आहेर सौभाग्याचा
आहेर सौभाग्याचा
मयुरा नेहमीच हसरी आणि आनंदी जीवन जगणारी मुलगी. सगळ्यांना मदत करण्याचा तिचा स्वभाव पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडावे,अशीच दिसायला देखणी मयुरा. श्रीमंत बापाची लेक असूनही गर्व हा शब्द तिचा डिक्शनरीत शोधूनसुद्धा सापडत नव्हता. राकेश नावाचा मुलगा त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकत असतो. परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण राकेश मात्र परिस्थितीची जाणीव असणारा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी झटणारा. आपले ध्येय मिळवण्यासाठी तो दिवस रात्र एक करत होता.
त्याची प्रत्येक गोष्टीत असणारी जिद्द पाहून मयुरा आणि तिचे इतर मित्र राकेशची खूप मदत करायचे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला राकेश मात्र कोणत्याही गोष्टीत मागे राहत नव्हता. फीस भरण्यापासून ते पुस्तक खरेदी करण्यापर्यंत. सर्व गोष्टीत मित्रांची साथ असल्याने राकेश युनिव्हर्सिटी मध्ये फर्स्ट आला. त्याचा आनंद त्याला मयूरा सोबत सेलिब्रेट करायचा होता. त्याने सर्व मित्र- मैत्रिणींना फोन करून कॉलेजमध्ये बोलावलं, पण मयूराने फोनही रिसिव्ह केला नाही आणि ती भेटायला सुद्धा आली नाही. मित्रांकडुन राकेश ला समजलं त्यादिवशी मयूरची एंगेजमेंट होती. राकेश कोणाला काहीच बोलला नाही, पण आपण मयूराला आपलं तिच्यावर किती प्रेम आहे, हे सांगण्यात जरा उशीर केला असं त्याला वाटलं. पण त्याचं दुसरं मन त्याला बोललं,"अरे आपण किती गरीब, मयुरा किती श्रीमंत आहे. ती आपल्याला हो म्हणू शकली असती का?" आणि ती हो म्हणाली नसती तर, माझी आणि तिची मैत्री सुद्धा संपुष्टात आली असती. आणि मी एक चांगली मैत्रीण गमावली असती. बरे झाले काही बोललो नाही ते. "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं."
एके दिवशी अचानक मयुरा चा राकेश ला फोन आला, तिने तिच्या लग्नाची तारीख आणि विवाह स्थळाचा संपूर्ण पत्ता राकेश ला पाठवला. आणि लग्नाला येण्याचा आग्रह केला. राकेश नाही म्हणू शकला नाही, सर्व मित्रांना घेऊन तो विवाहस्थळी पोहोचला. मयूराला पाहून पुन्हा तिच्या प्रेमात पडाव इतकी मयुरा सुंदर दिसत होती.. आणि "सौंदर्य हे माणसाच्या दृष्टीमध्ये असतं" त्याचप्रमाणे आपल्याला आवडणारी व्यक्ती भलेही रूपाने सुंदर नसली तरी, तिच्या गुणांमुळे आपण तिच्या प्रेमात पडत असतो. स्वतःला मनाला आवर घालत राकेश म्हणाला, "आता मयुरा दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे, तिच्याबद्दल असा विचार करणे पाप आहे. आता आपलं पहिलं प्रेम हरवलं आहे. सर्वजण लग्नाच्या तयारीत मग्न होते अक्षदा ची तयारी जवळ आली होती.
सर्व मित्र मैत्रिणी मयुराच्या लग्न मंडपात एन्जॉय करत होती. दहा मिनिटांनी येणारे कोल्ड्रिंक्स, स्टार्टर्स घेत, शाळेतल्या आठवणीत रमून गेले. शाळेपासून एकत्र शिकणारे आता कॉलेज संपल्यावर मात्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करणार होते. बोलत असतानाच नकळतपणे राकेश च्या तोंडून मयुरा बद्दलचे प्रेम मित्रांसमोर व्यक्त झाले. मित्रांनी राकेश ला सांगितलं, "तू आधी बोलला असता तर ,आम्ही मयूराला तयारच केल असतं, पण जाऊ दे आता तो मयूराला हरवून बसला आहेस. दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. दोघेही सुखी रहा." हीच आमची इच्छा.
मित्र वॉशरूम मध्ये गेले असताना त्यांना मयूराचा होणारा नवरा कोणत्यातरी स्त्रीला बोलत आहे, असे दिसले. नेमके काय असेल दोघांमधले नाते? कारण बोलण्यावरून तर दोघे भांडत आहे असे दिसत होते. आणि अशा मंगल प्रसंगी कोणी भांडत का? हा प्रश्न मित्रांना पडला. आपली मैत्रीण लग्न करून फसली जाणार नाही ना...! तिच्या काळजीपोटी ते त्या स्त्रीमधील व मयुराच्या होणाऱ्या नवरयामधील संभाषण ऐकण्यासाठी तिथेच कोपऱ्यात थांबले आणि त्यांनी ऐकलं, ती बाई मयुराच्या होणाऱ्या नवऱ्याची पहिली बायको होती आणि ती एका मुलाची आई सुद्धा होती. मयुराच्या नवरा हा पैशासाठी मयूराशी लग्न करत होता, हे मित्रांच्या लक्षात आल्याने त्यांनी मयुरा चा नवरा व त्याची पहिली बायको या दोघांचे फोटो काढले आणि त्यांचं संभाषण रेकॉर्ड करून मयुराच्या बाबांकडे धाव घेतली. ते पाहून मयुराच्या बाबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, कारण मयुरा ही एकुलती एक तिला भाऊ नसल्यामुळे बाबांना कोणाचाच आधार नव्हता. आज ह्या मुलांनी आपल्या मुलाची भूमिका पार पाडली म्हणून बाबांनी मुलांना मिठी मारली आणि त्यांचे आभार सुद्धा मानले.
मित्रांपैकी एका मित्राचा भाऊ पोलीस ऑफीसर होता. त्याने भावाला फोन करून सर्व माहिती दिली, भाऊ ही विवाहस्थळी लगेच पोहोचला आणि त्याने मयुराच्या होणार्या फ्रॉड नवर्याला ताब्यात घेतले. मयुराच्या होणाऱ्या नवर्याने ही आपली चूक मान्य केली. मयूरला जेव्हा हे सर्व समजलं, तेव्हा तिने सर्व मित्रांचे खूप खूप आभार मानले. आता मयुराच्या बाबांना समाजाची भीती वाटू लागली. लोक काय म्हणतील..? एवढा खर्च करूनही आपण मुलीचे लग्न करू शकलो नाही, याचं त्यांना वाईट वाटू लागलं. तेव्हा एका मित्राने मयूराला राकेश बद्दल विचारलं, "राकेश तिच्यावर किती प्रेम करतो. हे सांगितलं, तेव्हा मयुरानेही बाबांच्या परवानगीने पहिल्या ठरलेल्या मुहूर्त वेळेला राकेश सोबत सात जन्माची गाठ बांधली. आज राकेशने दिलेला सौभाग्याचा आहेर मयूरासाठी लाख मोलाचा ठरला.