पुनर्विवाह...
पुनर्विवाह...
माणसाच्या आयुष्यात प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं म्हणजे एकाच नाळेतून दोन जुळ्यांनी जन्म घेतल्यासारखे.
प्रेमासाठी आपलं सर्वस्व आणि अख्खं आयुष्य पणाला लावतात. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्वपूर्ण भावना आहे. ती दिसत नाही पण अंतरी अनुभूती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत असते. दोन व्यक्तींमध्ये काय नातं आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरूप बदलते. पती-पत्नी, गुरु-शिष्या
किंवा प्रियकर-प्रियसी या नातेसंबंधात प्रेमाचे वेगवेगळे
कंगोरे असतात. या कथेत ही एक वेगळा पुनर्विवाह म्हणता येईल कदाचित. थोडी सत्यकथा आणि थोडी काल्पनिक सुद्धा आहे.
आयुष्याच्या या पाडावात म्हणजे वयाची पंचावन्न वर्षे गाठलेले निषाद आज पुन्हा दुसऱ्यांदा एकाच मुली- सोबत लग्नबंधनाच्या गाठीत अडकणार होते. याचा अर्थ असा नाही की त्यांचे दोघांचेही आधी लग्न झालेले होते. लग्न झाले होते ही म्हणता येईल आणि लग्न झाले नाही असेही म्हणता येईल. निषाद चांगले सुशिक्षित गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. घरची परिस्थिती पण सधन भाऊ बहिणी सर्वच उच्चशिक्षित आणि सगळे गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. एकूण सर्व ऑल इज वेल. निषाद सर्वच बाबतीत सरस आणि देखणे तसेच एक समजदार व्यक्ती होते पण ते दिव्यांग एका पायाने अधू होते. साधारण आजपासून २७ वर्षापूर्वी त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होता.
पण त्यांना त्यांच्याच सारखी एका पायाने अधू असलेलीच
दिव्यांग मुलगी हवी होती. समाजात त्यांच्या आईवडिलांचे खूप नाव होते. एका पायाने अधू असले तरी त्यांना धडधाकट मुलगी भेटू शकली असती आणि लग्न करून सुखी संसार झाला असता. त्यांच्या भाऊबहिणींचे लग्न आधीच झाले होते हे सर्वात धाकटे होते आणि आता त्यांच्या लग्नासाठी आईवडील तगादा लावू लागले पण निषाद ची अटच होती की त्यांना त्यांच्या सारखीच एका पायाने अधू असणाऱ्या दिव्यांग मुलीशीच लग्न करायचे होते. आणि मग जिकडे तिकडे सांगावे जाऊ लागले.
असंच एक दिवस आजारी पडल्यामुळे ते दवाखान्यात गेले
दवाखान्यात खूप गर्दी असल्यामुळे त्यांची आई आणि ते नंबर येण्याची वाट बघत होते. त्याच वेळी शलाका आजारी असल्यामुळे ती सुद्धा आपल्या आईसोबत दवाखान्यात आलेली एका पायाने अधू दिव्यांग मुलगी होती. दिसायला
नाकी डोळी छान,टपोरे बोलके डोळे, गोरा वर्ण, लांबसडक केस अगदी सुंदर होती. तिला बघताच त्यांच्या मनात आले की लग्न याच मुलीशी व्हावं. पण याआधीच निषाद ची आई त्या मुलीसोबत बोलायला लागल्या. त्यांनी त्या मुलीचे नाव, शिक्षण, आईवडील, पत्ता वगैरे बोलण्यातून विचारपूस केली. ही माहिती शलाका सांगत असतांना तिच्या मनात कुठे शिवले देखील नाही की का विचारपूस होते आहे.
ती त्यावेळी शिक्षण घेत होती. तिच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती वडील एकटे कमावणारे. त्यात शलाका सगळ्यात मोठी तिच्या नंतरचे चारही भाऊबहिण शिकणारे
होते. आईपण नौकरी करत होती पण खूप कमी वेतन होते.
त्याच दरम्यान निषाद च्या घरच्यांकडून शलाका च्या घरच्या विषयी माहिती काढून ओळखीच्या माणसाकडून स्थळाचा सांगावा आला. एकाच शहरात पण वेगवेगळा एरिया असल्यामुळे त्यांना माहिती काढणं आणि पत्ता शोधणे अवघड गेले नाही. तिच्या घरी जेव्हा आईने शलाका ला सांगितले तेव्हा ती नकळत निषादचे स्वप्नं रंगवून लागली. तिला पुढे काय होणार आहे लग्न होईल की नाही हे देखील तिला माहिती नव्हते पण तरी ती त्यांच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न बघू लागली. त्यावेळी तिचे ही वय २१ वर्ष होते नुकतेच ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएटच्या फर्स्ट ईयरला प्रवेश घेतला होता. तोपर्यंत तिच्या मनात कधी कोणाविषयी असा विचार देखील शिवला नाही आणि तिने कधी कुणाला त्यादृष्टीने पाहिले नव्हते. जेव्हा निषाद चे स्थळ तिला सांगून आले तेव्हा ती मनातून खूप हरखली . कारण तिच्या दृष्टीने निषाद चे स्थळ तिच्या साठी परफेक्ट होते. तिच्या सारखेच एका पायाने अधू होते, उच्चशिक्षित होते वेल सेटल्ड होते आणि समजदार सुद्धा होते. त्यांना माहिती होते की मुलीकडील परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांनी मनोमन रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे हे देखील ठरवले होते. आणि याच इराद्याने त्यांनी सांगावा धाडला.
कारण निषादला पण शलाका आवडली होती आणि ते मनातल्या मनात तिच्या वर प्रेम करू लागले होते तै ही शलाका सोबत संसाराचे स्वप्न बघत होते. रॅदर असंही म्हणता येईल की त्यांनी शलाकाला मनात वरले होते. शलाकाने पण निषाद ला मनात वरले होते. पण निषाद चे स्थळ शलाका च्या घरी आल्यावर तिच्या वडिलांना काही आवडले नाही. म्हणजे त्यांनी सरळ सांगितले की माझी परिस्थिती आता मुलीचे लग्न करण्याची नाही मुलगी अजून शिक्षणच घेत आहे. मुलगी एका पायाने अधू आहे आणि ती कमावती होईल तेव्हा तिचे लग्न करू. जोपर्यंत ती स्वतः - च्या पायावर उभी राहत नाही तोवर तिचे लग्न करायचे नाही. इकडे शलाका निषादच्याच स्वप्नात मग्न होती तिला खूप उशिरा कळले. पण तोपर्यंत तिनं निषादलाच फक्त आपल्या भविष्याचा जोडीदार म्हणून स्विकार केला होता आणि मनोमन तिचा जीव सुद्धा जडला होतात. शलाकाच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला होता. तिला तिच्या आई- वडिलांवर पूर्ण विश्वास होता की तिच्या मनातलं आई- वडील ओळखून तिचे लग्नं लावून देतील. पण सगळं विस्कटलं होतं. तिच्या मनातलं स्वप्नं मात्र तिने मनात जपलं होतं आणि तिने इतर दुसऱ्या कुणासोबत लग्न नं करण्याचं ठरवलं. तीच परिस्थिती निषाद ची होती त्यांनी सुद्धा लग्न न करण्याच ठरवले. फक्त एकवेळ ची ती अजाणती भेट त्या एका भेटीनंतर पुन्हा ना कधी बघणं झालं, ना कधी भेटणं आणि ना कधी बोलणं झालं पण मनात मात्र एकमेकांना दोघांनीही वरले होते. असंच करत २७ वर्षाचा काळ लोटला. या कालावधीत तिला पण नौकरी लागली. आयुष्य फक्त जगत होते दोघेही. या काळात एकमेकांना भेटण्याचा किंवा बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. दोघेही एकमेकांप्रति नं बोलता, नं बघता एकनिष्ठ राहिले होते. निषाद ची आई देवाघरी गेली होती. ते एकटेच आयुष्य कंठत होते. इकडे शलाका तिच्या आई, भाऊ वहिनी सोबत राहत होती. तिचे वडील पण देवाघरी गेले.
असंच एकदा नकळत त्यांची ऑफिसच्या सेमिनार मध्ये भेट झाली आणि मनातली कोवळी पालवी बोलल्या- नंतर अंकुर घेऊ लागली. दोन तीन भेट झाल्यानंतर परत निषाद ने शलाकाला लग्नाविषयी विचारले आणि तिचा होकार मिळताच त्यांनी रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या संमतीने आणि आनंदात त्यांचा समाजातील रिती रिवाजानुसार लग्न झाले. आधी त्यांनी फक्त मनात एकमेकांना वरले होते तेव्हा समाजाची आणि आप्तेष्टांची साक्ष नव्हती पण आता सर्वांसमक्ष त्यांचा विवाह सोहळा पार पडला आणि त्यांच्या दृष्टीकोनातून समाज मान्यतेनुसार हा विवाह त्यांचा पुनर्विवाहच होता.
खऱ्या मिलनाची हिच खूण असते की वेगळेपणाची कसलीही खूण तिथे राहत नाही. किती ही प्रखर निष्ठा आणि विश्वास ज्यांनी फक्त एका पुसटशा भेटीनंतर आपलं हृदय एकमेकांना अर्पण केले मग ना कधी भेट ना संवाद तरीही अख्खं आयुष्य वाहीलं जिथे मिलनाची कुठलीच अपेक्षा नव्हती तरी युगानुयुगे वाट बघण्याची तयारी होती
नातं क्षणभराचं असो वा जन्मभराचं त्यात निष्ठा आणि एकमेकांचा विश्वास खूप आवश्यक असतो...

