Akash Kokate

Tragedy

5.0  

Akash Kokate

Tragedy

"दिवस ऊन पावसाचे"

"दिवस ऊन पावसाचे"

6 mins
16.8K


मला तो दिवस आजही आठवतो जेंव्हा मी माझी पहिली वहिली नोकरी करण्यासाठी पुण्याला निघालो होतो आणि मला निरोप द्यायला माझे आई-वडील, मावशी-काका,आतेभाऊ, मामेभाऊ(सागर),चुलत भाऊ असा फौजफाटा होता,माझ्या माऊली ने तर गंगा जमुनेला डोळ्यातून वाट मोकळी करून दिली..हे पाहून मला पण खूप गहिवरून आलं होतं..मग पुण्याला जाणारी बस लागली..आणि मी सगळ्यांचा निरोप घेऊन जड पावलांनी बस मध्ये चढलो.. "हा सीमेवर लढायला चाललाय की काय" असे सहप्रवाशांचे चेहऱ्यावरील हावभाव त्या बस मधील पिवळ्या मंद प्रकाशात मी अचूक टिपले..खिडकीतून नातेवाईकांना हात हलवताना माझ्या मनात holiday चित्रपटाचं "नैना अश्क ना हो.."हे गाणं निनादत होतं आणि त्या गाण्यातले आपण परिस्थितीजन्य का होईना पण "अक्षयकुमार" होण्याची भावना

मनाला एक वेगळंच समाधान देऊन जात होती..

मुलगी जेंव्हा पहिल्यांदा सासरी जायला निघते तेंव्हा तिच्यासोबत जशी "पाठराखीण" पाठवतात तसं माझ्यासोबत माझा मामेभाऊ सागर ला पाठवलं होतं...सागर माझा मामेभाऊ कमी आणि जिवलग मित्र जास्त आहे..आम्ही दोघांनी पण एकमेकांचे चांगले-वाईट दिवस खूप जवळून पाहिले होते..गाडीने वेग धरला तशा आमच्या गप्पांची मैफिल सुरू झाली.. मी:"अरे यार सागर,मी एवढया प्रतिष्ठित कॉलेज मधून B.Tech पूर्ण केलं आणि फक्त ६००० रु. पगाराची नोकरी करणार..मला तर लै टेन्शन येतंय..लोक काय म्हणतील??

सागर:(एकदम गंभीर स्वरात) "हे बघ आकाश,तू 'जगा'चा विचार करू नको,बिनधास्त तांब्याने पाणी पी.."

आणि टाळी देत हसत सुटला..आणि मीही 'दुसरा काही पर्याय नसल्यामुळे' हसण्यात सामील झालो..

परत गप्पा सुरु झाल्या..

मी:"सागर,जगा हुन आठवलं..जगात पाणी नसेल तर आपण काय म्हणायला पजिजे.."

सागर:(जास्त विचार न करता)" काय?"

मी:"जग सुना सुना सुना लागे रे" परत हशा पिकला..

सागर:"अरे हो,सुना हुन आठवलं सध्या bollywood मध्ये 'सासू' वरचं गाणं खूप गाजतंय..!"

मी:(चमत्कारिक उत्तराची अपेक्षा असल्याने जास्त विचार न करता)"कोणतं रे?"

सागर:"सास मे तेरी सास मिली तो मुझे सास आई..मुझे सास आई"

परत हस्यकल्लोळ

मी:"अरे ह्या गाण्यात "आई" पण आहे..विशेष म्हणजे सुनेने(कतरीना कैफ) दोघींना पण गाण्यात स्थान देऊन सुवर्णमध्य साधला आहे"

सागर:And "Wheel स्मार्ट सुनबाई" अवॉर्ड गोज टू कतरिना बाई"

हसण्याचा आवाज द्विगुणित झाला आणि आमच्या बाजूच्या सीट वर बसलेल्या मावशींनी आम्हाला "तुंबलेल्या म्हशीसारखं" बघीतलं.. तरीही आम्ही हसतंच होतो..

असा आमचा 'सफर' सुरू होता..आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुळे हा सफर इंग्रजीतल्या सफर(Suffer) मध्ये परिवर्तित झाला होता...

ह्या गप्पांमुळे मनावर आलेले निराशेचे मळभ हटले होते

गप्पा मारता मारता कधी डोळा लागला कळलंच नाही..

सकाळी ७:३० वाजता आम्ही पुण्यनगरीत पोहोचलो.. आणि पुणेरी अपमान पचवण्याची मनाची तय्यारी केली.

आम्ही माझ्या Engineering च्या वर्गमित्रांकडे थांबलो होतो..

त्या मित्रांपैकी एकजण कॉलेज ला असताना सगळ्यांना व्हिडिओ गाणी,Movies डाऊनलोड करून द्यायचा त्यामुळे आम्ही त्याचं नाव " Dawnloader" ठेवलं होतं...

त्या आमच्या बेशिस्त मित्राने Gel लावून केसांना मात्र बरोबर शिस्त लावली होती..

आम्ही ज्या मित्राकडे गेलो होतो त्या मित्राच्या 1 BHK फ्लॅट मध्ये ९ जण राहत होते..दुपारी जेवण केल्यानंतर सर्वजण असे काही झोपले होते की तो फ्लॅट कमी आणि निर्वासितांची छावणी जास्त वाटत होती.

शेवटी तो दिवस उजाडलाच.. माझा पहिला दिवस ऑफीस मध्ये जाण्याचा..मी तेंव्हा शिवाजीनगर ला मित्राकडे होतो आणि माझी कंपनी हडपसर ला होती..त्यामुळे सकाळी जरा लवकरच उठलो.. त्या फ्लॅट वर अंघोळीला नंबर लावणे हे नोट बंदीच्या काळात ATM मधून पैसे काढण्याहून अवघड होते..तरी ते दिव्य मी लीलया पार पाडलं..

सागर त्याच्या मित्राकडे गेला..आणि मी हडपसर ला जाण्यासाठी निघालो..शिवाजीनगर हून एकही बस हडपसर ला जात नव्हती..१० मिनिटांनी मी एका गृहस्थाला विचारलं तर त्याने सांगितलं "आज "पालखी सोहळा" आहे त्यामुळे शिवाजीनगरहुन बस नाही मिळणार..तुम्हाला म.न.पा. ला जावं लागेल..तिथून बस मिळेल अथवा तुम्ही ऑटो रिक्षा करून पण जाऊ शकता"

ऑटो रिक्षा चा प्रवास खिशाला परवडणारा नव्हता त्यामुळे मी बस ने म.न.पा. ला गेलो आणि तिथून हडपसर ला पोहोचलो..

कंपनीचा पत्ता विचारत विचारत एक सोसायटी मध्ये पोहोचलो..पत्ता तंतोतंत जुळत होता पण कुठेही कंपनीचा बोर्ड दिसत नव्हता..मी तिथे बऱ्याच जणांना त्या कंपणीबद्दल विचारलं पण कोणालाच माहित नव्हतं..शेवटी एक व्यक्ती मला दिसला त्याची देहयष्टी ही 'कुंग फु पांडा' मधील पांडा सारखी होती आणि दिसायला एवढा काळाकुट्ट की कलर गेला तर पैसे वापस..मी घामाने डबडबलेला होतो..मी हातरुमालाने घाम टिपत त्या व्यक्तीला अडवलं आणि विचारलं..

मी:"Excuse me काका तुम्हाला ही कंपनी कुठे आहे माहिती आहे का..पत्ता तर इथलाच आहे..पण कुठे बोर्ड दिसत नाहीये कंपनीचा"

तो गृहस्थ:(एका अपार्टमेंटच्या दिशेने बोट दाखवत)हीच आहे ना..नवीन Joinee आहेस का?"

मी:" हो"

तो गृहस्थ: "चल मग माझ्यासोबत".

असं म्हणून तो मला त्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर घेऊन गेला..लिफ्ट नसल्यामुळे चालत जाव लागलं..

शेवटी मला त्या कंपनीचा बोर्ड(बोर्ड म्हणण्यापेक्षा त्याला 'पाटी'च म्हणलेलं बरं कारण..ती 'सुविचाराच्या पाटी' लाही लाजवेल एवढी छोटी होती) आणि त्या पाटीवरची कंपनीचं नाव सोडून बाकी काही वाचायचं असेल तर भिंग वापरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता😂.

मी आत प्रवेश केला..तर तेथे २ रुम होत्या..एका रूममध्ये २ संगणक आणि एका संगणकावर ३ असे ६ जण बसले होते..आणि दुसऱ्या रूम मध्ये 3 कंपार्टमेंट होते..एकावर लिहिलं होतं HR, दुसऱ्यावर लिहिलं होतं Accounts आणि तिसऱ्यावर लिहिलं होतं Managing Director (MD)..

जो गृहस्थ मला वर घेऊन आला होता त्याने सगळ्यांना एकत्र जमवले आणि म्हटले "Good Morning Friends, He is the new Joinee" तेंव्हा सगळेजण 'निर्विकार' चेहरा करून माझ्याकडे पाहत होते.. जणू ते म्हणत होते की "कशाला आलास रे??"

त्यानंतर तो गृहस्थ माझ्याजवळ बसला..मी त्यांना विचारलं.."तुम्ही इथं काम करता का?"

त्यावर तो जोरात हसला आणि म्हणाला मीच ह्या कंपनीचा MD आहे..तेंव्हा मला वाटत होतं की 'कोणीतरी मला उठवेल "अरे उठला नाही का अजून, उठ ऑफिस ला नाही जायचं का?"आणि मी खुश होईल की अरे हे तर स्वप्न होतं.. पण तसं काही नव्हतं.. मी स्वतःला चिमटा घेतला..तर तो चिमटा एवढा जोरात बसला की पुढचे 2 दिवस माझ्या मनाप्रमाणे हात पण दुखत होता..😢"

मग त्यांनी मला कंपनीची POLICY सांगितली..पहिले ३ महिने बिनपगारी काम करावं लागेल,गरज पडली तर मार्केटिंग पण करावी लागेल आशा जाचक अटींची शृंखलाच सुरू झाली..तरीही मी मनाचा पक्का निश्चय केल्यामुळे सगळ्या अटी मान्य केल्या..तेवढ्यात Lunch Break झाला..जेवण झाल्यावर तो(MD) माझ्याजवळ आला आणि पाणी पीत मला त्याने विचारलं की "तुझ्याकडे पासपोर्ट तर असेलच ना??" मला दिवसा तारे दिसले..मी भीत भीतच म्हटलं "नाही सर..!" हे ऐकल्यावर त्याची reaction अशी होती जशी मी त्याला "डांबरमॅन" म्हणालो.."अरे असं कसं करता तुम्ही..जा पहिल्यांदा पासपोर्ट काढून या..आणि नंतर जॉईन करा" मी ही जास्त आढेवेढे न घेता तिथून निघालो ते मनाचा निर्धार करूनच..

पहिला दिवसच शेवटचा ठरला होता..आई-पप्पाचे मला निरोप देतानाचे चेहरे नजरे समोरून हटत नव्हते..मनात विचारांचे काहूर माजले होते.. घरी परत कसा जाऊ?..काय सांगू जाऊन?..वगैरे वगैरे..

बस स्टँड वर आलो हडपसरच्या तर शिवाजी नगर ला जायला एकही बस नव्हती.."पालखी मुळे"..खिशातून मोबाईल काढला सागर ला कॉल करावा म्हणून तर फोन dead.. करावं तरी काय..काही सुचत नव्हतं..मला नंबर पाठ होता त्याचा..म्हणून एकाला विनंती करून त्याचा मोबाईल वापरून त्याला कॉल केला आणि म्हटलं आपल्याला निघायचं आहे आजच..तो ही अवाक झाला..पण तेवढा वेळ नव्हता सगळं सांगायला..मी फक्त त्याला म्हटलं मी शिवाजी नगरला येतोय..तू थांब बस स्टँड बाहेर..बस एवढंच बोलणं झालं..मग एक रीक्षा केली तो म्हणाला सगळे मुख्य रस्ते ब्लॉक आहेत आपल्याला गल्ल्या बोळ्याने जावे लागेल मी निःशब्द झालो होतो मी फक्त मान डोलावली..

तो मला घेऊन निघाला..शिवाजीनगर ला पोहोचलो तर संपूर्ण रस्ता वारकऱ्यांनी फुलून गेला..आणि विठू माऊली कृपेने मला सागर दिसला..तो पालखीचे नयनरम्य दृश्ये त्याच्या नव्या मोबाईल मध्ये कैद करत होता..मी हाक मारली..आणी त्याला भेटलो..काय बरं वाटत होतं..मग मी त्याला सर्व कहाणी सांगितली..त्याने मला घरी कळवायला सांगितले..पण मला भीती वाटत होती की..घरचे कसे react करतील.. पण मी तेंव्हा हिम्मत केली आणि घरी सगळं इतिवृत्तान्त सांगितला..तेंव्हा वडिलांनी मला एवढंच सांगितलं की "अरे नाराज होऊ नकोस,हा तुला भेटलेला शेवटचा चान्स होता का.. अशा खूप संधी मिळतील तुला..आणि तुझ्या नशिबात याहून चांगलं लिहिलं असेल..तू टेन्शन घेऊ नकोस..बिनधास्त घरी ये.आणि खाऊन घ्या काहीतरी..Hello ऐकतोयस ना आकाश?..Hello..!"मला काहीही बोलता येत नव्हतं..मी अश्रू रोखू शकलो नाही.."हो" एवढंच म्हणून मी फोन ठेवला.. आणि सागरला आपण रडलोत हे कळू नये म्हणून रुमालाने अश्रु टिपूनच त्याच्याकडे गेलो..त्याने पण लगेच ओळखलं..पण त्याने विषय बदलला..

सागर:"काय मस्त आहे ना इथलं वातावरण एकदम भक्तिमय"

मी मान डोलावली..

सागर:(मला बोलतं करण्यासाठी)"तुला माहीत आहे का..bollywood ची सगळ्यात विठ्ठल भक्त अभिनेत्री कोणती?"

मी:(मिश्किल हसत) "कोण??"

सागर: अरे असं काय करतोस..तुझी आवडती अभिनेत्री.. जेनेलिया..!

मी:काही काय रे..

सागर: अरे हो..ती गाण्यात म्हणते ना..'मैं वारी जावा..मैं वारी जावा'

जोरात टाळी देत हसत सुटतो..आणि मी ही त्यात सामील होतो..

निराशेचे काळे ढग तेंव्हाच दूर झाले होते..आशेचे नवी किरणे साद घालत होती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy