ... हे मरण फारच दुर्दैवी...
चौकटीतल्या विचाराने रावण बरबाद झाला आणि कौरवही ..
बुध्दी जेव्हा चौकट मोडून बाहेर पडते तेव्हाच सखोल विचारांची सुमने वेचू शकते..
ह्या चौकटीबाहेर पडून जेव्हा बुध्दीला चालना दिली जाते तेव्हा घडतो
बुध्दही आणि कृष्णही..
जिजाऊही आणि मदर तरेसा ही..
म्हणून मोडावी चौकट ...
पण आखावी एक लक्ष्मणरेषा स्वतःसमोर स्वतःच प्रत्येकाने ...
मग तो पुरूष असो वा स्त्री...
कायम मर्यादेच भान रहाण्यासाठी..