तिचे साैंदर्य - भाग १
तिचे साैंदर्य - भाग १
गोष्ट १९९० ची आहे. नरेश आज लग्नासाठी स्थळं पाहायला जाणार होता. अनुराधा नावं होते मुलीचे. तिचा फोटो पाहूनच तो वेडा झाला होता. 'ही फोट मध्ये दिसते तशीच असेल तर लगेच लग्न करेन', हे त्याने मनाशी पक्के केले होते. इथे अनुराधाच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. नरेश कढून अनुराधाला होकार मिळावा यासाठी तिच्या आईने तर देवाकडे साकडं घातलं होतं. नरेश हा सरकारी कर्मचारी होता. मुंबईत स्वतःचे घर होते. आई वडील गावाकडे राहायचे. अनुराधाचे याच्याशी लग्न झाले तर आपली मुलगी अगदी ऐशो आरामात राहील, ही अनुराधाच्या आईची समज. अनुराधाला अजुन तीन बहिणी होत्या. दोघींची लग्न आई बाबांनी अगदी व्यवस्थितपणे लावुन दिली होती. त्यांचे दोन्ही जावई सुध्दा स्वभावाने छान होते. अनुराधा तिसरी. तीचे सुध्दा असेच सर्व चांगले व्हावे ही आई बाबांची इच्छा.
नरेश आणि त्याच्या घरची मंडळी आली. अनुराधाचे कुटुंबीय स्वागतासाठी उभे होते. सर्वांची ओळख झाली. नरेशची नजर अनुराधाला शोधत होती. थोड्या वेळाने अनुराधाची आई तिला घेऊन आली. अनुराधाच्या हातात चहाचा ट्रे होता. तिला पाहून नरेश भान हरपून बसला. फोटोपेक्षाही सुंदर होती ती. तिचा कमनीय बांधा, लांब सडक केस, मोठे टपोरे डोळे, गुलाबी ओठ, एकंदरीतच एखादी अप्सराच अनुराधाच्या रुपात समोर उभी आहे असे त्याला भासू लागले. काहीही झाले तरी आता हीच माझी बायको होणार हे त्याने ठरवून टाकले. अती उत्साही नरेशने तिथेच लग्नासाठी होकार दिला. अनुराधाच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या, आई बाबा म्हणतील तिथे लग्न करायचे असे तिचे ठरले होते. तिच्या आई बाबांना तर तो आधीच आवडला होता. मग अशा प्रकारे अनुराधा आणि नरेशचे तीन महिन्यांनी लग्न झाले.
नरेश खूपच खुश होता. त्याच्या स्वप्नांपेक्षा ही सुंदर मुलगी त्याची बायको झाली होती. ती आता फक्त त्याचीच होती. नरेश अनुराधाचा एक ही शब्द खाली पडू द्यायचा नाही. ती म्हणेल तस, त्याला जमेल तस तो सर्व करायचा. अनुराधा शिवाय त्याला चैनच पडायची नाही. कुठे समारंभात गेल्यावर सर्वांची नजर अनुराधावर असायची. सर्वच नरेशला म्हणायचे,' खुप नशिबवान आहेस इतकी सुंदर बायको मिळाली तुला'. त्याला सुध्दा या गोष्टीचे कौतुक वाटायचे.तिला सर्वत्र घेऊन मिरवायला त्याला फार आवडायचे. अनुराधा सुध्दा खुप खुश होती. नरेशच तिच्यावरच प्रेम पाहून तिला हायस वाटे. नरेश सारखा नवरा मिळाल्यामुळे ती स्वतः च्या नशिबावर भलतीच खुश होती. त्यासाठी ती नेहमी देवाचे आभार मानायची. सर्व काही खूप छान सुरू होतं. बघता बघता त्यांच्या लग्नाला दीड वर्ष झाली. पण नरेशच अनुराधा वरच प्रेम तसच होतं. आजही त्याला तिच्या दिसण्याचा आणि ती त्याची असण्याचा अभिमान होता. त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि तो काळजाचा ठाव घेणारा दिवस उजाडला.
नरेश नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला निघून गेला. अनुराधा घरात एकटीच होती. संध्याकाळी तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात केली. गॅस संपल्यामुळे ती स्टोव पेटवायला गेली. तिने आगपेटीची काडी लावताच अचानक भडका उडाला. त्यामुळे ती घाबरली आणि जागेवरून उठली. तितक्यात तिच्या साडीचा पदर त्या आगीत गेला. त्याने पटकन पेट घेतला. ती इतकी घाबरली होती की स्टोव् बंद करावा हे ही तिच्या लक्षात आले नाही तसेच पटकन साडी सोडावी हेही लक्षात आले नाही. आग बरीच वाढली. आणि अनुराधा बेशुद्ध पडली.
(क्रमशः)