govind kadam

Fantasy Thriller

4.3  

govind kadam

Fantasy Thriller

तबकडी - महासत्तेचा एक मार्ग

तबकडी - महासत्तेचा एक मार्ग

15 mins
402



अभिषेक हा नॅशनल रिसर्च सेन्टर येथे सायंटिस्ट म्हणून कार्यरत असल्यामुळे तो त्याच्या कुटुंबासह म्हणजेच त्याची बायको अस्मिता आणि मुलगा गणेश सोबत केरळ ला स्थाईक झालेला आहे. यंदाच गणेशच दहावीचं वर्ष. त्यामुळे त्याला आता त्याच पूर्ण लक्ष अभ्यासामध्ये केंद्रित करावे लागणार होत. त्यामुळे त्याला संपूर्ण वर्षभर कुठे फिरायला जाणे शक्य होणार नव्हते. त्यातच सध्या त्याला उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. म्हणून अभिषेक ने १५ दिवसांची सुट्टी घेऊन त्याच्या गावी म्हणजेच कोकणात फिरायला जायचे ठरवले. गावी जायचं म्हणून तिघेही खुश होते आणि तडक कोकणात यायला निघाले. अभिषेक जॉबच्या निमित्ताने केरळला स्थायी झाल्यामुळे त्याला फारसं गावी येणं-जाणं शक्य होत नव्हते. बऱ्याच वर्षांनी तिघे गावी येत असल्यामुळे गावीही आनंदाचे वातावरण पसरले होते. गावी घरी त्यांचं खूप उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करण्यात आलं. खूप वर्षांनी गावी आल्याने अभिषेक हि उत्साहात होता. रोज अभिषेक गणेश आणि घरातल्यांसोबत गावकऱ्यांच्या घरी त्यांच्या भेटीला जात असे, तर फावल्या वेळेत बाजारात, देवळात, मठात, शेतात फिरायला जात होते. म्हणता म्हणता चार पाच दिवस निघून गेले आणि रविवार आला. रविवारी अभिषेक चा गावचा चुलत भावाला ही सुट्टी असल्याने सर्व जण सिंधुदुर्ग किल्ला फिरायला गेले. तिथे भरपूर मौजमजा करून घरी येत असताना त्यांनी कोंबडी वड्यांचा बेत आखला आणि येताना बाजारातून कोंबडी विकत आणली. रात्री कोंबडी वडे फस्त करून सर्व जण झोपी गेले. सकाळी फिरायला गेलेले असल्यामुळे सर्व जण थकले होते. त्यामुळे सर्वांना लगेच गाढ झोप लागली.....


सोमवारची पहाट पण नेहमी प्रमाणे सर्वसाधारण होती. प्रतःविधी उरकून सर्व जण न्याहारी ला बसले. आणि आज कुठे फिरायला जायचं याच्या गप्पा रंगू लागल्या. गप्पा चालू असतानाच अभिषेक च्या भावाने टिव्ही वर बातम्या लावल्या.... बातम्या पाहून सर्वांचे धाबे दणाणले. संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. एका राज्यात भूकंपाचे महाभयंकर धक्के बसले होते. त्याची तीव्रता इतकी होती की अनेक शहरात व त्या लागून असलेल्या अनेक गावे व खेडो पाडे एकाच वेळी भूकंपाच्या धक्क्याने हादरून निघाले. सदर भूकंपाची तीव्रता ही इतक्या वर्षात सर्व जगभरात आलेल्या भूकंपाच्या तीव्रतेच्या कैक पटीने महाभयंकर होती. सर्व वैज्ञानिक एकाच वेळी इतक्या शहरामध्ये भूकंप कसा आला या कोड्यात पडले होते. आजवर असे कधीच घडले नव्हते. सर्वत्र मातीचे ढिगारे पडलेले होते आणि ढिगारया खाली मृतदेह. त्यात हवेत धुरळा उडाला होता. त्यामुळे मदत पोहोचविण्यासाठी ही उशीर होत होता. संपूर्ण जग अश्रूंनी होरपळून निघाल होत. विविध राज्यांतून वैद्यकीय, जेवणाची इत्यादी मदत घेऊन त्या राज्याच्या दिशेने अनेक टीम रवाना झाल्या होत्या. चक्क ट्रकांमध्ये एकावर एक टाकून मृतदेह नेले जात होते. जर का कोणी वाचलाच असेल तर त्याला तात्काळ तेथून हॉस्पिटलला हलविण्यात येत होते. मदत कार्याला उशीर होत असल्याने शेजारील शहरातील कित्येक तरुण स्वतः हून पुढे सरसावले. इतकी हृदयद्रावक भयानकता संपूर्ण जगाने या आधी कधीच पाहिली नव्हती. दोन- तीन दिवस झाले पण अजून हि अपघातग्रस्त किंबहुना मृतदेह सापडणे थांबले नव्हते. 

एका रात्रीत उध्वस्त झालेली शहरे पुन्हा नव्याने कशी उभी करायची आणि रस्त्यावर आलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन कसे करायचे असे अनेक प्रश्न प्रशासनाला भेडसावत होते. त्यातच एका भल्या मोठ्या जंगला जवळ असलेल्या एका शहरात एका जंगली प्राण्याला पाहून तेथील जनतेची आरडा ओरडा आणि पळापळ सुरू झाली. त्या जनावराला वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी पकडले नाही, तोवर त्या जंगलाच्या सिमे जवळ असलेल्या अनेक गावातून जंगली प्राणी शहराच्या दिशेने येत असल्याचे बातम्या येऊ लागल्या. त्यानुसार सर्वत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्या जंगली प्राण्यांना पकडून वन विभागाच्या केंद्रात निगराणी मध्ये ठेवण्यात आले. असे अचानक जंगली प्राणी जंगलातून बाहेर पडून शहराकडे कसे काय येऊ लागले हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. म्हणून त्यांनी पाच जणांची एक चौकशी समिती नेमली. सदर समिती प्रत्येक केंद्रात जाऊन त्या जंगली प्राण्यांबाबत चौकशी करू लागली . पकडण्यात आलेल्या प्रत्येक प्राण्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चाचण्या करून त्यांचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. सदर अहवालानुसार प्रत्येक प्राणी हा जखमी अवस्थेत आढळलेले आहेत. त्यांना झालेल्या जखमा ह्या कोण्या दुसऱ्या प्राण्यांकडून झालेले नसल्याचे त्यात नमूद केले. तसेच त्यांचे वैद्यकीय अहवालानुसार सदर प्राणी हे घाबरलेले असल्याचे आढळून आले. तरी सदर प्रकरणी जंगलात जाऊन अधिक तपासणी करणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने ने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले. 

वन विभागातर्फे तीन टीम तयार करण्यात आल्या. सदर टीम आपापली वाहने तसेच आवश्यक सुरक्षा साधने घेऊन जंगलात तपासणी साठी रवाना झाली. चार - पाच तास शोध घेऊनही काहीच हाती लागले नव्हते. जंगल खूप विस्तारलेले तसेच जंगली आणि खतरनाक जीवघेणे प्राणी असल्यामुळे सदर तपासणी करणे खूप जिकरीचे ठरत होते. तरीही सर्व अधिकारी सिकोशीने प्रयत्न करीत होते. जसे ते जंगलात आणखी आत जाऊ लागले तसे त्या जंगलातील झाडे मोडून पडलेली, मुळापासून तुटून पडलेली, जखमी, मृत अवस्थेत प्राणी पक्षी पडलेले आढळून आले. काही तरी भयंकर घडले असल्याचे त्यांना कळून चुकले होते. तरीही जीव मुठीत घेऊन सर्व अधिकारी तपासणी करिता पुढे जात होते. तसेच त्यांनी आपल्या सहकारी टीम ना जिओ कॉर्डीनेट कळवित येथील परिस्थितीचा आढावा देत सतर्क केले. त्यानुसार उर्वरित टीम देखील त्या दिशेने रवाना झाल्या. जसं जसे सर्व टीम देखील जंगलात आत जाऊ लागले तेव्हा त्यांना ही वाटेत मोडून पडलेली झाडे, जखमी मृत अवस्थेत जनावर दिसू लागले. सदर परिस्थिती पाहून आता सर्व घाबरलेले होते. पुढे जात जात सर्व टीम एका ठिकाणी पोचल्या. तेथील परिस्थिती पाहून सर्व अधिकाऱ्यांच्या पायाखालील जमीन सरकली. तेथे एक भला मोठा खड्डा पडला असून त्या खड्ड्यात गोलाकार आकाराची एक तबकडी पडलेली होती. सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तपासणीत आढळलेल्या सर्व बाबी वरिष्ठांना तात्काळ कळविण्यात आल्या. त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम, सैन्य दलाचे प्रमुख, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. सदर बाबींचा आढावा घेतला असता राज्यात दोन दिवस आधी घडलेली घटना हा भूकंप नसून परग्रहावरून तबकडी जलद वेगाने येऊन आदळल्या मुळे ही भीषण घटना घडली असल्याचे दाट शंका सर्वांच्या मनात निर्माण झाली. सदर घटनास्थळ व तबकडीची तपासणी करून तपासणी अहवाल तात्काळ प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच सदर तबकडी ही तात्काळ नॅशनल रिसर्च सेंटर च्यां त्या राज्यातील केंद्राकडे हलविण्यात आली. 

सदर प्रकरणी मंत्रालयात देखील युद्ध पातळीवर बैठका घेण्यात आल्या. विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्यत्या तपासणी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सैन्य दला तर्फे जवानांना सदर जंगलात पुन्हा तपासणी साठी पाठविण्यात आले. तसेच हेलिकॉप्टरमधून देखील जंगलाची पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली. एन.आर.सी. द्वारे अभिषेक यांना त्याची सुट्टी रद्द करीत तात्काळ घटना स्थळा जवळ असलेल्या केंद्रात रुजू होण्याचे आदेश दिले. परिस्थिती च गांभीर्य लक्षात घेत अभिषेकनेही क्षणाचाही विलंब न करता कामावर रुजू होण्यासाठी निघाला. 

अभिषेक ने घटनास्थळी पोचताच पदभार स्वीकारीत जंगलात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. वनविभागाने दिलेला अहवाल, तसेच जनावरांबाबत समितीने दिलेल्या अहवालाची पाहणी केली. सदर पाहणी नंतर त्याने हवामान खात्याशी भूकंपाच्या दिवशी रात्री वातावरणात काही बदल आढळून आलेला का याबाबत चौकशी केली. चौकशी अंती त्याला असे समजले की, वातावरणात काही काळ वादळ सदृष परिस्थिती निर्माण झालेली, परंतु काही वेळाने वातावरण पुन्हा सर्वसाधारण झाले होते. यावरून अभिषेक ला कळून चुकले की, त्यादिवशी भूकंप आलेला नसून, वादळ सदृष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तबकडी वरील ताबा सुटून ही तबकडी येऊन पृथ्वीवर आदळली. तिचा वेग भयंकर असल्यामुळे कंप निर्माण होऊन भूकंपाचे धक्के बसल्याचे भास झाला. याबाबत त्याने वरिष्ठांना कल्पना दिली. त्यानंतर अभिषेक रिसर्च सेंटरला जाण्यासाठी रवाना झाला. तिथे पोचल्यावर त्याने त्या तबकडीची पाहणी केली. तबकडी पाहून तो अवाक झाला. इतका भीषण अपघात होऊन देखील त्या तबकडी वर साधं खरचटल्याची खूनही नव्हती. सदर तबकडी साठी वापरण्यात आलेला धातू हा विशिष्ट व दुर्मिळ असल्यामुळे त्याची सखोल चाचणी करण्याचे ठरविले. तत्पूर्वी सदर तबकडी मध्ये कोण आहे हे पाहण्यासाठी सेंटर मधील तांत्रिक कर्मचाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु तबकडी चा दरवाजास असलेला लॉक उघडणे अशक्य होत होते. म्हणून फायर मशीनने दरवाजा कट करण्याचे ठरविले. परंतु त्या फायर मशीन ने त्या तबकडी वर काहीही परिणाम होत नव्हता. अनेक प्रयत्न केल्या नंतर तो दरवाजा उघडण्यास अभिषेक आणि त्याच्या टीम ला यश मिळाले. 

त्यानंतर अभिषेक आणि त्याच्या टीम ने तबकडीच्या धातू चे काही नमुने चाचणी साठी घेतले. अभिषेक तबकडीची पाहणी करण्यासाठी आत मध्ये गेला असता त्यांना पाहून तिथेच थबकला. तबकडी मध्ये हुबेहूब माणासांप्रमाणे दिसणारे एक युवक व एक युवती होते. त्यांना पाहून तो काही काळ बुचकळ्यात पडला. ते परग्रहावरून आलेले परग्रही (Alien) आहेत कि इतर देशातील कोणी गुप्तहेर, आपल्या देशाची माहिती काढण्यासाठी गुप्तहेरी करीत आलेले तर नाहीत ना? हा प्रश्न त्याला पडला. ते दोघेही इसम खुर्चीवर मृतावस्थेत पडलेले होते. त्याने त्या दोघांना आपल्या लॅब मध्ये तपासणीसाठी नेले. तपासणी दरम्यान त्याच्या असे निदर्शनास आले की, त्या दोघांच्या पाठीवर अंडाकृती तीन दिवे लागलेले होते. यावरून ते परग्रही असल्याचे सुनिश्चित झाले. परंतु ते दिवे प्रकाशित नसल्यामुळे बहुधा हे दोघे मृत झालेले असावेत असा अभिषेक चा प्रथमदर्शनी अंदाज होता. त्याने अधिक वैद्यकीय चाचणी केली असता, ते परग्रही मेलेले नसून त्यांचे हृद्य अजूनही कार्यरत असल्याचे जाणवले. त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्याच्या हेतू त्याने काही चाचण्या केल्या. त्या चाचणी नुसार त्यांचे रक्त हे गडद निळसर रंगाचे असून सभोवतालच्या वातावरणानुसार शरीराचे तापमान नियंत्रित करीत असतात. तसेच काही असे गुणधर्म आहेत कि, त्यामुळे त्यांची कोणत्याही आजाराविरुद्ध ची रोगप्रतिकार शक्ती तात्काळ वाढविण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार करू शकतात. तसेच शरीरावरील त्वचा हि कॊणातीही जखम त्वरित भरून काढू शकत असल्याचे गुणधर्म असल्याचे आढळून आले. तोवर तबकडीच्या धातूचा हि निरीक्षण अहवाल तयार झाला होता. त्याची पाहणी करून सदर अहवाल एकत्रित करून अभिषेकने वरिष्ठाना सादर केला. त्यामध्ये त्याने खालील तीन महत्वाचे मुद्दे नमूद केले होते. 

१. हे परग्रही असून त्यांना पुन्हा त्यांच्या ग्रहावर पाठविण्याची व्यवस्था केल्यास त्यांना पुन्हा जीवनदान मिळू शकते. त्यामुळे त्यांना परग्रही पाठविण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. 

२. त्यांच्या शरीरात असलेले काही विशिष्ट संरचनेमुळे त्यांची जखमा भरून निघण्याची, कोणत्याही आजाराविरुद्ध तात्काळ अँटी बॉडी तयार करण्याची, वातावरणानुसार शरीरात बदल करण्याची विशिष्ट अशी गुणशैली आहे. 

३. तबकडी मध्ये वापरलेला धातू मध्ये कोणतेही धक्के जसे कि बॉम्ब , ऍसिड इत्यादी पासून होणाऱ्या आघाताचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे गुणधर्म आढळून येत आहेत. 


सदर अहवालाची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाने अभिषेकला सखोल चाचणी करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाद्वारे सर्व स्तरावरच्या प्रमुखांशी बैठक घेऊन त्यांचा अहवाल त्या बैठकीत सादर करण्यात आला. बैठकी दरम्यान सादर परग्रहींची राहणीमान, त्यांचे खान पण, त्यांच्या ग्रहाची भौगोलिक स्थिती, ग्रहा वर उपलब्ध झाडे, पाणी, फळे, फुले इत्यांदीचा सखोल अभ्यास करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. 


अभिषेक आता त्या तबकडी मध्ये असलेल्या तंत्रज्ञानाबाबतची पाहणी त्याच्या टीम सोबत करीत होता. अत्याधुनिक सोयी सुविधा, साधनांनी परिपूर्ण अशी ती तबकडी होती. तबकडीच्या तपासणी करीत असताना त्यांच्याकडून तबकडीची सिस्टिम चालू झाली. त्यामुळे त्या सिस्टिम सोबत जोडलेला ट्रान्समीटर हि चालू झाला. तबकडीचा शोध घेत असलेल्या त्या ग्रहावरील अन्य परग्रहीना हरवलेल्या तबकडीच्या स्थाना बाबत ची माहिती पोचली. त्यामुळे त्या ग्रहावरून अजून दोघे जण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु संपर्क न झाल्याने त्यांच्या पासून जवळ असलेली तबकडी त्यांचा शोध घेत रवाना झाली आणि रिसर्च सेन्टर जवळ येऊन पोहोचले. त्यांची तबकडी जमिनीवर उतरवते वेळी झालेल्या आवाजाने आणि कंपामुळे रिसर्च सेन्टर मधील अधिकारीही सावध झाले. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या सुरक्षा कॅमेरा मध्ये परग्रही आल्याचे दिसत असल्याच्या सूचना अभिषेक ला कळविल्या. अभिषेक ने तात्काळ सुरक्षा यंत्रणेच्या कंट्रोल रूम मध्ये धाव घेतली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेत वरिष्ठाना अजून दोन परग्रही त्यांचा शोध घेत रिसर्च सेन्टर ला आल्याचे कळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक चालूच होती. आपल्या देशाला संपूर्ण जगात महासत्ता बनविण्याची ही नामी संधी चालून आली आहे. हे नव्याने आलेल्या दोन्हींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्यास आपणास पुष्कळ माहिती प्राप्त करून घेता येईल. तसेच त्यांच्या मदतीने त्यांच्या ग्रहावर हल्ला चढवून मनुष्य जातीचं अजून एका ग्रहावर साम्राज्य निर्माण करू, या आशयाने सैन्य दलाला त्यांनी तिथे तात्काळ पाचारण होऊन त्या दोघांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. आणि अभिषेक ला आम्ही येई पर्यंत त्यांच्या कडून माहिती प्राप्त करण्यास आणि आम्ही आल्या नंतर त्यांना त्यांची तबकडी आणि ते दोन्ही परग्रही सन्मानाने ताब्यात देऊ, असे आश्वासन दिले. परंतु वरिष्ठांच्या असलेल्या मनसुब्याबाबत अभिषेक पूर्णपणे अनभिज्ञ होता.   


अभिषेक त्या दोन्ही परग्रहींजवळ गेला. परंतु त्यांच्याशी नेमका कोणत्या भाषेत संवाद साधावा, त्यांना मराठी भाषा समजेल का अशा अनेक प्रश्न त्याला पडले होते. तरीही त्याने घाबरत घाबरत त्यांचे मराठीत स्वागत केले. त्यावर त्या परग्रहीनी दिलेले उत्तर ऐकून तो अवाक झाला. त्यांनी चक्क मराठी मध्ये उत्तर दिले होते. 


अभिषेक : नमस्कार, मी अभिषेक आपले आमच्या ग्रहावर स्वागत आहे. 


परग्रही १ : नमस्कार, मी ऑलिव्हर. आणि हा .... 


परग्रही २ : मी लिओ. आपणास भेटून आम्हाला आनंद झाला 


अभिषेक : आपण कोणत्या ग्रहावरून आला आहेत हे विचारले ? 


ऑलिव्हर : आम्ही पृथ्वीजवळच काही लक्ष किलोमीटर अंतरावर एक युरिच्यून नामक नवीन ग्रहाची निर्मिती झालेली आहे. त्या ग्रहावरून आम्ही आलोत. 


अभिषेक - आपल्या ग्रहावर देखील मी मराठी भाषेत संवाद साधला जातो का ?


ऑलिव्हर : नाही अस काही नाही. आमची आमच्या ग्रहावर सांकेतिक भाषेतच संवाद साधतो. 


अभिषेक : मग आपण इतकी अस्खलित मराठी कशी काय बोलत आहेत ?


लिओ : आमचा ग्रह हा नव्याने निर्माण झालेला ग्रह असून त्यावर निसर्गाने अनेक चमत्कारिक नावीन्य पूर्ण गोष्टीनी परिपूर्ण असा आमचा ग्रह आहे. त्यामुळे कोणाचीही आमच्या ग्रहावर नजर पडल्यास त्यांच्या आमच्या ग्रहांबाबत लालसा निर्माण होणारच. म्हणून आमच्या ग्रहाच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या ग्रहाभोवती फेऱ्या मारत असतो. तेव्हा आपल्या कक्षेत आल्यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी मुळे आम्ही आपली भाषा ऐकत आलो आहोत. कोणतीही हि भाषा आम्ही लगेच अवगत करू शकत असल्याची कला आमच्यात असल्याने आम्ही आपली मराठी भाषा लगेच शिकलो. 


ऑलिव्हर : आमच्या साथीदारांची तबकडी तुमच्या पृश्वीवर येऊन हरवली आहे. आम्ही आमचे साथीदार ऍडम आणि ती मिरांडा यांना व तबकडी शोधत आलो आहोत. 


अभिषेक : हो माहिती आहे मला ते. पण आपणा साठी एक वाईट बातमी आहे. आपले साथीदार यांचं अपघात झाल्याने ते बेशुद्ध झालेले आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो. 


अभिषेक त्यांना नेऊन बेशुद्धावस्थेत असलेले त्यांचे साथीदार दाखवतो. त्यांना पडून आलेले परग्रही थोडे भावुक होतात. आणि अभिषेक ला सांगतात की, आम्ही यांना घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. त्यांचे सुसंस्कृत, सभ्य वर्तन पाहून अभिषेक प्रभावित झाला. ते शांत आणि प्रेमळ स्वभावाचे असल्याचे त्याला जाणवले.  


तेवढ्यात सशस्त्र सैनिक आणि वरिष्ठ अधिकारी रिसर्च सेन्टर ला पोचतात. त्या दोन्ही परग्रही अभिषेक शी बोलण्यात गुंग असलेले पाहून ते सैनिकांना त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना देतात. अभिषेक वरिष्ठ आलेले पाहून त्या परग्रहीना सांगतो की, "हे पहा आले आमचे वरिष्ठ. हेच आपल्याला आपले सहकारी व तबकडी स्वाधीन करण्याची कार्यवाही करतील." कोण आले हे पाहण्यासाठी ते मागे वळताच सर्व सैनिक पाठी मागून त्यांच्या वर जाळी फेकतात. जाळी फेकल्यामुळे त्या परग्रहीना हालचाल करणे शक्य होत नव्हते. याच संधीचा फायदा घेत त्यांचे हात पाय साखळदंडाने बांधून त्यांना लटकवण्यात आले. हे सर्व काय चाललंय हे अभिषेक आणि त्याच्या टीम ला काहीच कळत नव्हतं. 


अभिषेक : सर हे काय करताय ? तुम्ही यांना असं ताब्यात का घेतल आहे ?


वरिष्ठ अधिकारी : अभिषेक तू जरा शांत राहा. आपण त्यांची चौकशी करणार आहोत 


अभिषेक : पण सर , आपण तर यांना त्यांचे साथीदार आणि तबकडी परत करण्याचे कबुल केले हॊते. मग आता हे सर्व का ?


वरिष्ठ अधिकारी : अभिषेक, आपले काम झालेले आहे. त्यामुळे आता मध्ये बोलू नका. 


अभिषेक आणि त्यांची टीम एका बाजूला उभी राहून जे काय चाललंय ते निमूटपणे पाहत उभे होते. सैन्य दलातील एका वरिष्ठ अधिकारी पुढे येऊन त्या परग्रहीना प्रश्न विचारू लागला. कोणत्या ग्रहावरून आलात? , तुमची लोकसंख्या किती आहे ? नेमका तुमचा ग्रह कुठे आहे ? तुम्ही पृथ्वीवर कशासाठी आलात ? असे अनेक प्रश्न एका मागोमाग विचारले जात होते. परंतु ते परग्रही एकही प्रश्नांच उत्तर देत नव्हते. त्यामुळे खवळलेल्या त्या अधिकाऱ्याने दंडुकाने त्या परग्रहीना मारण्यास सुरुवात केली. त्याने हि ते उत्तर देत नसल्याने खिळे टोचलेल्या लाकडी फळीने तो त्यांना मारू लागला. त्या परग्रहींच्या शरीरावर जखमा होऊन शरीर रक्त बंबाळ झाले होते. त्यांचं हे torture अभिषेकला बघवला न गेल्यामुळे तो त्या अधिकाऱ्याला रोखण्यासाठी पुढे गेला. पण त्या सनकी अधिकाऱ्याने अभिषेक चे काहीही ऐकून घेतले नाही. अभिषेक त्या अधिकाऱ्याला विनवणी करूनही त्या अधिकाऱ्याने दाद दिली नाही. म्हणून अभिषेक त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्या कडे जाऊन त्यांना विनंती करू लागला. पण ते हि दाद देत नव्हते. एका सैनिकाने मागून अभिषेक च्या पायावर बंदूक मारली त्यामुळे तो जमिनीवर पडला. त्याला हि आता एका कोपऱ्यात गुडघ्यावर बसविले आणि त्याच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली. हा सर्व प्रकार ते दोघे परग्रही हि बघत होते. थकलेल्या त्या सनदी अधिकाऱ्याने त्यातील एका परग्रहीला (लिओ) खाली उतरवून एका बंद खोलीत नेले. जगावर महासत्ता बनण्याच्या स्वप्नापायी आपण काय करतोय याच कोणालाच भान राहील नव्हतं. त्याच्यावर त्या बंद खोलीत नेऊन माहिती मिळवण्यासाठी अमानुषपणे थर्ड डिग्री देत होते. त्याच्या विव्हळण्याच्या आवाजाने संपूर्ण सेंटर थरारून उठल होत. अभिषेक हि ढसा ढसा रडत होता आणि वरिष्ठाना हे सर्व थांबविण्याची विनंती करत होता. त्याच्या वर बंदूक रोखून धरलेल्या त्या सैनिकाने त्या बंदूकीनेच त्याच्या डोक्यावर वार केला. यामुळे अभिषेक बेशुद्ध पडला आणि त्याच्या नाकातून रक्त येत होते. या सर्व प्रकाराने ऑलिव्हर च्या ही डोळ्यात पाणी आले होते. 


थोडे वेळाने तेथे अजून तबकड्या उतरल्यामुळे मोठमोठ्याने आवाज आणि कंपन निर्माण होऊ लागले. बाहेर सुरक्षा रक्षक ओरडत आला की, साहेब साहेब बाहेर खूप साऱ्या तबकड्या येऊन उतरल्या आहेत. आणि त्यातून उतरलेले १०० हुन अधिक परग्रही शस्त्र घेऊन सेंटर वर हल्ला चढवत आहेत. लिओने बंद खोलीत नेत असताना संधीचा फायदा घेत त्याच्या मनगटावर असलेल्या घडाळ्याचे बटन दाबून त्याच्या ग्रहावरच्याना संकटात अडकल्याची सूचना केली होती. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हल्ला चढवला होता. सेंटर वर सर्वांची धावपळ सुरु झाली होती. वरिष्ठ अधिकारी यांनी सैनिकांना position घेत येणाऱ्या सर्व परग्रहीना मारण्याचे आदेश दिले. आणि स्वतः बंद खोलीत सुरक्षित लपून बसले. कंपनाच्या आवाजाने अभिषेकला ही शुद्ध आली होती. सगळी कडे पळापळ चाललेली बघून तो आणि त्याचे सहकारी त्या लटकवलेल्या परग्रही ऑलिव्हरला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेवढ्यात नव्याने आलेले परग्रहगी सेंटरच्या आत घुसल्याने दोन्ही बाजूनी गोळीबार सुरु झाला होता. अनेक सैनिक यात मृत्युमुखी पडत होते तर काही परग्रही हि जखमी पडत होते. अभिषेक ने ऑलिव्हरला खाली उतरवून त्याच्या सहकाऱ्याला त्याला तबकडीत सुरक्षित नेण्यास सांगितले. त्याचा खांद्यावर हात घेऊन तो तबकडीच्या दिशेने निघाला. उर्वरित सहकाऱ्यांना घेऊन अभिषेक बेशुद्धावस्थेत असलेल्या परग्रही ऍडम आणि मिरांडा कडे गेला. त्याने त्यांच्या सहकाऱ्यांना strature च्या सहाय्याने त्यांना तबकडीत नेऊन सोडण्यास सांगितले. आणि अभिषेक बंद खोलीच्या दिशेने रवाना झाला. तिथे लिओ एकटाच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. अभिषेक ने त्याला हाक मारली. तेव्हा त्याने डोळे उघडून त्याच्या कडे पाहिले. पण उठण्याची त्राण त्याच्या अंगी नव्हती. अभिषेक ने त्याचा एक हात खांद्यावर घेत त्याला उचलले आणि तबकडी च्या दिशेने घेऊन जात होता. तो त्या खोलीच्या बाहेर निघाला तर सर्वत्र शांतता पसरली होती. चारी बाजूला रक्ताच्या पिचकाऱ्या उडाल्या होत्या. आणि त्यात न्हाऊन गेलेले सैनिकांचे मृतदेह पडले होते. एकही मनुष्य जिवंत राहिला नसावा कदाचित. जे परग्रही जखमी झालेले त्यांना घेऊन ते तबकडीकडे नेत होते. तर काही जण कोणी राहील तर नाही ना याचा शोध घेत होते. अभिषेक लपून लपून लिओ ला घेऊन तबकडीच्या दिशेने घेऊन जातो. बंद खोलीत लपलेल्या अधिकाऱ्यांजवळ काही परग्रही पोचतात. त्यांना पाहून ते सर्व अधिकारी त्यांच्या हाता पाया पडून आपल्या जीवाची भीक मागत असतात. पण रुद्रावतार धारण केलेले ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्यांना फासावर लटकवले. आणि जीव सोडणार तोच त्यांना खाली सोडले. सर्वाना वाटले कि त्या परग्रहीनी त्यांना माफ केले. म्हणून ते खुश होऊन त्यांच्या हात जोडून धन्यवाद मानायला लागले. तोच त्या परग्रहीनी त्यांचे शीर धडापासून वेगळे केले आणि क्रूर हास्य घेत बाहेर पडले. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात त्यांचे छाटलेले मुंडके होते. त्यांचे सहकारी कुठेही सापडत नसल्यामुळे ते सर्व परग्रही तबकडींजवळ पुन्हा परतू लागले.   


पण अभिषेक चे सहकारी घेऊन गेलेल्या त्या परग्रहीना सुखरूप तबकडी पर्यंत पोचवून परत यायला निघाले असताना त्यांना त्या परग्रहींनी पकडले. सर्व सहकारी घाबरलेले होते. ते त्यांच्या समोर घुडक्यावर बसले होते. सर्व परग्रहीनी त्यांना घेरले होते. मुंडकया छाटलेले परग्रही हि तिथे पोचले. त्यांचे प्रमुख हि तिथे जमले होते. यांचं काय करावं याबाबत त्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात अभिषेक हि लिओला घेऊन तिथे पोचला. रक्ताळलेला लिओला त्यांच्या साथीदारांनी अभिषेक कडून घेऊन तबकडी मध्ये नेऊन ठेवले तर एकाने येऊन अभिषेक ला पकडून त्यांच्या सहकाऱ्यांच्या शेजारी नेऊन बसविले. चर्चेअंती अभिषेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारून टाकायचे आणि पृथ्वी वरही अणुहल्ला करून पृथ्वी नामशेष करण्याचे ठरले. तसे ते परग्रही अभिषेक आणि त्याच्या सहकार्याना मारण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी त्यांच्या बंदुका अभिषेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर रोखल्या. त्यामुळे त्यांनी सर्वानी डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत होते. खूप वेळ काहीच झालं नाही म्हणून त्यांनी डोळे उघडले, तर ऑलिव्हर आमच्या बाजूने त्यांची समजूत काढत होता. प्रत्यक्षात तिथे काय घडले आणि अभिषेक आणि त्यांच्या टीम ने कसे त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला हे सर्व तो सांगत होता. आमची माणुसकी फळाला आली होती. आणि त्यांच्यातही माणुसकी होती याचा प्रत्यय आला. "काही व्यक्तींच्या लोभामुळे अनेक निष्पाप जीवांना, ज्यांना यातलं काहीच माहीत सुद्धा नाही त्यांना शिक्षा का ? अश्या अनेक मुद्यांवरच ऑलिव्हर ने त्यांना निर्णयाचा फेर विचार करण्यास भाग पाडले. ऑलिव्हरच बोलणं ऐकून त्या सर्वानी आम्हाला सोडून देण्याचे आणि पृथ्वीवर ही हल्ला करणार नसल्याचे ठरविले. त्यानुसार ते सर्व आपापल्या तबकडींमध्ये बसून आपल्या ग्रहावर जायला निघाले. जाता जाता त्यांनी आम्हाला त्या सेंटर मधून बाहेर काढले आणि निरोप घेत रवाना झाले. परंतु हा सर्व प्रकार ज्यामुळे आणि जिथे घडला त्या सेंटर ची इमारत आणि सर्व यंत्रणा त्यांनी बॉम्ब हल्याने उडवून टाकली. यामुळे या परग्रहींबाबत बघितलेला कोणीही हयात नव्हता, सर्व दस्तावेज कॅमेरा फुटेज किंवा अजून कोणताही पुरावा अस्तित्वात राहिलेला नव्हता. अभिषेक आणि त्याचे सहकारी यांनीही कोणाला काहीच सांगायचं नाही, हा संकल्प करीत तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी बातम्यां मध्ये भूकंपांचा धक्याने नॅशनल रिसर्च सेन्टर ची इमारत जमीनदोस्त झाल्याचे बातमी येऊ लागली. अनेक वरिष्ठ अधिकारी रिसर्च सेंटर ला उपस्थित असल्याने ते हि इमारती खाली चिरडून दगावले आहेत. काही तरी मोठ्या प्रोजेक्ट वर काम चालू असल्याने सर्व जमले असल्याची दात शक्यता आहे. नेमका कोणत्या प्रोजेक्ट वर काम चालू होत ते कळलेले नसले तरी आजच्या दिवसाची विज्ञानाच्या दृष्टीने काळ्या दिवसात नोंद घेतली जात आहे, अश्या बातम्या सर्वत्र दाखविल्या जात होत्या. 


शेवटी माणुसकी जिंकली. माणसाने जेव्हा जेव्हा हव्यासाच्या पाठी धाव घेतली आहे तेव्हा तेव्हा त्याचेच नुकसान झालेले आहे. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy