शेवटचा क्षण
शेवटचा क्षण
मनुष्याची अंधारात ठेवण्याची कला कदाचित सुर्यालाही अवगत झाली असावी नाहीतर प्रत्येकाच्या आयुष्यात नव-उदय करणारा सुर्य रमेशच्या आयुष्यात का कायमचा अस्त झाला असावा कुणास ठाऊक?
कुणाच्या आयुष्यात असा ही वेळ न यावा की त्याचे आयुष्य सुरु रहावे परंतु त्याचा वेळच थांबावा. भाग्याच्या खेळात प्रत्येक वेळी प्रयत्नांचाच विजय होईल असे भाग्यविधाताने कुणाच्या ही भाग्यात लिहिलेले नाही.
“फक्त तुमच्याच हातुन जेवते, कोणाच्या नशीबात काय लियेल हाय देव जाणे.”
सोबतीच्या वाक्यावर प्रतिक्रिया म्हणून काही क्षणांसाठी डोळे मिटून निर्भावी चेहऱ्याने ज्ञानदेवरावांनी एक दिर्घ श्वास घेउन सोडला.
मंदिर आणि दवाखान्याच्या पायऱ्यांवर प्रार्थना व विनवण्या करुन सुद्धा सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. निरुपयोगी श्रीमंतीच्या एकट्या घरात अथवा मनात पैसे केवळ आवाज देतात शब्द नव्हे ही प्रचिती ज्ञानदेवरावांना आली असावी. रमेश च्या हसण्याऱ्या मोठ्या आवाजासमोर बोलके ही चीर शांती चे पुतळे बनत थरथर कापत.
जणू कित्येक दिवसांपासून पोटी लागलेल्या भुकेचा वणवा अवकाळी पावसाप्रमाने विझवण्यागत रस्त्याच्या कडेला बसलेला रमेश अधाशीपणे एकामागे एक हाताच्या मुठ्ठी ने त्याच्या समोरील वृत्तपत्रावर ठेवलेला भात खाऊ लागला. स्वार्थी मनात खूप काही रहस्य लपवलेले ज्ञानदेवराव कुठलेही नाते संबंध नसताना रोज रमेश साठी जेवन आणतात.
आज चाळीशी गाठलेला परंतु एखाद्या लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर मातीसोबत खेळणाऱ्या रमेशच्या जवळ जाण्यासाठीही खूप मोठी हिम्मत हवी कारण त्याने विक्षिप्ततेची सिमा कधीची गाठली होती. रमेश चे भयावह रुप दिवसा प्रकाशात ही भितीचा आभास देण्यास सक्षम होते.
आजच्या दहा-बारा वर्षांपूर्वी गावातील काही मोजक्या हिम्मतवान व्यक्तिमधील एक रमेश ज्याने त्यावेळी गावात रोज होणाऱ्या चोरीचा छळा लावण्याचा विडा उचलला होता.
प्रत्येकाच्या संकटात धावून येणारा, पैश्यांचा कधीच विचार न करणारा असा दिलदार स्वभावाचा, प्रत्येकात मिळून मिसळून राहणारा एवढा की जेथे गर्दी तेथे तो असा रमेश आज ज्ञानदेवरावां व्यतिरिक्त कुणाला ही आपल्या जवळ थांबू देत नाही. पापाच्या अग्नित कधी भान तर कधी जीव ही जळतो.
प्रत्येक दिव्याखाली एका काळ्या अंधाराचे अस्तित्व नाकारता येत नाही असा विचार करत ज्ञानदेवराव केवळ हतबल उभे होते. ज्ञानदेवरावांनी रमेशला पिण्यासाठी पाणी दिले.
ज्ञानदेवरावांचे रमेशला मदतीचे एक मोठे कारण म्हणजे चांगला असलेल्या रमेशची लोकांसोबत शेवटची भेट ज्ञानदेवरावांच्या एकुलत्या लहान मुलाच्या अंतयात्रेत झाली होती. शेवटी अंत हाच शेवट. प्रत्येक गोष्टीच्या अंताचा एक शेवटचा क्षण ठरलेला असतो. मग तो क्षण प्रकाशमय असो अथवा अंधारमय.
पाण्याची शीशी व प्याला पिशवीत टाकून रमेश कडे एक दृष्टी टाकत ज्ञानदेवराव त्यांच्या सोबत्यासह तेथून निघू लागले. ज्ञानदेवरावांच्या सोबतीला असलेल्या रमेश च्या वडीलांनी जातांना परत एक वेळ मागे वळून रमेश कडे बघितले.
त्यावेळी गावातील रोज होणाऱ्या चोरीचा शेवटचा क्षण हा दुसरा तिसरा नसून ज्ञानदेवरावांच्या मुलाचा मृत्यूचा दिवस होता. चोर कोण होता केवळ हाच एक न सुटलेला प्रश्न गावकऱ्यांच्या मनात नेहमी साठी बसला. दयेच्या मूर्तीचे साक्षात दगडाचे रूप बघून बोलायचे तरी काय? सर्वज्ञानी सुर्य रोजप्रमाने आजही सर्व बघत होता परंतु जसा निस्वार्थी मनुष्य तसा दयावान ईश्वर!.