व्याकुळ
व्याकुळ
मी कामानिमित्त काही काळ परदेशात होतो. त्या नितांत सुंदर देशात मी खूप काही शिकलो, पैसा कमावला, चांगले मित्र मिळवले आणि "ती" सुद्धा तेथेच भेटली!
रिबा ला पाहता क्षणी तिच्या सौंदर्याची जणू भुरळ पडली. गोरीपान, लालबुंद गाल, मध्यम बांधा, साधारण उंची, छोटुसे नाक, हलके सोनेरी रेशमी केस आणि बोलके डोळे. नखशिखान्त सुंदर असलेल्या तिचा स्वभाव देखील कमाल होता. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या आसपास असण्यानेही तुम्ही फार सुखवता. रिबाच्या बाबतीत तसेच होते. आम्ही दोन वर्ष सोबत होतो. एकाच कंपनीत. रोजच्या सहवासाने ती मला अधिक अधिक आवडू लागली. इतकी की माझ्या तारुण्य सुलभ भावना मला तिच्याकडे व्यक्त करायच्या होत्या. तिला तसा अंदाज होता. खरंतर तिला ही मी आवडत होतो. ती तसे बोलली नसली तरी कळत होते स्पष्ट. आमच्यात छान मैत्री होती, मोकळेपणा होता. त्याच मोकळेपणाने एकदा तिने मला निश्चयी सुरात सांगितले, "आपण हे नातं पुढे नाही नेऊ शकत. मी विवाहित असून एका छोट्या मुलीची आई देखील आहे" क्षणभर कचरलो मी. पण प्रेम या सगळ्या गोष्टींना कुठे जुमानतय. मला काहीही फरक पडणार नव्हता. मला अगदी मनापासून आवडली होती ती. केवळ सौंदरच नाही तर तिच्यातील "माणूसपण" काळजाला भिडणारे होते.
आमच्यात असे कैक क्षण आलेत ज्यात मी वाहवत जाण्यास उत्सुक होतो. पण तिने दरवेळी संयम राखला. एकदाही मर्यादा ओलांडली नाही. ती मर्यादा जी तिने स्वतः भोवती आखून घेतली होती. आपण विवाहित आहोत, एक आई आहोत याची तिला सदैव जाण असे. परपुरुषात असे मन गुंतणे पाप होते तिच्यासाठी. ज्या युगात स्वैराचार जिथेतीथे बघायला मिळतो त्या युगात ही उच्चशिक्षित, सौंदर्यवती आपल्या तत्वावर ठाम होती. मी खूप प्रयत्न केलेत तिचे मन वळवण्याचे पण ती फार हट्टी होती. आमच्यातील मैत्री मात्र सदैव टवटवीत राहिली.
तेथील वास्तव्याचा माझा काळ संपला होता. मला माझ्या देशी परतायचे होते. रिबा मूळची तिथलीच होती. त्या शेवटच्या रात्री आम्ही एकत्र होतो. माझ्या घरीच. त्या रात्री पहिल्यांदा मी तिला इतक्या जवळून पाहिले. त्या पोषक एकांतातही तिला स्पर्श करण्याची अनुमती तिने मला दिली नाही. माझी तगमग, आसुसलेपण, माझ्या डोळ्यात तिच्या प्रति असलेली तीव्र ओढ बघून तिने मला घट्ट मिठी मारली. हवीहवीशी वाटणारी ती उबदार मिठी सैल करत तिने तिचे नाजूक, सुंदर ओठ माझ्या कपाळी टेकले. त्या नितांत सुंदर क्षणाने दोघेही भारावलो होतो आणि प्रचंड सुखावलोही. नवऱ्या कडून मिळणाऱ्या हक्काच्या सुखाला पारखी असली तरी तिचा तोल कधीही ढळला नाही. इतके संयमी असते कुणी? पण ती होती.
तो देश सोडला तेव्हा तिथलं सगळं तिथेच सोडलं मी. आठवणी फक्त चिकटून राहिल्या मनाला. त्या नंतर आम्ही कधीही भेटलो नाही. फेसबुक वर काय तो संपर्क होता. पण तो ही तातपुरताच. रिबा बद्दल माझ्या बायकोलाही सगळं मी प्रांजळपणे सांगितले. बायको देखील कमाल, तिला माझ्या पूर्वायुष्याशी काहीही देणंघेणं नव्हते. आज तिच्या आयुष्यात असणाऱ्या माझ्यावर तिचा जास्त विश्वास होता. खरेतर अनेक वर्षे झालीत या सगळ्या गोष्टी घडून. माहिती नाही का पण रिबा आज अचानक आठवली. कारण नसताना त्या आठवणींनी मी बैचेन झालो. माहितीय का आठवली रिबा?
का कुणास ठाऊक तिची आठवण आली आज
कळले नाही संदर्भ पण व्याकुळ झालो फार
इतके दिवस जराही विचार नव्हता मनात
आज मात्र अजिबात लक्ष नव्हते कामात
सैरभैर मन भेटी गाठी त्या आठवता
स्तब्ध झालो पुरता कानी शब्द पडता
कुठूनसे कळले तिने घेतला निरोप जगाचा
म्हणूच बहुदा धाडला संदेश मला अखेरचा