पार्थ..
पार्थ..
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. देवाचे आपल्या या भक्तांवर विलक्षण प्रेम होते. अर्जुनाजवळ असे काय होते की ज्याच्यामुळे त्याच्यावर देवाधिदेव सदैव प्रसन्न असायचे ? त्याच्या नावातच या रहस्याचा उलगडा व्यास महर्षींनी केलेला आहे.
ऋजुता म्हणजे सरळपणा , यालाच आर्जव असा दुसराही शब्द आहे. ज्याच्याजवळ मनाचा सरळपणा आहे ; किंचितही आत-बाहेर किंवा वाकडेपणा नाही अशा संपूर्ण सरळ मनाच्या व्यक्तीला अर्जुन असे म्हणतात. अर्जुन म्हणजे सरळ मनाचा मनुष्य. अशी सरळ मनाची माणसे देवाला खूप आवडतात.
राधेने एकदा मुरलीला विचारले , " काय ग ! तू अशी काय पुण्याई किंवा तपस्या केलीस कि ज्याच्यामुळे देव तुला सदैव आपल्याजवळ बाळगतात ? " मुरली म्हणाली , " काही नाही. पण तू एकदा मला निरखून पारखून बघ. तुला काही आढळते का ? राधेन मुरलीला नीट निरखून पाहिली. काय आढळणार तिच्यात ? मुरली म्हणजे पोकळ नळी , आतून संपूर्ण पोकळ , अगदी सरळ , दुसरे काही नाही. मुरली म्हणाली , " माझ्यात तुला काही ' ' विशेष ' आढळलं का ? राधेने ' नाही ' म्हणून उत्तर देताच मुरली म्हणाली , हेच रहस्य आहे. मी आतून पोकळ आहे. माझ्या अंतरंगात काहीही किल्मिष , कल्पना अथवा स्वतःचा विचार नाही. म्हणून देवाने मला सतत आपल्या सान्निध्यात ठेवलं आहे. याशिवाय , मी सतत देवाच्या हातात निमूटपणे पडून राहते. काही चुळबुळ करीत नाही. त्यामुळे मी देवाला खूपच आवडते आणि तो माझ्यातून सुरेल संगीताचे स्वर काढतो.
जय श्री कृष्ण
