Nilesh Bamne

Tragedy Others

3  

Nilesh Bamne

Tragedy Others

पलीकडे

पलीकडे

2 mins
277


गोरागोमटा गुबगुबीत दिसणारा श्रीमंत घरचा राजू नदीच्या किनाऱ्यावर आपल्या नावेजवळ उभ्या असणाऱ्या नावाड्याला म्हणाला, "नाखवादादा नाखवादादा मला नदीच्या पलीकडे घेऊन जाल का? त्यावर नाखवादादा म्हणाला, तुझ्या सोबत कोणीच नाही तू एकटा तिकडे कशाला जातोयस? त्यावर राजू म्हणाला,"मी त्या समोरच्या बंगल्यात राहतो! त्यावर नाखवा दादा म्हणाला,"म्हणजे तू पाटील साहेबांचा मुलगा, मी तुला घेऊन जाईन पण साहेबांनी सांगितले तरच... त्यावर राजू म्हणाला,"बाबांना सांगून जायचे असते तर मी ड्रायव्हरसोबत नसतो का गेलो. तुम्ही मला पलीकडे घेऊन चला आणि पुन्हा घेऊन या मी तुम्हाला त्याचे पैसे देईन पण बाबांना यातलं काही सांगायचं नाही. त्यावर नाखवा दादा म्हणाला,"तुझं पलीकडे जाण्याचं कारण पटलं तरच मी घेऊन जाईन." त्यावर राजू म्हणाला,"आमच्या बंगल्याच्या गच्चीतून नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर खेळणारी लहान मुले दिसतात पण ती उघडीबोडकी असतात, त्या छोट्याशा झोपडीत राहतात, झोपडीबाहेरच काहीबाही खाताना दिसतात. मी बाबांना म्हणालो, मला तेथे जायचंय तर बाबा म्हणाले ती गरीब लोकं आहेत ! त्यावर मी बाबांना विचारलं ते गरीब का आहेत? त्यावर बाबा म्हणाले, "त्याच्याकडे आपल्यासारखा बंगला नाही, गाडी नाही, कपडे आणि दागदागिने नाहीत, नोकरचाकर नाहीत म्हणून ते गरीब आहेत.

 

आमच्या शाळेतील बाईंनी गरीबी या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला आहे. पण मी निबंध कसा लिहू, मी गरिबी पाहिलीच नाही म्हणून मला ती पाहायची आहे. त्यावर नाखवादादा म्हणाला,"गरिबी तुझ्या डोळ्यांना सहन होणार नाही. पण तरीही मी घेऊन जातो तुला नदी पलीकडच्या किनाऱ्यावर नाखवादादा त्याला पलीकडे घेऊन गेला त्याने त्या झोपड्यांमध्ये गरीबी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. तर त्याला दिसले तेथील लहान मुले छोट्या छोट्या पेन्सिलने पाटीवर अभ्यास करत होते त्याच्या अंगावरील मळके फाटके कपडे अंग झाकण्यासाठी नव्हतेच बहुदा! शाळेचं दप्तर म्हणजे कापडी पिशवी! शाळेचा गणवेश तेवढा न फाटलेला पण मळका होताच! शाळेत डब्यात काय तर रात्रीची शिळी भाकरी! पायात चप्पल नाही... अस्वच्छ वातावरणात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात राहणारे हे गरीब विद्यार्थी आणि त्यांची गरिबी पाहून राजूचे डोळे भरून आले.


तो नाखवादादासोबत पुन्हा पलीकडे गेल्यावर त्याने नखवादादाला पैसे देऊ केले तर ते घ्यायचे नाकारत तो म्हणाला, तुझ्या डोळ्यात गोळा झालेले अश्रू मला पुरेसे आहेत कारण ते अश्रू बरंच काही सांगत आहेत. दुसऱ्या दिवशी राजूने आपल्याजवळ असणारे सर्व जास्तीचे सामान ज्यात कपडे, चपला, बॅगा, खेळणी, वह्या व इतर शालोपयोगी सामान बाबांच्या परवानगीने नाखवादादाला आणून दिले आणि पलीकडे ह्या गरीब मुलांना द्यायला सांगितले. नाखवादादाला खूप आनंद झाला. त्याने राजूला एक प्रश्न विचारला गरीबीवर निबंध लिहिला का? त्यावर राजू म्हणाला हो! गरीबी आणि श्रीमंती एकाच नदीचे दोन किनारे आहेत समांतर सारखे पण दोघांमधील अंतर कधीच कमी होत नाही. ते कोठेच एकत्र का येत नाहीत? ते अंतर कमी करण्याचा मी अट्टाहास करतोय इतकंच... त्यावर नखवादादा गालातल्या गालात गोड हसला आणि त्याने राजूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला... राजू त्याने दिलेले सामान आपल्या नावेतून पलीकडे घेऊन जाणाऱ्या नाखवादादाची वाट पाहात तेथेच किनाऱ्यावर उभा राहिला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy