होळी रे होळी पुरणाची पोळी
होळी रे होळी पुरणाची पोळी
होळी जवळ आली म्हणून जरा वेगळ्या पध्दतीची पुरणपोळीची रेसीपी सर्च करीत असताना शेजारी बसलेल्या नातवाने मला विचारले,"आजी होळी का पेटवतात? त्या दिवशी पुरणपोळीच का करतात?"
मग मी माझ्या परीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला.अरे आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणांमागे शास्त्रीय व वैज्ञानिक कारण तर असतेच.पण त्या बरोबर सांस्कृतिक वारसा ही आहे. हिंदूंचे वर्ष चैत्र महिन्यात पाडव्याला सुरु होवून शेवटच्या फाल्गुन महिन्यात होळीला समाप्त होते. चैत्र ते फाल्गुन दर महिन्याला एक धार्मिक सण असतोच. आणी त्या मागे वैज्ञानिक कारणे असतातच.
तसेच आता काही दिवसांनी येणाऱ्या होळी सणाला ही काही कारणे आहेत.आता ऐक. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने पाठविलेल्या होलिकादेवतेचा श्री विष्णूने वध केला.तिला अग्नि जाळू शकणार नाही. असा वर असल्यामुळे प्रल्हादाला मांडीवर घेवून तिने अग्नि प्रवेश केला.त्यात प्रल्हाद वाचला व होलिकेचे दहन झाल्याचा आनंद लोकांनी नाचून व बोंबा मारून आनंद व्यक्त केला. तेव्हां पासून होळी पेटवून नारळाच्या झावळ्यांनी सजवून व ह्या दिवसात झालेल्या पानगळीचा पानांचा कचरा होळीत जाळून परिसर स्वच्छ करण्याचा प्रघात आहे. व वाईट प्रवृत्ती नष्ट केल्याचाआनंद म्हणून त्या भोवती नाच करुन बोंबा मारतात.तसेचह्या दिवसात आलेल्या नवीन पिकांचा नैवेद्य दाखवून होलिकेदेवीला अर्पण करून आनंद साजरा करतात.आणखीण एक कथा प्रचलित आहे.'हुंडा' नावाची राक्षसीण बालकांना त्रास देत असे. परंतु या दिवशी बोंब मारली असता ती पळून जाते असे म्हणतात. त्यामुळेच या दिवशी बोंब मारण्याची प्रथा पडली असावी.
ह्या दिवसात शेतीची कामे संपल्यामुळे शेतकरी निवांत असतो.कोकणात रात्री पालखी सजवून गावात मिरवणूक काढून होळी साजरी केली जाते.नवीन आलेल्या हरबऱ्याच्या डाळीची पुरणपोळी करून तिचा नैवेद्य दाखवला जातो.मुलांना पुरणपोळीचा आनंद मिळतो म्हणून मुले होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडतात.दुसर्या दिवशी होळीची राख एक मेकांच्या अंगाला फासून ओल्या मातीचे लिंपण अंगाला करतात.त्यालाच दुसर्या दिवशी 'धुळवड'असे म्हणतात.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व वृक्षतोड रोखण्यासाठी पानगळीच्या पानांचा व सुकलेल्या निरर्थक लाकडांचीच होळी करावी. व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा.