Smita Vivek Agte

Tragedy Inspirational

4  

Smita Vivek Agte

Tragedy Inspirational

माहेर

माहेर

15 mins
412


सरोजिनीताई भराभरा ऑफिसमधून बाहेर पडल्या,आणि अनाथ आश्रमातल्या बायकांना उद्देशून म्हणाल्या,"काय?झाली ना सगळी सभेची तयारी,चला आता पटापट, आत्ता येतील प्रमुख पाहुणे, आपल्या संस्थेला भेट द्यायला." सरोजिनी ताई पुढे जात होत्या तेवढ्यात त्यांना काही आठवलं, आणि परत मागे फिरुन त्या म्हणाल्या," बरं, तुमच्या सगळ्यांमध्ये कोणकोण बोलणार आहेत ते लक्षात आहे ना?"


तशा जयश्री, सुजाता आणि चंदा तिघी त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या पाया पडून म्हणाल्या,"ताई, आम्ही तिघी बोलणार आहोत सभेमध्ये, आणि तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही अगदी छान बोलू, आणि तुमचे आशीर्वाद तर आहेतच की, त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा ताई".


तशा सरोजिनी ताई त्यांच्याजवळ आल्या आणि हसून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या,"मला कसली काळजी असणार गं?, तुम्ही सगळ्याजणी असल्यावर आपला कार्यक्रम अगदी छानच होणार,हो ना?... ठीक आहे चला आता लवकर येतीलच इतक्यात प्रमुख पाहुणे". इतके बोलून त्या स्टेजवरची तयारी पाहण्यासाठी गेल्या.


सगळी तयारी झाली, हार,श्रीफळ,शाली सगळे वेगवेगळ्या ताटांमध्ये ठेवलेले होते, स्टेजची सजावटही छानच केली होती संस्थेतल्या बायकांनी. सगळं पाहून सरोजिनी ताई मनापासून प्रसन्न झाल्या.....


संस्थेमधल्या सगळ्या बायका स्टेजच्या पुढे लायनीत अगदी शिस्तीत बसल्या होत्या!! सरोजिनी ताई आणि काही मोजक्या दोन तीन जणी संस्थेच्या गेटजवळ उभ्या राहून पाहुण्यांची प्रतीक्षा करत होत्या.….


आणि समोरून पाहुण्यांचं आगमन झालं.. प्रमुख पाहुण्या नीला ताई, आणि त्यांचे बाकीचे सहचारी मुख्य दरवाजाजवळ आले, तसे सरोजिनी ताईंनी त्यांचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..


पाहुणे स्टेजवर येऊन स्थानापन्न झाले, तशा सरोजिनी ताई माईक जवळ येऊन स्मित हास्याने बोलू लागल्या... "आपले आजचे आदरणीय पाहुणे आणि पुढे बसलेल्या माझ्या माहेरवाशिणी या सगळ्यांचे मी प्रथम स्वागत करते, आपल्या संस्थेला आज नीला ताईंसारख्या मानसोपचार तज्ज्ञांनी भेट दिली त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते, व आमच्या संस्थेकडून त्यांना शाल व श्रीफळ अर्पण करते, नीला ताईंनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते".


तशा जयश्री आणि सुजाता या दोघींनी लगबगीने सरोजिनी ताईंकडे शाल व श्रीफळ दिले, व सरोजिनी ताईंनी ते नीला ताईंना अर्पण केले. टाळ्यांचा कडकडाट झाला...


नीला ताई दोन शब्द बोलण्यासाठी माईक जवळ आल्या आणि म्हणाल्या, "आदरणीय सरोजिनी ताई आणि समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणी यांची मी आभारी आहे की आज तुम्ही मला थोडा वेळ का होईना तुमच्या या माहेरच्या घरामध्ये सामील करून घेतलं. आज बाईनेच बाईच्या मागे उभे राहणे, तिला संकटाच्या वेळी मदत करणे, तिचं मन खंबीर करण्याची खूप गरज आहे आणि आज ते काम तुमच्या सरोजिनी ताईंनी अगदी लीलया केलेलं आहे, नाही का?, आज त्या तुमच्या पाठीशी उभ्या आहेत, आज अश्या संस्था असल्यामुले सरोजिनी ताईंसारख्या समाजसेविका असल्यामुळे आपल्यासारख्या कित्येक बायकांना जगण्यासाठी निवारा मिळतो आहे, सरोजिनी ताईंच कार्य अगदी वाखाणण्याजोग आहे पण आज समाजात आपल्यासारख्या बायकांवर अशी वेळ येते,की तिला मग तिचं सासर माहेर दोन्हीही तिला पारखी होतात ह्या गोष्टीच खूप वाईट वाटतं, हे कुठेतरी थांबायला नको का? बायकांवर होणारे हे शारीरिक व मानसिक अत्याचार थांबायला हवेतच ना? आपले जन्म दाते आई वडील, सासू सासरे यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी, आज हुंडा नाही दिला, नाहीतर नवऱ्याचं एखाद प्रेम प्रकरण,किंवा घरातली सगळीच काम वाटेल तशी तिच्याकडून करून घेऊन, मोलकरणीसारखी वागणूक देऊन बायकांची खरंच किती विटंबना केली जाते याचा विचारच केला जात नाही, एखाद्या पुरुषाने बाईला घराबाहेर काढताना हा विचार त्याच्या मनात एकदा सुद्धा येत नाही का, की ही आपलं घर, आपले आईवडील या सगळ्यांचा त्याग करून इथे येते तर तिची काळजी घेणं, तिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं करणं, तिला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे, आज ही परिस्थिती माझ्या बहिणीवर,मुलीवरही येऊ शकते हा विचार करायला नको का? ... पण नाही असे विचार अजूनही समाजामध्ये रुजत नाहीयेत, रुजत आहेत ते हे विचार की ही लग्न करून आपलं घरचं काम करायला, आपण म्हणू तसं वागायला इथे आली आहे, तिने आपल्या शब्दाबाहेर जाता काम नये, नाही तर तिला आम्ही घराबाहेर काढू, आणि या सगळ्यामध्ये खंत अशी आहे ही घरात असलेली बाई , मग ती या मुलीची सासू असेल नणंद असेल तर एक बाई असून ती ही दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत नाही आणि मग अशा बायकांना रस्त्यावर यावं लागतं.. हे कुठेतरी थांबायला नको का?, मग आपल्या पासून तरी सुरुवात करायला हवी, एखाद्या बाईच्या मागे एका बाईनेच ठाम पणे उभे राहायला हवे, पण जर अशा बायका अनाथ होत असतील तर त्यांना आपल्यासारख्याच माणुसकी असलेल्या बायकांनीच सावरायला हवं, आपणच त्याच्यासाठी हे काम करायला हवं.!!

जे कार्य तुमच्या सरोजिनी ताई करत आहेत, तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तुम्हीही या कार्याला पुढे न्या आशी माझी तुम्हाला विनंती आहे, आता मी माझे बोलणे थांबवते कारण, आपल्यातल्याच काही मैत्रिणींना बोलायची मला संधी द्यायची आहे, बरोबर ना? नमस्कार!!"


नीला ताई बोलत होत्या आणि सगळे अगदी मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होते.... सरोजिनी ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या,"आज नीला ताई जे काही बोलल्या ते खरंच वास्तव आहे,अजूनही आपल्याकडे एका बाईकडे एकतर ती उपभोगाची वस्तू किंवा घरातली नोकर ह्या दृष्टीनेच बघितलं जातं, पण खरच ज्या बाईच्या वाट्याला असे भोग येऊन बेघर होण्याची वेळ येईल तर तिला ह्या माहेरची दारं कधीही उघडीच असतील!!! आता आपल्यातल्याच काही जणी इथे येऊन दोन शब्द बोलतील".तशी जयश्री माईक पाशी येऊन उभी राहिली...


"जयश्री माझं नाव, इथे येऊन बोलण्याचं भाग्य मला लाभलं आहे हेच खूप आहे माझ्यासाठी...माझं लग्न ठरलं तेव्हा आमच्या घरात खूपच आनंद झाला होता सगळ्यांना, ती माणसे ही चांगली वाटली आमच्याकडे, थोडा हुंडा जास्त मागितला पण वडील म्हणाले की करू काहीतरी, हातचं चांगलं स्थळ जायला नको,पण आता वाटतं की हे मी तेव्हाच थांबवायला हवं होतं, पण मीही लग्न ठरलं या आनंदातच होते पुढचा विचारच केला नाही, भाऊ आणि वहिनी सुद्धा म्हणाले की बघू करू काहीतरी व्यवस्था, वडिलांनी त्या प्रमाणे बरंच कर्ज काढलं... लग्नाच्या दिवशी सगळं छान चाललं असताना, मुहूर्ताच्या वेळी मुलाचे बाबा म्हणाले की हुंडा आम्ही वाढवला आहे, तीन नाही तर पाच लाख द्या नाहीतर हे लग्न होणार नाही.... बाबा खूप अस्वस्थ झाले, आता काय करावं हेच त्यांना सुचेना,मग ते म्हणाले की मी तुमच्या पाया पडतो हो!!वाटल्यास मी दोन तीन दिवसात पैशांची काहीतरी व्यवस्था करीन पण मुहूर्त टळू देऊ नका... शेवटी कसे बसे मुलाकडचे तयार झाले. लग्न होऊन मी सासरी आले पण त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या खोलीत जाऊ दिल नाही, तुझ्या वडिलांनी बाकीचे पैसे दिले की तुमचा संसार सुरू होईल असं नवऱ्याची आई म्हणाली, दोन दिवसांनी बाबा घरी आले दोन लाख घेऊन आणि म्हणाले की आता मात्र मागू नका हेच पैसे मी घर गहाण ठेऊन आणले आहेत.... झालं !!! एकदाचा आमचा संसार सुरू झाला, काही दिवस चांगले गेले, इकडे आईकडे मात्र बाबा आणि भाऊ यांची भांडणं व्हायला लागली, की घर का गहाण ठेवलं, पैसे नाही भरता आले तर घरही जाईल. पण बाबा म्हणाले की मला त्या वेळी जे सुचलं तसं मी केलं रे...

एक वर्ष झालं लग्नाला, बाबांना कर्जाचे हप्ते फेडणं कठीण जात होतं, त्यात घर ही गहाण!!!

रोज विचार करून ते आजारी पडू लागले, आणि एक दिवस छातीत दुखू लागलं ते शेवटचंच...

बाबा गेल्यानंतर परत इकडच्या लोकांच्या मागण्या चालू झाल्या की बाबा गेले आता तुझ्या वाटणीचं जे असेल ते घेऊन ये.

मी आईला सांगितलं की मी नाही जात परत तिकडे,काही नको त्यांना पैसे द्यायला. आई गप्प गप्पच होती, तीनी तिचे काही दागिने मोडून काही पैसे दिले भावाला न सांगता..

मी पैसे घेऊन आले आणि म्हणाले की आता मी माझ्या घरच्यांकडे कधीच पैसे मागणार नाही, पण ते तेवढ्यापुरतंच होतं बहुतेक.

आईची तब्येत माझ्या काळजीने बिघडू लागली होती, त्यात भाऊ आणि वाहिनी पण तिला घर दागिने याबद्दल वाटेल तसे बोलत होते, शेवटी आजारी पडून ती ही गेली!!!

आता या लोकांच्या तर नवीन मागण्या, म्हणे आईचे दागिने मुलगी म्हणून तुलाच मिळायला हवेत, जा घेऊन ये...

मला आता हे सहन झालं नाही आणि एक दिवस मी नकळत त्या घरातून बाहेर पडले परत जायचं नाही असं ठरवून..

भावाकडे आले, त्याला सगळं सांगितलं पण आता तो ही मला ह्या घरात ठेवायला काचकूच करत होता...

शेवटी वाट मिळेल त्या रस्त्याने निघाले, एका देवळाच्या पायथ्याशी बसून मी रडत होते तेव्हाच माझ्या खांद्यावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवला, मी मान वर करून बघितलं तर एक मध्यम वयाच्या बाई माझ्यासमोर उभ्या होत्या, रडण्याचे कारण खोदून खोदून मला विचारत होत्या, त्यांना मी सगळी कहाणी सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या की तुझी इच्छा असेल तर माझ्याबरोबर येशील का तुझ्या माहेराला, मी डोळे पुसून फक्त मानेनेच हो म्हटलं, त्याच या आमच्या सरोजिनी ताई, त्या म्हणाल्या की एक तर तू पहिलं काम करायचं ते म्हणजे यापुढे असं हतबल होऊन रडायचं नाही, तुझं नवीन आयुष्य सुरू झालंय असं समजायचं आणि इथे नुसतं राहायचं नाहीये तर तुला पुढचं शिक्षणही घ्यावं लागेल, स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल,समजलं?....

मी डोळे पुसले पण तरी डोळ्यातून आनंदाने पाणी येतच होतं, मला त्यांनी जवळ घेतले आणि म्हणाल्या की आजपासून मीच तुझी आई...

त्यांनतर मी डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि ताईंच्या ओळखीनेच एका शाळेत शिक्षिका आहे मी आज, पण माझं घर आता एकच माझं माहेर"......


जयश्रीची कहाणी ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तशी सुजाता पुढे आली आणि माईकवर बोलू लागली!!!


"मी सुजाता, माझंही असंच एका घरात लग्न झालं, पण मला जयश्री सारखे आईवडील नव्हते पहिल्यापासूनच, म्हणजे मी लहान असतानाच एका अपघातामध्ये ते दोघेही गेले, त्यावेळी मी माझ्या आत्याकडे होते म्हणून वाचले.

पुढे मग काही दिवस आत्या,काही दिवस मामा अशी माझी वाढवण्यासाठी वाटणी झाली, कारण त्या कोणालाच कायमसाठी अडकून घ्यायचं नव्हतं म्हणे, एकाच गावात असल्यामुळे शाळेचा प्रश्न नव्हता, ते मी दोघांकडूनही जाऊ शकत होते, मग सहा महिने आत्या व सहा महिने मामा असा माझा गावातल्या गावातच प्रवास सुरु असायचा, बरं मी आयतेच खाते असं त्यांचं म्हणणं असावं बहुतेक म्हणनू की काय दोन्ही घरी मला अगदी मोलकरणीसारखी कामे करावी लागत होती, आणि खुप वेळा कारण नसताना मारसुद्धा खावा लागत होता, माझे लोढणे विनाकारण गळ्यात अडकून बसल्याचा हा आत्या आणि मामाचा राग असावा असं मला नेहमी जाणवायचं....

कसंतरी बारावीपर्यंत माझं शिक्षण झालं!!! झालं म्हणजे काय ते शाळेतून मुलींना मोफत होतं म्हणून तरी झालं नाहीतर माझी फी भरायला पैसे नाहीत म्हणून कदाचित मला मामा आणि आत्यानी शाळेत घातलच नसतं!!!

बारावी झाले, आणि आता ही ब्याद लवकर इथून जाऊदे म्हणून मामा आणि आत्यानी माझं लग्न ठरवलं...

लग्न झाल्यावर पहिले काही महिने खरच खुपच छान गेले, मी मनात म्हटलंही की, चला आता तरी माझी परवड होणार नाही. मला आता हक्काची प्रेमाची माणसं मिळाली!!!

काही महिने झाले आणि मला दिवस गेले...

झालं, घरात एकच विषय चघळला जाऊ लागला, सगळे मला रोज रोज एकच ऐकून दाखवू लागले ते म्हणजे आपल्या घरात पहिला मुलगाच झाला पाहिजे बरं का? आम्हाला तुझ्याकडून मुलगाच हवा!!!

पण खात्री करण्यासाठी एक दिवस माझ्या नवऱ्यानं मला त्याच्या ओळखीच्या डॉक्टरकडे नेलं, तिथे काहीतरी तपासण्या झाल्या आणि कळलं की पोटात मुलगीच आहे, मग मला सांगितलं की जे मूल पोटात वाढतंय त्याचा काहीतरी प्रोब्लेम आहे त्यामुळे आपल्याला गर्भपात करावा लागेल नाहीतर जन्माला येऊन त्याला खूप त्रास होईल, मग मी ही तयार झाले कारण एवढं डॉक्टर सांगत आहेत म्हणजे नक्की खरं असेल...

मला गर्भपात करावा लागला, पण घरी आल्यावर सासू म्हणाली की बरं झालं हे केलं ते , मुलीला जन्म द्यावा लागला असता, डॉक्टरांकडुन हे आधीच समजलं ते बर झालं.

तेव्हा मला काय खर आहे ते समजलं की मुलगी नको म्हणून खोटं सांगून मला हे पाप करायला भाग पाडलं...

काही महिन्यांनी मला परत दिवस राहिले, आता मला संशय येईल म्हणून नवऱ्याने डॉक्टर बदलला, आणि फक्त मला कळू न देता गर्भजल चिकित्सा केली...

परत मुलगीच आहे हे लक्ष्यात आलं माझ्या. कारण या वेळीही नवरा असंच काही तरी बोलायला लागला की मुलगा हवा होता पण नशीबच फुटकं आहे तुझं, तू काही मला मुलगा देऊ शकणार नाहीस बहुतेक, पण मला मुलगी नकोय, तुला मागच्या वेळेसारखा गर्भपात करावाच लागेल, जोपर्यंत मुलगा होणार नाही तोपर्यंत असंच चालणार असं बोलून तो तावातावाने बाहेर गेला....

आता मात्र मी शहाणी झाले, मुलगी असेल तरी मी तिला जन्म देणारच अस मनाशी पक्क ठरवलंच, पण हे लोक माझं ऐकून घेणार नाहीत हीच भीती होती.

आणि एक दिवस काहीतरी निमित्त साधून घरातून बाहेर पडले!!! वाट मिळेल तशी चालत सुटले, किती वेळ चालत होते कोण जाणे पण मला स्वतःला आणि माझ्या मुलीला वाचवायचा होतं त्यामुळे चालतच राहिले. पोटात बाळ आणि अन्नाचा कणही नाही त्यामुळे चालता चालता डोळ्यांपुढे अंधेरी आली आणि मी खाली पडले पुढचं मला काहीच कळलं नाही,शुद्धीवर आले तेव्हा मी दवाखान्यात होते आणि एक मध्यम वईन बाई माझ्या बाजूला बसल्या होत्या, माझ्याकडे पाहून म्हणाल्या की आत्ता डॉक्टरकडून समजलं तुला दिवस आहेत ना? मग घर सोडून अशी वणवण का फिरते आहेस, त्या बाळाला आणि तुला त्रास होणार नाही का? !!

माझ्या डोळ्यात पाणी येऊन मी त्यांना म्हणाले की,"अहो ताई मी बाळालाच तर वाचवते आहे, म्हणूनच घरापासून दूर दूर पळते आहे". त्यांनी मला खरं काय ते विचारलं आणि मी ही अगदी लहानपणापासूनची सगळी हकीकत त्यांना सांगितली...

त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की तुला तुझ्या घरी तुझ्या माहेरी, जिथे तुझ्यासारख्याच आणखीही मुली आहेत तिथे यायला आवडेल का कायमच?!!!

मला एकदम आई मिळल्याचाच आंनद झाला आणि मी रडता रडता त्यांच्या मिठीतच शिरले....

ती माझी आई म्हणजेच आमच्या सरोजिनी ताई!!!

आता मला एक आठ वर्षाची मुलगी आहे, मला ताईंनी विचारले होते की तुला पुढे शिक्षण घ्यायचे आहे ना? मी ही हो म्हणाले, मग पदवीपर्यंत शिक्षण मी इथे पूर्ण केलं. आमच्या या माहेरी ताईंचा फक्त एकच नियम आहे तो म्हणजे माझ्यासारख्याच ज्या ज्या मुली इथे आहेत त्यांना ताई शिक्षण घ्यायलाच लावतात. त्या म्हणतात की इथे तुम्ही राहा, शिक्षण घ्या आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहा,मानानी जगा, कुणाच्याही कुबड्यांचा आधार घेऊ नका.

आज खरंच मी शिकले आणि माझ्या हिमतीने, ताईंच्या आशिर्वादाने आज मी वकिली करते आहे, सत्याची बाजू मांडते आहे...

मुलीलाही छान शिकवून कणखर बनवणार आहे, पण माझं घर आता एकच ते म्हणजे माझं माहेर".


सुजाताचं बोलणं संपलं तरी सगळ्यांचे कान आणि डोळे फक्त तिच्यावरच स्थिर होते...

चंदा स्टेजवर आली आणि तीही अनावर होऊन बोलायला लागली.


"माझं नाव चंदा, जयश्री आणि सुजाताप्रमाणेच मी ही अशीच या माहेरची होऊन गेले, तसं पाहिलं तर आम्ही तिघीच नाही तर आमच्या माहेर मधल्या प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी आहे...

मला असं म्हणायचं नाहीये की प्रत्येक घरातली माणसं किंवा प्रत्येक नवरा हा वाईट असतो, काही ठिकाणी खरच खुप छान असतात सासरची माणसं, नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही, दोघेही अगदी मिळून मिसळून राहतात. पण अजूनही काही ठिकाणी खरंच बायकांना अजिबात किंमत नसते, त्यांच्या विचारांना तर जाऊद्या त्यांना स्वतःलाच त्या घरात किंमत नसते...

माझी तर कहाणी वेगळीच आहे, माझंही बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं, सगळं कसं खूप छान चाललं होतं, मला पुढेही शिकायचं होत पण एक दिवस अचानक वडील हृदय विकाराच्या धक्याने गेले, घरात मी आणि आई दोघीच, कारण मला भाऊ बहीण कोणीच नाही, वडील गेले हे दुःख आईनी खूपच मनाला लावून घेतलं होतं, इतकं, की ती मध्ये मध्ये डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागायला लागली. मधूनच काही कारण नसताना ओरडा आरडा करायला लागली, आमचं घर म्हणजे एक चाळीवजा होतं, त्यामुळे रात्री बेरात्री आई ओरडायची, की सगळे आजूबाजूचे आमच्या घरी जमा व्हायचे.कधी पाणी भरायला म्हणून जायची आई पण तिथेही ती विनाकारण भांडण करायची, आणि अगदी मारायलाही धावायची. तशी मग तिची ट्रिटमेंट चालू केली मानसोपचार केंद्रामध्ये, थोडे दिवस चांगले गेले पण परत तिचा त्रास सुरू झाला आणि एकदम वेड्यासारखे हातवारे करायला लागली, कधीकधी तर मलाही मारायला अंगावर यायला लागली..

शेजारी पाजारी आता म्हणू लागले होते की ही बाई वेडी झाली आहे, हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला पाहिजे, नाहीतर ही कोणालाही मारेल...

मग मीच माझं मन घट्ट केलं आणि डॉक्टरना विचारून तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, बाबांनी जाताना जे काही थोडे फार पैसे ठेवले होते ते मी आईच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तिच्या नावावर ठेऊन दिले..

आता मी घरी एकटीच, आई नसली तरी माझा स्वतःचा खर्च तर करायला हवा ना म्हणून मी रोज नोकरी शोधण्यासाठी जाऊ लागले...

पंधरा दिवसच झाले असतील आईला तिकडे ठेऊन, आणि एक दिवस निरोप आला की आई झोपेतच गेली...

तिला घरी आणलं, तीचं सगळं कार्य मीच केलं, हॉस्पिटल मध्ये तिच्या नावावर ठेवलेले पैसे काही तिच्या कार्याला खर्च झाले, आणि उरलेले त्या हॉस्पिटलला डोनेट केले.

परत मी नोकरीच्या शोधात होते...

आमच्या बाजूला एक नवीनच बिऱ्हाड रहायला आलं होतं, माझ्याशी ओळख झाली त्यांची,आणि माझी सगळी कहाणी ऐकून त्यांनाही वाईट वाटलं, आणि मग मला त्या यमुताई म्हणाल्या की , नोकरी कशाला, तू लग्न कर ना,माझ्याकडे आहे एक स्थळ,तुला काही करावं लागणार नाही, सगळ्याला अगदी नोकर आहेत, अगदी राणीसारखी राहशील, माणसं चांगली आहेत पण त्यांच्या शब्दा बाहेर जायचं नाही, ते सांगतील तस करायचं,काय?....

मला पण आनंदच झाला!!!

मुलाकडचे, फक्त आई आणि मुलगा एवढेच बघायला आले होते, आणि माझ्याकडचे तर मी आणि बाजूच्या काकू एव्हढेच...

मुलाच्या आईला मी पसंत पडले, मुलालाही पसंत असावे असं मला आपलं वाटलं...

लग्न पुढच्याच आठवड्यात झालं...

त्यांचं घर खरच मोठं होत, लग्नाच्या दिवशी रात्री मी त्याची वाट पाहत असताना, त्याच आगमन झालं आमच्या खोलीत ते दारूच्या नशेतच, आमची पहिली रात्र साजरी झाली पण ती त्याच्या तोंडाला येणाऱ्या उग्र वासात आणि ज्या नात्याला प्रेम म्हणू शकणार नाही अश्या दादागिरीत...

आता प्रत्येक रात्र ही अशीच जाऊ लागली होती, रात्री बेरात्री तो घरी यायचा, दिवसभर कुठे असायचा, काय करायचा काहीही कळत नव्हतं, पण रात्री कितीही उशिरा आला तरी त्याची वासना मी शमवलीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही तर बळजबरी होती.

मला घरात सगळं मिळत होत पण सासुवाई मला बाहेर जाऊच द्यायच्या नाहीत, काय हवं ते सांग आम्ही आणून देतो असं म्हणायच्या, काही विचारायचं धाडस होत नव्हतं मला...

माझ्या बाबतीत काय चालले आहे ते काहीच कळत नव्हतं….

आणि एक दिवस ते धक्कादायक सत्य माझ्यासमोर आले...

माझा नवरा गेले आठ दिवस घरीच आला नव्हता.

मी सासूला विचारलं की हे कुठे बाहेरगावी गेले आहेत का?

तर!!!! बापरे!!! त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकते आहे असचं मला वाटायला लागलं...

त्या म्हणाल्या, तो गेला आता त्याच्या घरी!!,त्याचं काम झालं, आणि तो काही तुझा नवरा नाही आणि मी तुझी सासू नाही...

तुझ्या बाजूला ज्या राहतात त्यांनी दोन लाख रुपयांमध्ये तुझा सौदा केला आहे माझ्याशी...

आता नेहमी वेगवेगळी माणसं येतील त्यांना तू खुश ठेवायचं. तुला या घरात काही कमी पडणार नाही, तुला हवं ते सुख मिळेल, कपडालत्ता, सोनं नाणं, जे हवं ते खायला मिळेल, पण मला पैसे कमावून द्यायचे रोज रात्री!!!

बापरे!!! त्या बाईचे हे शब्द ऐकून मला इतका धक्का बसला मी भोवळ येऊन खालीच कोसळले.

मी शुद्धीवर आले तेव्हा दवाखान्यात होते आणि खोलीच्या बाहेर ती बाई बसली होती.

मला या बाईच्या कचाट्यातून सुटका करून घ्यायची होती, पण कशी?....

मग!! मी परत बेशुद्ध असल्याचं नाटक केलं, शुद्ध येईपर्यंत ती मला इथून नेऊ शकत नव्हती....

ती डॉक्टरांना म्हणाली की ही शुद्धीवर येईपर्यंत मी जरा काहीतरी खाऊन येते, पण शुद्ध आली की मी तिला लगेच घेऊन जाईन...

मला हाच चान्स होता, ती बाई कुठेतरी खाली गेली असावी....

मग मी नर्ससाठी असते ती बेल वाजवली.

मी शुद्धीवर आले आहे हे पाहून नर्सनी डॉक्टरांना बोलावून घेतलं, डॉक्टर आले आणि मला तपासू लागले, तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला वाचवा हो या बाईपासून!!!!

आणि मी थोडक्यात सगळी हकीकत डॉक्टरांना सांगितली..

ते ही देवासारखे धावून आले, आणि म्हणाले की थोडा वेळ बेशुद्ध असल्याचेच नाटक कर, पुढचं मी बघतो....

मग त्यांनी फोन करून कोणालातरी बोलावलं, आणि माझी जी सासू असणारी बाई होती तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं..

त्यांनी अजून एक फोन केला...

एक बाई माझ्यासमोर उभ्या होत्या, छान सात्विक भाव,डोळ्यात ममता.

त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, येशील ना तुझ्या घरी, तुझ्या माहेरी!!!!

डॉक्टर पण आले आणि त्यांनी या बाई कोण आहेत, त्यांचं कार्य काय आहे, माझ्यासारख्याच किती तरी मुलींना त्यांनी कसा आसरा दिला आहे ते सांगितले...

माझे डोळे भरून आले, आणि मी त्या बाईच्या, म्हणजेच आमच्या सरोजिनी ताईंच्या मिठीत शिरून खूप रडले...

तेव्हापासून आता माझं एकच घर, माझं माहेर"....


आमच्या तिघींचं बोलणं संपलं, आणि नीला ताई डोळे पुसतच माईक जवळ आल्या, पण काही बोलायच्या ऐवजी परत मागे गेल्या आणि सरोजिनी ताईंना घट्ट मिठी मारून म्हणाल्या,"खरंच तुमचं जे कार्य आहे त्यासाठी शब्द अपुरे आहेत, या मुलींना तुमच्यासारखी आई भेटली नसती तर काय झालं असत या मुलींचं, हा विचारही करवत नाही.

मग माईक जवळ येऊन नीला ताई म्हणाल्या,"ज्या मुलींवर असे प्रसंग येत असतील, मग त्या इथे असलेल्या सगळ्या तुमच्यासारख्या मुली असोत किंवा अजून ज्या ह्या प्रसंगातून जात असतील त्यांना सरोजिनी ताईंसारखी आई मिळाली पाहिजे..

पण खरं तर प्रत्येक स्त्री मध्ये अश्या सरोजिनी ताई जन्माला आल्या पाहिजेत नाही का?, एका स्त्री नेच दुसऱ्या स्त्री ला संकटाच्या वेळी मदत केली पाहिजे, तरंच हे जे समाजात स्त्रीयांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्याला आळा बसेल.

सरोजिनी ताई, तुम्ही सगळ्या जणी,आणि आता मी सुद्धा या आपल्या कार्यात सामील होणार आहे...

पण खरं तर जर एखाद्या स्त्री ची बाजू सत्याची असेल तर हे अत्याचार होण्या आधीच, आपल्या घरातीलच आई, सासू,बहीण, नणंद या सगळ्यांनीच ठरवलं की आपल्या घरातल्या स्त्री वर ही परिस्थिती येऊ द्यायची नाही, नाही होऊ द्यायचे कोणतेही अत्याचार. आपणच जर एकमेकांबरोबर उभे असू तर समोरच्या कोणाची हिम्मतच होणार नाही त्या स्त्रीला बेअब्रू करण्याची...

या माहेरसारखीच लाखो माहेर प्रत्येकाच्या घरा घराततच तयार व्हायला हवीत...

सासुपण दाखवण्यापेक्षा सुनेला आईपण द्यायला हवे, माहेरी असो किंवा सासरी असो प्रत्येकीच्या नात्यांमध्ये अधिकार असण्यापेक्षा एकमेकांबद्दल खात्रीचे प्रेम हवे ,नाही का?".....

खरच!!!! अश्या सरोजिनी ताई प्रत्येकाच्या घरातच असतील तर त्यामुळे स्त्रियांवरचे अत्याचार थांबायला खूपच मदत होईल,

ज्यामुळे स्त्री अबला नाही तर सबला होईल, आणि मग तिच्या स्वतःचीच नाही तर कुटुंबाचीही भरभराट ती करू शकेल,

खरंय ना???.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy