Govinda javheri

Romance

4.5  

Govinda javheri

Romance

मैत्रीतली प्रेयसी

मैत्रीतली प्रेयसी

56 mins
2.7K


मैत्रीतली प्रेयसी...


जो सगळं काही असतो तोच म्हणाला मी कधीतरीचं असतो का??..

त्याला काय सांगू आता??

तो असतानाही तोच असतो आणि तो नसतानाही फक्त तोच असतो...

तो आहे तर सगळं काही आहे आणि तो नाही तर काही सुद्धा नाही... 

तो आहे तोपर्यंत काळजात तोच राहील आणि तो नाही तर दुसरं कोणीचं नाही... 

तो आहे,फक्त माझ्यात आहे आणि तो नाही तर माझ्यात माझं काहीचं नाही... 

❤.....❤


टाळ्यांच्या आवाजाने कवितांमध्ये गुंग झालेला माधव जागा होतो. खूप सुंदर कविता होत्या त्या मुलीच्या. माधव एक सुप्रसिद्ध लेखक होता. दिसायला एकदम रुबाबदार, बोलके,घारे डोळे आणि नेहमीचं चेहर्‍यावर स्मितहास्य..लहरी हट्टी असा स्वभाव होता त्याचा पण मनमिळाऊ होता..मित्रांसाठी एकदम जीवलग असा मित्र जिवाला जीव लावणारा..उत्साहाचा झराचं होता तो..कोणतही काम खूप उत्याहाने चिकाटीने करणारा..आतापर्यंत त्याची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आणि तिन्ही खूप प्रसिद्ध झालेली होती...त्याच्याचं कॉलेजमध्ये आज तो स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. त्याच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती. ज्या काॅलेजने त्याला घडवलं होतं त्याच्यातल्या लेखकाला घडवलं होतं तिथेचं आज तो प्रमुख पाहुणा म्हणून आला होता..त्या मुलीच्या कविता त्याला खूप भावल्या होत्या...जणू त्या त्याच्याचंसाठी लिहल्या आहेत असं त्याला वाटलं. तिच्या कवितेत असणारा तो त्याला तोचं असल्यासारखा भासत होता. त्यातली एक चारोळी तर त्याला खूपचं आवडली होती, 


"ते एक यमक तिने डायरीत मागच्या पानावर लपवून ठेवले आहे...

नाहीतर त्या दोघांचीही ती अधूरी कविता पूर्ण झाली असती.."


त्याने त्यांच्या प्रिंसिपलला तिच्याबद्दल विचारलं. गार्गी नाव होतं तिचं. कलाशाखेच्या प्रथम वर्षात शिकत होती ती. कार्यक्रम संपल्यावर माधवने तिला भेटायचं ठरवलं.

माधवने तिला तिच्या सगळ्याचं कविता खूप छान होत्या असं सांगितलं. 

"थँक्यू सर, पण त्या कविता माझ्या नव्हत्या..माझ्या मोठ्या बहिणीच्या आहेत त्या. माझी ताई खूप छान कविता करते पण तिला आवडत नाही असं कोणी त्या वाचलेल्या. ते तर मीचं तिच्या डायरीतल्या काही कविता ईथे आज वाचून दाखवल्या आणि हे जर तिला कळालं तर मात्र माझं काही खरं नाही. पण ती इतकं छान लिहते मग जर मी ते जगासमोर आणलं तर त्यात काय बिघडलं."गार्गी बोलली. 

"तुम्ही खूप छान लिहता सर, मी तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. पण तुम्ही नेहमी रहस्य कथाचं लिहता. प्रेमकथा लिहा खरचं सगळ्यांना खूप आवडेल."गार्गीची बडबड चालूचं होती. माधव मात्र विचारात पडला होता. त्या कवितेंच्या आणि नकळत तिच्याही जीने त्या लिहल्या होत्या..

"मी तुमचा आभारी आहे पण जो कधी स्वतःचं प्रेम नाही समजू शकला तो दुसऱ्यांची कथा कशी लिहू शकेल. तुमच्या बहीणीचं नाव काय आहे.."माधव गार्गीला विचारतो. पण तेवढ्यात त्याला फोन येतो आणि गार्गी तिथुन निघून जाते..

माधव त्याच्या आॅफिसमध्ये विचारात गुंततेला असतो तेव्हा तिथे त्याचा मित्र यश येतो..यश त्याचा फक्त जवळचा मित्रचं नव्हता तर त्याच्या सोबत कामही करायचा..त्याच्या सगळ्या मीटिंग्ज वगैरे तोचं सांभाळायचा..

"काय लेखक साहेब, कुठे आहात तुम्ही? किती काॅल केले तुला..एवढा बिझी झालास की मित्राला विसरलास.."यश बोलतो. 

"नाही रे.. काम होतं जरा आणि तुला कसं विसरेल बाबा..तू तर जिगरी यार आहेस माझा.."माधव बोलतो. 

"हो ना दिसतयं ते मला आणि कुठे हरवला होतास एवढा."यश माधवला विचारतो. 

"अरे मी काल माझ्या कॉलेजमध्ये गेलेलो तर जरा जुन्या आठवणी ताज्या झाल्या."माधव बोलतो. 

"अच्छा! खास कोणी आठवलं वाटतं?...सांग तरी कोण होती? "यश त्याला चिडवतो. 

"सखी...नावाप्रमाणेच जिवलग सखी होती ती माझी..मैत्रिण म्हणू कि प्रेयसी???...मैत्रिणीपेक्षाही जास्त जीव लावला होता तिने मला...आणि मीही प्रेयसीपेक्षाही जास्त हक्क गाजवायचो तिच्यावर...मैत्रीतली प्रेयसी म्हण हवं तर..तिनेचं मला लिहायची प्रेरणा दिलेली.. बोलायची एक दिवस तू खूप मोठा लेखक बनशील..माझ्यापेक्षा जास्त तर ते तिचचं स्वप्न होतं. आणि कदाचित ते तिचं स्वप्न होतं म्हणूनचं आज मी ईथे आहे. माझ्याकडे नुसतं बघूनही तिला माझ्या मनात काय चाललयं कळायचं..तिने दरवेळी मला साथ दिली होती तेही निरपेक्ष मनाने.. जर कधी मी अस्वस्थ असेल तर तशीचं माझ्यासोबत दिवसभर शांत बसून रहायची..कधीकधी रागात मी तिला काहीही बोलायचे पण तरीही काहीही न बोलता माझ्या मागे मागे करत रहायची..ती निखळ मनाने माझ्यावर प्रेम करत राहीली..पण मी कधी तिला समजूचं शकलो नाही..

"ओहो..लेखक साहेबांची लव्हस्टोरी पण आहे तर.. तू तर छुपे रुस्तम निघालास..गेली तीन वर्ष तूझ्यासोबत काम करतो मी पण कधी थांगपत्ताही लागू नाही दिला तू तर.."यश बोलतो..

"अरे बाबा,तसं काही नव्हतं रे..मी कधी समजूचं शकलो नाही आमच्यात जे होतं ते मैत्रीपेक्षाही जास्त होतं..ती गेली शेवटी माझ्यापासून दूर..ती जोपर्यंत होती तोपर्यंत नाही समजून घेतलं तिला..ती गेल्यावर मला कळलं की ती माझ्यासाठी काय आहे ते..ती गेली पण इकडे माझं सगळचं कोणीतरी माझ्यापासून दुर नेल्यासारखं झालेलं..कितीतरी दिवस त्यातून सावरलो नव्हतो मी..लिहणं पण बंद केलेलं पण मी असचं लिहतं रहावं ही तिची इच्छा होती..ती असताना तर मी तिच्यासाठी काहीचं करु शकलो नाही..पण ती नेहमीचं असायची माझ्यासोबत काहीही झालं तरी..मी स्वतः जा बोललो तरी कधी माझी साथ नाही सोडली तिने..मग ठरवलं लिहायचं तिच्यासाठी..काल काॅलेजमध्ये त्या मुलीच्या त्या कविता ऐकल्या आणि सगळं आठवलं..तिच्याच असतील का त्या कविता..त्या कविता ऐकून ती एकदम जवळ असल्यासारखी भासली..त्या कवितेतला तिचा तो मला माझ्यासारखाचं वाटत होता..तीचं असेल का रे ती??.."माधव बोलला. 

"ती पण लिहायची?..आणि आता कुठे आहे ती? "यश विचारतो... 

"माहीत नाही रे..तीने काहीचं संपर्क नाही ठेवला त्यानंतर..खूप छान लिहायची..मलाही ते खूप नंतर कळालं..माझ्याचसाठी लिहायची पण मी नाही समजू शकलो तेव्हा..ती म्हणायची, कविता ही नदीसारखी असते..जशी नदी सागराला मिळाल्यावर पुर्णत्वाला जाते तशी कविताही ज्याच्यासाठी आहे त्याच्यापर्यंत पोहोचली की पुर्ण होते पण माझ्या कविता अपूर्णचं राहतील..अपुर्णेतही वेगळी मजा असते.."माधवचे डोळे भरून आलेले असतात..

"मी त्या गार्गीच्या घरी जाऊन बघू का तीची बहीण खरचं सखी असेल असं वाटतयं मला.."माधव बोलतो.. 

"अरे असं कसं तू कोणाच्याही घरी जाणार..आणि काय बोलणार तिथे..तुला वाटतयं तसं नसेल तर काय..फक्त कवितेवरुन तू कसं ठरवू शकतो ना..",यश बोलतो.. 

"माझं मन मला सांगतयं ती सखीचं आहे..माझी सखी.. "माधव बोलतो.. 

यश डोक्याला हात लावतो आणि माधवला बोलतो, "आतापर्यंत ऐकलं होतं लोक प्रेमात पडून वेडी होतात..आज पाहीलं पण..मग आता काय विचार आहे तुमचा लेखक साहेब..? जेवढं मी तुम्हाला ओळखतो त्यावरून काहीतरी ठरवलं असेलचं तुम्ही?.."

"हो..आणि त्यात मला तूझी मदत हवी आहे.. काही करून त्या गार्गीचा पत्ता मिळव.."माधव यशला सांगतो.. 

"बरं.. अजून काही आज्ञा लेखकसाहेबांची..??", यश त्याला चिडवतो.. 


"माधव गेला एक आठवडा झाला रोज आपण ईथे घराबाहेर येऊन थांबतोय पण अजून ती काही दिसली नाहीये. मला नाही वाटत ती इथे राहत असेल..काही उपयोग नाहीये इथे थांबून असं.",यश वैतागून बोलतो.. 

"मला विश्वास आहे ती दिसेल..सात दिवसात हार मानू का मी?.असं असू शकत ना की आपण गेल्यावर ती येत असेल..आज इथेचं थांबायचं आहे रात्रभर.. " माधव बोलतो.. 

"काय??..हे बघ,माधव ती इथे राहत असती तर दिसलीचं असती..निदान कोणीतरी ओळखीचं दिसलं असतं. तिचे आईवडील वगैरे..तू ओळखतोस ना त्यांना पण असं कोणीचं दिसलं नाही..माझं ऐक, आपण जाऊया इथून..",यश माधवला समजावतो पण माधव त्याचं ऐकायला तयार नसतो..

रात्र झालेली असते पण आजही माधवला सखी दिसलेली नसते..तो निराश झालेला असतो. त्याला असं बघून यशला त्याची काळजी वाटते. तो माधवला समजावतो,परत जायची विनंती करतो..माधव त्याचं काहीचं ऐकत नाही उलट त्यालाचं बोलतो, "यश, मी आज इथेचं थांबणार आहे.. तू जा ईथून.. घरी काकुपण वाट बघत असतील..त्यांनाही काळजी वाटत असेल..तू खरचं जा.."माधवचा हट्टी स्वभाव यशलाही चांगलाचं माहीती असतो...तो ईथून काही हलणार नाही हे त्याला कळून चुकतं...त्याची आई घरी वाट पाहत असते त्यामुळे तो तिथून जातो... 

माधव तिथेचं त्या घराभोवती फेर्‍या मारत बसतो..अचानक जोरदार वाऱ्याला सुरूवात होते..पावसाचं वातावरण झालं होतं..त्यामुळे माधव एका झाडाखाली जाऊन थांबतो..तेवढ्यात तिथे एक गाडी येते आणि एक मुलगी गाडीतून उतरते..माधवला तिचा चेहरा दिसत नसतो..तिने पिवळ्या रंगाचा लाॅंग स्कर्ट घातलेला असतो आणि वरती पांढर्‍या रंगाचा शाॅर्ट टाॅप..स्कर्ट ला लाल रंगाचे छोटे छोटे गोंडे असतात आणि किणकिण करणारी घुंगरं..हातात रंगीबेरंगी बांगड्या..गळयात चैन...खांद्यापर्यंत रूळणारे तिचे कुरळे केस वार्‍याच्या झुळूकीने उडत असतात..तिच्या स्कर्टवर लटकलेल्या घुंगरांचा आवाज माधवच्या हृदयाची धडधड वाढवत होता..माधवला अजूनही तिचा चेहरा दिसत नव्हता..तिचा चेहरा बघण्यासाठी माधवची धडपड चाललेली असते..तेवढ्यात ती वळते..तेच डोळे ज्यामध्ये कायम फक्त माधव होता पण तो कधी ते समजू शकला नाही..तेच गुलाबी ओठ ज्यावर दिवसरात्र फक्त माधवचं नाव असायचं..आणि तेच लाघवी निरागस हास्य...माधवची सखी आज त्याच्यासमोर होती..माधवसाठी थोड्यावेळ सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं..त्याला फक्त तीचं समोर दिसत होती..तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारायची होती पण त्याने स्वतःला सावरलं..अचानक जोरदार पाऊस पडायला लागतो आणि ती घरात निघून जाते..आणि माधव तसाचं उभा असतो जुन्या आठवणींमध्ये भिजतं. 

माधव खूप खूश असतो त्याला त्याची सखी भेटलेली असते नव्याने..माधवच्या डोळ्यासमोरुन तिचा चेहरा जातचं नसतो..अजूनही सगळं तसचं असेल का?.. त्याला काॅलेजमधली त्याची सखी आठवते..किती बदललीये आता ती..आधी एकदम साधी होती..लांब केस होते तेव्हा तीचे त्यामुळे नेहमी एक वेणी किंवा मग पोनी बांधायची..खूप शांत,कमी बोलणारी..हो पण जर कोणाला काही मदत हवी असेल तर नेहमीचं सगळ्यांच्या पुढे असायची..त्याला त्यांचे काॅलेजचे दिवस आठवतात..

माधव पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेला असतो..त्याच्या वडीलांची इच्छा होती की त्याने त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घ्यावे..म्हणून तो इकडे त्याच्या मामाकडे रहायला येतो.. 


....."माधवा, अरे ऊठ.. काॅलेजच्या पहील्याचं दिवशी उशीरा जाणार का? ",माधवची मामी त्याला झोपेतून उठवत असते..मामी असली तरी त्यांचा माधववर खूप जीव असतो आणि त्यांचाचं हट्ट असतो की माधवने हॉस्टेलवर न राहता त्यांच्यासोबतचं रहावं..माधव पटकन उठून तयार होतो आणि काॅलेजला जातो..दुरूनच त्याच्या काॅलेजला जाणारी बस त्याला बसस्टॉप दिसते..तो बसकडे धावत जातो..पण बस निघून जाते.. आधीचं उशिर झालेला असतो त्यामुळे तो रिक्षाने जायचं ठरवतो..तो एका रिक्षाला थांबण्यासाठी हात करतो..तेव्हाच एक मुलगी पळत येऊन त्याच्याआधी रिक्षात बसते.. 

" SP काॅलेज.. प्लीज,काका लवकर चला..", ती रिक्षावाल्याला विनंती करते.. 

माधवला तिचा खूप राग येतो..तो तिला बोलतो, "मी तुमच्याआधी रिक्षा थांबवली होती.. तुम्ही असं कसं बसू शकता?? "

"नवीन आहात का तुम्ही पुण्यात..?",तिच्या अश्या उद्धट प्रश्नाने माधवला जास्त राग येतो..

"हे बघा काका, मी तुम्हाला हात केला होता..मला आधीचं ऊशीर झालायं काॅलेजला..माझा पहीला दिवस आहे आज.."माधव बोलतो.. 

"तुला कुठे जायचं आहे.?"रिक्षावाला माधवला विचारतो.. 

"SP काॅलेज. ",माधव बोलतो.. 

"अरे तुमचं जायचं ठिकाण एकचं आहे..मी दोघांनाही सोडतो.. ",रिक्षावाला माधवला बोलतो.. 

"नाही.. मी हात केला होता आधी.. तुम्ही मलाचं सोडा..",माधव अडून बसतो.. 

"बाळ ,त्याने आधी हात केलेला..तू दुसर्‍या रिक्षाने ये. ",रिक्षावाला सखीला बोलतो..सखी नाराज होऊन रिक्षातून उतरते.. तीचा पडलेला चेहरा बघून माधवला वाईट वाटतं..तो रिक्षावाल्याला म्हणतो की दोघांनाही सोडा..सखी गोड हसते..हसताना तिच्या गालावर छान खळी पडते..खूप छान दिसत असते ती हसताना..तिच्याकडे बघून माधव थोडावेळ हरवून जातो..ते दोघेही रिक्षात बसतात..अचानक थोडा पाऊस पडायला लागतो..ती तिचा एक हात बाहेर काढून पावसाचा आनंद घेत असते..आणि गाणं गुणगुणत असते..ती डोळयात पाऊस साठवून घेत असते..हळूहळू माधवचं लक्ष तिच्याकडे जात असतं..गुलाबी रंगाची कुर्ती आणि निळ्या रंगाची लेगिन्स घातलेली असते..केसांचा छान उंच पोनी बांधून केस एका खांद्यावर पुढे घेतलेले असतात..केसांची एक बट पुढे कपाळावर घेतलेली असते..कानामध्ये एक छोटसं मॅचिंग कानातलं..नाकात नोझरिंग..साधी पण छान दिसत असते ती..डोळयांना काजळ आणि ओठांना फिकट गुलाबी लिपस्टिक लावलेली असते..तिला बघून माधव मनात बोलतो हिच्यासाठी तर मी आयुष्यभर कविता लिहू शकतो.. 


"तुझ्या नजरेत नजर माझी अडकावी.. 

तुझ्या माझ्यात असे काही घडावे.. 

तुझ्या ओठांत श्वास माझे सापडावे.. 

तुझ्या माझ्यात असे काही घडावे.."


माधव तीचं निरीक्षण करत असतो त्याला ती खूप शांत वाटते..तेव्हाच तिचं लक्ष माधवकडे जातं..तो लगेच नजर फिरवतो.. मग ती स्वतःहून बोलायला सुरूवात करते," मी सखी..तुझं काय नाव आहे?..आणि SP कॉलेजला कोणत्या शाखेत प्रवेश घेतला आहेस..?

"माधव नाव आहे माझं.. कला शाखेत प्रवेश घेतला आहे मी..आणि तू? "

"मी सुद्धा कलाशाखेतचं प्रवेश घेतलाय..",सखी माधवला सांगते.. 

कॉलेज येईपर्यंत ते दोघे खूप गप्पा मारतात..जसं की दोघेही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतात..थोड्यावेळापुर्वी शांत वाटणारी सखी त्याला आता एकदम बोलकी वाटते..

त्यानंतर ते दोघेही रोज सोबत कॉलेजला जात असतात..आता त्यांची खूप छान मैत्री झालेली असते..काहीही असो माधवला सांगितल्याशिवाय तीला चैन पडत नसे..जर तो अस्वस्थ असला तर हीचा सुद्धा पुर्ण दिवस उदास जात असे..कधी तो तिच्यावर चिडलाचं तर दिवसभर त्याच्या मागे मागे फिरत असे..माधवचही तसचं असतं..सखी त्याची एकदम जिवलग मैत्रिण झालेली असते..तो प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करत असतो..खूप छान लिहतो हे सखीला माहीत असतं..माधवने काहीही नवीन लिहलं तर सगळ्यात आधी तो सखीला दाखवत असतो..ती त्याला लिहण्यासाठी प्रेरणा देत असते..सखी एकदा माधवच्या नकळत त्याचं लिहलेलं एक नाटक स्पर्धेसाठी देते..माधवला ते कळल्यावर खूप राग येतो..तो तिच्यावर खूप चिडतो..पण त्याला प्रथम पारितोषिक मिळतं..माधवला खूप आनंद होतो..तो सखीला मिठी मारतो..तिलाही खूप आनंद झालेला असतो..त्यानंतर तो नेहमीच अश्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो..कॉलेजमध्ये तर सगळे त्याला लेखक म्हणूनचं ओळखत असतात..तो आता कॉलेजच्या आर्टसर्कल चा हेड झालेला असतो..बघताबघता दोन वर्ष संपतात..ह्या दोन वर्षात त्यांचं नातं आता जास्तचं घट्ट होतं..सखीसाठी माधव आता सगळं काही झालेला असतो..मित्रापेक्षाही जास्त काहीतरी..नकळत ती त्याच्यावर प्रेम करायला लागलेली असते..माधवचही काही वेगळं नसतं पण ती फक्त मैत्री आहे की त्यापेक्षा जास्त काही हे त्याला कळत नसतं त्यामुळे तो कधी काही बोलत नाही आणि सखीला भीती असते जर त्याच्या मनात असं काही नसेल तर त्यांची मैत्रीही तुटेल आणि त्यामुळे तीही अबोल राहते..नुकत्याचं त्यांच्या परीक्षा संपलेल्या असतात पण लवकरचं एक एकांकिका लेखन स्पर्धा असते त्यामूळे माधव गावी जात नाही..सुट्टया असल्यातरी माधव रोज कॉलेजला येत असतो आणि माधव आहे म्हणून सखीही येत असते..आज माधव त्याची एकांकिका सखीला वाचवून दाखवणार असतो म्हणून ते कॉलेजच्या जवळचं असणाऱ्या एका टेकडीवर भेटणार असतात.. माधवला शांतता हवी असते.. सखीनेचं ती जागा सुचवलेली असते..सुंदर जागा असते ती..सखी जेव्हाही अस्वस्थ किंवा मग खूप आनंदी असेल तिथे येत असते..

"काय मस्त जागा शोधलीये हीने.. पण अजून हीचाच पत्ता नाहीये.",माधव स्वतःशीच बोलतो..

तेवढ्यात सखी येताना दिसते त्याला..तिने छान पांढर्‍या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि त्यावर रंगीत ओढणी असते..केस मोकळे सोडलेले असतात आणि केसांत एकाबाजूला सोनचाफ्याचं फूल माळलेलं असतं..नेहमीपेक्षा खूप वेगळी दिसत असते ती आज..ती जवळ येईपर्यंत तो तिच्याकडे बघत असतो... 

"असा काय बघतोयस?..साॅरी मला थोडा ऊशीर झाला यायला.. " ,सखी बोलते.. 

"ते कळालं मला का ऊशीर झाला तुला ते..",माधव डोळे मिचकावत तिला बोलतो..ती थोडीशी लाजते आणि त्याला बोलते, "आता काय बोलतचं बसणार आहेस काय?..वाचुन दाखव मला लवकर..मी खूप उत्सुक आहे.."

ते दोघे तिथेच एका मंदिरात बसतात..माधव तिला त्याची एकांकिका वाचून दाखवत असतो..सखी लक्षपूर्वक ऐकत असते..त्याचं वाचून झाल्यावर ती त्याला कुठे काय बदल केले पाहीजेत ते सांगत असते..पण माधवचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं.. तो गुंतलेला असतो तिच्या काळ्याभोर केसांमध्ये..ती बोलता बोलता तिच्या वाऱ्याच्या झुळूकीने उडणाऱ्या केसांना सावरत असते..मध्येच बोटांभोवती केसांची गुंडाळी करणं तर कधी उगाच मान हलवून केसांना ह्या बाजूने त्या बाजूला कर असं चालू असतं..

"बघं.. पटतयं का तुला मी जे बोलतीये ते?..",सखी माधवला विचारते..पण त्याचं लक्ष नसतं..एखाद्या लहान मुलासारखे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात.. 

"अरे लक्ष कुठे आहे तुझं? काय विचारतीये मी.",तिच्या आवाजाने माधव भानावर येतो..

"हो हो.. बरोबर आहे तुझं.. मी करेल तेवढे बदल..",माधव बोलतो.. 

"बरं..ही जागा कशी वाटली तुला? ",सखी त्याला विचारते.. 

"खूप मस्त आहे..किती शांतता आहे ईथे..फक्त दिवसातून चार वेळा चहा आणि दोन वेळचं जेवण मिळालं ना तर ईथे बसून आठवड्यात एक कथा लिहून होईल माझी..",माधव बोलतो.. 

"मी जेव्हा ईथे येते ना मला सगळं विसरायला होतं..",सखी बोलते..अचानक पावसाची रिमझिम सुरू होते..सखीला पाऊस खूप आवडतो..ती पावसात भिजायला जाते..लहान मुलांसारखी ती नाजत असते..माधव बेभान होऊन तिच्याकडे बघत असतो.. त्याला आजूबाजूचा कसलाचं आवाज येत नसतो..वाऱ्याने होणारी झाडांची सळसळ,पावसाचा आवाज..काही काही ऐकू येत नसतं..माधव सखीच्या जवळ जातो ,तिला जोरात स्वतःकडे ओढतो आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो..सखीही त्याला अडवत नाही..


भरदुपारी चांदणे पडले होते जेव्हा तिने केसांत सोनचाफ्याला माळले होते... 

त्याचा ह्रदयाचा ठोका चुकला होता जेव्हा तिने ओठांनी चांदणे पाजले होते... 


"साॅरी.. ",काय केलयं हे लक्षात येताचं माधव बाजूला सरकतो..सखी डोळे घट्ट मिटून थोडावेळ स्तब्ध राहते..नंतर दोघेही सोबत घरी जातात पण कोणीही काहीचं बोलत नाही..

सखीला काय वाटलं असेल ह्या विचाराने माधवला रात्रभर झोप लागत नाही..सखीची अवस्थाही काही वेगळी नसते..तो क्षण तिच्या डोळ्यासमोरुन जात नसतो..तो क्षण आठवूनचं तिच्या सर्वांगावर रोमांच उठतात..हृदयाची धडधड वाढते.. 

माधवच्याही मनात कदाचित तेचं असेल जे तिच्या मनात असेल ह्या विचाराने ती सुखावते..माधवच्याचं विचारात झोपी जाते..


 मैत्रीतली प्रेयसी...(भाग ३)

फोनची रिंग वाजते आणि माधवची तंद्री भंगते..त्या दिवसाच्या आठवणीनेचं माधवच्या अंगावर रोमांच उठतात..तो उठतो आणि फ्रीजमधून पाण्याची बाॅटल घेतो आणि गटागट पाणी पितो आणि थोडावेळ शांतपणे बसून पुन्हा तो सुंदर क्षण आठवतो..त्याला कधी झोप लागते कळत नाही दाराच्या बेलच्या आवाजाने त्याला जाग येते.. तो दार उघडतो तर समोर यश ऊभा असतो.. 

"अरे काय? कधीपासून फोन करतोय तूला..उचलायला काय झालयं?..कश्याला घेतलाय तो फोन? ",यशने जवळजवळ त्याला वीसवेळा फोन केलेला असतो आणि माधवने एकदाही उचलला नसतो..त्यामुळे तो जाम वैतागलेला असतो.. 

"त्या पब्लिशरचा कितीवेळा फोन आलाय मला..त्याने तुलासुद्धा कितीवेळा फोन केला पण तू काही उचलला नाही आणि दोन दिवस कुठे गायब आहेस तू?..इकडे सगळयांना मला उत्तरं द्यावी लागतात ना?.तुमचं काय वाटेल तेव्हा व्हायचं गायब.."..यश बोलतो..

माधव त्याला घट्ट मिठी मारतो..आणि त्याला बोलतो,

"यश, मला सखी दिसली.. तीचं आहे गार्गीची बहीण..तूला माहीत नाहीये मी किती खुश आहे..ती माझीचं सखी आहे.."

बोलताना माधवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं..यश माधवला पहील्यांदाचं इतकं खुश बघत असतो.. त्याचा सगळा राग निघून जातो..

"काय बोलली सखी तूला..काय झालं त्यादिवशी?..मला सगळं ऐकायचं आहे..",यश त्याला उत्सुकतेने विचारतो.. 

"मी नाही गेलो तिच्यासमोर.?",माधव नाराजीच्या सुरात बोलतो.. 

"काय??..पण का आणि अरे दोन दिवस कुठे गायब होतास मग तू?..",यश त्याला विचारतो..

"माझी तिच्यासमोर जायची हिमंतचं नाही झाली रे..मी खूप चुकीचं वागलो होतो तेव्हा..स्वतःमध्ये इतका गुंतलो होतो की तिला समजूचं शकलो नाही..मी गार्गीच्या कॉलेजमध्ये गेलेलो..तिच्याकडूनचं मला सखीची माहीती मिळाली असती मग तिकडेच गेलेलो..",माधव बोलतो.. 

"मग काय कळालं तूला?..",यश विचारतो.. 

"जास्त काही नाही कळालं रे..मी असं एकदम गार्गीला कसं विचारणार ना?..आणि परत तीने जाऊन सखीला सांगितलं असतं तर..तीन वर्ष मुंबईला होती ती..ती बोलायची तिला संगीतात तिचं करिअर करायचं होतं..मी कधी ते एवढं सिरीयसली घेतलचं नाही..ती गेली तेपण चांगलचं झालं कारण आधी माझ्या स्वप्नांपुढे तिला स्वतःचं काही दिसलचं नाही.. माझ्यापासून दूर जायच्या निमीत्ताने का होईना तिकडे गेली ती संगीताचं पुढचं शिक्षण घ्यायला..आणि आता काही दिवसांसाठीचं आलीये ईथे..",माधव यशला सांगतो.. 

"मग आता काय करायचं ठरवलं आहे तू..कधी भेटणार आहेस तिला?..",यश विचारतो.. 

"मला सुचतं नाहीये काहीचं?..कसं जाणार आहे मी तिच्यासमोर?.कशी रिअॅक्ट करेल ती..?पण भेटावं तर लागेलचं मला तीला..काही दिवसांसाठीचं आलीये ती ईथे..मी पुन्हा गमावू नाही शकत तिला.. ",माधव बोलतो..

"माझ्याकडे एक आयडिया आहे..तू तुझ्या काॅलेजच्या सगळ्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर कर..ती ईथेचं आहे तर ती येईल..",यश बोलतो.. 

"माझं नाव ऐकूनचं ती नाही येणार..",माधव नाराज होऊन बोलतो.. 

"अरे तुझं नाव मध्ये येऊनचं द्यायचं नाही..तीला कळूनचं द्यायचं नाही हे सगळं तू केलयं.. तुमचं कोणीतरी काॅमन फ्रेंड असेल ना त्याची मदत घे..",यश बोलतो.. माधवला त्याची आयडिया आवडते.. तो लगेच त्यांच्या काॅलेजच्या काही फ्रेंड्सला काॅल करतो..सगळेजण तयार होतात..आता फक्त सखी राहीलेली असते..माधवने त्यांच्या एका काॅमन फ्रेंडला तीच्याशी बोलायला सांगितलेलं असतं..


हातात हात असे अडकावे..

तू मला नव्याने पुन्हा ओळखावे.. 

श्वासात श्वास असे मिसळावे.. 

तू मला नव्याने पुन्हा ओळखावे.. 

एकमेकांना आपण असे सावरावे.. 

तू मला नव्याने पुन्हा ओळखावे.. 


माधव खूप उत्साहीत असतो कुठेतरी आतून त्याला असं वाटत असतं की ती येईल..त्यादिवशी काय होईल या विचारानेचं माधव झोपी जातो...


"सखी, काय अगं हे?? तूला ईकडे येऊन एक आठवडा झालायं पण तू काय घराच्या बाहेर जात नाहीस..अगं जाऊन तूझ्या मित्रमैत्रिणींना भेट..आणि तूझ्या कोणत्या मित्रमैत्रिणींना कळणार पण नाही तू आलेली कारण आता आपण ईकडे नव्या घरी रहायला आलोय ना..जात जा जर बाहेऊ.. ",सखीची आई तीला बोलतो.. 

"भेटेल गं आई..अजून आहे मी ईथेचं..चालली नाहीये लगेच.. ".सखी बोलते.. 

तिची आणि गार्गीची मज्जामस्ती चाललेली असते आणि बोलताबोलता गार्गी बोलून जाते की तिने सखीच्या कविता काॅलेजमध्ये वाचवून दाखवल्या आहेत..तिला खूप राग येतो.. 

"साॅरी दीदी, पण तू ईतक्या सुंदर कविता करतेस म्हणून मग मी तसं केलं..प्लीज तू चिडू नकोस ना माझ्यावर..",गार्गी बोलतो..

"तू असं कसं मला न सांगता माझ्या कविता वाचून दाखवल्या आणि ते पण कॉलेजमध्ये..तूला माहीती आहे मला नाही आवडत ते..",सखी गार्गीला बोलतो.. 

"एवढं काय झालं गं त्यात..तुझ्या कवितेतल्या त्याला थोडी कळणार आहे लगेच..सगळ्यांना किती आवडल्या माहीती आहे का तुझ्या कविता..आणि माधवसरांना तर इतक्या आवडल्या ना..ते तर बोलले की तुझ्या कवितेतला तो त्यांना त्यांच्यासारखाचं वाटला..",गार्गी बोलतो..माधवचं नाव ऐकून सखी गोंधळून जाते.. 

"काय बोललीस तू?.. माधव?.. कोण माधव? ",सखी गार्गीला विचारते.. 

"हो.. माधवसर..अगं ते नाही का लेखक आहेत खूप मोठे ते आलेले प्रमुख पाहुणे म्हणून..त्यांना खूप आवडल्या तुझ्या कविता..ते तर नंतर पण आलेले कॉलेजमध्ये तुझ्याबद्दल विचारायला..",गार्गी सखीला सांगते..

"म्हणजे माधवला कळालं असेल की मी ईथे आलीये आणि आता बरं ह्याला माझ्या कवितेतला तो स्वतःसारखा वाटला आधी कधी नाही वाटला..",सखी स्वतःशीच बोलते..

सखीला झोपचं येत नसते..ती तिची जूनी डायरी वाचत बसते..सगळं अजुनही तसचं असेल का रे..तू अजूनही तसाचं असशील का??..दूर केलं मी स्वतःला तुझ्यापासून पण माझ्यातल्या तूला कधी दूर करूचं शकले नाही..माधवच्या आठवणीने तिला भरून येतं..तीच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं..माधवचा विचार तीच्या मनातून जातचं नसतो..मग ती तेचं करते जे नेहमी करते.. तिच्या अव्यक्त भावना कागदावर उतरवते.. 


तूझा तो स्पर्श अजूनही अंगावर शहारे आणतो पुन्हा आसुसलेल्या मनाचा गोंधळ सुरू होतो..तू जवळ नसलास तरी खूप जवळ भासतोस..खरचं स्विकारलं आहे का रे मी तूझं आता माझ्यासोबत नसणं...


कधीकधी सुकलेल्या डोळ्यांना पुन्हा भिजायचं असतं..मग ऊशी कधी ओली होते कळतचं नाही..पण मग तिलाचं जवळ घेते तु समजून..खरचं स्विकारलं आहे का रे मी तूझं आता माझ्यासोबत नसणं...


रात्रपण इतकी छळते आजकाल येताना सोबत तू़झ्या आठवणी घेऊन येते..मग माझ्यासोबत आठवणीही तश्याच जाग्या राहतात रात्रभर..खरचं स्विकारलं आहे का रे मी तूझं आता माझ्यासोबत नसणं...


ओठांत दाबून ठेवलेल्या माझ्या भावना कधीतरी बाहेर यायचा हट्ट करतात..मग मीही त्यांना छान समजावते आणि अबोल प्रीत अबोलचं राहते..खरचं स्विकारलं आहे का रे मी तूझं आता माझ्यासोबत नसणं...


तिला त्यांचे कॉलेजचे दिवस आठवतात..तो दिवस आठवतो टेकडीवरचा ज्याने तिचं आयुष्य बदललं होतं..त्या दिवसानंतर तिचं माधववर असणार प्रेम अजूनचं वाढतं..तीला वाटायला लागतं की माधवचही तिच्यावर प्रेम आहे..आता माधव तिचं जग झालेला असतो..माधवची एकांकिका स्पर्धा होते आणि त्यात त्याला प्रथम पारितोषिक मिळतं..तो खूप खुश असतो.. नंतर तो सुट्टी असल्यामुळे त्याच्या गावाला जातो..ते दोघे रोज फोनवर बोलत असतात..रात्री ऊशीरापर्यंत चॅटिंग करत असतात..माधवच्या मेसेज ने तिच्या दिवसाची सुरुवात होत असते..एकदिवस जरी त्याचा फोन नाही आला तर तिचं कश्यातचं लक्ष लागत नसतं..सखी कॉलेज सुरु झाल्यावर माधवला सांगायचं ठरवते तिच्या मनात त्याच्यासाठी काय आहे ते..

काॅलेज सुरू झालेलं असतं..हे त्यांचं शेवटचं वर्ष असतं..पहीलाचं दिवस असतो..सखी,माधव त्यांच्या ग्रुपसोबत कॅन्टीनमध्ये बसलेले असतात..तेवढ्यात माधवला एक मुलगा एक चिठ्ठी आणून देतो..त्यात एक सुंदर कविता लिहलेली असते..


तुझ्या माझ्यासाठी असे काही लिहू..

आयुष्यभर पुरेल असं काही लिहू.. 

सखा साजन होशील का माझा?? 

दोघांची सोबत एक कविता लिहू..

-तूझीचं मैत्रीतली प्रेयसी.. 


ती कविता वाचून माधवला काहीचं कळत नाही.. कोण असेल ती मुलगी जीने त्याच्यासाठी ती कविता लिहलेली असते..त्यानंतर रोज त्याला एक चिठ्ठी येत असते..ज्यात एक कविता लिहलेली असते..आणि शेवटी फक्त हेचं तुझीचं मैत्रीतली प्रेयसी..आता माधवलाही जाणून घ्यायचं असतं ती कोण आहे जी इतक्या छान कविता करते..तिचं ते असं वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणं त्याला खूप आवडतं..कॉलेजमध्ये त्याची नजर तिलाचं शोधत असते..

तो पुरता गोंधळून गेलेला असतो..त्याचा असं बघून सखीला खूप गमंत वाटत असते..

"सखी, कोण असेल यार ती मुलगी.. आणि ती समोर का येत नाही मग..रोज एक कविता पाठवते..वेडी आहे का ती जरा.. ",माधव बोलतो.. 

"वेडीचं आहे ती.. तुझ्यावर प्रेम करते ना..",असं बोलून सखी जोरात हसते.. 

"हसते काय तू..आणि वेडीचं आहे म्हणजे तू ओळखते का तिला..?",माधव सखीला विचारतो..आता त्याला काय सांगावं हे सखीला कळत नाही..

"अरे मी कसं ओळखत असेल तिला.. तुलापण काहीही वाटतं..",तेवढं बोलून ती तिथून निघून जाते..आणि जवळचं असलेल्या झाडाच्या मागे जाऊन लपते..

माधव बॅगेतून त्या सगळ्या चिठ्ठ्या काढतो आणि वाचत बसतो.. 

"अजून थोडेचं दिवस माधव मग तूला कळेल कोण आहे तूझी ती मैत्रीतली प्रेयसी.. थोडेदिवस वाट बघ..थोड्याचं दिवसात तूझा वाढदिवस आहे तेव्हा येईल ती तूझ्यासमोर..",सखी मनात बोलते.. 



एक महीन्याने माधवचा वाढदिवस असतो..सखी खूप उत्साहीत असते..ती त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असते..ती त्याला सांगणार असते.. मीच आहे तुझी ती मैत्रीतली प्रेयसी..ती आतापासूनच तयारीला लागलेली असते..काय करायचं?..कसं करायचं?.. सगळं ठरवलेलं असतं तीने..माधवची कार्यशाळा असते त्यामुळे त्याला एक आठवड्यासाठी बाहेर जावं लागणार असतं..माधवची जायची इच्छा नसते कारण आता एक आठवडा त्याला त्याची मैत्रीतली प्रेयसी कविता पाठवणार नसते..नकळत माधव गुंतत होता तिच्यामध्ये..त्याला ते सगळं हवहवसं वाटत असतं..तिकडे जायचं म्हणजे तिच्यापासून दूर जायचं जे की त्याला अजिबात जायचं नसतं..तो एकटाचं विचार करत कॅन्टीनमध्ये बसलेला असतो..सखी तिथे येते.. 

"काय रे? असा काय एकटाचं बसलायसं?? उद्या निघायचं आहे ना तूला? झाली का सगळी तयारी?"सखी त्याला बोलते.. 

"माझी जायची इच्छा नाहीये यार..",माधव बोलतो.. 

"अरे असं काय करतोयस??..तूला तर जायचं होतं आणि कॉलेजमध्ये इतक्या मुलांमध्ये तुझं सिलेक्शन झालयं..तूला तर आनंद झाला पाहीजे आणि तू काय असा तोंड पाडून बसला आहेस.."सखी बोलते.. 

माधव काहीचं बोलत नाही..तोंड फिरवून बसतो.. 

"अच्छा.. आता कळालं मला??तूला का जायचं नाहीये ते..तू गेलास तर मग तूझ्या त्या कवितावालीचं काय होणार ना??.. आजकाल तिच्या कविता वाचण्यातचं तुझा दिवस जातो ना मग तिकडे कसं करमेल ना तूला?? ",सखी त्याला चिडवते..माधवला खूप राग येतो..तो तिथून निघून जातो..सखी पण त्याच्या मागे जाते.. 

"अरे कुठे चालला आहेस..एक लक्षात ठेव तू गेल्यावर इकडे मीचं आहे तूझ्या त्या चिठ्ठ्या घ्यायला..",ती तसं बोलल्यावर तो परत मागे येतो..आणि तिचा हात जोरात पकडतो आणि बोलतो, "तू घेशील त्या चिठ्ठ्या..?"

"अरे..थोड्यावेळापुर्वीतर कोणालातरी माझ्याशी बोलायचं नव्हतं..",सखी बोलते.. 

"जास्त भाव खाणार असशील तर जातो मी..",माधव रागात बोलतो.. 

"ठीक आहे..घेईल मी तूझ्या सगळ्या चिठ्ठ्या तूझ्या बाकावरचं ठेवते ना ती कॉलेज सुटल्यावर..आता खुश??",सखी बोलते...माधव खूश होऊन तिला मिठी मारतो..त्याच्या एकदम अश्या मिठी मारण्याने ती शहारून जाते पण लगेच स्वतःला सावरते..

"पण तूला कसं माहीती गं..ती माझ्या बाकावर चिठ्ठी ठेवते..",माधव तिला विचारतो..

"अरे तुचं सांगितलं होतसं एकदा.",सखी घाबरून बोलते पण माधवला ते लगेच कळतं..

"मी कधी सांगितलं??.. पहील्यांदा फक्त तूझ्यासमोर चिठ्ठी आलेली कॅन्टीनमध्य...त्यानंतर कधी असं झालं नाही मग तूला कसं कळालं?? ",माधव बोलतो..

"तू काय माझी उलटतपासणी घेणार आहेस का??..मी जाते लेक्चर सुरू होईल..",माधव अजून काही विचारायच्या आधीचं सखी पटकन तिथून निघून जाते.. 

माधव कार्यशाळेला जातो..सखीला त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये करमत नसते..ती काॅलेजलाही जात नाही..तिला माधवची खूप आठवण येत असते..ती त्याला मेसेज वगैरे करत असते पण त्याचा काही रिप्लाय येत नाही..ती कॉलही करते पण तो उचलत नाही..तो बीझी असेल नंतर करेल अशी स्वतःचीच समजून काढून ती झोपून जाते..दुसर्‍यादिवशी माधवचा मेसेज येतो...थोडावेळ बोलणं होतं..तिच्यासाठी खूप असतं ते..त्यानंतर त्याचा काही मेसेज किंवा काॅल येत नाही..पण ती रोज त्याला मेसेज करत असते..तो एक आठवडा कधी संपतोय असं झालेलं असतं तिला..जेव्हा जीवघेणी ओढ लागलेली असते ना तेव्हा वेळ जाता जात नाही...


"तू नसताना मी माझी नसते..

तू असलास तरी माझी नसते..

फक्त तूझी आणि तझीचं होत जाते..

माझ्यातूनही मी वजा होत जाते.."


एकदाचा आठवडा संपतो..आज माधव येणार असतो पण त्याने एकदाही सखीला कॉल केलेला नसतो.. संध्याकाळी ती स्वतःहून त्याला कॉल करते..पण तो खूप थोडसं बोलतो..सखी खूप उदास होते पण त्याचं काहीतरी बिनसलं असेल उद्या कॉलेजमध्ये विचारूया असा विचार करून तीही जास्त काही बोलत नाही..

आज माधव भेटेल त्यामुळे सखी खूप आनंदीत असते..आज तीने तोचं ड्रेस घातलेला जो त्यादिवशी टेकडीवर जाताना घातलेला असतो..तशीचं तयार होऊन ती बसस्टॉपवर माधवची वाट बघत थांबलेली असते..आजसुद्धा तसाचं माधव माझ्याकडे बघत राहील असा मनात विचार करून ती गोड लाजते..खूप वेळ झालेला असतो पण माधव येत नाही..ती त्याला कॉल करते पण त्याचा फोन बिझी येत असतो...ती तशीचं त्याची वाट बघत थांबते..

"आता पहीलं लेक्चर पण होऊन गेलेलं असेल..माधव अजून का नाही आला?..फोनपण बिझी लागतोय.. काही झालं तर नसेल सखीला काळजी वाटायला लागते..संध्याकाळी त्याच्या मामाच्या घरी जाऊ या असा विचार करून ती कॉलेजला जाते..वर्गात माधवला बघून तिला खूप राग येतो..ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला बोलतो.. 

"काय रे? मी किती वाट बघीतली तूझी आणि तू आधीचं आलायस..कि विसरून गेलास एका आठवड्यात तूझ्या वेड्या मैत्रिणीला..फोन पण नाही उचलला??.. ",सखी त्याला रागात बोलते.. 

"साॅरी,अगं माझं काम होतं थोडं म्हणून लवकर आलो मी..",माधव बोलतो..एक आठवड्याने ती त्याला समोर बघत असते..तिला खूप बोलायचं असतं त्याच्याशी..तिचा सगळा राग निघून जातो..ती त्याचा हात पकडते आणि त्याला वर्गाबाहेर घेऊन जाते..

"सांग आता मला..कशी झाली कार्यशाळा?..आणि इतका बिझी होतास की एक फोन करू नाही वाटला..",सखी त्याला बोलते.. 

"साॅरी..खरचं वेळ नाही मिळाला..",माधव बोलतो.. 

"बरं.. ठिक आहे.. माझ्याकडे तूला देण्यासाठी काहीतरी आहे..ह्या तुझ्या सात चिठ्ठ्या.. आजची तर तू स्वतःचं जाऊन घेशील ना?? ",ती डोळा मिचकावत त्याला बोलते आणि सात दिवसाच्या सात चिठ्ठ्या त्याला देते..पण त्याच्या चेहर्‍यावर काहीचं भाव नसतात..तो न वाचताचं बॅगमध्ये ठेवून देतो..

"सखी, माझं थोडं काम आहे..मी जातो आपण नंतर बोलूया.."असं बोलून तो निघून जातो..सखीला खूप वाईट वाटतं..

"ह्याचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे..कॉलेज सुटल्यावर विचारावचं लागेल आता??",सखी स्वतःशीच बोलते..कॉलेजनंतर पण माधव तिला कुठेचं दिसत नाही..खूपवेळ वाट बघते ती त्याची पण तो येत नाही..शेवटी कंटाळून ती घरी निघून जाते..दुसर्‍यादिवशी सुद्धा माधव सखीसोबत न जाता एकटाचं जातो..आता असं रोजचं व्हायला लागतं..आता तो तिच्याशी जास्त बोलत पण नसतो..तासनतास सखीशी बोलणारा माधव आता तिला टाळायला लागलेला असतो..सखीला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो..त्याला नक्की काय झालं असेल तो असा का वागतोय?..सखीला काहीचं कळत नसतं.. ती त्याला खूपवेळा विचारते पण तो काहीचं सांगत नाही..असं काही नाहीये तू उगाचच जास्त विचार करतीये असं बोलून तिला टाळत असतो..पण तिचं रोज त्याच्या मागेमागे करणं..त्याला चिडवणं..त्याची काळजी करणं चालूचं असतं.. 

ज्या दिवसाची सखी वाट बघत असते तो दिवस एकदाचा येतो..आज माधवचा वाढदिवस असतो..तिने खूप तयारी केलेली असते त्याच्या वाढदिवसासाठी...तीने त्याला चिठ्ठी पाठवलेली असते...

प्रिय माधव, 

मला माहीती आहे तु पण तेवढाचं उत्सुक आहेस मला भेटण्यासाठी..कोण आहे ती तुझी मैत्रीतली प्रेयसी जाणून घेण्यासाठी..आज मी येणार आहे तुझ्यासमोर तिथेच जिथे बसून तू कितीतरी कथा कविता लिहल्या आहेत..तूझी सगळ्यात आवडती जागा..येशील ना??...मी वाट बघतीये तुझी... 

तूझीचं,

मैत्रीतली प्रेयसी.. 


सखी एक तास आधीचं येऊन थांबते..खूप सुंदर दिसत असते आज ती..तिचं हृदय जोरात धडधडत असतं..माधव कसा रिअॅक्ट करेल..त्याला आनंद होईल का??.. की राग येईल??मी का नाही सांगितलं म्हणून रुसून बसेल..मग मिठीत घेईल मला..सखीची स्वतःशीचं बडबड चालू असते..तो आल्यावर हे होईल ते होईल असं स्वप्न रंगवणं चालू असतं..तो येईपर्यंत ती कविता करत बसते.. 


तुझ्या माझ्यासाठी असे काही लिहू..

आयुष्यभर पुरेल असे काही लिहू.. 

सखा साजन होशील का माझा?? 

दोघांची सोबत एक कविता लिहू..


बराच वेळ होऊन जातो पण माधव अजूनही आलेला नसतो..सखीला कळत नाही नक्की काय झालं असेल..त्याला चिठ्ठी मिळाली नसेल का??..काही झालं असेल का??.. का आला नाही तो अजून??..ती तशीचं तिथे थांबलेली असते त्याची वाट बघत..आता संध्याकाळ होत आलेली असते..पण माधव येत नाही..सखी खूप नाराज होते..ती घरी निघून जाते..तिला रात्रभर झोप येत नाही..माधवचा विचार तिच्या मनातून जातचं नसतो..तिला खूप रडायला येतं..त्याने असं का असेल??..

"नक्कीच काहीतरी झालयं त्याला.. आजकाल तो खूप दूर दूर राहतो माझ्यापासून..आणि तो सांगतही नाही नक्की काय झालयं ते..पण आता उद्या मी त्याला विचारणार आहे त्याने असं का केलं ते..??..आणि कदाचित त्याला माझी चिठ्ठी मिळालीचं नसेल.. हो मिळालीचं नसेल...तो असं नाही वागणार..उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर आधी त्याला सगळं सांगेल आता अजून दूर नाही राहू शकणार मी त्याच्यापासून..",ती स्वतःशीचं समजुत काढत झोपी जाते... 

आज सखीची जास्तचं लगबग चाललेली असते..कधी एकदा कॉलेजला जाऊन माधवशी बोलतीये असं झालेलं असतं तिला..तिला माहीत असतं माधव आजपण बसस्टॉपवर येणार नाही तरीही तिचं वेडं मन मानायला तयार नसतं.. आजसुद्धा जाऊन ती थोडावेळ त्याची वाट बघते रोजसारखी आणि मग कॉलेजला जाते.. गेल्या काही दिवसांत माधव तिच्यासोबत येतजात नसला तरी ती रोज जाऊन त्याची वाट बघत असते..कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ती माधवला सगळीकडे शोधते पण तो तिला दिसत नाही..सगळे लेक्चर्स संपतात पण माधव येत नाही..शेवटी ती त्याच्या घरी जाते पण तिथे गेल्यावर तिला कळतं माधव आता त्याच्या मामामामी सोबत रहात नाही,हॉस्टेलला राहतो..सखीला खूप वाईट वाटतं इतकी मोठी गोष्ट माधवने तिला सांगितलेली नसते..ती तिथून जाणारचं असते तेवढ्यात माधव त्याच्या मामीला भेटायला येतो..सखीला तिथे बघून तो गोंधळून जातो..तो तिचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जातो.. 

"सखी, तू ईकडे काय करतीये??..",माधव बोलतो.. 

"तूलाचं भेटायला आले होते..कॉलेजला नाही आलास म्हणून इथे आले तर कळालं तू आता हॉस्टेलला राहतोस..मला सांगितलं पण नाहीस तू??.. ",सखी बोलते.. 

"अगं, खूप अचानक ठरलं सगळं..आणि माझा अभ्यासही होत नव्हता इथे..सारखं स्पर्धा वगैरे चालू असतं ना..मग लिहायलाही वेळ मिळत नव्हता..मग गेलो हॉस्टेलला..",माधव बोलतो.. 

"वाटतचं नाहीये माझ्यासमोर तोचं माधव ऊभा आहे..एक महीन्यात किती बदललास रे..मला साधं सांगावसं पण नाही वाटलं आणि मी वेडी अजूनही रोज तिथे स्टाॅपवर तुझी वाट बघत बसते..आधी साध्या साध्या गोष्टी मला सांगितल्याशिवाय करमायचं नाही तूला..कालपण तूझा वाढदिवस म्हणून किती उत्साहीत होते मी.. किती तयारी केलेली तूझ्यासाठी.. आणि तू?? ",सखीला खूप वाईट वाटतं.. 

"तू उगाचचं जास्त विचार करतीये..नाही सांगितलं मी तूला त्यात एवढं काय झालं.. आणि कालचं बोलशील तर मी माझ्या मित्रांसोबत गेलेलो बाहेर..",माधव बोलतो.. 

"मीचं जास्त विचार करतीये..बरोबर आहे तूझं",सखीच्या डोळ्यातून पाणी येतं.. 

"यार,रडतीयेस काय तू अशी??लहान आहोत का आपण आता??..आणि मी नव्हतं सांगितलं तूला माझ्यासाठी काही करायला..तूचं केलसं..आणि सगळं सारखं नाही ना राहू शकत सखी..स्पष्टचं बोलतो..तू गुंतली आहेस माझ्यात..सवय झालीये तूला माझी खूप..त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण त्रास होतोय तूला..तू माझी खूप चांगली मैत्रिण आहेस पण सगळंच मी तूला सांगावं असं नाहीये ना..माझ्या आयुष्यात येऊ शकतात नवीन मित्रमैत्रिणी..तूचं नाहीयेस ना फक्त..प्रत्येक गोष्टीत तूला मी लागतो..काहीही करायचं झालं तर मला विचारल्याशिवाय नाही करत तू..तूला तूझं स्वतःचं असं काही आहे की नाही..मलापण माझं आयुष्य आहे..आणि तूलाही तूझं..",माधव नकळत सखीला खूपकाही बोलून जातो..सखीला त्यांच्या एका मित्राने सांगितलेलं असतं की हल्ली तो रोज कोणत्यातरी मुलीला भेटायला जातो..पण सखी जास्त लक्ष देत नाही..असं काही असतं तर त्याने सांगितलचं असतं असं तिला वाटतं..आणि तिचं मन मानायलाही तयार नसतं.. पण आज त्याच्या अश्या बोलण्याने सखी खूप दुखावली जाते..

"सवय नाही रे फक्त..आणि प्रत्येक गोष्ट तूला विचारून करते कारण तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दांत नाही सांगू शकणार मी..आणि आता सांगणारही नाही..",सखी त्याला बोलते आणि तिथून निघून जाते..तिला वाटतं कदाचित माधव थांबवेल तिला पण तो तसं करत नाही..ती घरी येते आणि स्वतःला रूममध्ये कोंडून घेऊन आसवांना वाट मोकळी करून देते..पण आता तिने ठरवलेलं असतं ती माधवला काहीचं सांगणार नाही..तेव्हाचं तिची मैत्रिण दिव्या तिच्या घरी येते..तिला असं बघून काय झालं ते विचारते..सखी तिच्या गळ्यात पडून खूप रडते..दिव्या तिला शांत करते..आणि बोलते,"काय झालं सखी??..तू अशी का रडतीयेस??..आणि भेटला का माधव तूला??..सांगितलं का तू त्याला तूझ्या मनातलं?? "..दिव्या सखीची लहानपणापासूनची मैत्रिण असते..एकत्रचं शाळेत शिकलेल्या असतात दोघी आणि आता एकाचं कॉलेजमध्ये असतात..दिव्याने फक्त सखीसाठी तिच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतलेलं असतं..दिव्याला खरतरं माधवचा खूप राग यायचा पण सखीसाठी ती त्याच्याशी नीट वागायची.. सखी तिला झालेलं सगळं सांगते.. 

"त्याच्या आयुष्यात आता असं कोणीतरी आलयं..कदाचित खूप खास कोणीतरी..मलाचं कसं नाही कळालं..स्वतःला मैत्रिण म्हणवते मी त्याची.. आणि इतकही कळू नये मला.. स्वतःच्या प्रेमात इतकी स्वार्थी कशी होऊ शकते मी..आणि त्याचही बरोबरचं होतं.. प्रत्येक गोष्ट मला सांगावीचं असं थोडी आहे..पण आता मी त्याला काहीचं नाही बोलणार कधी कळूनही नाही देणार की काय आहे माझ्या मनात त्याच्या मनात..त्याच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाहीये माझ्यासाठी.."

इतकं होऊनसुद्धा सखी फक्त माधवचाचं विचार करतीये ह्याचा दिव्याला खूप राग येतो.. माधववर तिचं किती प्रेम आहे हे दिव्याला माहीत असतं..त्यामुळे ती सखीला काहीचं बोलत नाही..

माधवलाही खूप वाईट वाटलेलं असतं..तो खूप काही बोललेला असतो सखीला..ईतके दिवस तिचं तर होती त्याच्यासोबत..तो उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर तिची माफी मागायची ठरवतो.. 

दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये सखी एकदम नेहमीसारखचं वागते जसं की काहीचं झालं नाही..मग माधवही काही बोलत नाही त्याला वाटतं तीने त्याचं बोलणं जास्त मनावर नसेल घेतलं..पण खरतरं सखी आतून खूप तुटलेली असते..वरून जरी ती तशी दाखवत नसली तरी आतमध्ये तिचं काय चाललेलं असतं हे तिलाचं माहीती..आणि फक्त दिव्याचं असते जिला सखीला होणारा त्रास दिसत असतो...बरेचं दिवस जातात पण सखी माधवशी स्वतःहून बोलत नाही..तिला वाटतं कदाचित माधव बोलेल तिच्याशी येऊन पण तोही काहीचं बोलत नाही..ह्यादीवसात सखी खूपचं हिरमुसून जाते..कश्यातचं लक्ष लागत नसतं तिचं..कविता लिहणं मात्र चालूचं असतं फक्त आता त्या माधवपर्यंत जात नसतात..त्याची मैत्रीतली प्रेयसी आता हरवलेली असते..तिच्या अबोल अव्यक्त भावना ती कागदावर उतरवत असते..पण माधवसमोर खूप नॉर्मल रहात असे जसं की काहीचं झालेलं नाहीये..कधीकधी माधव खूप जवळून जायचा पण काहीचं बोलायचा नाही..तिला खूप वाईट वाटायचं पण ती तसं दाखवत नसे..


"आता कितीही तुटली तरी ती त्याचा आवाज होऊ देत नाही.. 

जखम होतेचं पण तिच्या चेहर्‍यावरचं हसू जखमेला पुढे येऊ देत नाही.. "


एकदा सखी लायब्ररीमध्ये बसलेली असते..तिला बघून माधव तिच्याजवळ येतो आणि त्यादिवशी जे काही बोलला त्याबद्दल तिची माफी मागतो..त्याला असं एकदम काय झालं तीला कळत नाही...ईतकेदिवस तो काहीचं बोललेला नसतो..सखीला खरतरं आनंद होतो आणि ती त्याला माफ करते..आज खूप दिवसांतून ते दोघेही एकमेकांशी खूप बोलतात..माधवलाही खूप बरं वाटत असतं..

"एक विचारू का माधव??",सखी बोलते..

"विचार की..दोन विचार ",माधव हसत बोलतो.. 

"कोण आहे रे ती मुलगी??.. खूप सुंदर असेल ना ती??..जिच्या तू प्रेमात पडलायसं.. ",सखी बोलते.. 

सखीने असं एकदम विचारल्यावर माधव गोंधळून जातो..

"किर्ती नाव आहे तिचं..कार्यशाळेला गेलेलो तेव्हा भेट झाली आमची..तिच्याशी बोलायला भेटायला आवडू लागलं..नकळत ओढला जात होतो मी तिच्याकडे..इतके दिवस कळत नव्हतं मला तिच्याही मनात तेचं असेल का..पण शेवटी विचारलं तिला आणि तिलाही मी आवडतो हे कळाल्यावर तर काय करू काय नको असं झालेलं मला..",माधवचा चेहरा खुललेला असतो..एक वेगळीचं चमक असते..भरभरून बोलत असतो तो त्याच्या तिच्याबद्दल..आणि त्याला असं आनंदी बघून सखीलाही बरं वाटतं..रात्री आकाशात चांदण्याकडे बघत सखी माधवचा विचार करत असते..तिला माधवचा हसरा चेहरा आठवतो..किती खुश दिसत होता माधव..खूप छान असणार ती किर्ती..मलापण तर तेचं हवं होतं ना..जर तो खुश आहे तर मी पण खुश..आणि त्यालाही माझ्याबद्दल तेचं वाटावं असं थोडी आहे..गरजेचं नाहीये ना आपण ज्यावर प्रेम करतो त्याचही आपल्यावर प्रेम असावं..प्रेम तर ह्या सगळ्या पलीकडे असतं..निखळ, नितळ, निरपेक्ष..आणि माझ्यासाठी आमची मैत्री जास्त महत्त्वाची आहे..

माधव खूप खुश असतो आजकाल..कॉलेजला फार कमी येत असतो..सखी स्वतःहूनचं त्याच्यापासून दूर राहत असते..सखीचं कधीतरी फोन करून किंवा कॉलेजमध्ये कधी दिसलाचं तर बोलत असे..त्यातपण तो नेहमीचं किर्ती आणि त्याच्याबद्दल बोलायचा..त्यांची भांडणं त्यांच भेटणं सगळं सांगायचा आणि सखीही शांतपणे त्याचं ऐकायची..जर कधी माधवचं आणि किर्तीचं भांडण वगैरे झालं तर माधव तिला फोन करून सांगायचा..मग ती त्याला समजावून सांगायची.. आता ह्या सगळ्याचा ती त्रास नसते करून घेत..आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो त्याच्या सगळ्या आवडीनिवडी ही आपण आपल्याश्या करून घेतो.. त्याचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीवरही तितकचं प्रेम करतो..त्याला आनंदी बघून आपणही आनंदी होतो..ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती..खरतरं माधवपासून दूर राहणं तिच्यासाठी खूप अवघड असतं..माधवला खुश बघुन ती तिचं दुःख विसरून जात असे..

एक दिवस असचं सखी,दिव्या आणि त्यांचे काही मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये बसलेले असतात..तेव्हा माधव तिथे येतो..खूप दिवसांतून आज तो कॉलेजला आलेला असतो..त्यांचे सगळे मित्र त्याला चिडवायला लागतात..

"आजकाल खूप बीझी झालास रे तू..मित्रांना विसरलास..आता काय जास्त लपवू नको.. सांग कोण आहे ती..",त्याचा एक मित्र बोलतो.. 

"अरे कोण काय विचारतोय..तिचं असेल त्याची मैत्रीतली प्रेयसी..कवितेतून प्रेम व्यक्त करणारी..",दूसरा मित्र बोलतो आणि सगळे माधवला जास्तच चिडवायला लागतात..सखी आणि दिव्या दोघीपण खूप शांत असतात..शेवटी कंटाळून माधव किर्तीचं त्याची मैत्रीतली प्रेयसी आहे असं सांगतो.. 

माधवला खरं काहीचं माहीत नसतं त्यामुळे तो खोटं बोललेला असतो..सखीला खूप वाईट वाटतं..आत कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं होतं..तिच्या डोळयात दाटलेला पाऊस माधवला दिसू नये म्हणून ती बाहेर निघून जाते..दिव्यापण तिच्यामागे येते..सखी खूप रडत असते आणि तिला असं बघून दिव्याला माधवचा खूप राग येतो...

"मी आता जाऊन माधवला जाऊन सगळं सांगते.. असं कसं करू शकतो तो??..",दिव्या खूप चिडलेली असते..सखी तिला थांबवते..तेवढ्यात माधव तिथे येतो..सखी पटकन तिचे डोळे पुसते..

"काय गं..किती छान कविता करतेस तू..मला कधी सांगितलं का नाही..आता तू तूझी डायरी तिथे विसरली म्हणून कळालं मला..माझ्या कथा, कविता कशी चोरून वाचायचीस आणि माझ्यापासूनचं लपवलं..",माधव बोलतो... 

"तूझ्या कवितेत असणाऱ्या तूझ्या तिला मी फक्त वाचत नाही तर अनुभवते.. 

पण माझ्या कवितेत असणाऱ्या माझ्या त्याला तू ना कधी वाचू शकशील ना अनुभवू शकशील.. ",सखी बोलते... 

"म्हणजे??.. ",माधवला कळत नाही ती काय बोलतेय..सखी त्याच्याकडे बघून हसते आणि तिथुन निघुन जाते.. सखीच्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि तिने आपल्याला थांगपत्ताही लागू दिला नाही या विचाराने माधवला झोप लागत नाही..आधी रोज त्याच्याशिवाय तिचा दिवस जात नसे..सकाळपासून कॉलेजमध्ये तिची नुसती बडबड..सतत त्याच्या मागेमागे घुटमळनं..रात्री झोपेपर्यंत तिचे नुसते प्रश्न..जेवलास का??..काय खाल्लस??..आज काय लिहलसं..मला वाचायचं आहे..आणि मग हे असं हवयं ते तसं पाहीजे..उगाचचं लेखक म्हणून चिडवणं..माधवच्या एकदम लक्षात येतं आता हे सगळं बंद झालयं..गेल्या तीन महीन्यात झालेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात.. त्याच्या वाढदिवसानंतर तो तिला काय बोलला होता आणि त्यानंतरचं हे सगळं झालं.. अचानक त्याला असं वाटतं तो खूपकाही मागे सोडून आलायं आणि कदाचित आता ते सगळं संपलं होतं जे फक्त त्याच्यासाठीचं असायचं..पण त्याला माहीत नव्हतं तो जरी पुढे गेला असला तरी त्याने मागे सोडलेलं ते सगळं तिथेचं थांबलेलं होतं तसचं..

ईकडे सखीच्या डोक्यातून आजचा प्रसंग जात नसतो..असं कसं तो सांगू शकतो सगळ्यांना कि त्याची किर्तीचं ती मुलगी आहे जी त्याच्यासाठी कविता पाठवायची त्याची मैत्रीतली प्रेयसी...तिचं सगळ्यात जवळचं काहीतरी कोणीतरी तिच्याकडून हिरावून घेतलयं असं तिला वाटतं..जे फक्त तिचं होतं..त्या कवितांमधून ती तिचं अव्यक्त प्रेम कागदावर उतरावयची..पण आता तो हक्कसुद्धा तिचा नाहीये असं वाटतं तिला..आणि ती माधवला विचारूही शकत नव्हती तू का केलसं रे असं माझ्यासोबत कारण तो पण तर तिच्या भावनांपासून अनभिज्ञ होता..त्याच्याकडून नकळत झालं होतं हे सगळं..ईतके दिवस माधवपासून दूर रहायला शिकली होती ती..सावरली होती पण आज जून्याचं जखमेवर कोणीतरी खूप जोरात घाव घातल्यासारखं झालं होतं..

कधी कधी एखादी व्यक्ती कायम असते आपल्यातचं... पण आपण काहीचं नसतो??

जिथे आपलं काहीच नसतं...तेच नेमकं आपलं सगळं जग का असतं.??

जिथे आपलं साधं एक ढगही नसतं..तेच नेमकं आपलं सगळं आभाळ का असतं.??...

सखीला खूप त्रास होत होता ह्या सगळ्याचा..आता तिने ठरवलेलं असतं माधवपासून जमेल तेवढं दूरचं रहायचं..कारण आता तिथे तिचं असं काहीचं राहीलं नव्हतं..आणि जे काही होतं तेपण आज माधवने संपवलं होतं..


दुसर्‍यादिवशी माधव स्वतःहून सखीकडे येतो आणि तिला बोलतो,"मला तूझ्या सगळ्या कविता वाचायच्या आहेत..काल मी एकचं वाचली.."

"तूला??..पण का??..",सखी हसते..

"का म्हणजे??..ईतके दिवस माझ्यापासून लपवलं तू ते आणि आता का म्हणून विचारतीये.. मला बघायचं आहे माझी मैत्रिण काय लिहते ते..?? ",माधव बोलतो.. 

"मला नाही आवडत माझं असं कोणी वाचलेलं.. आणि काही भावनांचं अलिप्त रहाणचं चांगलं असतं आणि तू तरी ते न वाचलेलचं बरं..",सखी बोलते.. 

"काय अलिप्त वगैरे नाही.. मला वाचायचं आहे म्हणजे वाचायचं आहे आणि तूला माहिती आहे मी किती हट्टी आहे ते..त्याशिवाय मी तूला जाऊनचं देणार नाहीये..",माधव बोलतो... 

सखीला कळत नाही आता काय करावं ते कारण माधवला नाही म्हणनं तिच्यासाठी खूप अवघड होतं.. पण तिच्या त्या कविता पण होत्या त्या डायरीत ज्या तिने आधीही त्याला पाठवल्या होत्या..त्याला तिचं अक्षर कळेल म्हणून ती दिव्याकडून लिहून घ्यायची आणि मग त्याला पाठवायची..पण आता जर त्याने तिची डायरी वाचली तर त्याला सगळं कळेल ह्याची सखीला भिती होती..आता त्याला कळूनही काही उपयोग नव्हता..आणि तिला काही कळूनही द्यायचं नव्हतं त्याला..एकेकाळी ह्या कविता त्याने वाचाव्या म्हणून तिची धडपड असायची आणि आज त्याने ते वाचू नये म्हणून धडपड चालू होती..सगळं किती बदललं होतं..ती विचारात गुंग असताना माधव हळूच तिच्या बॅगमधून डायरी घेतो आणि एक कविता वाचतो.. 


"अजूनही सोडवतीये तूझ्या प्रश्नांची कोडी नवीन उत्तराच्या शोधात.. 

अजूनही तूझ्या स्पर्शावर आहेत डोळे नवीन ओलाव्याच्या शोधात..

अजूनही भिजतीये जून्या आठवणींत नवीन पावसाच्या शोधात.."


सखी त्याच्या हातातून डायरी घेते आणि तिथून निघून जायला लागते..माधव तिचा हात पकडून तिला थांबवतो.. 

"काय प्रॉब्लेम आहे तूझा??..तूला हवं तेच करतीये ना आता मी..तूला तुझं आयुष्य आहे आणि मला माझं असचं बोलला होतास ना..तू जगतोयस तूझं आयुष्य तूला हवं तसं आणि मी मला हवं तसं..नाही सांगत मी तूला काही.. नाही त्रास देत..तूझ्यासाठी जी फक्त सवय होती ती सवय मोडलीये मी..आता अजून काय करू??..",रागाच्या भरात आपण अजुन काहीतरी बोलून जाऊ म्हणून सखी तिथून निघून जाते..

माधवला तिच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं..त्याच्या बोलण्याचा वागण्याचा सखीला ईतका त्रास झालायं हे त्याला माहीत नव्हतं..आज पहील्यांदा सखी त्याला असं काहीतरी बोलली होती..तो नेहमीचं चिडायचा काहीही बोलायचा पण ती कधीचं त्याला काही बोलायची नाही..

सखीला पण खूप वाईट वाटतं..

"मला माफ कर माधव..मला सांगायचं होतं रे तूला माझ्या प्रत्येक कवितेत फक्त तूचं असतोस..पहीली कविता ही तूझ्यासाठी होती आणि शेवटचीही फक्त तूझ्यासाठीचं असेल..नाही सांगू शकले..पण हेचं योग्य आहे तूझ्यासाठी..माझं तुझ्यापासून दूर रहाणचं योग्य आहे..खूप प्रयत्न केलायं मी तूला विसरायचा..तूला माझ्या मनातून काढायचा पण नाही करू शकले..मला माझं प्रेम तर नाही मिळणार पण तूला तूझं प्रेम मिळालं यातचं माझा आनंद आहे..तूझ्या स्वप्नांचा एक छोटासा भाग होणं हे माझं खूप मोठं स्वप्न आहे..पण माझ्या स्वप्नांना भंगण्याचाचं वास आहे..तूझं प्रत्येक स्वप्न पुर्ण झालं पाहीजे..आणि त्यासाठी माझं तुझ्यापासून दूर रहाणचं चांगलं..मला माफ कर माधव आता यापुढे मी तूझ्याशी जे काही वागेल त्यासाठी..कदाचित तूला खूप वाईट वाटेल माझ्या वागण्या बोलण्याचा तूला त्रास होईल..पण हेचं योग्य आहे तूझ्यासाठी..",सखी खूप रडत असते.. 

त्यानंतर सखी माधवपासून खरचं खूप दूर रहायला लागते..एक महीन्यात ती एकदाही त्याच्याशी स्वतःहून बोललेली नसते आणि जर तो येऊन बोललाचं तर त्याला त्रास होईल असं काहीतरी बोलत असे..सगळ्यांसमोर त्याला उगीचच खूप काही बोलत असे..माधवला कळत असतं ती हे सगळं मुद्दामून करतीये..ती जाणूनबुजून त्याच्यापासून दूर राहतीये पण ती असं का वागतीये हे त्याला कळत नसतं..त्याला वाटतं की तो तिला त्यादिवशी जो काही बोलला होता ती गोष्ट तिच्या मनाला खूप लागलीये..पण खरतरं ती हे सगळं फक्त ह्यासाठी करत असते की कधी चुकून जरी त्याला तिच्या भावनाबद्दल कळालं आणि त्याला कळालं की तिचं त्याची मैत्रीतली प्रेयसी आहे तर त्याला खूप वाईट वाटेल..कदाचित तो स्वतःलाचं दोषी समजेल आणि सखीला हे सगळं चालणार नव्हतं..त्यामुळे ती त्याच्याशी असं वागत असते खरतरं तिला स्वतःला पण तिच्या वागण्याचा खूप त्रास होत असतो..असेचं दिवस जातात..दोन आठवड्यानंतर त्यांची परीक्षा असते आणि त्यानंतर दिवाळी असल्यामुळे सुट्टया असतात..सखीने ह्या सगळ्यापासून काही दिवस दूर जायचं ठरवलेलं असतं..ती तिच्या मामाकडे जाणार असते..

माधव बरेचं दिवस कॉलेजला आलेला नसतो..सखीसुद्धा ह्यावेळी त्याला कॉल वगैरे करून विचारत नाही..तिला वाटतं तिने ज्यासाठी हे सगळं केलं ते आता झालयं..माधव आता विसरून पण गेला असेल जे झालं ते..कदाचित तिच्या त्याच्यासोबत वाईट वागण्याने आता त्याला तिचा खूप रागपण येत असेल..आणि तो बिझी पण झाला असेल त्याच्या आयुष्यात.. पण त्यांच्या एका मित्राकडून तिला कळतं की तो खूप आजारी आहे..तो रूमच्या बाहेर पण निघत नाही हल्ली..सखीला त्याची खूप काळजी वाटते..ती कसलाही विचार न करता त्याला भेटायला त्याच्या हाॅस्टेलवर जाते..माधव खूप आजारी असतो त्याला नीट बोलता पण येत नसतं..खूप अशक्त झालेला असतो तो..त्याला असं बघून सखीला रडायला येतं..तिला स्वतःचाचं राग यायला लागतो..गेले काही दिवस त्याच्याशी दूर रहायच्या नादात ती त्याच्याशी खूप वाईट वागलेली असते..सखीला तिथे बघून माधवला खूप बरं वाटतं..इतक्या दिवस त्याची हरवलेली सखी त्याला परत मिळालेली असते..तो तिला घट्ट मिठी मारतो..दोघेही खूप रडत असतात..त्याच्या मामामामीला त्रास नको म्हणून त्याने सांगितलेलं नसतं..ती पुर्ण दिवस त्याच्याबरोबरचं रहाते..पुढचे दोन दिवस सखी रोज येत असते..माधवची काळजी घेत असते..आता माधवला बरं वाटायला लागलेलं असतं..सखी त्याच्याशी एकदम आधीसारखं वागत असते..सखीमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळं नीट झालयं ह्याचा त्याला जास्त आनंद असतो..पण माधव तिच्यापासून काहीतरी लपवतोय असं तिला वाटतं..नक्कीच काहीतरी झालयं पण ती त्याला विचारत नाही..त्याला अजून थोडा अशक्तपणा असतो..

"सखी त्या टेकडीवर जायचं का ग??.. किती दिवस गेलो नाहीये मी.. तिथे शांततापण असते..बरं वाटेल थोडं..",माधव बोलतो..

"हो जाऊयात की..तू काहीतरी लिह तिथे जाऊन.. तूला छान वाटेल..",सखी बोलते.. 

ते दोघे तिथे जातात..माधव खूप शांत असतो..

"मग कशी आहे तूझी किर्ती??.. ",त्याला बोलतं करण्यासाठी सखी त्याला विचारते.. 

"खूप खुश आहे.. लग्न आहे तिचं पुढच्या महीन्यात..",माधव बोलतो.. 

सखी गोंधळून जाते..

"कारण पण खूप छान दिलं तिने..आपण खूप वेगळे आहोत बोलली.. आपली कुटूंब वेगळी आहेत..",माधवला होणारा त्रास सखीला दिसत असतो.. 

"अरे तू समजावायचं ना तिला..थांबली असती ती..आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्याच्यासाठी आपण कितीही वेळ थांबू शकतो..प्रेम वाट बघायला शिकवतं..",सखी बोलते.. 

"तूला काय वाटतं मी केलं नसेल का काही.. 

खूप प्रयत्न केला मी तिला थांबवायचा..बोलली फक्त कविता आणि प्रेमाने पोट नाही ना भरत माधव..तिच्या घरच्यांनाही जाऊन भेटलो पण जर ज्याच्यासाठी तुम्ही लढत असता तोचं तुमची साथ द्यायला तयार नसेल तर काय उपयोग ना?? मला आधीचं कळायला हवं होतं गं..मला वाटलं प्रेमाने काहीही करता येतं..पण फक्त प्रेमचं पुरेसं नसतं..खूप त्रास झाला मला ह्या सगळ्याचा..आणि त्यावेळी तूही सोबत नव्हतीस..त्यात तूझी काहीचं चूक नाहीये पण..मी माझ्यामध्ये इतका गुंतलो होतो कि कळालचं नाही कि खूप काही आहे जे सोडून जातोय मागे..तू जेव्हापासून दूर रहायला लागली तेव्हा जास्त जाणवलं मला..किर्ती तर खूप आधीचं गेलेली..पण नंतर तूझा अबोला सहन नाही झाला गं..भांडावं कडकडून पण अबोल राहू नये असं मला शिकवणारी माझी जीवाभावाची सखी आता स्वतःचं माझ्यापासून दूर रहात होती आणि त्याला कारणीभूत ही मीचं होतो.. मीचं तिला अबोल केलं होतं..कोणाशी बोलतापण येत नव्हतं..खूप एकटा पडलो होतो मी..",बोलता बोलता माधवच्या डोळ्यात पाणी येतं..ती त्याच्या डोक्यावरुन अलगद हात फिरवते..माधव तिच्या गळ्यात पडून खूप रडतो..इतकेदीवस त्याच्या मनात साठलेलं आज बाहेर पडलेलं असतं..त्याला खूप बरं वाटतं..

परिक्षा होते..माधवला बरं वाटावं तो लवकर सावरावा म्हणून सखीच्या सांगण्यावरून त्यांच्या सगळ्या ग्रुपने दोन दिवसांची ट्रिप प्लॅन केलेली असते..सगळेजण खूप मज्जामस्ती करतात दोन दीवस..माधवला कळत असतं कि सखी हे सगळं फक्त त्याच्यासाठी करतीये..नंतर काही दिवसांसाठी तो त्याच्या गावाला जातो..आणि सखीही तिच्या मामाकडे जाते..पण रोज माधवला फोन करत असते..

कॉलेज सुरू होतं..दोन महीने होतात..माधव आता सावरलेला असतो..सखी आणि त्याचं नातं पण आता परत पहील्यासारखं झालेलं असतं..तिच्यासाठी त्यांची निखळ मैत्री खूप महत्वाची होती..गेल्या काही दिवसात माधवने एक वेगळी सखी पाहीलेली असते..इतकं सगळं होऊनही तिने त्याची साथ नव्हती सोडली..माधवला आता तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम जाणवायला लागलेलं असतं..त्यालाही ते सगळं हवहवसं होतं..त्याला तिची साथ हवी होती अशीचं कायम..तिचं त्याच्यासोबत असणं त्याला आता जास्त आवडायला लागलेलं असतं..याआधी सुद्धा बऱ्याचदा त्याने तिच्याबद्दल तसा विचार केलेला असतो..पण नंतर किर्तीचं येणं तिचं जाणं ह्या सगळया गोष्टी..असं नव्हतं कि त्याने किर्तीवर पण खूप प्रेम केलं होतं पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात..पण सखीने आता तिच्या भावनांना अव्यक्तचं ठेवायचं असं ठरवलेलं असतं..आणि माधवलाही भिती असते तिला काय वाटेल असं कसं आता मी ह्याला आवडायला लागले..नकळत त्याच्याकडून तिच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या..त्यामुळे तोसुद्धा काही बोलत नाही..

त्यांच्या कॉलेजमध्ये एक कल्चरल इवेंट असतो..त्यामध्ये एक नाटक करायचं असतं..आणि ते माधवने लिहावं अशी सगळ्यांची इच्छा असते.. माधवने आता लिहायचं सोडलेलं असतं..सखी त्याला खूप समजावते पण तो ऐकायला तयार नसतो..सखीला कळत नाही त्याला कसं समजावू..

माधवला आज परत एक चिठ्ठी आलेली असते खूप महिन्यानंतर..त्याच्या वाढदिवसानंतर आजचं.. 


प्रिय माधव, 

   आज बऱ्याच दिवसांतून तूला काहीतरी पाठवतीये..जास्त वेळ नाही घेणार तूझा.. 

तू लिखाण थांबवलस हे कळालं..नक्कीच असं काहीतरी झालं असेल कि तू असं केलसं..पण तूझं लिखाण तूझं पहीलं प्रेम आहे..तूझ्यात असणार कोणीतरी अचानक निघून गेलं असेल..किंवा मग नसेल जमलं एखादं पान त्यामुळे मग नको पुन्हा कागदपेनासोबत खेळ म्हणून थांबवलं असशील..पण मनात साठवून ठेवण्यापेक्षा कागदावर उतरवलेलं कधीही चांगलं..बस इतकचं...

-मैत्रीतली प्रेयसी.. 


ती चिठ्ठी वाचून माधव सखीकडे बघतो..

"काय मग आता लिहणार ना??..आता तर तूझ्या मैत्रीतल्या प्रेयसीने सांगितलं..",सखी त्याला चिडवते..

"हो ना..लिहावचं लागेल आता..पण यामध्ये मला तिची पण मदत हवीये..जर तिची सोबत असेल तर नक्की लिहिल...ती सुद्धा छानचं लिहते कि..फक्त एक चूकतं तिचं..शब्द तिचे असतात भावना तिच्या असतात..पण लिहायचा त्रास दिव्याला देते..",माधव बोलतो..सखी गोंधळून जाते..तो तिच्याकडे बघतो.. त्याचे घारी छटा असलेले डोळे थेट तिच्या डोळ्यांशी बोलत असतात..तिच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं..आज तिच्या नजरेत त्याने तिच्या सगळ्या भावना वाचल्या होत्या..

"तूला काय वाटलं मला कधी कळणार नाही का?..जेव्हा आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा चोरून तूझी डायरी वाचली होती..तू नव्याने ओळख करून दिली आहेस मला स्वतःची..",माधव बोलतो..सखी तिथून जायला लागते..माधव तिचा हात पकडतो आणि तिला जोरात स्वतःकडे ओढतो..ती घाबरते.. 

"मी काहीतरी विचारलं..मला तिची साथ हवीये..माझ्या मैत्रीतल्या प्रेयसीची..उत्तर नाही मिळालं मला माझ्या प्रश्नाचं..",माधव बोलतो.. 

"ती सोबतचं आहे ना..तिला ते सांगायची गरज आहे का??..सगळं बोलूनचं दाखवलं पाहीजे का??.एवढं वाचलसं आहेस मग तूझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळाललं का??. ",सखी बोलते..

खूप छान नाटक लिहताे माधव..माधवचे संवाद आणि मध्येचं सखीच्या सुरेख कविता..सगळ्यांना खूप आवडतं ते..त्या नाटकाबरोबरचं त्यांच्या नात्याची एक नवीन सुरूवात झालेली असते..त्यांच्या मैत्रीतल्या प्रेमाची सुरूवात...माधवला आता जास्त वाट बघायची नसते..

माधवने ठरवलेलं असतं आता जास्त वेळ वाया न घालवता लगेचच त्याच्या मनातलं सखीला सांगायचं..त्यादिवशी त्याने तिला भेटायला टेकडीवर बोलावलेलं असतं..नेहमीप्रमाणे सखी आधीचं येऊन थांबलेली असते..आजसुद्धा थोडासा पाऊस पडत असतो..माधव येतो पण तो खूप शांत असतो..तो काहीचं बोलत नाही म्हणून सखीचं बोलायला सुरूवात करते...

"काय रे, काही बोलणार आहेस कि नाही..",सखी बोलते..माधव तरीही खूप शांत असतो.. मग सखीला राग येतो..

"तूला जर काही बोलायचं नव्हतं तर मग मला का बोलावलं आहेस..मी जातीये तू बसं असाचं ईथेचं..",सखी जायला लागते..

"काल किर्ती भेटली होती..तिचं आलेली हॉस्टेलजवळ..",माधव सांगतो..

"काय बोलली मग ती आणि कशी आहे..",सखी विचारते.. 

"खुश आहे.. लग्न नाही झालं अजून तिचं..",माधव बोलतो..

सखीला वाईट वाटतं..काय बोलू तेचं कळत नाही तिला..तो काय बोलतोय हेसुद्धा ऐकू येतं नसतं तिला.. ती तशीचं तिथून निघून जाते..

दूरवरं कोणीतरी तुमचा हात घट्ट पकडून सोबत चालत आलेलं असतं..तुम्हाला वाटायला लागतं तुमचा रस्ता एक आहे..तुमचं स्वप्न एक आहे,तुमचं जग एक आहे..पण अचानक ती व्यक्ती झटकन तुमचा हात सोडते आणि रस्ता बदलून त्याच्या जगात निघून जाते..आणि तुम्ही तसेचं तिथे ऊभे असता..सखीला आता तसचं काहीसं वाटत असतं..तिच्या आयुष्यात हे सगळं काय चाललयं हेचं तिला कळत नाही..

"जर दूरचं करायचं होतं त्याला माझ्यापासून तर मग पुन्हा जवळ आणलं आम्हाला..",ती खूप रडत असते..

त्यानंतर दोन दिवस माधव कॉलेजला येत नाही..त्यामुळे तर सखीची खात्री पटते कि तो आणि किर्ती पुन्हा एकत्र आलेत..

काही दिवसांत त्यांची शेवटची परीक्षा असते..सखी नेहमीसारखचं वागत असते माधवसोबत पण माधवला माहीत असतं कि तिला खूप वाईट वाटलयं..त्यादिवशी ती त्याचं काहीचं ऐकून न घेता तशीचं जाते..परीक्षा झाल्यावर माधव तिला सगळं सांगणार असतो..जे झालं ते सखीच्या मनाला खूप लागलेलं असतं..तिचं आधीचं काहीतरी वेगळं ठरलेलं असतं..शेवटच्या पेपरच्या दिवशी ती लवकरचं घरी निघून जाते..माधव तिला कॉल करतो पण ती ऊचलत नाही..तो दिव्याला विचारतो पण तिलाही काही माहीत नसतं..तो तिच्या घरी पण जातो पण घराला कुलूप असतं..त्यांचा एक मित्र माधवला तिची चिठ्ठी आणून देतो..


जसं दिवसभर प्रकाश देऊन सुर्य जातो लाटांमध्ये विरघळून आणि जसे रंग होतात समुद्रात विलीन मग उरतो फक्त गडद काळा रंग..तसं तिलाही जावं लागणारचं होतं एक दिवस तुझ्यापासून दूर आणि हे तिला माहीत होतं...पण जाण्याआधी ते रंग तिला तूझ्या आयुष्यात भरायचे होते, तो प्रकाश तिला तूला द्यायचा होता..तूझ्यानंतर तिच्या आयुष्यात अंधार आणि फक्त काळा रंगचं असणार आहे...ती काहीही नसताना तू सगळंकाही आहेस...आणि ते सगळंकाही काय आहे हे तूला कधी न कळलेलचं बरं...तूझं सगळंकाही मात्र तूला नक्की मिळालं पाहीजे..तूला तूझा प्रकाश आणि तूझं इंद्रधनुष्यी प्रेम मिळाल्यावर जाईलचं ती नकळत निघुन जराही आवाज न करता...

- मैत्रीतली प्रेयसी.. 


चिठ्ठीत लिहल्याप्रमाणे खरचं सखी माधवपासून दूर निघून जाते...एक तो दिवस असतो जेव्हा सगळं सोडून ती गेलेली असते आणि एक आजचा दिवस..

"त्यानंतर माधवने शोधल असेल का मला??..कसा असेल तो??..आणि किर्ती तिचं काय झालं असेल..ते अजून सोबत असतील का??..",तिच्या डोक्यातून माधवचा विचार जातचं नसतो..

गार्गीमुळे पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झालेल्या असतात..खरतरं ईथे परत आल्यापासून तीने खूपवेळा त्याला भेटायचा विचार केलेला असतो..तीन वर्षात एक दिवस असा गेलेला नसतो की तिला त्याची आठवण आली नाही..त्याची सगळी पुस्तकं त्याचे ब्लॉग तिने कितीतरी वेळा वाचलेले असतात..कधी जर मुंबईला त्याचा कसला कार्यक्रम असलाचं तर ती आवर्जून जात असे..मागे बसून त्याला दिसणार नाही अश्या जागेवर बसून कौतुकाने त्याला पाहत असे..ती जोपर्यंत ईथे आहे तोपर्यंत चुकून जरी तो तिच्यासमोर आला तर तिचं काय होईल..माझ्याकडे फक्त बघूनचं त्याला कळून जाईल कि मी अजूनही त्याच्यावर तितकचं प्रेम करते..त्याच्या विचारातचं ती झोपी जाते..


माधव आणि यशने मिळून गेट टुगेदरची सगळी तयारी केली होती...त्याचा मित्र शेखर सखीला कॉल करणार असतो..शेखर माधवच्या आॅफिसमध्ये आलेला असतो..त्याच्यासमोरचं शेखर सखीला कॉल लावतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो..

सखी फोन ऊचलेपर्यंत माधवच्या हृदयाची धडधड होत असते आणि ती एकदाचा फोन ऊचलते..

"हॅलो...",तिकडून सखीचा गोड आवाज येतो..जवळजवळ तीन वर्षांनी माधव तिचा आवाज ऐकत होता..माधवसाठी थोड्यावेळ सगळं तिथेचं थांबलं होतं..तीन वर्षापुर्वी दिवसभर तिची फक्त बडबड असायची त्याच्यासमोर..

"हॅलो सखी..मी शेखर बोलतोय..शेखर साने..SP कॉलेज.. ओळखलं का?? ",शेखर बोलतो.. 

"ओळखलं रे..आवाजावरूनचं ओळखलं..बोल ना?? काय म्हणतोयस?? ",सखी बोलते.. 

"मी ह्यासाठी कॉल केलेला की आम्ही सगळ्यांनी गेट टुगेदर करायचं ठरवलं आहे ह्या रविवारी..तू पण ईथेचं आहेस तर तूला जमेल ना??.. म्हणजे जमवचं.. तूला यायचं आहे काहीही करून..",शेखर सांगतो..

"तूला कसं कळालं मी इथे आहे ते..",सखी त्याला विचारते..

शेखर तिला काहीतरी सांगून टाकतो आणि सविस्तर कधी,कुठे,कोण कोण येणार आहे हे सांगतो..माधव येणार नाहीये असही सांगतो..शेखर कॉलेजमध्ये असल्यापासूनचं खूप बोलका होता..समोरच्याला आपली गोष्ट व्यवस्थित पटवून द्यायचा..त्यामुळेच माधवने ही कामगिरी त्याच्यावर सोपवली होती..शेखर तसा माधवपेक्षा जास्त दिव्या आणि सखीचा जवळचा मित्र होता..माधवला स्वतःवरचं हसायला येतं कारण कॉलेजमध्ये असताना ह्याचं शेखरचा त्याला खूप राग यायचा कारण तो आणि दिव्याचं सखीला त

आपल्याबद्दल काहीही सांगतात असं माधवला वाटायचं..पण आज हाचं कामी आला होता..

"हो येईल मी.. मलासुद्धा तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे..विशेषतः तूला आणि दिव्याला..",सखी बोलते... 

तिचा तो हो ऐकून माधवच्या आनंदाला पारावर उरत नाही..तो यश आणि शेखरला मिठी मारतो..

सगळे भेटतील म्हणून सखीला पण खूप आनंद होतो..पण लगेचच माधव येणार नाहीये ह्याने ती नाराज होते.. 

"का येणार नसेल तो..मी येतीये म्हणून तर नाही येणार असं नसेल ना..नाही पण जर तसं असतं तर त्याने स्वतः गार्गीकडे जाऊन माझी चौकशी नसती केली..पण मग का नाही येणार तो..काय करतीये सखी तू..का त्याचा विचार करतीये..जर नाही येणार नको येऊ दे ना..तुझ्यासाठी चांगलचं आहे ना..",सखी माधवच्या विचारात गुंग झालेली असते तेवढ्यात दिव्या येते आणि मागून तिला मिठी मारते..दिव्याला तिथे बघून सखीला खूप आनंद होतो..ईतके दिवस ती फक्त दिव्याच्याचं संपर्कात होती..फोनवर बोलणं चालू असायचं पण आज ती दिव्याला जवळजवळ एक वर्षानंतर पाहत होती..दिव्याचं तिला मुंबईला जाऊन भेटायची पण एका वर्षात तिचीपण भेट झालेली नसते..

"कशी आहेस..ईतके दिवस झालेत तूला ईथे येऊन आणि तू मला काल फोन केलास..खूप राग आलाय मला तूझा..येणारचं नव्हते मी पण राहवलं पण नाही.. ",दिव्या बोलते.. 

"सॉरी गं..तूला माहीती आहे ना सगळं..बरं ते सोड..तू कशी आहेस??..",सखी बोलते.. 

"मी मस्त आहे..रविवारी सगळे भेटणार आहेत..आपलं गेट टुगेदर आहे..आणि तू काही कारण नाही द्यायचं..यावचं लागेल तूला..",दिव्या बोलते.. 

"हो गं.. येणार आहे मी..शेखरचा फोन आलेला मलापण ..",सखी तिला सांगते.. 

"काय बोलली?..माझा माझ्या कानावर विश्वास नाही बसत आहे..मलातर वाटलेलं खूप मनवावं लागेल मला तुला..माधव पण येणार आहे वाटतं??..तसही तूझं सगळं त्याच्यासाठीचं असतं ना..त्याच्यासाठीचं तर गेली होती ना इकडून..",दिव्या तिला चिडवायला लागते..पण माधवचं नाव ऐकून सखी उदास होते..

"सॉरी..अगं गमंत करत होते मी..",दिव्या बोलते.. 

"नाही येणार तो..आणि तो आला असता तर मी नसते ना आले?..आणि मी तर तूझ्यासाठी येतीये..",सखी तिला बोलते.. 

"हो राहूद्या तुमची नाटकं..ते जाऊ दे..मला तूला काहीतरी सांगायचं आहे..",दिव्या बोलते..

"काय गं..लग्न बिग्न करतीयेस का?..",सखी तिची गमंत करते..

"तूला कसं कळालं..?",दिव्या आश्चर्यचकित होऊन तिला विचारते.. 

"मी तर सहज बोलले होते पण तू खरचं लग्न करतीये??...कोण आहे तो मुलगा..मला सगळं ऐकायचं आहे..",सखीला खूप आनंद झालेला असतो..

"यश नाव आहे त्याचं..बाबांच्या मित्राचा मुलगा आहे..बाबांची ईच्छा होती मग हो बोलले मी..

भेटलोय तसं आम्ही खूपवेळा..चांगला आहे खूप..आधी तर नाही बोलला होता..प्रेम लग्न वगैरे यावर विश्वास नाही बोलला माझा..मग मीपण विषय सोडला पण नंतर बऱ्याचदा भेटले त्याला..हळूहळू आवडायला लागला तो.. 

त्याच्याशी बोलायला आवडायला लागलं..मध्ये बाबा खूप आजारी होते तेव्हा त्याने खूप मदत केली मला.. तेव्हाचं वाटलं हाच आहे तो..",दिव्या बोलत असते..बोलताना थोडीशी लाजत असते..सखी पहील्यांदाचं तिला अशी लाजताना बघत असते..

"ओहो..कोणितरी लाजतयं..यश नाव आहे तर त्याचं ज्याने माझ्या मैत्रिणीचं हृदय चोरलयं..आधी तर नाही बोलला होता तूझा यश मग असं काय केलं तू एकदम हो बोलला..",सखी तिला चिडवते.. 

"मी नाही काही केलं..त्याचा कोणितरी मित्र आहे.. त्याच्याकडे बघूनचं त्याला प्रेमावर विश्वास बसला..त्याचा तो मित्र त्याचं प्रेम परत मिळवण्यासाठी खूपकाही करतोय..",दिव्या बोलते.. 

"अच्छा..मग त्याच्या मित्रालाही त्याचं प्रेम लवकर मिळो जसं यशला तू मिळाली..",सखी बोलते.. 

त्या दोघीपण बाहेर फिरायला जातात..त्यांच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना जाऊन भेटतात..आणि नंतर दिव्याला घरी सोडून सखीसुद्धा घरी येते..दिव्यासाठी सखी खूप खुश असते..पण तिला माधवची खूप आठवण येत असते..सगळे भेटतील पण तो नसेल ह्याचं तिला खूप वाईट वाटतं..तिला त्याला भेटायची खूप ईच्छा होते..त्याला काॅल करावा वाटतो.. 

ती गार्गीचा फोन घेते आणि त्याला फोन लावते..

"हॅलो.. ",माधव तिकडून बोलतो..आणि त्याचा आवाज ऐकूनचं सखी फोन ठेवून देते..

"काय बधीरपणा चालला आहे सखी तूझा..त्याच्यासाठीचं केलं होतस ना हे सगळं..दूर गेली होतीस मग आता का??..",ती स्वतःलाचं समजावयचा प्रयत्न करते..

दुसर्‍याला समजावणे खरतरं खूप सोपं असतं पण स्वतःला समजावणं खूप अवघड असतं.. माधवचा विचार काही तिच्या डोक्यातून जात नसतो...

माधवला कधी रविवार येतोय असं झालेलं असतं आणि 

एकदाचा तो दिवस येतो..माधव सकाळपासून खूप 

बेचैन असतो..त्याचं सारखं इकडून तिकडे फेऱ्या मारणं चालू असतं..यश ते सगळं पाहत असतो..माधवकडे बघून त्याला हसायला येतं..

"आज कोणीतरी जरा जास्तचं खुश आहे..मित्राकडे लक्षपण नाहीये..",यश बोलतो.. 

"गप्प रे जरा..सकाळपासून माझं काय चाललयं तूला कसं सांगू आता..येईल ना ती??..आणि भेटल्यावर काय बोलू मी तिच्याशी..ती जर बोललीचं नाहीतर..मला काही समजत नाहीये रे..",माधव बोलतो.. 

"अरे बस..किती टेंशन घेतोयस..ती येईल आणि बोलेल पण तुझ्याशी..",यश त्याला समजावतो खरं पण 

माधवचं काही लक्ष लागत नसतं कधी एकदाची संध्याकाळ होते असं होतं त्याला..

संध्याकाळ होते..माधव आधीचं एक तास येऊन थांबलेला असतो..पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचं ब्लेजर त्याला खूप छान दिसत असतं..राजबिंडा दिसत असतो एकदम..कुरळे केस आणि घारी छटा असलेले त्याचे डोळे.. कोणीही मुलगी सहज प्रेमात पडेल असाच होता तो...यशची माधवच्या सखीला भेटायची खूप ईच्छा असते पण त्याचं महत्त्वाचं काम असतं त्यामुळे तो येत नाही..हळूहळू त्यांचे सगळे मित्रमैत्रिणी यायला लागतात..सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगलेल्या असतात..कॉलेजचे ते दिवस त्या सगळ्या आठवणी ताज्या होतात..सखी आणि दिव्या अजून आलेल्या नसतात..माधवचं सगळं लक्ष दरवाज्याकडे असतं..तिथे बाकीच्याचं काय चाललयं याचं माधवला काही भान नसतं..तो सारखा बाहेर बघत असतो..त्याला असं बेचैन बघून शेखर त्याच्याजवळ येतो आणि त्याला चिडवायला लागतो..आणि तेवढ्यात सखी आणि दिव्या आल्याचं शेखर त्याला सांगतो..माधवचं हृदय जोरात धडधडत असतं..तो मागे वळून पाहतो आणि पाहतचं राहतो..काळ्या रंगाचा सुंदर वनपिस..कानामध्ये त्याचं रंगाचे थोडेसे लोंबते कानातले..गळ्यात छानसं पेंडंट..मोकळे केस..

खूप सुंदर दिसत असते ती..माधव तिच्याकडे पाहतचं बसतो..त्याला आजूबाजूचं काहीचं दिसत नसतं ऐकू येत नसतं..थोड्यावेळासाठी सगळं जग तिथेचं थांबतं..कारण जगचं आज त्याच्या समोर असतं..त्याची मैत्रीतली सखी..आणि तिचं लक्ष त्याच्याकडे जातं..दोघांची नजरानजर होते..खरतरं त्याला तिथे बघून ती गोंधळून जाते..तो जर येणार नव्हता तर कसा आला..तीन वर्षानी ती त्याला पाहत होती..तिच्या डोळ्यात नकळत पाणी येतं..आणि सखी लगेच तिची नजर दुसरीकडे करते..माधवला ते कळतं..त्याला तिला जाऊन घट्ट मिठी मारावी वाटते..तिला विचारावं का गेलीस मला सोडून..त्याला तिच्याशी खूप बोलायचं असतं..आधी त्याला भिती वाटत होती तिला सामोरं जायची.. पण त्याला बघून आलेल्या तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला सागितलं होतं आजही तिच्या डोळ्यात मनात सगळीकडे फक्त तोचं आहे..तो स्वतःला सावरतो..

सखी बाकी सगळयांना भेटते..मध्ये मध्ये तिचं माधवकडे लक्ष जात असतं..माधव एकटक तिच्याकडेचं पाहत असतो..त्यांचा नजरेचा खेळ सुरू झालेला असतो..


"तूझ्या येण्याची चाहूल येता.. 

शब्द सुचती मजला काही.. 

नजरेला नजर ही भिडता.. 

कविता बनूनी ओठांतूनी वाही.."


सखी शेखरजवळ येते आणि त्याला बाहेर घेऊन जाते,"जर माधव येणार होता तर तू खोटं का बोललास माझ्याशी..तो तर आलायं..आणि हे त्यानेचं केलं ना..मला खरं सांग.."

"तो नाही खोटं बोलला..त्याला मी तसं करायला सांगितलं.. "माधव मागून येतो आणि बोलतो.. 

"मी काही नाही केलं गं..ह्याने केलयं हे सगळं..काय बोलायचं ते ह्याला बोल.. ",असं बोलून शेखर तिथून निघून जातो.. 

"तूझा गुन्हेगार तुझ्या समोर आहे..मीचं केलं हे सगळं..तूला काय शिक्षा द्यायची ती देऊ शकते तू..",माधव तिला बोलतो..ती त्याच्याकडे बघतही नाही आणि तिथून निघून जायला लागते..माधव तिला अडवतो..

"ह्यावेळी नाही..आधीपण तू मला न सांगता काहीही न बोलता असचं निघून गेली होती पण आता नाही..",माधव बोलतो..

"थांबण्यासारखं काही राहीलचं नव्हतं ना..मग जावचं लागलं..आणि बोलले होते ना..तूला तूझं सगळं मिळाल्यावर जाईलचं जराही आवाज न करता..तेचं केलं मग..",सखी बोलते..तिचे डोळे भरून आलेले असतात.. 

"सगळं तूचं ठरवलं ना..",माधव बोलतो.. 

"तूझं आधीचं ठरलं होतं ना..",सखी बोलते.. 

"हे सुद्धा तूचं ठरवल..मला काय हवयं हे विचारलचं नाही..",माधव बोलतो..

"तू तरी कुठे सांगितलसं..",सखी बोलते.. 

"दरवेळी मला काय हवयं काय नको हे मी न सांगताही कळायचं ना तूला मग त्यावेळी का नाही कळालं..",माधव बोलतो.. 

"तूला जे हव होतं तेचं केलं मी..त्या सगळ्यात मी कुठे होते?..तूचं होतास आणि ",सखी बोलता बोलता थांबते.. 

"सगळं तूझचं तर होतं गं फक्त तूझचं..",माधव बोलतो..

सखी त्याच्याकडे बघते आणि काहीही न बोलता तिथून बाहेर निघून जाते..माधव तिच्यामागे जातो पण तोपर्यंत ती गाडीत बसून निघून गेलेली असते...माधव तसाचं तिथे बसून राहतो तिच्या भिजलेल्या डोळ्यात त्याच्या भिजलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत


"हॅलो..बोल ना दिव्या..",डोळे चोळत सखी झोपेतून उठते..

"काल अशी का गेलीस तू मला न सांगता..?",तिकडून दिव्या बोलते..तिला सखीचा खूप राग आलेला असतो..ती काल काहीही न बोलता सरळ निघून आलेली असते..

"अचानक काम आलं गं मला एक..मेसेज केलेला मी तूला..",सखी बोलते.. 

"व्वा..खोटं बोलायला पण येतं की तूला..",दिव्या बोलते.. 

"दिव्या..सकाळी सकाळी सुरू नको होवूस आता.."सखी बोलते.. 

"हा..खरं बोललं की कसं लगेच झोमतं..असो..सोड ते..माझं दुसरं काम आहे तुझ्याकडे..तू फ्री आहेस का आज..?",दिव्या बोलते.. 

"हो आहे ना..तूझ्यासाठी वेळचं वेळ आहे माझ्याकडे..पण आता तूलाचं वेळ नसणार आहे माझ्यासाठी..आता कोणितरी खास व्यक्ती आलीये ना तुझ्या आयुष्यात..",सखी तिची गमंत करते..

"हो त्याचं व्यक्तीला माझ्या सगळ्यात खास मैत्रिणीने सुद्धा भेटावं अशी इच्छा आहे माझी...येशील ना?",दिव्या सखीला विचारते.. 

"हो मग..मलापण तर भेटायचं आहे त्याला..बघूतरी कसा आहे तूझा यश..",सखी तिला चिडवते.. 

"आज संध्याकाळी सात वाजता..माझ्या घरी..",दिव्या तिला सांगते.. 

"ओके मॅडम..",सखी बोलते.. 

सखी थोडं लवकरचं दिव्याच्या घरी जाते..यशला भेटायला खुप उत्साहीत असते ती..अजून यश आलेला नसतो..दोघींच्या छान गप्पा रंगलेल्या असतात..शाळेतल्या,कॉलेजमधल्या सगळ्या गमतीजमती आठवून मस्त हसणं चाललेलं असतं..तेवढ्यात यश तिथे येतो..आणि यशसोबत माधवसुद्धा..सखी, माधव आणि दिव्या तिघे एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात.. 

"तुम्ही तिघे आधीपासूनच ओळखता का एकमेकांना??..",त्यांना असं बघून यश विचारतो.. 

"हो..म्हणजे नाही.. ",दिव्या बोलते.. माधव आणि सखी दोघे अजूनही एकमेकांमध्येचं गुंतलेले असतात..

"हो आम्ही कॉलेजमध्ये होतो एकत्र..ही सखी..जिच्याबद्दल मी तूला सांगितलं होतं..माझी सगळ्यात जिवलग मैत्रिण..",दिव्या यशला सखीची ओळख करून देते.. 

सखीचं नाव ऐकून यश माधवकडे बघतो..

"हा माधव..माझा तोचं खास मित्र ज्याच्यामुळे माझा प्रेमावर विश्वास बसला..जसं मला माझं प्रेम मिळालं तसं त्यालाही त्याचं प्रेम लवकरचं मिळेल..आणि तो ते मिळवेलचं मला विश्वास आहे..",यश मुद्दाम सखीकडे बघून बोलतो..तो अजून काही बोलेल म्हणून माधव जोरात त्याचा हात दाबतो आणि त्याला गप्प करतो.. 

दिव्या आणि यशच्या छान गप्पा रंगलेल्या असतात..ते दोघे ते कसे भेटले वगैरे सगळं सखी आणि माधवला सांगत असतात..पण सखी आणि माधव तिथे असूनही तिथे नसतात..त्या दोघांचही अजिबात दिव्या आणि यशच्या बोलण्याकडे लक्ष नसतं..यश आणि दिव्या जरी त्यांच्याबद्दल सांगत असले तरी ह्या दोघांनाही त्यांच्या पहील्या भेटीपासून नंतरच्या सगळ्या गोष्टी आठवतात..हरवून गेलेले असतात ते एकमेकांमध्ये..

"माधव..",यशच्या आवाजाने माधवची तंद्री भंगते.. 

"हा बोल ना..",माधव बोलतो.. 

"म्हणजे आतापर्यंत मी जे काही बोललो ते तू काही ऐकलचं नाही..",यश त्याला विचारतो..

"ऐकलं रे..",माधव बोलतो.. 

"हम्म्म..दिसतचं आहे ते कुठे आहेस तू..",यश बोलतो..

नंतर ते चौघेही बाहेर डिनरसाठी जातात..माधव आणि सखी खूपचं शांत असतात..त्यांच्या मनाचा गोंधळ यशला जाणवतो आणि तोचं बोलायला सुरूवात करतो.. 

"मुंबईला कुठे असते तू आणि काय करते.?",यश सखीला विचारतो.. 

"ती मुंबईला गोरेगावला असते आणि तिथे तिचं एक छोटसं म्युझिक स्कूल आहे..",दिव्या सांगते.. 

"तिला सांगू दे ना..तू काय वकिल आहेस का तिची..तिचा पण आवाज ऐकू ना जरा..पुढे आयुष्यभर तूझाचं आवाज ऐकायचा आहे मला..",यश दिव्याला बोलतो..दिव्याचा चेहरा एकदम बारीक होऊन जातो..सखीला खूप हसू येतं यशच्या बोलण्याचं..तिला हसताना बघून माधवला खूप छान वाटतं..हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खळीकडे बघतचं रहावं असं त्याला वाटतं..

सखी यशला ती मुंबईला काय करते कुठे राहते सगळं सविस्तर सांगते..बोलताना तिच्या चेहर्‍यावरचे वेगवेगळे भाव माधव टिपत असतो..तिने असचं बोलत रहावं असं त्याला वाटत असतं..

"गोरेगावला बासरी म्युझिक स्कूल आहे तेच ना..??",यश विचारतो.. 

"हो तेच..",सखी बोलते.. 

"मग आपण एकमेकांना आधीपासूनच ओळखतो..तुझ्या लक्षात असेल तर??..",यशच्या प्रश्नाने सखी गोंधळून जाते..माधव आणि दिव्यासुद्धा त्याच्याकडे बघत असतात.. 

"दोन वर्षापुर्वी माधवचं जेव्हा पहीलं पुस्तक प्रकाशित झालेलं तेव्हा त्याची पहीली प्रत तूला हवी होती..तू कॉल केलेलास तेव्हा आणि त्यासाठी तू काहीही करायला तयार होती..मी त्यावेळी माझा फायदा बघितला..फक्त एक प्रत द्यायला मी तयार नव्हतो तर तू जवळजवळ तीनपट जास्त किमंत देऊन त्याच्या पन्नास प्रति मागवल्या होत्या..तू त्यावेळी ज्या व्यक्तीशी फोनवर बोलली होती तो मीचं आहे..",यश एकादमात सगळं सांगून टाकतो..माधव तिच्याकडे एकटक बघत असतो..तिला काय बोलावं कळत नाही..

"नाही..तुमचा काहीतरी गैरसमज झालाय..मी का असं करेल..",सखी बोलते..

"तू का असं केलं हे तूलाचं माहीत ना..ठिक आहे जर हे सगळं तू केलं नाहीस पण मग मुंबईला होणार्‍या माधवच्या प्रत्येक कार्यक्रमात तुझं हजर असणं सुद्धा उगीच असेल ना..?",यश तिला प्रतिप्रश्न करतो..सखीला खूप जोरात ठसका लागतो..आत मात्र तिची चांगलीचं फजिती झालेली असते..दिव्याला ते कळतं म्हणून ती लगेच विषय बदलते..जेवण झाल्यावर सखी आणि दिव्याला घरी सोडून ते दोघेही घरी जातात..गाडीतून जाताना मध्येच माधव आरश्यामधून सखीकडे बघत असतो..त्यांची बऱ्याचदा नजरानजर होते..

"हिला खरचं कळत नाही माझ्या मनात काय चाललं आहे कि ही कळत असूनही मुद्दाम असं करते..",माधव स्वतःशीचं बोलत असतो.. 


"तूझा नजरेचा स्पर्श होता 

मी तूझा होत जातो.. 

वाच ना मला एकदा 

सगळेचं कसे शब्दात मांडू.."


दुसर्‍या दिवशी आॅफिसमध्ये माधवचं लक्ष लागत नसतं..काल जे झालं त्या विचारातचं गुंग झालेला असतो..आजसुद्धा सखीच्या मनात फक्त तोचं आहे ह्याचा त्याला खूप आनंद झालेला असतो..यश तिथे येतो..त्याची आणि दिव्याची एंगेजमेंटची तारीख फिक्स झाल्याचं सांगतो..पुढच्या आठवड्यात असते त्यांची एंगेजमेंट..माधवला खूप आनंद होतो..तो त्याला मिठी मारतो..त्या दोघांचं एकमेकांना चिडवणं वगैरे चाललेलं असतं..तेव्हाचं माधवच्या एकदम काहीतरी लक्षात येतं..

"यश मला तूला काहीतरी विचारायचं आहे..",माधव बोलतो.. 

"विचार कि बिन्धास्त.. ",यश बोलतो.. 

"यश, ते सगळं तूला कसं माहीत आणि तू कधी मला सांगितलं का नाही..",माधव यशला विचारतो..

"जेव्हा तू मला सांगितलं होतस ना ती मुंबईला असते तेव्हा मला एकदम वाटलं ती मुलगी जिने त्यावेळी मला खूप विनंती करून तुझं पहीलं पुस्तक घेतलं होतं ती तिचं असेल मग जरा माहीती काढली..आणि मग अजून एक गोष्ट कळाली कि तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ती यायची..काल दिव्याची मैत्रिण म्हणजे तुझीचं सखी आहे हे कळाल्यावर मग तर मला खूप आनंद झाला..आणि तुझ्यासमोरचं तिला विचारलं सगळं..तिचं खूप प्रेम आहे माधव तुझ्यावर..तिच्या डोळ्यात दिसतं ते..",यश बोलतो.. 

"माहिती आहे रे मला ते..पण ती अशी दूर का राहते मग..बोलतही नाही साधं..",माधव बोलतो.. 

"हे बघ..त्यादिवशी किर्ती भेटल्यानंतर काय झालं तिला माहीत नाहीये..तिने वेगळा अर्थ घेतला..तू सांग ते तिला..",यश बोलतो.. 

"त्यासाठी तिने बोललं पाहीजे ना आधी..",माधव बोलतो.. 

"तू तिला काॅल कर आणि भेटायला बोलव..सगळं सांगून टाक..वेळ नको घालवूस ह्यावेळी आणि आता तूला कळालं असताना कि ती दूर असूनही फक्त तूझीचं सखी होती आणि आहे..",यश बोलतो..

"नाही येणार ती..तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तिला..तिच्यासाठी तिला जे वाटतं ना तेचं खरं असतं..",माधव बोलतो.. 

"ठिक आहे..आता नको बोलूस पण माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी तू काहीही झालं तरी सगळं सांगणार आहेस तिला.."यश त्याच्याकडून प्रॉमिस घेतो.. 

तेवढ्यात दिव्या तिथे येते..सखी एंगेजमेंटला नाही येणार आणि ती उद्याचं मुंबईला परत जातीये असं सांगते..माधव खूप नाराज होतो..

"अगं पण ती तर अजून दोन आठवडे थांबणार होती ना..",यश विचारतो.. 

"हो पण तिचं काहीतरी काम आहे बोलली..तिला जावचं लागेल..नाही ऐकत आहे ती..खूप समजावलं मी तिला..",दिव्या सांगते.. 

"नाही जाणार ती...ती नक्की येईल तुमच्या एंगेजमेंटला..",माधव बोलतो.. 

"नाही माधव..ती खरचं जातीये..",दिव्या बोलते.. 

"मला विश्वास आहे ती नाही जाणार..ह्यावेळी ती मला एकटं सोडून नाही जाणार..आणि मी तिला जाऊन नाही देणार..",माधव बोलतो.. 

"म्हणजे काय करणार आहेस तू..?",यश आणि दिव्या दोघेही त्याला विचारतात.. 

माधव गालात हसतो आणि त्या दोघांनाही बोलतो.. 

"तुम्ही तयार रहा फक्त..खूप केलं तिने तिच्या मनासारखं..आता जे होईल ते माझ्या मनासारखं होईल.. ",असं बोलून माधव तिथून निघून जातो.. 

आज माधवच्या पुस्तकाचं प्रकाशन असतं..त्याने पहील्यांदाचं प्रेमकथा लिहलेली असते..आणि कथेचं नाव असतं मैत्रीतली प्रेयसी..सखी तिकडे येईल अशी त्याला आशा असते पण सखी येत नाही..माधव थोडा नाराज होतो..

"माधव..मला वाटलेलं सखी आज येईल..पण नाही आली ती..जाणार आहे ती संध्याकाळी.. तूझं काय ठरलं आहे नक्की.. काय करणार आहे तू..",यश त्याला विचारतो..

"ते सोड..मी तूला सखीच्या घरच्या पत्त्यावर पुस्तकाची एक प्रत पाठवायला सांगितलेली..पाठवलीस का??.. ",माधव विचारतो.. 

"हो..वाचलं पण असेल तिने..तिच्यासाठीचं तर लिहलं आहेस..",यश विचारतो.. 

ईकडे माधवचं पुस्तक वाचून सखीच्या डोळ्यात पाणी येतं..किती छान वर्णन केलं होतं त्याने त्यात तिचं..त्यांच्या पहील्या भेटीचं..त्या टेकडीचं..त्या दिवसाच..नंतर त्यांचा दुरावा..नंतर त्याला झालेली प्रेमाची जाणिव..आणि तिचं त्याला सोडून जाणं...

आणि शेवटची ती एक चारोळी..ती तर खूप सुरेख होती...आणि येशील ना परत???...असं शेवटचं वाक्य...


हृदयात तुझ्या नव्याने पुन्हा मला साठवं.. 

नको आता हा दुरावा अंतर तेवढं मिटवं.. 

सहवासाचे ते सुरेख क्षण पुन्हा एकदा आठवं.. 

नको आता हा दुरावा अंतर तेवढं मिटवं.. 

तशीच येऊन परत एक नवीन कविता सुचवं..

नको आता हा दुरावा अंतर तेवढं मिटवं.. 


"पुन्हा तुझ्याजवळ येऊन दूर जाणं खरचं खूप अवघड आहे माधव..तुझ्यापासून दूर असूनही जवळचं भासायचा तू मला..आणि आता ईतका जवळ होतास खूपदा वाटलं कि जावं तुझ्याकडे खूप बोलावं पण माहीत नाही काय होतं असं जे तुझ्याजवळ येऊ देत नव्हतं..कदाचित भिती होती कि पुन्हा तेचं झालं तर आधी खूप जीव लावशील आणि मग एकदम दूर करुन टाकशील..आणि मी तशीचं तिथे थांबून राहील..नको रे आता पुन्हा ते सगळं..",सखीची निघायची सगळी तयारी झालेली असते..माधवचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातचं नसतो..गुंग झालेली असते ती त्याच्या विचारात..तेवढ्यात दिव्याचा फोन येतो..आधी ती फोन उचलत नाही..पण दिव्या सारखा कॉल करत असते मग ती फोन उचलते.. 

"सखी..माधवचा अपघात झालाय..",दिव्या बोलते..दिव्याचं बोलणं ऐकून सखी मटकन खाली बसते..तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागतात..

"हॅलो..सखी ऐकतीयेस ना..तू लवकर ईथे हाॅस्पिटलमध्ये ये..आम्ही तिथेचं आहोत..",दिव्या बोलते..सखी लगेच घरातून निघते आणि हाॅस्पिटलमध्ये पोहोचते..यश आणि दिव्या तिथेच असतात.. 

"कसा आहे माधव.??",सखी यश आणि दिव्याला विचारते..ती खूप घाबरलेली असते..यश तिला माधवच्या रुमकडे घेऊन जातो..माधव बेशुद्धावस्थेत असतो..त्याला तसं शांत झोपलेलं बघून सखीला जास्तचं रडायला येतं..त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते..

"किती लागलयं त्याला..कसं झालं हे सगळं??..",ती यशला विचारते.. 

"नक्की माहित नाही..काही लोक घेऊन आले त्याला ईथे..त्यांनी माधवच्याचं फोनवरून मला कॉल केला..",यश सांगतो.. 

"डॉक्टर काय बोलले??",सखी बोलते.. 

"डोक्याला बराचं मार लागलाय..शुद्धीवर यायला वेळ लागेल आणि हातही फॅक्चर झालाय..",यश सांगतो..

यशचं बोलणं ऐकून सखीला माधवची जास्तचं काळजी वाटायला लागते..दिव्या तिथे येते आणि बोलते,"सखी तू काळजी करू नकोस..आम्ही आहोत इथे..तू घरी जा..तसही तूला निघायचं असेल ना..ऊशीर होत असेल..मी तूला फोनवर सांगेलचं सगळं.."

"मी माधवला अश्या अवस्थेत सोडून कशी जाईल..?",सखी बोलते..

"अगं पण तूला काम आहे ना..तूचं बोललीस ना??..तू जा तसही आपल्याला काय करायचं आहे ना..यश आहेचं तो सांगेल मला आणि मी कळवेल तूला...",दिव्या बोलते.. 

"काही काय बोलतीये तू??..आपल्याला काय करायचं म्हणजे..तूला कळत नाहीये का त्याची काय अवस्था आहे ते..मी कसं जाईल त्याला सोडून??.",सखी बोलते.. 

"मला सगळं कळतयं पण आता तूला कळून घ्यायची गरज आहे..हो माहिती आहे मला तू नाही सोडून जाऊ शकत त्याला अशी..का नाही जाऊ शकत हे पण माहीती आहे..पण ते एकदा स्वतःला समजावं..आतापण धावत पळत आलीस ना जसं कळालं त्याचा अपघात झालायं..नाही जाऊ शकलीस..कारण तू कितीही नाही म्हणालीस तरी हेच खरं आहे कि आजही तूझं हृदय फक्त त्याच्याचसाठी धडधडतं..तूझ्या मनात फक्त तोचं आहे आणि तोचं असेल कायम..तू थांब ईथे त्याच्याजवळ आम्ही बाहेर आहोत..",दिव्या आणि यश बाहेर निघून जातात..माधव अजूनही बेशुद्ध असतो..

त्याच्या डोक्यावरुन अलगद हात फिरवते..शांत झोपलेला असतो पण तरीही चेहर्‍यावर एक स्मित असतं त्याच्या..ती तशीचं त्याच्याकडे बघत राहते..

"मला माफ कर माधव..कदाचित माझ्यामुळेचं झालयं हे सगळं..पण मी तूला असं नाही रे बघू शकत..प्लिज ऊठ ना..बोल माझ्याशी..हवं तर चिड..रागाव..तू विचारलं होतसं ना तूझ्या कथेत..येशील ना परत.. मग आलीये मी..तूझ्यासाठी..तुझ्यापासून दूर असले तरी फक्त तूझीचं होते रे मी..तूझीचं मैत्रीतली प्रेयसी..आणि मला कायम तूझीचं बनून रहायचं आहे..",सखी खूप रडत असते..ती त्याचा हात हातात घेऊन तिथेचं बसून राहते..तिचा डोळा लागतो..रात्र झालेली असते..यश तिला ऊठवतो आणि घरी जायला सांगतो पण ती ऐकत नाही..यश तिला खूप समजावतो..तो रात्रभर माधव जवळ थांबेल..आणि काही वाटलचं तर लगेच फोन करेल असं सांगून कसंतरी तिला जायला तयार करतो..सखी गेल्यावर यश माधवजवळ येतो आणि त्याला बोलतो..

"उठा लेखक साहेब...खूप झाली तुमची नाटकं..गेलीये आता तूझी सखी.."

माधव पण हळूच डोळे उघडतो..डोक्याची आणि हाताची पट्टी काढून उठून नाचायला लागतो..खूप खूश असतो आज तो..त्याला काय करू न काय नको असं होतं..आज सखीने नकळत तिच्या मनातलं सगळं त्याला सांगितलं होतं..तो यशला मिठी मारतो..त्यांच्या डोळ्यात आनंदाने पाणी येतं..

"यश तूला माहीत नाहीये आज मी किती खूश आहे ते..ती बोलली कि तिला कायम माझीचं बनून रहायचं आहे..",माधव बोलतो.. 

"हो हो..आपण अजूनही हाॅस्पिटलमध्ये आहोत..आणि तुम्ही सध्या पेशंट आहात हे विसरू नका..आणि आता मला पार्टी पाहीजे जंगी..",यश बोलतो.. 

"पार्टी??..आज काय मागशील ते देईल रे.. कारण हे सगळं मी फक्त तूझ्या आणि दिव्या मुळेचं करू शकलो..आणि तूझा तो डाॅक्टर मित्र त्याने जर मदत केली नसती तर झालचं नसतं काही..",माधव बोलतो.. 

"माधव.. तूझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागतं..जान आहेस मित्रा तू माझी..तू खूपकाही केलं आहेस माझ्यासाठी..मी जे केलयं ते त्यापुढे काहीचं नाही..",असं बोलून यश त्याला मिठी मारतो..

"मग आता अजून किती त्रास देणार आहेस तिला..बिचारी किती रडत होती..पण मानलं तूला..सात तास असचं झोपून राहीलास तू..म्हणजे झोपचं सोंग घेतलसं.. ",यश बोलतो... 

"ह्या सात तासांमुळेच तर आता पुढचे सात जन्म तरी सखी फक्त माझी असेल..आणि जास्त त्रास नाही देणार तिला..उद्याचं सांगेल..मी पण तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत..ती जेव्हा बोलत होती ना तेव्हा तिला घट्ट मिठीत घ्यावं वाटत होतं..तिचे डोळे पुसावे..तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवून तिला सांगावं कि माझं खूप प्रेम आहे तूझ्यावर..तू हातात दिलेला हा हात कधीचं नाही सोडणार मी..",माधव बोलतो...

"व्वा..लेखक साहेब..खरचं तुम्हाला खूप छान कथा रंगवता येतात..",मागून सखीचा आवाज ऐकून माधव आणि यश दोघेपण एकदम शांत होतात..त्यांना काय बोलावं तेपण सुचतं नाही.. 

"सखी..मी हे सगळं.. ",माधव बोलतो.. 

"ऐकलं मी सगळं..तू खोटं बोललास माझ्याशी.. नाटक केलसं सगळं..आणि मी तूला असं सोडून कसं जाऊ म्हणून परत आले ईथे आतापण..",सखी त्याला मध्येच तोडत बोलते.. 

"हो बोललो मी खोटं..पण हे सगळं फक्त तू मला पुन्हा सोडून जाऊ नये म्हणून केलं..आणि नाही गेलीस तू..जाऊचं शकली नाहीस..",माधव बोलतो.. 

"मला तूझं काही ऐकायचं नाहीये.. तू का केलसं..कश्यासाठी केलसं..काहीचं नाही..आतापण का ऐकतीये मी तूझं..",असं बोलून सखी तिथून जायला लागते..माधव तिचा हात पकडतो..

"तूला माहीती आहे का तूला त्या अवस्थेत बघुन माझी काय अवस्था झालेली ते..",सखी बोलते..तिला माधवचा खूप राग आलेला असतो.. 

"ठिक आहे..मला माहीती आहे..माझं चुकलयं ते..पण जर मी सगळं केलं नसतं तर तू कधी माझ्यासमोर व्यक्तचं झाली नसती..कधी तूझ्या मनातलं मला सांगितलचं नसतं..",माधव बोलतो..

"खोटं होतं ते सगळं..मी जे सगळं बोलले ते खोटं होतं जसं तू खोटं बोललास ना तसचं..",सखी बोलते..

माधव तिला जोरात स्वतःकडे ओढतो आणि बोलतो,"खोटं होतं तर ना सगळं तर तेचं माझ्या डोळ्यात बघून बोल..मला माहीतीये नाही बोलू शकत तू.."

सखी त्याचा हात सोडतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जाते..माधव तसाचं तर तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहतो...




हवेत गारवा होता..नुकतीचं पाऊस पडुन गेला होता..थंड वातावरण झालं होतं..मस्त मातीचा सुगंध येत होता..संध्याकाळचे सहा वाजले होते..खूप प्रसन्न वातावरण होतं..तीन वर्षानी सखी त्या जागेवर आली होती..ह्या जागेने तिला खूपकाही दिलं होतं आणि ह्याचं जागेने तिच्याकडून खूपकाही हिरावूनही घेतलं होतं..तिच्या सगळ्या कडूगोड आठवणी ताज्या होतात..तिला तो दिवस आठवतो जेव्हा ती माधवला घेऊन पहील्यांदा ईथे आलेली असते..तो दिवस तिच्यासाठी खूप खास होता..त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या चेहर्‍यावर हलकसं हसू येतं..

"सगळं जर अजूनही त्या दिवसासारखचं असलं असतं तर..",सखी स्वतःशीच बोलत असते..


"हातात हात गुंफून बेधुंद होऊन पावसात भिजावं आणि पावसानेही आपल्याकडे बघून असचं बरसत रहावं...आता तसं काही नाहीये म्हणत असताना अजूनही सगळं तसचं असावं...


चंद्राकडे बघून एकमेकांच्या सोबतीची तिचं स्वप्न परत पहावी आणि त्यालाही नकळत त्याच्या चांदणीची याद यावी...आता तसं काही नाहीये म्हणत असताना अजूनही सगळं तसचं असावं..."


"सगळं अजूनही तसचं आहे..",मागून माधवचा आवाज येतो..ती मागे बघते..ह्याला कसं कळालं मी काय बोलले ते मी तर मनात बोलले होते.. 

माधव तिच्याजवळ येतो आणि बोलतो,"नको विचार करूस इतका मला कसं कळालं वगैरे..तूचं बोलायची ना म्हणजे तूझ्या कवितेतून बोलायची..तूझ्यातचं असतो मी..मग कळालं.."आणि माधव हसायला लागतो..

"तू इथे काय करतोयस..पाठलाग करतोयस का माझा तू??..",सखी बोलते.. 

"मी का पाठलाग करू तूझा..?.. तूझी जागा थोडी आहे ही..आणि हा प्रश्न तर मी तूला विचारायला हवा..कारण मी तर रोजचं येतो इथे..पण आज तू कशी काय ईथे..?",माधव तिला बोलतो..ती त्याच्याकडे लक्ष देत नाही..आणि तिथे असणाऱ्या एका बाकावर जाऊन बसते..माधवपण तिच्याजवळ जाऊन बसतो..बराचं वेळ दोघं तसेचं शांत असतात..माधवचं परत बोलायला सुरूवात करतो.. 

"कविता खूप छान आहेत तूझ्या..",माधव बोलतो.. 

"हम्म्म..गार्गीने मुर्खपणा केला नाहीतर.."सखी बोलते.. 

"नाहीतर मला कधी कळालचं नसतं तू परत आलीयेस.. असचं ना..पण तू कधी विचार केलायस का.?..आपण पुन्हा भेटावं म्हणूनचं झालं असेल सगळं..बघ ना..त्यादिवशी गार्गीने तुझ्या कविता वाचून दाखवणं आणि त्याचंवेळी माझं तिथे असणं नंतर तूला भेटण्यासाठी केलेलं गेट टुगेदरचं प्लॅनिंग..सगळं असचं नव्हत ना..तस नसतं तर गेट टुगेदर नंतर नसतो ना भेटलो आपण परत..पण यश आणि दिव्यामुळे आपण परत भेटलो..तू माझ्यापासून दूर होतीस पण फक्त शरीराने...मनाने नाही..तू स्वतःला माझ्यापासून दूर करुचं शकली नाहीस..तूझ्या हृदयात अजूनही मीचं आहे..तूझ्या प्रत्येक कवितेत दिसतं ते.. ",माधव तिला मध्येचं तोडत बोलतो..

"तसं काही नाहीये..तूला काहीही वाटतं..",सखी बोलते.. 

"जर मला काहीही वाटतं तर मग तीन वर्षात तू जाऊ शकली असतीस पुढे आयुष्यात पण नाही गेलीस..का?.",माधव बोलतो..त्यावर ती काहीचं बोलत नाही..पुन्हा तशीचं शांतता असते बराचं वेळ..

"ह्या जागेसोबत किती आठवणी आहेत ना आपल्या..",माधव बोलतो.. 

"आपल्या नाही...फक्त माझ्या..",सखी बोलते.. 

"हो बरोबर आहे तुझं..जे होतं किंवा आहे त्यामध्ये तूचं होतीस ना फक्त मी कुठेचं नव्हतो..",माधव तिच्याकडे बघून बोलतो..

"होतास का??..असशील..मलाचं दिसलं नसेल..",सखी बोलते..

"टोमणे मारायला नाही विसरलीस तू..मला वाटलं जशी मला विसरलीस म्हणजे तसं दाखवते तरी कि तूझ्या मनात आता माझ्याबद्दल काहीचं नाहीये तसं ते पण विसरली असशील..",माधव बोलतो.. 

"मी विसरले का तू विसरलास??",सखी बोलते.. 

"सोडून कोण गेलं??..",माधव बोलतो.. 

"मीचं गेले कारण त्यातचं तूझा आनंद होता..आणि तेचं योग्य होतं.. ",सखी बोलते.. 

"सगळं तूचं ठरवलसं..माझा आनंद तुझ्यातचं होता..तेचं सांगायचं होतं तूला त्यादिवशी पण तू काहीही ऐकून न घेता निघुन गेली..आणि नंतरही तसचं नीट बोलतही नव्हतीस..टाळत होतीस मला..शेवटच्या पेपरच्या दिवशी सांगायचं होतं मला.. पण तू तर सरळ मला काहीच न सांगता शहरचं सोडून गेलीस..खूप शोधलं तेव्हा..तूझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी,शेजारी वगैरे कोणालाचं काही माहीत नव्हतं..",माधव बोलतो..त्याच्या बोलण्यातून त्याची तळमळ सखीला जाणवत होती..तीन वर्षात त्याला झालेला त्रास त्याच्या बोलण्यातून बाहेर पडत होता..

"आणि मग किर्ती..म्हणजे तेव्हा तर ती परत आली होती..?",सखी बोलते.. 

"तू ऐकूनचं नाही घेतलं माझं काही..हो त्यादीवशी ती आलेली मला भेटायला..ती दुसर्‍या देशात जाणार होती कायमची म्हणून आलेली भेटायला शेवटची..",माधव बोलतो.. 

"पण तिने तर लग्न ही नव्हतं केलं..आणि त्यादीवशी तू पण किती शांत होतास..आणि मग मला वाटलं.. ",सखी बोलते.. 

"मग तूला वाटलं कि आम्ही पुन्हा एकत्र आलो..लग्न झालं नाही असं बोललेलो मी..असं नाही तिने माझ्यासाठी लग्नचं नाही केलं..पुढे ढकललं होतं लग्न..खरतरं खूप खूश होती ती..तिला हवं ते सगळं मिळालं होतं आयुष्यात..त्यादीवशी अचानक आली ती समोर..मला काही सुचलं नाही..कधीकाळी खूप प्रेम केलेलं मी तिच्यावर आणि मनापासून केलेलं..सावरलो होतो मी..पण त्यादीवशी तिला बघुन अस्वस्थ झालो थोडा..साहजिक होतं ना गं..ती तिच्याबद्दल आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याबद्दल सांगत होती..पण मी मात्र तिथे नव्हतो..तूझाचं चेहरा समोर दिसत होता..तिला काहीही न बोलता सरळ तूझ्याकडे आलो..तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून तूला सांगितलं लगेच कारण मला आपल्या नात्याची सुरुवात कोणत्याही खोट्यानं नव्हती करायची.. पण तू माझं काहीही ऐकून न घेता त्या सगळ्याचा चुकीचा अर्थ घेतला..आणि निघून गेलीस..",माधव बोलतो..

सखीला खूप वाईट वाटतं..तेव्हा तिला झालेल्या गैरसमजामुळे ती माधवशी किती चुकीची वागलीये याची तिला जाणिव झालेली असते..

"तू नेहमीप्रमाणे स्वतःचं डोकं लावून मला सोडून गेलीस..तू गेल्यापासून असा एक दिवस गेला नाही कि तूझी आठवण नाही आली..तू माझ्यासाठी लिहलेल्या त्या कविता आणि पत्र वाचून दिवसाची सुरूवात होते रोज..त्यातचं तूला शोधायचा प्रयत्न करतो..आधीतर लिहणं पण सोडून दिलेलं पण मला एक मोठा लेखक झालेलं बघणं हे माझ्यापेक्षा जास्त तूझं स्वप्न होतं..मग पुन्हा लिहायला सुरुवात केली..",माधव बोलत असतो..सखीच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं..माधव ते बघतो..तो तिचा हात अलगद हातात घेतो..ती त्याला मिठी मारते..तिला जास्तचं रडायला येतं..सखी लगेच सावरते आणि स्वतःला त्याच्यापासून दूर करते..

माधव पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला बोलतो,"ह्यावेळी नाही..आता हा हात मी कधीचं सोडणार नाहीये..मला माहितीये मी खोटं बोललो..अपघाताचं ते नाटक केलं म्हणून तू चिडलीये माझ्यावर..पण तू जाणार होतीस परत मला सोडुन..आणि मला दुसरा कोणता मार्ग नाही दिसला..काही करुन तूला थांबवायचं होतं..पण झालं उलटचं तू जास्तचं चिडली..त्यापेक्षा माझा खरचं अपघात व्हायला हवा होता..",माधव बोलतो.. 

"काहीही काय बोलतोय तू..तूला काय झालं असतं तर माझं काय..",तेवढं बोलून सखी थांबते..

"थांबलीस का?...खूप वाट बघीतली आहे मी हे सगळं ऐकण्यासाठी..आज नको ना थांबूस..",माधव बोलतो..

"सगळं बोलूनचं दाखवलं पाहीजे का??.",सखी बोलते.. 

"हो..आज बोलावचं लागेल..",माधव बोलतो.. 


"मनातलं गुपित आज ओठांवर आण ना.. 

अधूरी आपली कविता आज पुर्ण कर ना.."


"व्वा..मस्त आहे हा कविता..कोणासाठी आहे पण??..तूझ्या त्या कथेतल्या मैत्रीतल्या प्रेयसीसाठी.. ",सखी खळखळून हसते..माधव तिला जोरात स्वतःकडे ओढतो..ती थोडी घाबरते..त्याच्यापासून दूर व्हायला लागते पण तो तिला जास्तच जवळ ओढतो..सखी शहारून जाते..ती तिचे डोळे मिटते..दोघेही खूप जवळ असतात..दोघांनाही ऐकमेकांच्या श्वासांचे आवाज ऐकू येत असतात.. माधव तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो..सखी लाजते..


"माधव,मला माहीती आहे मी खरचं खूप चुकीचं वागलीये..जर तेव्हा मी तुझं ऐकुन घेतलं असतं तर आपण दूर झालोचं नसतो..पण तुझ्यापासून दूर असले तरी तूचं असायचा रे कायम सगळीकडे..माझ्यातचं असायचा तू..माझ्या प्रत्येक कवितेतही फक्त तूचं असतोस..खरतरं माझ्यासाठी कविता म्हणजे तूचं आहेस..दिर्घ कविता झालायस आता तू माझी..शब्दही कमी पडतात तूझ्यासाठी लिहायला लागल्यावर..


"माझ्यासाठी माझी कविता म्हणजे तू..

शब्दांची लय तू आणि त्याचा अर्थही तू..

शब्दांचा गंध तू आणि त्याचा रंगही तू.. 

शब्दांची ऊब तू आणि त्याची ओलही तू..

शब्दांचे गीत तू आणि त्याचा तालही तू..

शब्दांचा ध्यास तू आणि त्याची आसही तू.. 

माझ्यासाठी माझी कविता म्हणजे तू.."


माझी पहिली कविताही तूझ्यासाठी होती आणि शेवटची कविताही फक्त तूझ्यासाठीचं असेल..मी तूला वचन देते कि आता मी कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही..",सखी बोलते..तिची कविता आणि तिचं बोलणं ऐकून माधवच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं..दोघांचेही हात ऐकमेकांच्या हातात असतात..


"मी तूला जाऊनचं देणार नाहीये..आयुष्याचा प्रत्येक क्षण, सगळी सुखं सगळी दुःख तुझा हात हातात घेऊन जगायची आहेत..तूझ्या नावानंतर मला माझं नाव लावायचं आहे..माझा प्रत्येक दिवस तूझा चेहरा बघून सुरू करायचा आहे आणि प्रत्येक रात्र तूझ्या मिठीत घालवायची आहे..रोज ईथे येऊन तूझ्यासोबत असाचं सुर्यास्त बघायचा आहे..कधी मी गाठ झोपलो असताना माझ्या कपाळावर ओठ टेकवताना तूला अनुभवायचं आहे..तूझ्या ओल्या केसांचा तो सुगंध स्वतःमध्ये सामावून घ्यायचा आहे..आयुष्यभर फक्त तूझाचं बनुन रहायचं आहे फक्त तूझा..तू पण फक्त माझीचं बनून राहशील ना?? ",माधव बोलतो..सखीच्या डोळ्यात पाणी येतं पण आनंदाने..ज्या क्षणाची तिने इतकी वाट बघितली होती..माधवकडून हे सगळं ऐकण्यासाठी तिचे कान तरसले होते आणि आज तो क्षण आला होता..माधव उत्तराच्या अपेक्षेने तिच्याकडे बघत असतो..पण सखी खूप शांत असते..ती त्याच्याकडे बघते आणि पुन्हा त्याला मिठी मारते..आणि माधवला त्याचं उत्तर मिळतं..दोघे बराचवेळ एकमेकांच्या मिठीत असतात..माधवची मैत्रीतली प्रेयसी कायमची त्याची झालेली असते फक्त त्याची..आणि सखीला तिचा माधव मिळालेला असतो..आज त्यांच्या मैत्रीतल्या प्रेमाची एक नवीन सुरूवात झालेली असते.. 


"त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिने नजरेनेचं दिले होते.. 

शब्द बोलत नसले तरी श्वास खूपकाही बोलत होते.. 

तो तिला आणि ती त्याला आज नव्याने भेटले होते.. 

आसुसलेल्या दोन मनांचे अंतर आज मिटले




Rate this content
Log in

Similar marathi story from Romance