Sunita madhukar patil

Tragedy Others

3  

Sunita madhukar patil

Tragedy Others

आणि तिचं वाट पाहणं संपल...कायमचं !!! (भाग - २ अंतिम )

आणि तिचं वाट पाहणं संपल...कायमचं !!! (भाग - २ अंतिम )

3 mins
76


( भाग - २ )


 राजन सुट्टीवर आला असता गीताला डोकेदुखीचा भयंकर त्रास सुरू झाला, राजननी तिला गावातीलच दवाखान्यात नेऊन डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांना तिच्या तब्येतिविषयी माहीत होतं, त्यांनी तिला चांगल्या न्यूरॉलॉजिस्टला दाखवण्याचा सल्ला दिला. CT scan करून घ्यायला सांगितलं होतं. " माझी सुट्टी संपत आली आहे पुढच्या वेळेस सुट्टी आलो की नक्की चांगल्या डॉक्टरांकडे तुला घेऊन जाईन," अस राजननी गीताला सांगितलं आणि तो परत नोकरीच्या ठिकाणी निघून गेला. दिवसांमागून दिवस सरत होते. गीता आणि राजनची मुलं ही आता मोठी झाली होती. मुलगा बारावी तर मुलगी दहावीत शिकत होती. सासुसासरे ही वयोमानानुसार काही वर्षाच्या अंतराने एकापाठोपाठ देवाघरी गेले होते. तिने सगळी जवाबदारी अगदी चोख पार पडली होती. तिने तिचं कर्तव्य निभावण्यात कुठेच कुचराई केली नव्हती. आता फक्त मुलांची जवाबदारी होती. ती जवाबदरीही आपण राजनच्या सोबतीने व्यवस्थित पार पाडू याची खात्री होती तिला. 

आयुष्याची संध्याकाळ तरी राजनच्या सोबतीने छान व्यतीत करू अशी वेडी आशा होती तिला. पूर्ण आयुष्य तिनं दुसऱ्यांसाठीच वेचलं होतं. पण सासुसासरे गेल्यानंतर ही " मुलांची शिक्षण गावी झाली, ते लवकर शहरातील वातावरणात रुळणार नाहीत, त्यांची दहावी, बारावीची निर्णायक वर्ष आहेत, मध्येच शाळा, कॉलेज बदलले तर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल." तेंव्हा त्यांना तिथेच गावी शिकवू म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी परत तिला राजननी गावी एकटी राहण्यास भाग पाडले. दिवसेंदिवस तिची तब्येत जास्तच ढासळू लागली. डोकेदुखीचा अटॅक आला की ती गडगडा लोळायची. डोकं आता फुटतंय की काय असं तिला वाटायचं. पण करणार काय ? सगळ्यांनीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं होत. 

मुलाचं इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला राजननी MBA करण्यासाठी परदेशात पाठवलं. मुलीच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न करून दिल. आता तर ती पूर्णपणे एकटी पडली होती. एकटेपणा तिला खायला उठे, रात्री तिला झोप येत नसे. मनात विचारांचं काहुर दाटे. कित्येक रात्री तिने जागून काढल्या होत्या. " आता तरी राजन मला सोबत घेऊन जाईल, तो ही तिकडे एकटाच आहे आणि मी इथे...आता कुठल्या जवाबदरीच ओझं ही राहिलं नाही..." हेच सगळे विचार तिच्या डोक्यात थैमान घाली. तिने कित्येक वेळा राजनला ह्याबद्दल विचारलं देखील होतं. पण प्रत्येक वेळी तो काही ना काही कारण सांगून तिला टाळतच होता. 

या सगळ्यात तिचा एकटेपणा इतका वाढत गेला की या एकटेपणात तिला कोणाचीच साथ नव्हती आणि या एकटेपणात तिला साथ होती ती फक्त गडद अंधाराची... चार भिंतीत ती एखाद्या कैद्या प्रमाणे अडकली होती...मग डोक्यात प्रश्नाचं चक्र सुरू होई, प्रश्न स्वतःच्या अस्तित्वाचा... मनात सलणाऱ्या कटू आठवणी...कारण एकच !!! सोबत नव्हता तो आपला हक्काचा माणूस...सोपं नसतं ना हो एकटेपणाचा ओझं कवेत घेऊन फिरणं... आणि याच एकटेपणाचा आज स्फोट झाला होता आणि अंतही . ती हे जग सोडून गेली होती कायमची आणि हे जग सोडताना देखील तिला सोबत होती एकटेपणाची, एकटेपणाच्या गर्द अंधारात ती हरवली होती कायमची. आणि आज खऱ्या अर्थाने तिचं वाट पाहणं संपलं होतं... कायमचं!!!

तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं... गीताच्या या अवस्थेला कोण किंवा काय कारणीभुत आहे, मला नक्की कळवा... एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेंव्हा तिने खुप स्वप्न बघितलेली असतात. लग्नानंतर तीच संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱ्या अपेक्षा, बंधन, कुटुंबाची परंपरा जपत सासरच्या लोकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करते. सगळ्या जवाबदऱ्या अगदी प्रेमाने पार पाडते. सगळ्यांना आपलंसं करून घेते. ती संपूर्ण कुटुंबाला आपलंस करून घेते. मग सासरच्यांची आपल्या सुनेच्या प्रति काही कर्तव्य असतात का नाही. निदान तिला एक माणूस म्हणून तरी योग्य वागणूक मिळावी एवढी माफक अपेक्षा असणे पण गैर आहे काय ? महिला जास्त भावुक असतात. त्यांच्यात पुरुषांपेक्षा सहनशक्ती जास्त असली तरी तिच्या सहनशीलतेचा अंत कधी ना कधी होतोच.


वाळवंटातील वादळ म्हणजे,

एकटेपणा...

झंझावात एकट्यानं येणं आणि,

सारं काही हिरावून नेणं...

खुणा सोडून जाणं

मनाला सलणाऱ्या आठवणींच्या...


दुःखाचे सावट म्हणजे,

एकटेपणा...

गडद अंधारात वाट हरवणं आणि,

अस्तित्वाचा शोध न लागणं...

जणु काही धुक्याची चादर पसरणं,

समोर असतानाही काहीच न दिसणं...


पापण्यांवर तरळणारे अश्रु म्हणजे,

एकटेपणा... 

मनात विचारांचं काहुर उठणं आणि,

स्वतःचाच थांग न लागणं...

बोचणाऱ्या आठवणींनी,

रक्तबंबाळ होणं...


© copyright

All rights reserved.


कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासहित शेअर करावी.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy