प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
“काय गं कनू कधी आलीस तू?”, रमा काकूनी विचारले.
"आजच आली काकु..."
“कसं आहे बंगलोर?”
“छान आहे, काकु... या ना कधी फीरायला.” काकुशी संवाद संपवतच मी आत गेले.
आई म्हणाली, "कनू, उद्या खूप गर्दी होईल घरी. तुला काय तुझी पुस्तक अभ्यासाला लागतात. ती वरच्या रुममध्ये आहेत. एका ठिकाणी बांधून ठेव. आणि यावेळी घेवून जा सासरी!”
“हो, गं आई...” म्हटले व वरच्या खोलीमध्ये जाण्यास निघाली. जिना चढताना धापच लागली. पाहाते तर काय माझ्याच पुस्तकाचं कपाट जणू खाली केलेलं... मनात म्हटलं, काय गं आई! कधी आवरु आता हे!
आवरताना एक माझी आवडती वही हाती लागली व त्यातून खाली पडलं, तू इतिहासाच्या तासात मला लिहीलेलं पत्र! आणि तो गुलाब व्हॅलेन्टाईनच्या दिवशी तू मला दिलेला.
होय... खरंच खूप आठवलास तू. मी काबरी बावरी झाले तुझ्या आठवणीने व पटकन दारं-खिडक्या बंद केल्या.
प्रेम म्हणजे काय जेव्हा कळलं, तेव्हापासून तूच मनात होतास. अवखळ निरागस साधा सर्वांना समजून घेणारा... व मदत करणारा. तुझ्या प्रेमळ व बोलक्या स्वभावाने कधी मनात जागा केली कळलंच नाही. खरंच किती गोड होतास तू!तुझ्या प्रेमात मी कधी पडले कळलेच नाही. मग तुझा सहवास अावडू लागला. आणि तो दिवस तू खूप महत्वाची माहिती देण्यासाठी घरी आलास व आईबाबा घरी नव्हते. संधी पाहून तू मला प्रपोज केलंस. तुझा हात हातात घेतल्यावर मी मोहरले होते. तू हातवर ओठ टेकवून प्रेमाची कबुली दिलीस. किती सुंदर होतं तुझं माझ्या जीवनी येणं. चारही दिशा बहरल्या जणू! माझ्या रणरणत्या आयुष्यातील वाळवंटी भूमितील तू एक ओयासिसच होतास. भुतकाळाला वळून पाहू नये म्हणतात पण वर्तमान एखाद्यावेळी तरी विसरुन क्षणभर भूतकाळात रमावंसं वाटतंच.
काय नातं होतं आपलं, कितीतरी नात्यामध्ये सुंदर सात्विक निस्वार्थ! आठवते अजही तुझी माझी पहिली भेट. कॉलेजातील तो कार्यक्रम, किती घाबरुन गेले होते मी! त्यावेळी स्टेजवर गेल्यावर माझी काय गत होईल या विचारानेच गार पडले होते. तू भेटलास, बोललास व तू खूप जवळचा व्यक्ती असल्यासारखे वाटले व मी कवितेसाठी बक्षीसपात्र ठरले. किती आनंदी झाला होतास तू! प्रत्येकवेळी तू मनात खोल खोल उतरत जायचा.
नेहमी मला म्हणायचास की, मला तू स्वतःपेक्षाही जास्त आवडतेस. तू माझ्या आयूष्यातलं सर्व काढूनच घेतलं कनू! मी चकीत होत असे मला अनपेक्षीत असं तू बोलायचास.
पण पुढे काही नाही असं तू म्हणालास. आपण एकमेकांना खूप खूप आवडत होतो. पण अापल्या भावनांना प्रेम नाव तू कधी द्यायच नाही व तू ते मला देऊ दिलं नाही. आपल नातं मैत्रीच्या पलीकडचं व प्रेमाच्या अलीकडच ठेवू असं मला बजावलंस. एक अनामिक नातं तू माझ्याशी जोडलंस. त्यानंतर तुला तुझ्या आईवडीलांची स्वप्न पूर्ण करायची होती व मला देखील माझ्या स्वप्नांना व महत्वाकांक्षेला सामोरे जायचं होतं दोघेही वेगळे झालो. कारण आपण विरुद्धलिंगी होतो व ही आपली तारुण्यातील मैत्री जगाला रास येणारी नव्हतीच.
का कुणास ठाऊक! त्याक्षणी यावंच वाटलं तुझ्या मिठीत.! आधार घ्यावा वाटला तुझा. तुझ्या एका चुंबनाने व मिठीने क्षणात घट्ट झालेले हे नातं दूसर्याच क्षणी तुटणार होतं. रडत रडत एकमेकांचा निरोप घेतला. पुन्हा कधी न भेटण्यासाठी! जातानाचे तुझे ते वाक्य अजूनही अाठवतात. की चुकून जरी दिसलो कोठे तर तू नजर वळवून घेणे. गर्दी समजून टाळून जाणे. जर गोष्ट निघालीच कधी माझी तर हसण्यात उडवून देणे. ज्या स्मृती माझ्या तुझ्याजवळ अाहेत त्या मनाच्या कुपीत बंद करणे... किती अशक्य होतं ते माझ्यासाठी!
माझ्या मनाच्या भरलेल्या आकाशातून गतजीवनातील आठवणीचा पाऊस अनेक धारांनी कोसळू लागला. एकेका घटनेत माणसाला नखशिखांत बदलण्याची ताकद असते. माझ्या जीवनातही लग्न या घटनेनं मला नखशिखांत बदलवुन टाकले होते. मी बेभान होऊन तुझ्या पत्रावरील अक्षरांवर ओठ टेकवीत होते, डोळ्यातील आसवांना रोखण्याची माझी इच्छाच नव्हती व ताकदही हरविली होती. वैवाहिक जीवन आनंदी मोरपिसासम होतं पण आज कर्तव्य व भावना, वास्तवता व स्वप्न या द्वंद्वात मन सापडलं...
अचानक आईच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. डोळे पुसत भानावर आले व ओठातुन एकच उद्गार निघाला, प्रेमा खरंच तुझा रंग कसा!
अभि कोठे आहेस तू भेट ना एकदा तरी या जीवनात...