Deeplaxmi Jadhav

Inspirational

2  

Deeplaxmi Jadhav

Inspirational

जिवंत आहेस ना

जिवंत आहेस ना

3 mins
285


काही महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला..  एका दुपारी फोनची रिंग वाजत होती.. स्क्रीनवर नाव पाहून चेहऱ्यावर स्मित येते (फोन माझी जिवलग मैत्रीण अंजलीचा... डॉ. अंजली ढमढेरे) आणि फोन घेऊन "हॅलो" म्हणायचा अवकाश की पलीकडून तोफगोळ्यांचा भडीमार व्हावा तसे शब्द कानावर येऊन आदळतात, "काय गं दिपाडे.. जिवंत आहेस ना? का गेलीस वरती.. काही फोन नाही काही नाही."


यावर हसून माझा रिप्लाय,  "इतक्यात काय जाते गं मी वरती आणि मेसेज आहेत की सुरू आपले..."


त्यावर तिकडून प्रतिटोला, "मेसेज काय गं.. तिकडून कोण टाईप करते आहे आपल्याला काय कळतंय.. दोन मिनिट बोललं की बरं वाटतं.. मोकळं वाटतं जरा,  म्हणून म्हटलं फोनच करावा चुकून वर गेली असली तर तुझ्या नवऱ्याला आम्हा मैत्रिणींचा तेवढा आधार नाही का गं?"


तिच्या या आगाऊ बोलण्यावर दोघीही गडगडाटी हास्य करतो. गप्पांची गाडी मग चेष्टा-मस्करीवरून ख्याली-खुशालीवर.. आणि त्यानंतर संसारातल्या सुख-दुःखांवर येते. एकमेकींच्या सुखाचे कौतुक होते, दुःखावर फुंकर घातली जाते.. आणि त्या चार-पाच मिनिटानंतर मोकळं वाटायला लागतं.


हा प्रसंग आठवण्याचं कारण-नुकतीच घडलेली सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना!!  ही धक्कादायक बातमी आली.. त्यावर जनसामान्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या.. कारणांचा ऊहापोह झाला, मनोविश्लेषकांनी-तज्ज्ञांनी आपली मते मांडली, थोडक्यात काय समाजमन ढवळून निघाले. निघायलाच हवे.. समाज जिवंत असल्याचे ते एक लक्षण आहे.


"आपल्याला काय त्याचे?" ही मृतवत उदासीन मानसिकता काही कामाची नसते.  आज सोशल मीडियावर भरमसाठ मित्र-मैत्रिणी, मैत्रीच्या व्याख्या, quotes यांची इतकी गर्दी असते.. पण जर काही ठराविक काळ तुम्ही या सर्वांपासून दूर गेलात तर किती जण तुमची फोन करून चौकशी करतात? आणि जे करतात तेच खरे तुमचे मित्र!


माणूस वयाने, अधिकाराने, मानाने कितीही मोठा झाला तरी व्यक्त होणं, भावनिक आधार हवा असणे, सक्षम मानसिकता असणे या त्याच्या मूलभूत मानसिक गरजा असतात.  या संदर्भात मला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचं एक वाक्य नेहमी आठवतं ते म्हणतात, "You are not alone." हे नेहमी लक्षात ठेवावे. काळजी, चिंता, नैराश्य, उदासीनता, अनारोग्य, आर्थिक विवंचना, नातेसंबंधात तणाव यापैकी कोणत्याही समस्येने ग्रस्त असताना स्वतःला नेहमी समजावत राहा.. You are not alone.


आपल्यासारखीच किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेची दुःखे लोकांना असतात आणि कित्येक जण त्यावर यशस्वीपणे मात करून पुढे जातात. ते दुःख कुरवाळत स्वतःला कमकुवत करण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करून सक्षम होतात. नुकतेच Adversity quotient बद्दल वाचलं. जसे IQ (intelligent Quotient), EQ (Emotional Quotient), SQ (Social Quotient) महत्त्वाचे असतात तसेच सध्याच्या काळात या rat race मध्ये AQ खूप महत्त्वाचा आहे.  AQ म्हणजे the measure of your ability to go through a tough patch in life and come out without losing your mind.  हा tough patch सर्वांच्याच आयुष्यात येतो. पण तो हँडल करणे, तो कमकुवत, खचलेल्या मानसिकतेचा.. एक क्षण सांभाळणे खूप महत्त्वाचे असते. आजच्या घडीला सक्षम राहायचं असेल तर AQ strong करणं मला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं.


तो स्ट्राँग करण्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं, मेडिटेशन करणे, मोजकेच पण चांगले मित्र जोडणे-असे मित्र जे आपल्या व्यक्त होण्याचं भांडवल करणार नाहीत तर त्याचं खासगीपण जपतील.. अशा मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवणे, जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील.  या घडलेल्या आत्महत्येच्या घटनेबद्दल ऊहापोह करणे किंवा मनोविश्लेषण करण्याइतका माझा अभ्यास नाही पण बर्‍याच दिवसांच्या शांततेवर हक्काने रागावून "जिवंत आहेस ना" असा टोकाचा धीट प्रश्न विचारणारे मित्र-मैत्रिणी मात्र असायलाच हवेत.. हे मला नक्की सांगायचे आहे.


शेवटी काय आयुष्यात आव्हाने ही असायचीच पण.. त्यांना उत्तर देताना विंदा करंदीकर यांनी सांगितल्याप्रमाणे द्यायला काय हरकत आहे..


असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये  आयुष्याला द्यावे उत्तर


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational