Sunita madhukar patil

Tragedy Others

4.4  

Sunita madhukar patil

Tragedy Others

आणि तिचं वाट पाहणं संपल...कायमचं !!! - भाग - १

आणि तिचं वाट पाहणं संपल...कायमचं !!! - भाग - १

4 mins
303


गीताताई !!! अहो गीताताई !!! गीताताईंच्या दारात जमलेले शेजारी त्यांना आवाज देत होते. हाका मारत होते. काल दिवसभर गीताताईंना कोणीच पाहिलं नव्हतं. चोवीस तास उलटुन गेले होते. त्यांच्या घराचा दरवाजादेखील आतुन बंद होता. असं कधी घडलं नव्हतं की त्या दिवसभर घरात बसून राहिल्या होत्या कारण त्या एकट्या रहायच्या आणि बोलण्यासाठी, कोणाशी तरी संवाद साधण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी त्या आसुसलेल्या असायच्या. शेजाऱ्यांना थोडी शंका आली. काही विपरीत तर घडलं नसेल ना, कारण त्यांची तब्येत पण आजकाल ढासळतच चालली होती. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून पहिला पण आतुन काहीच प्रतिसाद भेटत नव्हता. हाका मारून पहिल्या पण काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी खुप प्रयत्नांती शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून उघडला आणि ते आत गेले. आत जाऊन पाहतात तर काय!!! गीताताई फरशीवर निपचित पडल्या होत्या आणि हातात त्यांच्या लग्नातील राजनचा आणि त्यांचा फोटो होता. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. पण काही उपयोग झाला नाही. गीताताईंचा मृत्यू होऊन जवळपास दहा ते बारा तास उलटून गेले होते आणि कोणाला काहीच माहीत नव्हतं. गीताताईंनां फार वर्षांपासून भयंकर डोकेदुखीचा त्रास होता. किती तरी वेळा त्या बेहोष देखील झाल्या होत्या. त्यांना CT scan करून घ्यायला सांगितलं होत. पण कोणीही त्यांच्या डोकेदुखीला जास्त महत्त्व देण्याची तसदी घेतली नव्हती. ना स्वतः गीताताईंनी ना त्यांच्या घरच्यांनी. आणि हाच हलगर्जीपणा आज त्यांच्या जीवावर बेतला होता. सगळे शेजारी त्यांच्यासाठी हळहळत होते. तर काही आपापसात कुजबुजत होते. " बिचारी !!! आयुष्यभर नवऱ्याची वाट पहात राहिली...आणि शेवटी जीव सोडला तो ही त्याची वाट पहातच...असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये." 


त्यांच्या मृत्यूची बातमी मुंबईत नोकरी करीत असणाऱ्या त्यांच्या नवऱ्याला राजनला, परदेशात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलाला आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या त्यांच्या मुलीला कळवण्यात आली. त्या एकट्या नव्हत्या, त्यांचा पूर्ण भरलेला परिवार होता. नवरा, मुलगा, मुलगी. त्यांच्या आयुष्यात सगळे असुनही त्या एकट्या होत्या. पूर्ण आयुष्य त्यांनी वाट बघण्यातच घालवले होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं वाट पाहणं संपल होतं...कायमचं!!!

राजनला ही बातमी समजताच तो तातडीने गावी यायला निघाला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी गीताताईंच्या अंत्यसंस्कारांची तयारी करून ठेवली होती. राजन गीताताईंच्या मृतदेहाजवळ बसून हमसून हमसून रडत होता." मला माफ कर गं गीता मी तुझा अपराधी आहे, मी तुला आयुष्यात काहीच नाही देऊ शकलो. फक्त वाट पहायला लावली." मला एक संधी तरी द्यायची होती माझी चूक सुधारण्याची." पण आता काहीच उपयोग नव्हता. त्या जिवंत होत्या तोवर त्यांचं अस्तित्व सर्वांच्या लेखी शून्यच होत. आता रडून आणि पश्चाताप करून काही उपयोग नव्हता... वयाची पन्नाशी उलटलेल्या गीताताई बत्तीस वर्षापूर्वी या घरात लग्न होऊन आल्या आणि या घरच्यांचं होऊन गेल्या. हे घरच त्यांचं विश्व बनलं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. 


अठरा वर्षाची गीता बारावीपर्यंतच शिक्षण. मनाने हळवी, मितभाषी, बघताच क्षणी कोणाच्याही नजरेत भरावी अशी. बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण होताच घरच्यांनी लग्नासाठी स्थळ बघायला सुरवात केली. हुशार कर्तबगार राजनच स्थळ गीतासाठी सांगून आलं. राजनला चांगली सरकारी नोकरी होती, पगार चांगला होता. राजनच्या घरी आईबाबा, एक बहीण आणि लहान भाऊ असा परिवार होता. सगळं छान जुळून आलं होत. गीतालाही राजन आवडला होता. छान थाटामाटात लग्न पार पडलं. लाजरी बुजरी गीता थोड्याच दिवसात आपल्या प्रेमळ स्वभावामुळे सगळ्यांची लाडकी बनली. राजन महिन्याभरातच नोकरीच्या ठिकाणी रवाना झाला. "आई बाबा, लहान बहीण, भावाची जवाबदारी

माझ्यावऱ़ असल्यामुळे मी तुला आत्ताच माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही " अस राजननी गीताला स्पष्ट सांगितलं होतं. गीता सासरी राहून सासुसासऱ्यांची सेवा करत होती. सगळं घर गीतावर अवलंबून होतं. राजन वर्ष दीडवर्षातून गावी सुट्टीवर यायचा. गावची सगळी जवाबदारी गीताच्या खांद्यावर होती. वर्षांमागून वर्ष सरत होती. गीता दोन मुलांची आई बनली होती. अजूनपर्यंत तरी तिचं राजनची वाट पाहणं संपल नव्हतं. " लहान बहीण आणि भावाची लग्न उरकली की आईबाबांची जवाबदारी छोट्या भावावर सोपवून तुला सोबत घेऊन जाईन " अस राजन तिला प्रत्येक वेळी गावी आला की बोलायचा.


हळूहळू मुलं ही मोठी होत होती. आता ती शाळेत जाऊ लागली होती. दरम्यान तिच्या नणंदेच लग्न होऊन ती सासरी गेली होती, आणि दिराला ही आता नोकरी लागली होती. त्याच लग्न झालं की थोडे दिवस तरी त्याच्यावर घरचा भार सोपवून राजनच्या सोबतीने तिला रहायचं होतं. ती वर्ष-दीड वर्ष राजनची वाट पहात एकटीनेच काढायची. संसाराचा गाडा ती एकटीच ओढत होती. राजन फक्त पैसे कमावण्याचे काम करत होता. ह्या सगळ्यात तिची मानसिक कुचंबणा फार व्हायची.  एकटेपणा तिला खायला उठे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम की काय तिला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. तिची डोकेदुखी इतकी भयंकर होती की आता जीव जातोय की काय असं वाटायचं. डोकं दुखायला लागलं की ती वेदनाशामक गोळ्या घ्यायची.


गीताच्या धाकट्या दिराच लग्न थाटामाटात पार पडलं. चला आता थोडे दिवस घराची, सासुसासऱ्यांची जवाबदारी दिरावर सोपवून थोडे दिवस तरी राजन सोबत रहायला भेटणार म्हणून गीता खुप खुश होती. पण इथेही तिच्या नशीबाने तिला साथ दिली नाही. वर्षभरातच तिच्या धाकट्या जावेने दिराचे कान भरून त्याला वेगळे रहायला भाग पाडले. आणि दोघांनी वेगळा संसार थाटला. तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पडलं होतं. ती पार हिरमसून, कोमेजून गेली होती. पण राजनला काहीच फरक पडत नव्हता. सासुसासरे म्हातारे झाले होते. त्यांना शहरातील वातावरण सहन होणार नाही ही सबब सांगून परत गीताला गावी राहण्यासाठी तयार केलं. तिचं राजनची वाट पाहणं काही संपल नव्हतं.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy