निकालाचा कालचा दिवस
निकालाचा कालचा दिवस


काल माझा एलएलबीच्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला. सकाळपासून मनात सारखी हुरहूर होती. कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर, परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र. मी अधूनमधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते. घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मितहास्य असलेला फोटो पाहत, नकळत मला माझी वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली.
आजचा तो दिवस आहे ज्याची वाट प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने पाहतो. प्रत्येकाची ती जीवनपरिक्षा असते. तशी माझ्याही विचारांची घालमेल मनात सतत सुरू होती. बाबाचा फोटो पाहून, त्या जीवन परीक्षेबाबत, विचारा-विचारात नकळत आठवले ते दिवस.
मी बारावी पास झाले. मी मेडीकलला जाणारी पण खूप वादळं येऊन गेली आयुष्यात, कारण बाबांचे ठीक दुसऱ्या दिवशी कॅन्सरने निधन झाले. मी बाबाची लाडकी लेक. आयुष्याच नकोसे वाटले होते बाबा गेल्यावर. मग तिथे जीवनाचा काय प्रश्न. मी फक्त बाबाच्या दुःखात बाबांना ओल्या डोळ्यांनी शोधत फिरणारी. पण अश्यात माझा भाऊ याने तो जिथे शिकला त्याच लॉ कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला माझा. माझे वक्तृत्व अतिशय चांगले, त्यामुळे माझ्या आपल्यांना तो निर्णय फार आवडला. मी कॉलजमध्ये जाण्याचे टाळत होते पण आईकडे पाहून परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती तेव्हा कॉलेज सुरू केले. नवीन अभ्यासक्रम हातात पडणारी भलीमोठी पुस्तकं... कॉलेजमधील अभ्यासक्रम शिकून झाला. क्लासमेट नवीन, शिक्षकही नवीन, पण न घाबरता आत्मविश्वासाने मी अभ्यास सुरू केला. पातूर ते अकोला बसने प्रवास करावा लागत असायचा. बस स्टँडवर गेले की बाबाची आठवण यायची. बाबाच्या ओळखीचे लोक दिसायचे. तिथेच नकळत आसवे डोळ्यांतून वाहत असायची. तो रोजचा बसचा प्रवास माझ्या सदैव आठवणींचा राहील, कारण मी सलग तीन वर्षे बसमध्ये माझी आसवे पुसत पुढे गेलेली आहे. बस वेगाने धावायची त्यापेक्षाही वेगाने माझे मन धावायचे बाबांच्या आठवणींमध्ये...
पण दुःखाने व्याकुळ झालेल्या मनाला बाबा गेल्यावर ज्यांनी मला धीर दिला अशी माझी आई, भावंडं आणि माझ्या बाबाचे मित्र मोहन जोशी काका या सर्व लोकांनी मला जो धीर दिला त्या धिरामुळे मी स्वतःला सावरत इथपर्यंत आले, असे मला वाटत होते. विचारा विचारात सकाळ झाली. मी लवकर तयार होऊन नेहमीच्या बस स्टँडवर आले. आजचा तो दिवस आहे जो कसा आला, केव्हा आला, मला कळत नव्हतं, असे मनात विचार चालू होते. मी फार उत्सुक होते निकाल पाहायला. बसमध्ये बसून केव्हा अकोला आला कळलेच नाही.
कॉलेजमध्ये पोहोचताच सर्व मैत्रिणी भेटल्या. माझ्या नवीन प्रकाशित पुस्तकाला खूपखूप शुभेच्छा देत. आमच्या चांडक मॅडमनेही माझे खूप कौतुक केले. सगळंच आधीपेक्षा वेगळं घडत होत. निकाल यावेळी ऑफलाईन लागला होता. त्यामुळे निकाल पहायची आतुरता शिगेला पोचली होती. लवकरच आमचा निकाल मॅडमच्या हाती आला. आम्ही सर्व कॅबिनमध्ये गेलो. सर्वांचा एकामागून एक निकाल कळत होता. आता मॅडमनी माझी मार्कशीट हातात घेतली अन् मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्याचे सांगितले. कॉलेजमध्ये टॉपर येण्याचा आनंद तर होताच पण ह्या क्षणाला माझे नकळत डोळे भरून आले. कारण माझ्या मैत्रिणी त्यांच्या बाबांना कॉल करून निकालाची बातमी देत होत्या. त्यावेळी मला वाटले, आज माझे बाबा असते तर मी फर्स्ट क्लास टॉपर आल्याचे त्यांना किती कौतुक झाले असते. अभिमानाने त्यांनी माझी पाठ थोपटून मला कौतुकाने अॅडव्होकेट म्हणून हाक मारली असती. क्षणभर मी तो निकालाचा कागद पाहत राहिले. ती माझी गेलेली पाच वर्षे आठवत...
तेवढ्यात मैत्रिणीने विचारले, विशाखा तू घरी कॉल नाही केला. मग लगेच भानावर येत माझ्या भावा-बहिणींना कॉल करून सांगत मी ती आनंदाची बातमी त्यांना दिली. सांगताना डोळे भरून आले अन् लगेच कॉल कट केला. सर्वांसारखे माझेही स्वप्न होते, की बाबांचे नाव मोठे करावे अन् त्यावेळी कौतुकाने त्यांनी मला शाबासकी द्यावी. पण मात्र मन ते सदैव सोबत असल्याची जाणीव करून देत होते, कारण जेव्हा मी पेपर द्यायला जायची तेव्हा मैत्रिणीचे बाबा यायचे तेव्हाही माझ्या भोळ्या मनाला मनात बाबा नसल्याची जाणीव व्हायची...
अशी आसवांच्या पुरात माझी पाच वर्षे गेली अन् आज तो निकालाचा दिवस आला... माझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गाथा लिहून गेला हा माझा दुःखाचा प्रवास. या वेळी सोबतीला होत्या माझ्या बाबांच्या आठवणी, माझ्या सोबत आहेत जे मला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त लढ विशाखा असे म्हणतात. कालचा निकालाचा दिवस हा सदैव माझ्या स्मरणात राहील, कारण ती माझ्या जीवनातील पहिली यशाची पायरी मी चढले पण खरे बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला. त्यांच्या आठवणीला जीवननौका करीत... कारण बाबाचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे.